पुणे- उद्या कात्रज कोंढवा रस्त्याच्या कामाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम स्थानिक आमदाराच्या पुढाकारातून करण्याचा प्रकार म्हणजे या आमदाराच्या ‘उद्योगांवर ‘पांघरून घालू पाहण्याचा प्रकार आहे . दुसऱ्याने केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार आहे अशी टीका राष्ट्रवादीचे कात्रज येथील नगरसेवक प्रकाश कदम यांनी केली आहे.
ते म्हणाले माझ्या पत्नीने म्हणजे भारती कदम यांनी नगरसेवक असताना या रस्त्याच्या कामासाठी सातत्याने 9 वेळा निवेदने देत या कामाचा पाठपुरावा केला एवढेच नव्हे तर खुद्द अजितदादा पवार यांच्या कानावर येथील समस्या घालून या प्रकरणी तातडीने बैठक लावली आणि तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष अश्विनी कदम यांनी याप्रकरणी प्राथमिक १५ कोटीची सर्वप्रथम तरतूद करून या कामाला प्रारंभ केला . पुन्हा त्यासाठी आम्ही भाजपची सत्ता आल्यावर आंदोलनेही केली .आता हे काम अंतिम टप्प्यात येवून कामाचा प्रारंभ होत असताना निव्वळ श्रेय लाटण्यासाठी स्थानिक आमदाराच्या पुढाकाराने भूमिपूजनाचा घाट घालून आमदाराच्या उद्योगांकडे दुर्लक्ष कसे होईल यासाठी भूमिपूजनाचा समारंभ मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत करण्यात येतो आहे .वास्तविक पाहता राष्ट्रवादीने या कामासाठी केलेले सर्व प्रयत्न यामुळेच या कामाला प्रारंभ होणार आहे असेही ते म्हणाले .
आमदाराच्या ‘उद्योगांवर ‘पांघरून घालण्यासाठी फसव्या भूमिपूजनाचा घाट- प्रकाश कदम
अनुपम खेर यांचा एफटीआयआयच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
मुंबई- बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांनी बुधवारी फिल्म अॅण्ड टेलीव्हिजन इन्सिट्यूट ऑफ इंडियाच्या (एफटीआयआय) अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. व्यस्त असल्यामुळे अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे खेर यांनी सांगितले आहे.
अनुपम खेर यांनी आपला राजीनामा माहिती व प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांच्याकडे पाठविला आहे. प्रतिष्ठित संस्थेच्या अध्यक्षपदावर संधी मिळणे, हा माझ्यासाठी मोठा सन्मान होता, असे खेर यांनी म्हटले आहे.
माहिती व प्रसारण मंत्रालयाने 11ऑक्टोबर 2017 रोजी अनुपम खेर यांची ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. मात्र, या नियुक्तीनंतर विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पसरली होती. सत्ताधारी भाजपच्या जवळील व्यक्तीची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याची टीकाही झाली होती. त्यामुळे वर्षभरातच अनुपम खेर यांनी संस्थेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
सीमेवरील सैनिकांना नगरसचिव कार्यालयाकडून दिवाळी फराळ
पुणे-देशात दिवाळी साजरी होत असताना सीमेवर लढणाऱ्या जवानांसाठी आज महापालिकेतील नगरसचिव कार्यालयाने आपल्या तर्फे दिवाळी फराळ पाठविला .
नगरसचिव कार्यालयातील सर्व अधिकारी सेवक यांनी आपल्या स्वखर्चाने दिवाळी फराळ घेऊन आज तो महापौर मुक्ता टिळक आणि सभागृहनेते श्रीनाथ भिमाले ,उपमहापौर सिद्धार्थ धेंडे,स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक यांच्या सुपूर्त केला .सीमेवरील रँक एन के ,युनिट १८ चे तुषार अशोक शेटे यांच्यामार्फत मराठा बटालियन पर्यंत पोस्ट पार्सल ने हा फराळ पाठविण्यात येतो आहे . नगरसचिव सुनील पारखी ,उपनगरसचिव राजेंद्र शेवाळे आणि नगरसचिव कार्यालयातील सर्व सेवक यावेळी उपस्थित होते .
एमसीई सोसायटीच्या वतीने चार कला शिक्षकांचा ‘अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार’२०१८ देवून सन्मान
पुणे :
‘महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटी’च्या ‘पी.ए.इनामदार कॉलेज ऑफ व्हिजुअल इफेक्ट्स, डिझाइन अॅण्ड आर्ट (Veda) च्या वतीने अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार २०१८-१९ चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे चौथे वर्ष होते.
