Home Blog Page 2136

कृषी वीजबिलांच्या थकबाकीमध्ये ५० टक्के सूट

0

महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांची माहिती

पुणे, दि. ०३ जानेवारी २०२२: राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरणानुसार शेतकऱ्यांना कृषिपंपांच्या वीजबिलांमधून थकबाकीमुक्त करण्यासाठी मूळ थकबाकीच्या रकमेत तब्बल ६६ टक्के सूट देण्यात येत आहे. यामध्ये येत्या मार्चपर्यंत सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचा भरणा केल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ केली जाणार आहे अशी माहिती महावितरणचे पुणे ग्रामीण मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी दिली.

       खोडद (ता. जुन्नर) येथे कृषी विभाग, महावितरण व अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने शेतकरी, महसूल व वीजग्राहक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषिपंप वीजजोडणी धोरणाची सविस्तर माहिती देताना श्री. पवार बोलत होते. कार्यक्रमाला ग्राहक पंचायतीचे संघटन मंत्री बाळासाहेब औटी, कार्यकारी अभियंता हेमचंद्र नारखेडे, नायब तहसीलदार सचिन मुढे, सरपंच मनीषा गुळवे, ग्राहक पंचायतीचे रमेश टाकळकर, तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाठ, उपकार्यकारी अभियंता डॉ. संतोष पटनी यांची प्रमुख उपस्थिती होती.

अधीक्षक अभियंता श्री. राजेंद्र पवार यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या धोरणामुळे शेतकरी बांधवांना कृषी वीजबिलांमधून थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वीजबिलांच्या एकूण मूळ थकबाकीमधील व्याज व दंड तसेच महावितरणकडून निर्लेखन अशी रक्कम वगळून वीजबिलांची सुधारित थकबाकी काढण्यात आली आहे. या थकबाकीमधील ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित संपूर्ण थकबाकी माफ होणार आहे. तसेच कृषी ग्राहकांनी भरलेल्या चालू व थकीत वीजबिलांमधील प्रत्येकी ३३ टक्के रक्कम संबंधीत ग्रामपंचायत व जिल्हा क्षेत्रात वीजयंत्रणेच्या विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्तीसह नियमित वीजबिलांचा भरणा करून गावातील व जिल्ह्यातील वीज यंत्रणेच्या विस्तारीकरण व सक्षमीकरणाला हातभार लावावा असे आवाहन अधीक्षक अभियंता श्री. पवार यांनी केले. यावेळी श्री. बाळासाहेब औटी यांनी देखील मार्गदर्शन केले तर डॉ. संतोष पटनी यांनी महावितरणचा मोबाईल अॅप, वीजसुरक्षेबाबत माहिती दिली.

या कार्यक्रमात वीजबिलांमधून थकबाकीमुक्त झालेले विश्वनाथ फावडे, गंगूबाई सातपुते, रेखा दीक्षित, दत्तात्रय थोरात, शिवाजी थोरात, अशोक काळे या शेतकऱ्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात थकबाकीमुक्तीचे प्रमाणपत्र प्रदान करून गौरव करण्यात आला. या मेळाव्यात जगन्नाथ खोकराळे, उपकार्यकारी अभियंता सिद्धार्थ सोनवणे, उपसरपंच सविता गायकवाड, शैलेश कुलकर्णी व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळ कृषी अधिकारी प्रमोद बनकर यांनी आभार मानले.  

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ३१ जानेवारी अर्ज करण्याचे आवाहन

0

मुंबई, दि. 3 : अनुसूचित जाती व नवबौद्ध प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरिता ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना’ सुरू केलेली आहे. या योजनेकरिता सन २०२०-२१ व २०२१-२२ करिता पात्र विद्यार्थ्यांनी स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण भरलेला अर्ज  इतर कागदपत्रासह सहायक आयुक्त समाज कल्याण मुंबई शहर यांच्याकडे ३१ जानेवारी २०२२ पर्यंत  पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असणाऱ्या परंतू शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तसेच भाडे तत्त्वावर राहत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतिगृहामधील प्रवेशित मुलां-मुलीप्रमाणे भोजन भत्ता, निवास भत्ता, शैक्षणिक साहित्य, निर्वाह भत्ता व इतर आवश्यक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केलेली आहे. या योजनेअंतर्गत नियमानुसार पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति वर्षी 60 हजार रुपये इतकी रक्कम त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट शासनामार्फत जमा करण्यात येते. तरी पात्र विद्यार्थ्यांनी  स्वतः ऑफलाईन अर्ज भरून परिपूर्ण भरलेला अर्ज  इतर कागदपत्रासह ३१ जानेवारी २०२२ पर्यंत  पाठवावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण मुंबई शहर यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याची मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पाहणी

0

पुणे, दि.३ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या समोर उभारण्यात येत असणाऱ्या सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाची पाहणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली.

श्री. भुजबळ म्हणाले, सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे येत्या आठवड्यात अनावरण करण्याचा मानस असून त्यासाठी पुतळा उभारणीचे काम गतीने पूर्ण करावे. सावित्रीबाई फुले यांचा पुतळा हा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरेल. पुतळा अनावरण प्रसंगी कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन होईल याची काळजी घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

चबुतऱ्यावर पुतळा उभारणीचे प्रारंभीक काम पूर्ण करण्यात आले असून उर्वरित कामातही दर्जेदार बांधकाम साहित्याचा वापर करण्यात यावा. पुतळा परिसरातील सुशोभिकरण, प्रकाशव्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात यावी, असे सांगत ऐतिहासिक अशा विद्यापीठाच्या वारसा (हेरिटेज) इमारतीच्या दगडकामाशी सुसंगत असे पुतळ्याचे चबुतऱ्याचे दर्शनी भागातील काम करण्यात यावे, यासह विविध सूचना त्यांनी दिल्या.