भारतीय रुपयाच्या नव्या डिझाईनचे डिझायनर डॉ उदय कुमार धर्मालिंगम यांच्या हस्ते वैभव कुमरेश (2 डी अॅनिमेटर), सुधाकर चव्हाण (आर्टिस्ट), नितीन देसाई (चित्रपट निर्मिती), रावसाहेब गुरव (आर्टिस्ट) या कलागुरूंंचा गौरव करण्यात आला, अशी माहिती प्राचार्य ऋषी आचार्य यांनी पत्रकाद्वारे दिली.
यावेळी एम.सी.ई.सोसायटीचे अध्यक्ष डॉ. पी.ए.इनामदार, सचिव लतिफ मगदूम, सहसचिव प्रा.इरफान शेख, प्राध्यापक आणि कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
१७ व्या आंतरराष्ट्रीय अॅनिमेशन डे निमित्त हा कार्यक्रम आझम कॅम्पसमध्ये रविवारी झाला.
आर्टिस्टच्या कामासाठी उत्कटता असणे आवश्यक आहे. जगावर राज्य करण्यासाठी आपण स्वत:ला शोधण्याचा प्रयत्न करावा असे मार्गदर्शनपर उद्गार डॉ उदय कुमार धर्मालिंगम यांनी काढले.
अखिल भारतीय कला शिक्षक गौरव पुरस्कार’ हा भारतातील सर्व महाविद्यालयातील अॅनिमेशन, कला, ललित कला आदी क्षेत्रातील शिक्षकांना लक्षणीय योगदान आणि उत्तुंग कामगिरीसाठी देण्यात येतो.
दरवर्षी चार पुरस्कार कला क्षेत्र, ग्राफीक डिझाईन, अॅनिमेशन, व्हिजुअल इफेक्ट्स, स्पेशल ईफेक्ट्स, क्रिएटिव्ह फोटोग्राफी, पेंटींग क्राफ्ट, शिल्पकला, ललित कला, साहित्य, चित्रपट या क्षेत्रातील कलाकार आणि शिक्षकांना, कलागुरुंना देण्यात येतात.
महापौर मुक्ता टिळक यांनी बँक ऑफ महाराष्ट्रच्या पुणे पूर्व अंचल कर्मचार्यांना सतर्कता प्रतिज्ञा दिली
पुणे– केंद्रीय सतर्कता कामिशनच्या मार्गदर्शक तत्वांनुसार दिनांक 29 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2018 दरम्यान बँक ऑफ महाराष्ट्रमद्धे ‘सतर्कता सप्ताह’ आयोजित करण्यात येत आहे. या सप्ताहाचे आयोजन बँकेच्या सर्व शाखा, अंचल कार्यालये आणि महाराष्ट्र ग्रामीण बँक येथे करण्यात येत आहे.
पुणे पूर्व अंचल येथे आयोजित करण्यात आलेल्या सतर्कता सप्ताहाचा प्रारंभी महापौर मुक्ता टिळक यांनी उपस्थितांना सतर्कता प्रतिज्ञा दिली. स्वत: महापौरांनी इलेक्ट्रोंनिक माध्यमातून वेबसाईटद्वारे ‘ऑन लाईन प्रतिज्ञा’ घेऊन या सप्ताहाचा प्रारंभ केला. यावेळी अंचल प्रमुख श्री मानियार म्हणाले की, प्रत्येक नागरिकाने शपथेप्रमाणे वर्तणूक करून भारताला भ्रष्टाचार मुक्त करायला हवे. यावेळी बँक कर्मचार्यांसाह आय पी सक्सेना अकादमीचे प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
या सप्ताहामध्ये प्रामाणिकपणाची वृद्धी आणि भ्रष्टाचाराचे निर्मूलन करण्याच्या व्यापक कार्यात जनसामान्यांना सामील करण्याच्या उद्दीष्ट संकल्पनेसाठी बँकेद्वारा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भ्रष्टाचारमुक्त समाजनिर्मितीच्या कार्यासाठी सर्वसामान्यांच्या प्रबोधनाकरिता नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले आहे. भ्रष्टाचार निर्मूलन संबंधित विषय घेऊन शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच बँक कर्मचारी यांसाठी वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. बँकेचे कर्मचारी आणि अधिकारी वेबसाईटद्वारे ‘ऑन लाईन प्रतिज्ञा’ घेत आहेत. सप्ताहाचा समारोप 3 नोव्हेंबर रोजी बँकेच्या मुख्य कार्यालयात होईल.
माणसातील ईश्वरावर प्रेम करा : डॉ. डी. वाय. पाटील
“प्रदूषण मुक्त भारत साठी कर्वे समाज कार्य महाविद्यालयाचा पुढाकार : पुणे व पिंपरी –चिंचवड शहरातील सिग्नल्सवर ठिकठिकाणी जनजागृती
पुणे: पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील चार चाकी, दुचाकी व अवजड वाहनांचे वाढते प्रमाण व त्यामुळे भेडसावणारी प्रदूषनाची भीषण समस्या यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचे एक नवीन तंत्रज्ञान कर्वे समाज सेवा संस्थेच्या रिसर्च व कन्सल्टंशी विभागाने कमिन्स ग्रुप इंडिया कंपनीच्या मदतीने विकसित केले असून इंधनाचा अपव्यय टाळीत प्रदूषण मुक्त भारत साठी गेल्या आठवडाभर समाजकार्य कमहाविद्यालयाचे विद्यार्थी पुणे” व पिंपरी –चिंचवड परिसरातील महत्वाच्या सिग्नल्स वर उभे राहून लोकांना यासंबंधी जागृत करण्याचे काम करीत आहेत.