यावेळी माजी आमदार पंकज भुजबळ, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य संजीव सोनवणे, प्रा.हरी नरके, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, निबंधक डॉ. प्रफुल्ल पवार, मुक्त व दूरस्थ प्रशाला संचालक प्रा.वैभव जाधव, मराठी विभागप्रमुख प्रा. प्रभाकर देसाई, इतिहास विभागप्रमुख प्रा. बाबासाहेब दुधभाते, ईश्वर बाळबुधे, बापू भुजबळ, प्रित्येश गवळी आदी उपस्थित होते.

बेरोजगारीचा फास : इंजिनिअर तरुणाने आईची हत्या करून केली आत्महत्या

0

राज्यासह केंद्र सरकारने हि गंभीर दखल घ्यावी अशी घटना : उच्च न्यायालयानेही का घेऊ नये दखल ?

पुणे : आपल्या ७६ वर्षाच्या आईला औषधांचा ओव्हर डोस देत त्यांचा चेहरा प्लॅस्टिक पिशवीत घालून त्यांचा हत्या केली.त्यानंतर इंजिनिअर असलेल्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याने पहाटे मेसेज करुन माहिती दिल्यानंतर आत्महत्या केली. गणेश मनोहर फरताडे आणि त्याची आई निर्मला मनोहर फरताडे अशी या दोघांची नावे आहेत. वाढते कर्ज आणि बेरोजगारीने हैराण झाल्याने सुशिक्षित तरुणाने उचलेलेल्या या पावलाने निश्चितच राज आणि केंद्र सरकारलाही मान खाली घालावी लागणार आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्येने जागे न झालेले सरकार आता जबाबदारी असलेल्या अशा सुशिक्षित बेरोजगारांच्या आत्महत्या पाहणार असल्याचे हे स्पष्ट चिन्ह आहे.

याप्रकरणी गणेश याची मावस बहिण शोनित सावंत यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश फरताडे व आपली आई निर्मला फरताडे हे दोघे धनकवडीमध्ये रहात होते. ग़णेश हा इंजिनिअर होता. त्याची नोकरी गेली होती. ५ वर्षांपूर्वी त्याच्या वडिलांचे आजारपणामुळे निधन झाले होते. त्यांच्या आजारपणात खूप पैसा खर्च झाला होता. त्याची आईलाही अनेक व्याधी होत्या. त्यावर खूप पैसे खर्च होत होते. आईच्या औषधावर होणारा खर्च व नोकरी नसल्याने त्याला खूप कर्जही झाले होते. या कारणामुळे तो निराश झाला होता. त्यातून त्याने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला.

आपल्यामागे आईचे कोण पाहणार, हे लक्षात घेऊन त्याने आईला औषधांचा ओव्हर डोस दिला. ती निपचित पडल्यावर तिच्या चेहर्‍यावर प्लॅस्टिकची पिशवी घालून गळ्यास पांढर्‍या रंगाच्या दोरीने घट्ट बांधून त्यांची हत्या केला. त्यानंतर त्याने शनिवारी पहाटे २ वाजून १० मिनिटांनी एक मेसेज केला. आपण बेरोजगारी आणि कर्ज बाजारी झाल्याने आत्महत्या करीत आहोत, असा मेसेज त्याने आपल्या नातेवाईकांना पाठविला. त्यानंतर तो घराच्या छतावर गेला. आणि गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

त्याच्या नातेवाईकांनी गणेशचा मेसेज सकाळी पाहिला. त्यानंतर त्याची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सहकारनगर पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. त्यानंतर मावस बहिणीच्या फिर्यादीनंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक युनुस मुलाणी (9552587081) अधिक तपास करत आहेत .

राज्यातील सर्व शाळांमध्ये ३ ते १२ जानेवारी दरम्यान ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियान

0

मुंबई,- राजमाता जिजाऊ माँ साहेब यांची जयंती आणि पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये ‘जिजाऊ ते सावित्री-सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानांतर्गत विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. या अभियानामध्ये सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड यांनी केले आहे. या अभियानादरम्यान कोविड संदर्भातील मार्गदर्शक तत्वांचे आणि नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही त्यांनी म्हटले आहे.

असंख्य अडचणींवर मात करून स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती ०३ जानेवारी रोजी साजरी करण्यात येते. तसेच त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षणदिन म्हणून साजरा करण्यात येतो. शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या जीवनचरित्रातील प्रसंग समाजासमोर सुजाण पालकत्वाचे आदर्श निर्माण करण्यासाठी प्रेरणादायी आहेत. यशस्वी जीवनासाठी आवश्यक मूल्ये शालेय विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबविणे या उद्देशाने राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमांच्या प्राथमिक ते उच्च माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शाळा, विद्यार्थी, पालक, लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रातील मान्यवर व समाज यांचा सक्रीय सहभाग घेण्यात येणार आहे. तसेच सदर अभियानाच्या कालावधीमध्ये शाळाबाह्य मुलींच्या शिक्षणासाठी सुद्धा विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

या अनुषंगाने शालेय स्तरावर दि. ०३ ते १२ जानेवारी, २०२२ या कालावधीत विविध इयत्तांच्या विद्यार्थ्यांसाठी पुढील शैक्षणिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. दि. ३ आणि १२ जानेवारी रोजी अनुक्रमे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे तसेच राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन, ३ जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले आणि १२ जानेवारी रोजी वेशभूषा, ४ जानेवारी रोजी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तसेच किशोरवयीन मुलींसाठी मासिकपाळी व्यवस्थापन उद्बोधनसत्र, ५ जानेवारी रोजी विविध विषयांवर निबंधलेखन, ६ जानेवारी रोजी यशस्वी महिलांच्या यशोगाथा/ मुलाखती, ७ जानेवारी रोजी आनंदनगरी प्रदर्शन, ८ जानेवारी रोजी चित्रकला आणि किल्ले शिल्प, १० जानेवारी रोजी पोवाडागायन तसेच समूहगायन उपक्रम, ११ जानेवारी रोजी व्याख्याने व परिसंवादाचे आयोजन, तर १२ जानेवारी रोजी एकांकिका/ एकपात्री नाटिकांचे आयोजन करण्यात येणार आहे.

विद्यार्थी आणि शिक्षकांनी कार्यक्रमांचे आयोजन करून आपल्या उपक्रमाचा/ कार्यक्रमाचा २ ते ३ मिनिटांपर्यंतचा सुस्पष्ट व्हिडीओ, फोटो व इतर साहित्य समाज-संपर्क माध्यमांवर (फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम) #balikadivas2022, #mahilashikshandin2022, #misavitri2022, #mijijau2022 या हॅशटॅग (#) चा वापर करून अपलोड करण्यात यावा, असे यासंदर्भातील शासन निर्णयात म्हटले आहे. सदर कार्यक्रमांच्या आयोजनाबाबत शिक्षण संचालकांच्या स्तरावरून आवश्यक त्या सूचना निर्गमित केल्या जातील.

लस शिल्लक पडून ठेवली पण बूस्टर डोस का दिला नाही ?

0

पुणे- गेली कित्येक महिने लसींचा पुरवठा पुरेपूर होता असताना लसींचा साथ वाढत असताना तो केंद्रांवरून माघारी जात होता लसींचे डोस शिल्लक पडून राहिले . महापालिकेने केंद्रे बंद केली पण लसींचे तिसरे डोस ,बूस्टर डोस देण्याचा साधा विचारही केला नाही . ना केंद्राकडे परवानगी मागितली ना राज्याकडे , ना स्वतःच्या पातळीवर पुनावालांशी बोलून यासाठी प्रयत्न केले . असा ठपका आता पुणे महापालिका आणि पालकमंत्री यांच्यावरही ठेवला जाऊ शकणार आहे.

कोरोना चे रुग्ण पुन्हा वाढू लागले याचा अर्थ काय ? असा प्रश्न विचारला जाऊ लागलाय अशाच भोंगळ पद्धतीने कारभार गेली २ वर्षाहून अधिक काल सुरु आहे आणि सुरु राहिला तर मध्यमवर्गीय अस्तित्वात राहील काय ? असा प्रश्न आता विचारला जातोय . पुन्हा पुन्हा तेच तेच होत असेल तर एकटे लोक याला जबाबदार म्हणून प्रशासन आपले अंग काढून घेऊ शकणार नाही . तिसरा बुस्त्र डोस का दिला नाही अजूनही त्याचा विचार का होत नाही ? याची उत्तरे आता मान्यवरांना द्यावी लागणार आहेत . करोना , ओमायक्रोन अशा महामारींच्या नावाखाली आणि दहशतीखाली बंधने किती काल , किती वर्षे लादणार ? आणि लोकही ती किती वर्षे सहन करणार ? असे हि प्रश्न आता आ वासून पुढे उभे आहेत .

आज पासूनच सरकार इंधनावरील नाही तर इलेक्ट्रिक वाहनेच खरेदी करणार – आदित्य ठाकरे

0

मुंबई- राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच मोठी घोषणा केली आहे.१ एप्रिल पासून नाही तर आजपासूनच त्यांनी सरकार इंधनावरील वाहन खरेदी करणार नाही आणि खरेदी करायचीच असेल तर ती फक्त इलेक्ट्रिक वाहनांचीच करेल अशी घोषणा केल्याने आता यापूर्वीचे राज्यातील सर्व सरकारी आणि निमसरकारी यंत्रणेने जर गाड्या खरेदीची प्रोसेस सुरु केली असेल तर ती त्यांना थांबावी लागेल एवढेच नव्हे तर भाड्याने घेण्यात येणाऱ्या इंधनावरील गाड्यांचे कार्याचे काय ? हा प्रश्न उपस्थित करत नको झंझट म्हणत आता इंधनावरील भाड्याने घेतलेल्या गाड्या माघारी पाठवून त्यांना इलेक्ट्रिक गाड्यांचीच मागणी करावी लागणार आहे . अशा सर्व संदिग्ध पातळीवर सरकरी आणि निमसरकारी यंत्रणेला आता सावरायला किमान १५ दिवसांचा अवधी आणि सरकारचे स्पष्ट आदेश हाथी असले तर हे शक्य होणार आहे हेही निश्चित मानले जातेय .

गाड्यांमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. त्यानुसार आता राज्यातील सर्व सरकारी वाहने इलेक्ट्रिकच असतील, अशी घोषणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे.दरम्यान, हा निर्णय याआधीच राज्य सरकारने घेतला होता. या निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2022 पासून होणार होती. पण आता ही अंमलबजावणी 1 जानेवारी 2022 पासूनच होणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले.

हर्षवर्धन पाटील यांच्या नववधू कन्येलाही कोरोनाची लागण, अंकिता पाटील-ठाकरे पॉझिटिव्ह

0

पुणे- भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची मुलगी आणि ठाकरे घराण्याची नववधू अंकिता पाटील यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती त्यांनी स्वत: ट्विटरवरून दिली आहे. अंकिता पाटील आणि निहार ठाकरे यांचे लग्न गेल्याच आठवड्यात पार पडले आहे.अंकिता पाटील यांच्या लग्नानंतर अनेक नेते कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आले होते. यामध्ये खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटील यांचा समावेश आहे.

आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आलेली आहे. माझी तब्येत व्यवस्थित आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने मी पुढील उपचार घेणार आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी व सर्वांनी आपली काळजी घ्यावी असेही आवाहन त्यांनी केले.