पुणे शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत्या वाहनांचे प्रमाण व त्यामुळे होणार्या धुराच्या प्रदूषणामुळे पुणेकर श्वसानाच्या विविध आजारांना बळी पडत असून या भीषण समस्येवर एक शास्वत व कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून प्रथम वाहन चालकांनाच योग्य ते प्रशिक्षण देऊन हे प्रदूषण टाळत इंधनाची देखील बचत करण्यासाठी कर्वे समाज सेवा संस्थेच्या रिसर्च व कन्सल्टंशी विभागाचे प्रमुख व महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर यांनी प्रथम वाहनचालकांसाठी मोफत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित केले तर गेल्या आठवडाभरापासून ते पुणे पोलीस वाहतूक शाखेचे कर्मचारी व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने ठिकठिकाणी जनजागृती करण्याचे काम करीत आहेत. या उपक्रमाचा फायदा बहुतांशी वाहनचालकांना होत असून शहरातील प्रदूषणाची पातळी कमी करण्यासाठी व इंधनाचा अपव्यय देखील टाळण्यासाठी करण्यात येत असलेल्या मार्गदर्शनाचा फायदा सर्व वाहनचालकांना व परिणामी पुणेकरांना होत असल्याची भावना पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी व वाहनचालक यांनी व्यक्त केली आहे.
कर्वे समाज सेवा संस्थेचे प्रभारी संचालक डॉ महेश ठाकूर, डॉ. चित्रलेखा राजुस्कर, कमिन्स ग्रुप इंडिया चे व्यवस्थापक सचिन वाघ, उप महाव्यवस्थापक महेश बिराजदार, मानवसंसाधन अधिकारी शलाखा भोसले, कार्यक्रम अधिकारी रुपेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य महाविद्यालयाच्या मानव संसाधन विभागाच्या प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ठिकठिकानच्या सिग्नल्स वरील वाहनचालकांना लाल सिग्नल सुरु असताना पुढील हिरवा सिग्नल चालू होईपर्यंत दुचाकी- चारचाकी बंद करून इंधनाचा अपव्यय टाळून कशापद्धतीने आपण कार्बन डाय ओक्साईड व इतर घातक घटकांपासून फुफ्फुसांचे किंवा श्वसनाचे आजार टाळू शकतो तसेच सर्वच प्रकारचे प्रदूषण देखील टाळले जाऊ शकते शिवाय इंधनाची देखील बचत करू शकतो यासंबंधी सिग्नल असतानाच्या काळात विविध पोस्टर्स द्वारे तसेच वैयक्तिक मार्गदर्शन करून प्रबोधन व जनजागृती करण्याचे काम केले.
पीएमआरडीएच्यावतीने नसरापूर येथे प्रधानमंत्री आवास योजनेचे प्रशिक्षण
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा (पीएमआरडीए)च्या वतीने भोर तालुक्यातील नसरापूर
पंचायत समितीच्यावतीने दि. ३१ ऑक्टोबर रोजी प्रधानमंत्री आवास शहरी योजना नेमकी काय आहे याचा लाभ
नागरिकांनी कसा घ्यावा याविषयी नागरिकांना प्रशिक्षण देण्यात आले.
कार्यशाळेत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांद्वारे वैयक्तिक स्वरूपातील घरकुल बांधण्यास अनुदान असून
घरकुल बांधकामासाठी शासकीय अनुदान व्यतिरिक्त उर्वरित रकमेची सोय इच्छुक कुटुंबाला स्वतः करावी लागेल
तसेच कुटुंबाच्या मालकीचा खुला भूखंड किंवा कुटुंबाच्या मालकीच्या भूखंडावर कच्च्या स्वरूपाचे घर किंवा कुटुंबाच्या
मालकीच्या भूखंडावर सुधारणा होऊ शकेल असे घर असणे आवश्यक आहे. यात लाभार्थ्याला ३०० sqft चटई क्षेत्राचे
घर बांधता येणार असून २.५० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त होणार आहे यासाठी वार्षिक उत्पन्न ३ लक्ष पेक्षा कमी
असलेले लाभार्थी पात्र होणार आहेत हे सांगण्यात आले.