हर्षवर्धन पाटलांनाही कोरोना
गेल्या काही दिवसांपासून कोरोना वाढत आहे. आपल्या सर्वांच्या व सहकाऱ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मी काल कोरोना तपासणी केली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. पुढील उपचारासाठी मी रूग्णालयात दाखल झालो आहे. इच्छा असताना देखील ही निर्बंधांमुळे व आपल्या सुरक्षेच्या कारणास्तव आपल्या सर्वांना भेटता येत नाही व आपले प्रश्न सोडवता येत नाहीत. परंतु प्रत्यक्ष मी जरी आपल्या सर्वांना भेटू शकत नसलो तरीही आपण मला दूरध्वनीद्वारे किंवा माझ्या कार्यालयास संपर्क करून आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी निसंकोचपणे सांगू शकता” असे ट्वीट हर्षवर्धन पाटील यांनी 31 डिसेंबरला केले होते.

गेल्या आठवड्यात विवाहबंधनात
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुतणे निहार बिंदूमाधव ठाकरे यांचा विवाह 28 डिसेंबर रोजी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील यांचासोबत झाला. मोठ्या शाही थाटात मुंबईतील ताज हॉटेलमध्ये दोघं लग्नबंधनात अडकले.

शनिवारी पंकजा मुंडेंना कोरोना

राज्यातील 20 आमदार आणि 10 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना काल कोरोनाची लागण झाली आहे. ट्विट करुन आपल्याला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पामुळे ‘काटोल’ नागपूरची सॅटॅलाइट सिटी म्हणून ओळखली जाईल- केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितिन गडकरी

0

नागपूर, 2 जानेवारी 2022

ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पाला सर्व परवानग्या मिळाल्या असून त्याचे काम आता वर्षभरात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करून काटोल ते नागपूर हे अंतर केवळ 15 ते  20  मिनिटात कापता येईल आणि काटोल ही नागपूरची सॅटॅलाइट सिटी म्हणून  ओळखली जाईल असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री  नितिन गडकरी यांनी आज  नागपूर जिल्ह्यातील काटोल येथे केले. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे राष्ट्रीय महामार्ग 353 जेके या नागपूर काटोल रस्त्याच्या  आऊटर रिंग रोड ते काटोल बायपासच्या शेवटपर्यंत चौपदरीकरणाच्या कामाचा  कार्यारंभ आज नितीन गडकरी यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी रामटेकचे खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जयस्वाल, काटोलच्या नगराध्यक्षा वैशाली ठाकूर प्रामुख्याने उपस्थित होते.

नागपूर ते काटोल या रस्त्यामध्ये वनविभागाच्या परवानगीचा तसेच इतर अनेक अडचणी आल्या यासंदर्भातील अडचणी दूर करून आता या चौपदरी करण्याचे काम आता चालू झाले आहे, असे गडकरी यांनी यावेळी सांगितल.  या प्रकल्पामध्ये असणा-या कामासाठी एकंदरीत 1 हजार 184 कोटी निधीची तरतूद केली असून रस्त्याच्या  याभागाची लांबी 48.20 किलोमीटर आहे. या रस्त्याच्या चौपदरीकरणामध्ये काटोल बायपासच्या शेवटी आणि कळमेश्वर बायपास या दोन्ही टोकावर एका बाजूचे  उड्डाणपूल बांधण्याचे काम देखील अंतर्भूत आहे त्यामुळे कळमेश्वर आणि काटोल शहराकडे जाणारी वाहतूक सुरक्षित आणि सोयीची  ठरणार आहे.नागपूर जवळच्या रिंग रोडचे काम सुद्धा  फेटरी  जवळ चालू होणार  आहे, अशी माहिती गडकरी यांनी दिली.

या रस्त्यामुळे नागपूर शहराची काटोल, वरुड तालुक्यासोबतची कनेक्टिव्हिटी चांगली होणार असून यामुळे स्थानिक तसेच उत्पादनांची बाजारपेठापर्यंत वाहतुक सुकर होणार आहे.  या रस्त्यावर  5 उड्डाणपुल तसेच 13  भुयारी  मार्ग  असून   रेल्वे क्रॉसिंग मुळे वेळ आणि इंधनाच्या बचत होण्यासोबतच  प्रदूषण नियंत्रणात मदत होणार आहे.

काटोल नगर परिषदेने राज्यातील पहिल्या  5  नगरपालिकेमध्ये आपल्या कार्यकतृत्वाने नाव मिळवले असल्याचा उल्लेख करत  काटोल नगरपरिषदेने उपलब्ध करुन दिलेल्या  स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जलतरण तलाव यासारख्या सुविधांमुळे येथील विद्यार्थ्यांना चांगली सुविधा मिळत असून काटोलचा  शैक्षणिक सामाजिक आर्थिक तसेच सांस्कृतिक विकास होत आहे असेही  गडकरी यांनी  सांगितले.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणातर्फे नागपुरातील वर्धा ते बुटीबोरी रस्त्याचे चौपदरीकरण खापरी येथील रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम, लिबर्टी सिनेमा ते मेंटल हॉस्पिटल येथे उड्डाणपुलाचे बांधकाम, ऑटोमोटिवे चौक ते कन्हान या बहुपदरी रस्त्याचे बांधकाम तसेच   रेडिसन ब्लू हॉटेल ते प्राइड हॉटेल पर्यंत उड्डणपूलाचे बांधकाम,  बुटीबोरी येथील चौपदरी उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण झाले असून या सर्व विकास कामाची लांबी 87. 97 किलोमीटर असून यासाठी 2, 943 कोटी रुपये निधी खर्च झालेला आहे. 

याशिवाय नागपूर जिल्ह्यातील  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण -एन.एच.ए.आय.द्वारे प्रगतीपथावर असलेल्या कामामध्ये नागपूर-उमरेड रस्त्याचे चौपदरीकरण, सावनेर ते धापेवाडा रस्त्याचे चौपदरीकरण, नागपूर आऊटर रिंगरोड भाग 1 आणि 2 चे बांधकाम,  पारडी पुलाचे बांधकाम, गड्डीगोदाम ते कडबी चौक येथे उड्डाणपुलाचे बांधकाम तसेच अजनी येथे इंटरमोडलस्टेशनचे बांधकाम प्रस्तावित असून या सर्व कामासाठी 5,504  कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. इंदोरा चौक ते पाचपावली ते शीतला माता चौक वर उड्डाणपुलाचे बांधकाम, नागपूर भंडारा रस्त्याचे सहापदरीकरण या प्रकल्पाचा सुद्धा विस्तृत प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात आहे.

या कार्यक्रमामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक,  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.

डिसेंबर 2021 मध्ये देशाचे सकल GST महसूल संकलन 1,29,780 कोटी रुपये:महाराष्ट्राचा सर्वाधिक 19,592 कोटी रुपयांचा वाटा

0

डिसेंबर 2021 मध्ये देशाचे सकल जीएसटी संकलन 1,29,780 कोटी रुपये झाले असून त्यामध्ये सीजीएसटी 22,578 कोटी रुपये, एसजीएसटी 28,658 कोटी रुपये, आयजीएसटी 69,155 कोटी रुपये (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या 37,527 कोटी रुपयांसह) आणि  9,389 कोटी रुपये अधिभाराचा (वस्तूंच्या आयातीवर जमा झालेल्या रु. 614 कोटींसह) समावेश  आहे

सरकारने नियमित तडजोडीचा भाग म्हणून सीजीएसटीपोटी 25,568 कोटी रुपये आणि एसजीएसटीपोटी 21,102 कोटी रुपयांची तडजोड केली आहे. डिसेंबर 2021 साठी केंद्र आणि राज्यांचा एकूण महसूल सीजीएसटीसाठी 48,146 कोटी रुपये आणि एसजीएसटीसाठी 49,760 कोटी रुपये इतका आहे.

डिसेंबर 2021 मधील महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा 13% नी जास्त आहे आणि डिसेंबर 2019 मधील जीएसटी महसुलापेक्षा 26% नी जास्त आहे. या महिन्यात, वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल 36% नी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात या स्रोतांमधून मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत  5% नी जास्त आहे.

ऑक्टोबर, 2021 च्या तुलनेत (7.4 कोटी)  नोव्हेंबर, 2021 महिन्यात ई-वे बिल्सच्या संख्येत 17% घट होऊनही (6.1 कोटी)  महिन्यातील जीएसटी संकलन 1.30 लाख कोटी रुपयांच्या जवळपास आहे. सुधारित कर अनुपालन आणि केंद्र आणि राज्य या दोन्ही कर प्राधिकरणांच्या उत्तम कर प्रशासनामुळे हे संकलन झाले आहे.

या आर्थिक वर्षाच्या पहिल्या आणि दुसऱ्या तिमाहीत अनुक्रमे 1.10 लाख कोटी आणि 1.15 लाख कोटी रुपयांच्या सरासरी मासिक संकलनाच्या तुलनेत तिसऱ्या तिमाहीत 1.30 लाख कोटी रुपयांचे सरासरी मासिक सकल जीएसटी संकलन झाले आहे.

अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागल्याने, करचुकवेगिरी विरोधात केलेल्या कारवाया, विशेषत: बनावट पावत्या देणाऱ्यांविरुद्धची कारवाई यामुळे जीएसटी संकलनात वाढ होत आहे.  उलट्या शुल्क संरचनेत सुधारणा करण्यासाठी परिषदेने केलेल्या दर तर्कसंगत करण्याच्या  विविध उपायांमुळेही महसुलात सुधारणा झाली आहे. अखेरच्या तिमाहीतही महसुलातील सकारात्मक कल कायम राहील अशी अपेक्षा आहे.

खालील तक्त्यामध्ये चालू वर्षातील मासिक सकल जीएसटी महसुलाचा कल दर्शविला आहे. डिसेंबर 2020 च्या तुलनेत डिसेंबर 2021 मध्ये प्रत्येक राज्यात जमा झालेल्या जीएसटी ची राज्यनिहाय आकडेवारी सारणीमध्ये दिसत आहे.

यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक 19,592 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले असून डिसेंबर 2020 मधील 17,699 कोटी रुपयांच्या तुलनेत ते 11 % नी जास्त आहे. गोवा राज्यात 592 कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले असून डिसेंबर 2020 मधील  342 कोटी रुपयांच्या तुलनेत ते 73 % नी जास्त आहे.

State-wise growth of GST Revenues during December 2021

StateDec-20Dec-21Growth
Jammu and Kashmir3183200%
Himachal Pradesh670662-1%
Punjab1,3531,57316%
Chandigarh1581644%
Uttarakhand1,2461,077-14%
Haryana5,7475,8732%
Delhi3,4513,7549%
Rajasthan3,1353,058-2%
Uttar Pradesh5,9376,0292%
Bihar1,067963-10%
Sikkim22524911%
Arunachal Pradesh465316%
Nagaland3834-12%
Manipur414818%
Mizoram2520-23%
Tripura7468-9%
Meghalaya10614940%
Assam9841,0153%
West Bengal4,1143,707-10%
Jharkhand2,1502,2063%
Odisha2,8604,08043%
Chhattisgarh2,3492,58210%
Madhya Pradesh2,6152,533-3%
Gujarat7,4697,336-2%
Daman and Diu42-60%
Dadra and Nagar Haveli259232-10%
Maharashtra17,69919,59211%
Karnataka7,4598,33512%
Goa34259273%
Lakshadweep11170%
Kerala1,7761,8957%
Tamil Nadu6,9056,635-4%
Puducherry159147-8%
Andaman and Nicobar Islands222618%
Telangana3,5433,7606%
Andhra Pradesh2,5812,532-2%
Ladakh81583%
Other Territory8814058%
Centre Jurisdiction12718647%
Grand Total87,15391,6395%

मुंबईने केले, पुण्याचे काय ? मुंबईत ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर रद्द – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

0

मुंबई दि 1: नवीन  वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ फुटापेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.