आमदार संग्राम थोपटे यांनी उपस्थित नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजेना सर्वासाठी फायदेशीर असून सर्व
नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे सांगितले. पंतप्रधान आवास योजनेची माहिती लोकांपर्यंत
पोहोचविणेसाठी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्याला योजना व अर्ज भरणेबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे
आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास ३०० ग्रामस्थ उपस्थित होते.
यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांचेकडून अतिरिक्त आयुक्त प्रवीण देवरे यांच्याकडून ग्रामस्थांना
मार्गदर्शन करण्यात आले. यास लाभार्थ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. यावेळी आमदार संग्राम थोपटे, कार्यकारी
अभियंता युवराज नाकाडे, जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल गव्हाणे, विस्तार अधिकारी आर, आर. राठोड, राजू चांदगुडे,
सरपंच, सदस्य व पुणे महानगर विकास प्राधिकरणाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. पंतप्रधान आवास
योजनेकरिता अर्ज करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या http://pmrdapmay.com या
संकेतस्थळावर नागरिकांनी अर्ज करावा.
दिवाळी पहाट निमित्त गदिमा आणि बाबूजी यांना सांगितिक मानवंदना
पुणे :
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत दिवाळी पहाट च्या निमित्ताने गोल्डन मेमरीज निर्मित ‘गान वंदना’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘च्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत हा ६१ वा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्या माध्यमातून गदिमा आणि सुधीर फडके (बाबूजी ) यांचा जीवनपट उलगडला जाऊन त्यांना सांगितिक मानवंदना दिली जाणार आहे, अशी माहिती ‘भारतीय विद्या भवन’चे मानद सचिव आणि कार्यक्रमाचे संयोजक प्रा. नंदकुमार काकिर्डे यांनी पत्रकाद्वारे दिली.
ग. दि. माडगूळकर (ग.दि.मा) आणि सुधीर फडके (बाबूजी) यांच्या जन्म शताब्दीनिमित्त आयोजित हा कार्यक्रम सोमवार दिनांक ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजता ‘भारतीय विद्या भवन‘चे ‘सरदार महादेव बळवंत नातू सभागृह‘, सेनापती बापट रोड येथे होणार आहे.
‘भारतीय विद्या भवन‘ आणि ‘इन्फोसिस फाऊंडेशन‘ आयोजित हा पहिलाच दिवाळी पहाट कार्यक्रम आहे.
शशांक दिवेकर, चैत्राली अभ्यंकर, हेमंत वाळुंजकर हे गायक गीते सादर करतील. प्रसन्न बाम, राजेंद्र हसबनीस, राजेंद्र साळुंखे हे साथसंगत करतील. कार्यक्रमाचे निवेदन स्नेहल दामले करणार असून, कार्यक्रमाची निर्मिती आणि संकल्पना चैत्राली अभ्यंकर यांचे आहे.
‘गोल्डन मेमरीज’ संस्था गेली चार वर्षे महाराष्ट्रभर गीतांचा प्रसार करीत आहे. ५ नोव्हेंबर २०१८ रोजी संस्थेचा पाचवा वर्धापनदिन आहे. या पाच वर्षात संस्थेच्या वतीने विविध प्रकारचे एकूण ३८७ कार्यक्रम सादर केले आहेत, अशी माहिती गोल्डन मेमरीज संस्थेच्या चैत्राली अभ्यंकर यांनी दिली.
खासदार संजय काकडे यांच्या मध्यस्थीने कामगार व पीएमपीएलमधील तिढा सुटला-पीएमपीएलच्या 9500 कामगारांना पहिल्यांदाच मिळणार दिवाळीपूर्वी बोनस!
पुणे : पीएमपीएल कामगारांची यंदाची दिवाळी चांगली जाणार आहे. पीएमपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यामुळे हे शक्य झाले आहे. राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या मध्यस्थीने पीएमपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे व कामगार संघटना यांच्यामध्ये आज झालेल्या बैठकीत पीएमपीएलच्या कामगारांना दिवाळीपूर्वी बोनस देण्याचा निर्णय झाला. कामगारांना पहिल्यांदाच दिवाळीपूर्वी बोनस मिळणार असून याचा फायदा तब्बल 9500 कामगारांना होणार आहे. तसेच, बदली रोजंदारी सेवक म्हणून काम करणाऱ्या कामगारांनादेखील येत्या जानेवारीपर्यंत कायम करण्यात येणार असल्याने कामगारांची दिवाळी खऱ्या अर्थाने आनंदमय होणार आहे.
पीएमपीएल सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही पुणे व पिंपरी-चिंचवड शहराची लाईफलाईन समजली जाते. परंतु, कायमच या व्यवस्थेकडे दुर्लक्ष झाल्याने ही व्यवस्था सतत समस्यांनी ग्रस्त राहिली. पीएमपीएलच्या कामगारांना आतापर्यंत दिवाळीनंतर बोनस मिळायचा. दिवाळीसारख्या सणाला देखील या कामगारांची परवड होत असे. मात्र, आज राज्यसभेचे खासदार व भाजपचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यासोबत पीएमपीएल कामगार संघटनेच्या प्रतिनिधींना बरोबर घेत तब्बल दीड तास बैठक घेतली. यामध्ये कामगारांच्या प्रलंबित मागण्यांवर ठोस आश्वासन नयना गुंडे यांनी दिले. तसेच, शहराची ही लाईफलाईन म्हणजे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पीएमपीएलला सर्वोतोपरी मदत करण्याची भूमिका खासदार संजय काकडे यांनी घेतली आहे.
पीएमपीएलच्या अध्यक्षा व व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांच्यासोबत झालेल्या बैठकीस भाजपच्या माथाडी कामगार आघाडीचे अध्यक्ष दिनेश धाडवे, तुषार पाटील, पीएमपीएल कामगार संघटनेचे सुनील नलावडे, हरिश ओव्हाळ, कैलास पासलकर, उद्धव भोसले, उल्हास मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
पीएमपीएलची सेवा सुधारण्यासाठी 3200 बसेसची गरज असल्याची बाब नयना गुंडे यांनी निदर्शनास आणून दिली. तसेच, सध्या 1700 बसेस असून त्यातील 1400 बस सुरु आहेत आणि 300 बसेस ब्रेक डाऊन आहेत. तेजेस्विनीच्या 33 बसची नवीन खरेदी होत असून 400 बसेस खरेदीचे टेंडर फायनल झाले असल्याचे व्यवस्थापकीय संचालक गुंडे यांनी सांगितले. एकूण बसेसची संख्या व दोन्ही शहरांतील लोकसंख्या लक्षात घेता नवीन बसेस खरेदी करण्यासंदर्भात त्वरित निर्णय घ्यावेत. त्यासाठी राज्य व केंद्र सरकारकडून मदत मिळवून देण्यासाठी आपण निश्चित मदत करू, असे खासदार काकडे यांनी सांगितले.
पीएमपीएलची बस वेळेत यावी व त्याचे वेळापत्रक सर्वांसाठी उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्येक बस मार्गाचे सर्वेक्षण करून नवीन वेळापत्रक बनवावे. अडीच कोटीचे स्पेअर पार्ट पडून असून काही अधिकाऱ्यांनी त्याची विनाकारण खरेदीदेखील केली आहे. यासंबंधी चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधीत अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. पीएमपीएलच्या कर्मचाऱ्याविषयी अनेकदा तक्रारी येतात. परंतु, त्याची शहानिशा न करताच कारवाई केली जाते. यापुढे असे न करता संबंधीत तक्रारीची सखोल चौकशी करूनच कारवाई करावी. कामगारांना वैद्यकीय रजा मिळाव्यात, कामाचे तास सोईस्कर व कायदेशीर असावेत आणि त्यांना वैद्यकीय सहाय्य योजना लागू करावी. महिला सफाई कर्मचाऱ्यांची कामाची वेळ पहाटे 5 ऐवजी 6 करावी आदी मागण्या खासदार संजय काकडे यांनी यावेळी केल्या. या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय लवकरच घेऊ, असे व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे यांनी आश्वासन दिले.
मुख्यमंत्र्यांनी पापात धनी होऊ नये -आ. टिळेकरांवरून शिवसेनेचा टोला (व्हिडीओ) कात्रज कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन शिवसेनेकडून संपन्न
पुणे- उद्या भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या पुढाकाराने कात्रज कोंढवा रस्त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत असताना ,तत्पूर्वीच म्हणजे आज सकाळीच शिवसेनेने माजी आमदार महादेव बाबर आणि स्थानिक नगरसेविका संगीता ठोसर यांच्या प्रमुख उपस्थितीत या रस्त्याचे भूमिपूजन करून भाजपला तडाखा दिला आहे .
या वेळी माजी आमदार महादेव बाबर आणि नगरसेविका संगीता ठोसर यांनी सांगितले कि, ‘या रस्त्याचे काम रखडल्याने कित्येक जीव अपघातात बळी गेले . निव्वळ मलिदा खाण्यासाठी या रस्त्याची टेंडर प्रक्रिया राबविली गेली , आणि चारवेळा निविदा काढल्या गेल्या शिवसेनेच्या नगरसेविका संगीता ठोसर यांनी वारंवार यावर आंदोलने केली सभागृहात आवाज उठविला . मनसे आणि राष्ट्रवादीनेही मलिदा खाण्याचा डाव उधळून लावण्यात मोठी महत्वपूर्ण भूमिका निभावली . आता कुठे या साऱ्या प्रयत्नांना यश येत असताना भ्रष्टाचारी आमदाराच्या नादी निष्कलंक मुख्यमंत्र्यांनी लागू नये आणि त्यांच्या पापात धनी होऊ नये .