या बैठकीस नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, उपमहापौर सुहास वाडकर, मुख्य सचिव देवाशिष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल, प्रधान सचिव नगरविकास महेश पाठक आदी उपस्थित होते.

राज्यातील सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, सुविधा देतांना आपल्याला मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकासकामांमध्ये मोलाचे योगदान देतो. कष्टकऱ्यांच्या घामातून ही मुंबई उभारली आहे हे आम्ही विसरता काम नये. 500 चौ. फुटापर्यंतच्या घरांचा मालमत्ताकर माफ करणे हे महत्त्वाचे वचन पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले. पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे दिवसरात्र पालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत जाऊन मुंबईतील विकासकामांची पाहणी करतात असेही श्री. ठाकरे यांनी सांगितले.

सर्वात मोठी भेट – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे

मुंबईकरांच्या  500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून 16  लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. अशा स्वरूपाचा मोठा निर्णय देशात कुठल्याही पालिकेने घेतला नसेल. मुंबईकरांसाठी महत्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय असून नवीन वर्षाची मोठी भेट आहे असे सांगून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ असून रुग्णालयात असूनही कोविड रोखण्यासाठीचे काम आणि इतर कामांच्या प्रगतीविषयी मुख्यमंत्री वेळोवेळी आढावा घेतात. कोविड काळात देखील विकास कामांना कात्री लावली नाही असेही ते म्हणाले.

मुंबई उपनगर पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून आभार

मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, हा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्र्यांचे आणि नगरविकास मंत्री तसेच पालिका आयुक्त, नगरविकास अधिकारी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. हा निश्चितच एक क्रांतिकारी निर्णय असून लाखो मुंबईकरांना याचा फायदा होणार आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील या महत्त्वाच्या निर्णयासाठी मुख्यमंत्री, पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे आभार मानले.

महिला शिक्षणातील अग्रणी… सावित्रीबाई

0

 महिलांच्या उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या, सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणाऱ्या अग्रणी सावित्रीबाई फुले यांची ३ जानेवारी ही जयंती. यानिमित्त त्यांच्या महिला शिक्षणक्षेत्रातील कार्याची ही थोडक्यात आठवण.

स्वातंत्र्यपूर्व शंभर वर्षापूर्वीचा काळ हा सामाजिक रूढी परंपरांचा काळ होता. महिलांचे शिक्षण हे त्या काळी वर्ज्य होते. त्या काळात सर्वांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत विशेषत: महिलांना शिक्षण घेण्यासाठी प्रवृत्त करण्याचे कठीण कार्य जोतिराव व सावित्रीबाई यांनी केले. सावित्रीबाईंनी स्वत: शिक्षण घेऊन महिलांसाठी शिक्षिकेचे काम केले. त्यांच्या या अनन्यसाधारण कार्यामुळेच त्यांना महिला शिक्षणाचे प्रवर्तक मानले जाते.

सातारा जिल्ह्यातील नायगाव येथील खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाईंचा विवाह १८४० मध्ये जोतिरावांसोबत झाला. सावित्रीबाईचे शिक्षण जोतिरावांनीच पुरे केले. जोतिबा फुले यांच्या मदतीने त्यांना सतत पुढे जाण्याकरीता प्रेरणा मिळत होती, ते त्यांचे फक्त पती नव्हते तर एक चांगले गुरू व संरक्षक देखील होते. सावित्रीबाईंच्या कार्याचे ते सतत कौतुक करून त्यांचा उत्साह वाढवित असत. सावित्रीबाई यांनी शिक्षिकेचे व्रत अंगीकारून पतीच्या कार्यात पूर्ण सहकार्य दिले. त्यांच्या या योगदानामुळे महिला-शिक्षणाची महाराष्ट्रातील अग्रणी म्हणून सावित्रीबाईंचे नाव नेहमीच आदराने घेतले जाते.

शिक्षण पूर्ण केल्यानंतर या शिक्षणाचा उपयोग समाजातील महिलांना शिक्षीत करण्याकरता करावा असा विचार सावित्रीबाईंनी केला पण हा विचार एखाद्या आव्हानापेक्षा कमी नव्हता, कारण त्या काळात महिलांना शिक्षणाची परवानगी नव्हती. यासाठी सावित्रीबाईंनी खूप संघर्ष केला आणि या रूढीला तोडण्यासाठी पती जोतिबांच्या साहाय्याने 1 जानेवारी 1848 पासून शिक्षणाचे माहेर घर असे ज्याला आज आपण म्हणतो त्या पुण्याच्या भिडेवाडा येथे पहिली मुलींची शाळा सुरू केली. पती जोतिबा फुले यांच्या मदतीने कुणाचेही आर्थिक साहाय्य न घेता सुरूवात करून दोघांनी पुढे अनेक शाळा सुरू केल्या. महिलांच्या शिक्षणाच्या ध्येयाने प्रेरीत सावित्रीबाई सतत या क्षेत्रात काम करीत राहिल्या.