आमदार या कामाचे श्रेय लादू पाहत आहेत .पण हे काम महापालिकेच्या माध्यमातून होते आहे . यात आमदारांचा एक पैशाचाही संबध नाही . आम्ही सातत्याने संघर्ष करून कात्रज कोंढवा रस्त्याची आमदारांनी निर्माण करून ठेवलेला तिढा आता सोडविला आहे . त्यामुळे आता त्यांना भूमिपूजनाचा नाही तर भूमिपूजनाचा हक्क आम्हाला आहे
बँक ऑफ महाराष्ट्र पुन्हा प्रगतीपथावर; तिमाहीत 27 कोटींचा निव्वळ नफा
वार्षिक आधारावर दुसर्या तिमाहीमधे 15 % सुधारणा होवून कार्यान्वयन नफा रु.794 कोटी.
पुणे–: बँक ऑफ महाराष्ट्रचे कार्यकारी संचालक श्री. ए. सी. राऊत आणि सरव्यवस्थापक आणि मुख्य वित्त अधिकारी श्री व्ही पी श्रीवास्तव यांनी आर्थिक वर्ष 2018-19 च्या दुसर्या तिमाही अखेरचे आर्थिक निकाल आज जाहीर केले.
यावेळी बोलताना श्री राऊत म्हणाले की, बँकेने आर्थिक वर्ष 2018-19 च्या दुसर्या तिमाहीमध्ये टर्न आराऊंड केला असून बँक आता नफा दर्शवत आहे. आपल्या भागधारकांना चांगला परतावा मिळण्यासाठी आणि सातत्यपूर्ण वृद्धीसाठी बँक निरंतर प्रयत्न करत आहे.
कार्यक्षमतेमध्ये सुधार, किरकोळ (रिटेल) कर्जामध्ये वृद्धी तसेच ग्राहक आणि भागधारकांच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढण्यावर बँकेने आपले लक्ष केन्द्रित केले आहे.
कामगिरीची ठळक वैशिष्टे
- नफा
Ø बँकेने या आर्थिक वर्ष 2018-19 च्या दुसर्या तिमाहीमध्ये रुपये 27.00 कोटींचा निव्वळ नफा मिळवला आहे. मागील वर्षीच्या दुसर्या तिमाहीत बँकेला रु. 23.24 कोटीचा तोटा झाला होता. कर भरणा पश्चात गेल्या दहा तिमाहींपासून (मार्च 2016 पासून) होणार्या तोट्यावर वर्ष 2019 मधील दुसर्या तिमाहीमध्ये बँकेने टर्न आराऊंड करून निव्वळ नफा नोंदवला आहे.
Ø कार्यान्वयन नफ्यामधील वाढ 15% असून आर्थिक वर्ष 2018 मधील दुसर्या तिमाहीमध्ये हा नफा रु. 692 होता आणि आता या तिमाहीमध्ये तो रुपये 794 कोटी झालेला आहे. कार्यान्वयन नफ्यामधील वाढ ही मुख्यत: निव्वळ व्याजावरील उत्पन्नामध्ये वाढ, बुडीत कर्जामधील वसूली आणि कार्यान्वयीन खर्चांमध्ये केलेल्या कपातीमुळे झालेली आहे.
Ø आर्थिक वर्ष 2019 मधील दुसर्या तिमाहीमध्ये कार्यान्वयीन खर्चामध्ये 4% ने घट झाली आहे. गतवर्षीच्या दुसर्या तिमाहीमद्धे कार्यान्वयीन खर्च रु 640 कोटी होता तो या वर्षीच्या दुसर्या तिमाहीमध्ये रु. 613 कोटी झाला आहे.
Ø व्याजेतर उत्पन्नामध्ये 10% वाढ झालेली आहे. गतवर्षीच्या दुसर्या तिमाहीमद्धे व्याजेतर उत्पन्न 369 कोटी इतके होते तर या वर्षीच्या दुसर्या तिमाहीमध्ये ते रु. 405 कोटी झाले आहे.
Ø निव्वळ व्याज उत्पन्न या वर्षीच्या दुसर्या तिमाहीमध्ये रु 1003 कोटी झाले. गतवर्षी व्याजावरील निव्वळ उत्पन्न 963 कोटी होते. ही वाढ 4% आहे.
Ø आर्थिक वर्ष 2017-18 साठी 2.64% च्या तुलनेत निव्वळ व्याजामधील अंतर (नेट इंटरेस्ट मार्जिन) यामध्ये सुधारणा होवून ते आर्थिक वर्ष 2018-19 साठी 2.76% राहिले.
Ø आर्थिक वर्ष 2017-18 च्या दुसर्या तिमाहीच्या रु 1972 कोटींच्या व्याजावरील व्ययाच्या तुलनेत तुलनेत 9.46% ची मोठी सुधारणा होवून आर्थिक वर्ष 2018-19 साठी हा खर्च रुपये 1785 कोटी राहिला. कासा प्रकारामध्ये (बचत आणि चालू खाते मधील ठेवी) वाढ याबरोबरच अधिक मुल्याने आणलेल्या कर्जाची परतफेड (उदा. टायर 1 आणि टायर 2 बोण्ड्स) यामुळे व्याजावरील खर्च कमी झालेला आहे.
Ø मागील वर्षाच्या दुसर्या तिमाहीस ठेवींवरील मूल्यदर 5.44% च्या तुलनेत या आर्थिक वर्षीच्या दुसर्या तिमाहीस तो 5.03% होवून 0.41 ने कमी झाला आहे.
Ø मूल्य आणि उत्पन्न यांच्या गुणोत्तरमध्ये 450 बीपीएसने वृद्धी झाली. मागील वर्षाच्या दुसर्या तिमाहीस हे गुणोत्तर 48.06% होते त्याच्या तुलनेत या आर्थिक वर्षीच्या दुसर्या तिमाहीस गुणोत्तर 43.56% झाले.
Ø या वर्षीच्या दुसर्या तिमाहीस जुन्या बुडीत कर्ज खात्यामधील वसूली जोमदार होवून तिची वाढ 882% झाली. मागील वर्षीच्या दुसर्या तिमाहीस 13.47 कोटी रुपयांची वसूली या वर्षीच्या तिमाहीस 132.33 कोटी झालेली आहे.
- व्यवसाय
Ø बँकेचा एकूण व्यवसाय 30 सप्टेंबर 2017 मधील रुपये .2,28,062 कोटी वरून या वर्षीच्या दुसर्या तिमाहीमध्ये रु. 2,26,069 कोटी इतका झाला आहे.
Ø बँकेची एकूण कर्जे 30 सप्टेंबर 2018 रोजी रुपये 90,542 कोटी आहेत जी दिनांक 30.09.2017 रोजी रु. 92,965 कोटी इतकी होती.
Ø रिटेल कर्जे (किरकोळ कर्जे) या प्रभागामध्ये 15% वाढ झाली आहे. ही वाढ 30.09.2017 मधील रुपये 13,303 कोटींवरून 30.09.2018 रोजी 15,331 झाली आहेत.
Ø बँकेच्या एकूण ठेवी 30 सप्टेंबर 2017 रोजी रु 1,35,097 कोटी होत्या त्या आता दिनांक 30.09.2018 रोजी 1,35,527 कोटी झाल्या आहेत.
Ø कासा ठेवींचे प्रमाण वाढून दिनांक 30.09.2018 रोजी 46.25% झाले जे गतवर्षी दुसर्या तिमाहीस 44.26% इतके होते.
Ø एकूण ठेवींमधील किरकोळ ठेवीचे प्रमाण (कासा + किरकोळ मुदत ठेवी) यामध्ये 30.09.2017 रोजीच्या 95.91% तुलनेत 30.09.2018 रोजी 97.16% झाले आहे.
Ø एकूण गुंतवणुकीमध्ये 38% ने वाढ झाली आहे.30.09.2017 रोजी एकूण गुंतवणूक रुपये 37466 कोटी होती ती आता 30.09.2018 रोजी रु. 51662 कोटी इतकी झाली आहे.
- थकीत कर्जे व्यवस्थापन :
Ø मालमत्तेच्या गुणवत्तेमद्धे सुधारणा झालेली आहे. दिनांक 30.09.2017 रोजीची एकूण थकीत कर्जे रु. 17239 वरून दिनांक 30.09.2018 रोजी 16873 कोटी झालेली आहेत. सकल थकीत कर्जे आणि निव्वळ थकीत कर्जे यांचे प्रमाण जे दिनांक 30.09.2017 रोजी अनुक्रमे 18.54% आणि 12.68% होते ते दिनांक 30.09.2018 रोजी 18.64 % आणि 10.61% झाले.
Ø निव्वळ थकीत कर्जामध्ये दिनांक 30.09.2017 रोजीच्या 10,990 कोटी रुपयांवरून 20% ने घट होवून ही कर्जे दिनांक 30.09.2018 रोजी 8,743 कोटी रुपये झाली आहेत.
Ø थकीत कर्जामधील रोख वसूली वर्ष 2018-19 मधील अर्धवर्षात 52% ने वाढून रुपये 1,630 कोटी झाली. ही वसूली दिनांक 30.09.2017 रोजी 1,072 कोटी रुपये होती.
Ø संरक्षक तरतूद गुणोत्तरामध्ये दिनांक 30.09.2017 च्या 49.69% वरून 1468 बीपीएसने भरघोस वाढ होवून ती दिनांक 30.09.2018 रोजी 64.37% इतकी झाली आहे.