सर्वसामान्य मुलींना शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणारे बहुजन समाजाचे हे जोडपे आणि त्यांचे त्याकाळातील कार्य संस्मरणीय आहे. म. फुले यांनी मुलींसाठी काढलेल्या शाळेत लहुजी साळवे यांनी स्वत:च्या मुक्ता या पुतणीस पाठविले आणि राणबाच्या मदतीने अनेक मुलींना त्यांच्या शाळेत दाखल केले. पुढे शाळेत मुलींची संख्या वाढत गेली. अस्पृश्य समाजातील मुलींची संख्या यात लक्षणीय होती. या दरम्यान त्यांच्या समस्या वाढत गेल्या सावित्रीबाई शिकविण्याकरता ज्यावेळेस घरून निघत असत त्या दरम्यान शाळा ते विद्यालय हे अंतर पार करतांना त्यांना अनेक कटु अनुभवांना सामोरे जावे लागत असे. असे तरी देखील त्या त्यांच्या निश्चयापासून डगमगल्या नाहीत, ध्येयापासून परावृत्त झाल्या नाहीत. आत्मविश्वासाने आलेल्या प्रत्येक प्रसंगाचा त्यांनी सामना केला आणि महिला शिक्षणाची जाज्वल्य ज्योत आपल्या मनात तेवत ठेवली. अस्पृश्याचे हाल पाहून जोतिबांचे काळीज पिळवटून निघत असे. जोतिबांच्या मनातील पेटत्या ज्योतिला प्रज्वलीत करण्याचे कार्य सावित्रीनेच केले व ती खऱ्या अर्थाने सामाजिक क्रांतीची प्रखर ज्योत झाली.

सावित्रीबाई फुले या भारताच्या प्रथम महिला शिक्षिकाच नव्हे तर त्या एक उत्तम कवयित्री, अध्यापिका, समाजसेविका देखील आहेत. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य महिलांना शिक्षीत करण्याकरता आणि त्यांना त्यांचा हक्क मिळवून देण्याकरता खर्ची घातले.

पुणे येथील हे शिक्षण कार्य पाहून १८५२ मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सरकारने फुले पतीपत्‍नींचा मेजर कॅन्डी यांच्या हस्ते जाहीर सत्कार केला. त्यानंतरही सावित्रीबाई फुले यांनी आपले शिक्षण देण्याचे व्रत चालूच ठेवले.

शिक्षणाची महती गाताना सावित्रीबाई म्हणतात… ‘विद्या हे धन आहे रे श्रेष्ठ साऱ्या धनाहून, तिचा साठा ज्यापाशी, तो ज्ञानी मानिती जन..’सावित्रीबाईंनी महिलांसाठी शिकविणे सुरू केले, यात त्यांच्या जोडीने महिला शिक्षणाची ज्योत पुढे नेण्याचे काम केले ते फातिमा शेख यांनी. त्या खऱ्या अर्थाने सावित्रीबाईंच्या सहकारी, सखी आणि सहशिक्षिका मानल्या जातात. सावित्रीबाईंच्या अनुपस्थितीत त्यांनी सुरू केलेल्या शाळेची धुरा त्या समर्थपणे सांभाळत. काही ठिकाणी वाचनात येते की, महात्मा फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली तेव्हा त्यांच्या वडिलांनी त्यांना घराबाहेर काढले. त्यावेळेस उस्मान शेख यांनी त्यांना आपल्याकडे जागा दिली. फातिमा त्या उस्मान शेख यांची बहीण होत्या. १९२४-३० या काळात पुण्यातून मजूर हे मासिक प्रकाशित होत होते, त्या मासिकात सावित्रीबाईंसह फातिमा शेख यांचा फोटो छापला होता असा उल्लेख डॉ.मा.गो.माळी यांनी आपल्या सावित्रीबाई फुले समग्र वाङ्मय या पुस्तकाच्या प्रस्तावनेत केला आहे. असाच फोटो लोखंडे नावाच्या ख्रिस्ती मिशनऱ्याने काढलेल्या पुस्तकातही प्रसिद्ध केला होता, हे दोन्ही फोटो सारखेच असल्याने सावित्रीबाई आणि फातिमा शेख यांची ओळख पटते, असाही उल्लेख काही ठिकाणी आढळतो. सावित्रीबाईंनी जोतिबांना लिहिलेल्या एका पत्रात, ‘माझी तब्येत ठीक होताच मी परत येईन, फातिमाला सध्या त्रास होईल, पण ती कुरकूर करणार नाही, असा फातिमा शेख यांचा उल्लेख सापडतो. सावित्रीबाईंच्या खांद्याला खांदा लावून त्या वंचिताच्या हक्कासाठी अखेरपर्यंत लढल्या.

एकविसाव्या शतकात स्वतंत्र भारतातील महिला शिक्षण क्रांतीच्या मोठ्या टप्प्यावर उभे आहे. प्रामुख्याने शहरी विभागापुरते मर्यादित असलेले हे शिक्षण आता ग्रामीण, दुर्गम, आदिवासी भागापर्यंत विस्तारले आहे. एक महिला शिकली की, ती सारे कुटुंब साक्षर करते, संस्कारक्षम करते, या महात्मा फुलेंच्या वचनाला स्मरून महिला-शिक्षणाला भारतवर्षाने प्राधान्यक्रम दिला आहे. महिलेला शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रांत आता समान संधी आहे. ज्या देशात महिलांचे कर्तृत्व जगाला गवसणी घालते, त्या देशात महिलांचा आणि महिला शिक्षणाचाही खऱ्या अर्थाने सन्मान होतो. याची सुरूवात सावित्रीबाईंनी केली, याचे श्रेय निश्चितच त्यांना जाते.

महाराष्ट्र राज्य हे स्त्रीशिक्षणाच्या क्षेत्रातील प्रागतिक राज्य असून सावित्रीबाई फुले दत्तक योजनेची अभिनव कल्पना महाराष्ट्रात राबविली गेली. बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचा पायंडा महाराष्ट्रात प्रथम पाडला गेला. असंख्य अडचणींवर मात करून महिला शिक्षणाचा पाया रचणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस ‘महिला शिक्षणदिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांच्या ३ जानेवारी या जन्मदिवसापासून ते शिवरायांना शूर, पराक्रमी, धाडसी योद्धा म्हणून घडविणाऱ्या राजमाता जिजाऊ यांच्या १२ जानेवारी या जन्मदिनापर्यंत शाळांमधून ‘जिजाऊ ते सावित्री- सन्मान महाराष्ट्राच्या लेकींचा’ अभियानाअंतर्गत विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहेत.