Ø अनर्जक गुंतवणुकीमध्ये घट झाली असून दिनांक 30.09.2017 रोजी अशा गुंतवणुकी रु. 687 कोटी रुपये होत्या. दिनांक 30.09.2018 त्या रु. 290 कोटी इतक्या राहिल्या आहेत.
- भांडवल पर्याप्तता :
Ø बँकेचे सीईटी-1 भांडवल (सीसीबी सह)7.81% राहिले आहेत. (टायर 1 भांडवल 7.85%) आणि एकूण सीआरएआर (CRAR) 9.87 इतका दर्शवीत आहे.
- भविष्यासाठीच्या योजना:
Ø कृषी कर्जे, किरकोळ कर्जे आणि लघु तसेच माध्यम उद्योगांच्या कर्जांवर अधिक लक्ष केंद्रीत करणे.
Ø वसुलीसाठी अथक प्रयत्न करणे आणि खासकरून बुडीत कर्जांच्या वसुलीवर लक्ष देणे आणि नवीन कर्जांच्या थकीत होण्यापासून बचाव करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न करणे.
Ø गैर व्याजेतर उत्पन्नाच्या वृद्धीवर लक्ष केंद्रीत करणे आणि कार्यान्वयीन खर्चावर अंकुश ठेवणे.
Ø नफा वाढीसाठी सातत्याने प्रयत्न करणे आणि भागधारकांच्या मूल्यांच्या वृद्धीसाठी प्रयत्नशील रहाणे.
फडणवीसांना’ तेव्हा’ आमच्या तक्रारी चालायच्या ..आता काय झाले ? आ. टिळेकर प्रकरणात रवी बराटेंचा सवाल (व्हिडीओ)
पुणे-आघाडीचे सरकार असताना ,आपण दिलेल्या माहितीवरून फडणवीस आणि त्यांचे सहकारी विधानसभेत सरकारला धारेवर धरून संबधितांवर कारवाई करायला भाग पाडत .मग आता त्यांच्याच सरकार मधील आमदारावर कारवाई करण्याचे धाडस दाखविण्याऐवजी तक्रारदार म्हणून माझीच का चौकशी करत आहेत.
त्यांचे सरकार नसताना त्यांना तेव्हा चालत होते ते आता का चालत नाही ? असा सवाल …भाजप आमदार टिळेकर यांच्या विरोधात खंडणीची तक्रार देणाऱ्या कंपनीच्या रवी बराटे या तथाकथित आरटीआय कार्यकर्त्याने आज माध्यमांशी बोलताना केला आहे .तर व्हायरल क्लिप मध्ये आपण पाया पडताना दिसतो आहे , आपणास जाताना वडिलधाऱ्या माणसाच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची सवय आहे. याचा अर्थ गुन्हा केला म्हणून माफी मागितली असा घेवू नये ,असे स्पष्टीकरण भाजपचे आ.योगेश टिळेकर यांनी माध्यमांना दिले आहे.
आ. टिळेकर यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल झालेले हे प्रकरण सर्वप्रथम सोशल मिडियावर मोठ्ठे व्हायरल करण्यात येते आहे .टिळेकर आणि तक्रारदार कंपनीचे एक वरिष्ठ यांच्यातील मोबाईलवर झालेले संभाषण प्रथम व्हायरल झाले होते .आज टिळेकर हे तक्रारदार कंपनीच्या आणि त्यांच्या तथाकथित मित्राच्या
पाया पडत असतानाचे सीसी टीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर आज पुण्याच्या राजकीय क्षेत्रात पुन्हा आ. योगेश टिळेकर यांच्या बद्दलची चर्चा उसळून आली आहे.
याचा अर्थ मी गुन्हा केला आणि माफी मागतो असा काढू नये ,मला भेटून जाताना वडीलधाऱ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेण्याची सवय आहे .मी त्यांना ,’ माझ्यावर खोटा गुन्हा दाखल करून माझी राजकीय कारकिर्दीला बट्टा लावू नका अशी विनंती केली असा खुलासा आ. टिळेकर यांनी केला आहे .
तर याबाबत रवी बराटे यांनी मात्र , तक्रार मागे घ्यावी यासाठी ते पाया पडले असा दावा केला आहे .मात्र ते कितीही रडले काढले तरी आपण तक्रार मागे घेणार नाही असे सांगत बराटे म्हणाले कि ,’आपण हे सीसीटीव्ही फुटेज आज माध्यमांपुढे आणले त्यास कारण आहे . पूर्वी आघाडीचे सरकार असताना फडणवीस यांच्याकडे आपण सरकारमधील लोकांच्याबाबत तक्रारी देत असू तेव्हा ते विधानसभेत मांडून त्यावर कारवाई करवून घेत आणि आता त्यांचेच सरकार असताना मात्र आता कारवाई ऐवजी तक्रारदार यांचीच चौकशी का करण्यात येते आहे ?
पहा आणि ऐका नेमके कोण काय म्हणाले ते त्यांच्याच शब्दात …