महिला शिक्षणाच्या प्रणेत्या, महिला उद्धारासाठी आपले सर्वस्व वाहून देत महात्मा जोतिराव फुले यांनी हाती घेतलेला समाजोद्धाराचा वसा तितक्याच नेटाने पुढे नेणाऱ्या क्रांतिज्योति सावित्रीबाईंना त्यांच्या जयंती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

  • शब्दांकन : ब्रिजकिशोर झंवरवरिष्ठ सहायक संचालक (माहिती)

महापालिकेतील 1 हजार 844 कोटींचा घोटाळ्याच्या चौकशींचे राज्यपालांनी दिले लोकायुक्तांना आदेश

0

मुंबई – मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतील 1 हजार 844 कोटींच्या कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिले आहेत.मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतघो टाळा झाल्याचा आरोप भाजपचे आमदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केला आहे. त्यामुळे राज्यपालांनी आश्रय योजनेतील झालेला गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश लोकायुक्तांना दिले आहेत.

काय आहे प्रकरण
सफाई कामगारांसाठी आश्रय योजनेतून पक्की घरे बांधली जातात. या योजनेच्या माध्यमातून सफाई कामगारांच्या 39 वसाहतींचा पुनर्विकास करण्यात येणार आहे. या योजनते आतापर्यंत मुंबई महापालिकेने 1 हजार 844 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला आहे. या प्रस्तावावर भाजपने आक्षेप नोंदवला होता. मात्र त्यानंतरही प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर भाजपचे स्थायी समिती सदस्य विनोद मिश्रा यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेऊन राज्यपालांनी या प्रकरणात लोकायुक्तांना चौकशी करण्याची सूचना केली.

याआधीही लोकायुक्तांना चौकशीचे आदेश
परिवहन विभागातील पदोन्नतीसाठी लाखो रुपयांची वसुली केल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी लोकायुक्तांना आदेश देऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.

नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी पुणे जिल्ह्यात ६३१ नवे कोरोना रुग्ण

0

पुणे – पुणे जिल्ह्यात नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच शनिवारी (ता.१) ६३१ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.शहरात सध्या २ हजार ७० सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी ३०६ जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. उर्वरित १ हजार ७६४ जण गृह विलगीकरणात आहेत.

 आढळून आलेल्या रुग्णांत पुणे शहरातील ३९९ जण आहेत. याउलट दिवसात ३१५ जण कोरोनोमुक्त (Coronafree) झाले आहेत. अन्य दोन जणांचा कोरोनाने मृत्यू (Death) झाला आहे. दिवसातील मृत्यूमध्ये शहर आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पिंपरी चिंचवड, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

गेल्या चार दिवसांपासून सातत्याने दिवसातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये शहरातील ३९९ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ११२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८४, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी १८ रुग्णांचा समावेश आहे.

  पुणे शहरात ३९९ जण आहेत. याउलट दिवसात ३१५ जण कोरोनोमुक्त झाले आहेत. अन्य दोन जणांचा कोरोनाने मृत्यू (Death) झाला आहे. दिवसातील मृत्यूमध्ये शहर आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एक मृत्यू आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी पिंपरी चिंचवड, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात एकाही कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

गेल्या चार दिवसांपासून सातत्याने दिवसातील नवीन कोरोना रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या तुलनेने खूप कमी आहे. जिल्ह्यातील दिवसांतील एकूण नवीन कोरोना रुग्णांमध्ये शहरातील ३९९ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ११२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ८४, नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी १८ रुग्णांचा समावेश आहे.

पोलिसाने पोलिसालाच मारण्याची गुन्हेगाराला दिली सुपारी

0

पुणे : पोलीस कर्मचाऱ्यानेच रेकॉर्डवरील गुन्हेगाराला दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्याला मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी कट रचून खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. एका गुन्हेगाराला अटक केली आहे.

योगेश प्रल्हाद अडसुळ (वय ३५, रा. काळेपडळ, एकता कॉलनी, हडपसर) असे अटक केलेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. तर पोलीस अंमलदार नितीन दुधाळ याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तो फरार झाला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील बाळसो लोहार यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार नोव्हेंबर २०२१पासून आजपर्यंत हडपसर व दत्तवाडी परिसरात घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी नितीन दुधाळ हा सध्या फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. तो आणि दत्तवाडी पोलीस ठाण्यात सध्या कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी हे शेजारी शेजारी रहायला होते. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता. योगेश अडसुळ हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून तो नुकताच खूनाच्या गुन्ह्यातून पॅरोलवर सुटला होता. नितीन दुधाळ याने अडसुळ याची हडपसर येथे भेट घेतली. त्याला सुपारी देऊन पोलीस कर्मचारी यास मारहाण अथवा अपघात करुन गंभीर दुखापत करुन कायमचे अपंगत्व आणण्यासाठी व त्याचा जीव गेला तरी मी सर्व काही पाहीन, असे सांगितले. अडसुळ याने दत्तवाडी येथील एका गुन्हेगाराला या पोलीस कर्मचाऱ्याची सर्व माहिती काढण्यास सांगितले. तो जातो कोठे, कधी येतो, त्याच्याकडे काही हत्यार आहे, अशी माहिती काढण्यास सांगितले.

याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक कृष्णा इंदलकर यांनी सांगितले की, दत्तवाडी पोलिसांना अशा प्रकारे सुपारी दिल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या गुन्हेगाराला ताब्यात घेऊन माहिती घेतली. त्याला अडसुळ याने १० हजार रुपये दिल्याचेही या गुन्हेगाराने सांगितले. त्यानंतर दत्तवाडी पोलीस ठाण्यातील या पोलीस कर्मचार्याचा पाठलाग करुन त्याचा अपघात घडवून आणण्याचा प्रयत्न कट रचल्याची माहिती मिळाली. त्यावरुन पोलिसांनी योगेश अडसुळ याला अटक केली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस नितीन दुधाळ याचा शोध घेत आहे.