Home Blog Page 1946

पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरक्षा ठेवीच्या व्याजापोटी ८० लाख वीजग्राहकांना ११५ कोटींचा परतावा

0

पुणे – महावितरणकडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत पुणे, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील उच्च व लघुदाब वर्गवारीतील ८० लाख ४१ हजार १८९ ग्राहकांना ११४ कोटी ६६ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे. यामध्ये मे महिन्याच्या वीजबिलांमध्ये ९२ कोटी ६३ लाख रुपयांचा परतावा समायोजित करण्यात आला आहे तर जून महिन्याच्या बिलामध्ये उर्वरित २२ कोटी ३ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे.

महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी महावितरणकडे सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता २०२१ च्या विनिमय १३.१ नुसार वीजग्राहकांना सुरक्षा ठेव आकारण्यात येते. दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे नवीन सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. याआधीची जमा असलेली सुरक्षा ठेव व वीजवापरानुसार नव्याने निर्धारीत करण्यात आलेली सुरक्षा ठेव यांच्यातील फरकाची रक्कम भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येते. यापूर्वी सुरक्षा ठेव सरासरी एका बिलाच्या रकमेइतकी होती. आता वीजग्राहकांची सुरक्षा ठेव मासिक बिल असेल तर तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे.

तसेच विनिमय १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर आरबीआयच्या दराच्या सममूल्य दराने ग्राहकांना व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून अदा करण्यात येते. त्याप्रमाणे सन २०२१-२२ मध्ये पुणे प्रादेशिक विभागातील उच्च व लघुदाब वर्गवारीतील ८० लाख ४१ हजार १८९ वीजग्राहकांना एकूण ११४ कोटी ६६ लाख रुपयांच्या व्याजाचा परतावा मे व जूनमधील वीजबिलांच्या माध्यमातून समायोजित करण्यात येत आहे. यामध्ये ९२ कोटी ६३ लाख रुपयांचा परतावा मे महिन्यात देण्यात आला आहे तर २२ कोटी ३ लाखांचा परतावा जूनच्या वीजबिलामध्ये समायोजित करण्यात येत आहे.

जमा असलेल्या सुरक्षा ठेवीवरील व्याजापोटी पुणे जिल्ह्यातील ३९ लाख २ हजार २६ वीजग्राहकांना ७१ कोटी १३ लाख, कोल्हापूर जिल्हा- ११ लाख ८६ हजार ७२४ वीजग्राहकांना १४ कोटी ६८ लाख, सांगली जिल्हा- ९ लाख ७ हजार ६१० वीजग्राहकांना ८ कोटी ३० लाख, सातारा जिल्हा- ९ लाख ९१ हजार ९९१ वीजग्राहकांना ९ कोटी ९१ लाख आणि सोलापूर जिल्ह्यातील १० लाख ५२ हजार ८३८ वीजग्राहकांना १० कोटी ६४ लाख रुपयांचा परतावा देण्यात येत आहे. गेल्या एप्रिलमध्ये पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत संबंधित वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीचे स्वतंत्र बिल देण्यात आले आहे. ही रक्कम भरण्यासाठी सहा मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. सुरक्षा ठेवीचे बिल भरून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

अरविंद केजरीवालांच्या आप च्या मेळाव्याचा प्रतिसाद अनेकांना धक्कादायी

पुणे- आज बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या अरविंद केजरीवाल हाच चेहरा असलेल्या आप च्या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला हा प्रतिसाद अनेकांना धक्कादायी असा ठरणारा आहे. दिल्ली सरकारचे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र गौतम , राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन,निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य अध्यक्ष रंगा राचुरे,सिनेकलाकार गौरी करणी रवी वाल्याच्या चाहत खन्ना शेफाली सेठी आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.

अरविंद केजरीवाल यांची काम की राजनीति पुण्यातील प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवा. जे दिल्लीत झालं, तो बदल पुण्यात ही शक्य आहे आणि त्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे”, असे मत आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्ली सरकारचे सामाजिक कल्याण मंत्री राजेंद्र गौतम यांनी आम आदमी पक्षाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथील निवडणूक मेळाव्यामध्ये व्यक्त केले. त्यांच्या हस्ते आज पुणे महानगरपालिकेतील आम आदमी पक्षाच्या प्रचाराचा आरंभ करून गॅरंटी कार्डचे अनावरण करण्यात आले.

आम आदमी पक्षाचे सरकार पुणे महापालिकेमध्ये निवडून आल्यानंतर पुणेकर जनतेला 6 सेवा हमी पूर्वक देण्यात येतील. मोफत व दर्जेदार शिक्षण, मोफत व दर्जेदार आरोग्य सेवा, महिलांसाठी मोफत बस सेवा, टँकर मुक्त पुणे, कचरामुक्त पुणे आणि घरपोच सरकारी कागदपत्रे या सहा हमीपत्रांचे यावेळी अनावरण करण्यात आले. आम आदमी पक्ष जनतेला आश्वासन देत नाही तर गॅरंटी देतो आणि निश्चित पूर्ण करतो असा संदेश या हमी पत्राच्या माध्यमातून आम आदमी पक्ष पुणेकरांना देत आहे.

गुरुवार दि. २ जून रोजी पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात मोठ्या जल्लोषात पार पडला. दिल्ली सरकारचे समाज कल्याण मंत्री राजेंद्र पाल गौतम, राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा मेनन, महाराष्ट्र राज्य निवडणूक प्रमुख महादेव नाईक, राज्य अध्यक्ष रंगा राचुरे, राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष विजय कुंभार, राज्य सचिव धनंजय शिंदे, आप वाहतूक विंग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हा अध्यक्ष मुकुंद किर्दत, डॉ अभिजित मोरे हे यावेळी मंचावर उपस्थित होते यावेळी मोठ्या संख्येने आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते आलेले होते.

कार्यक्रमाची सुरूवात राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज, महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून आप पुणे टीमकडून पुणे मनपा निवडणुकीचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेश प्रवक्ते डॉ. अभिजीत मोरे यांनी केले, आपल्या प्रास्ताविकपर मनोगतात त्यांनी आम आदमी पक्ष पुणे टीमकडून गेल्या १ वर्षांत केलेल्या कामाचे सादरीकरण केले. जवळपास ८५ वेगवेगळ्या टीमच्या माध्यमातून पक्षाचा प्रभावी प्रचार करण्यात येत आहे.

आप वाहतूक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष श्रीकांत आचार्य, पुणे जिल्हाध्यक्ष मुकुंद किर्दत, प्रदेश सचिव धनंजय शिंदे यांनी आपल्या भाषणात आप पुणे टीमच्या कामाचे कौतुक केले.

आपल्या कुटुंबाच्या उज्वल भवितव्यासाठी जनतेने आम आदमी पक्षाला सत्तेवर आणावे असे आवाहन यावेळी निवडणूक प्रमुख महादेव नाईक यांनी केले तर राष्ट्रीय प्रवक्ता प्रीती शर्मा मेनन यांनी बूथ बांधणीवर भर देण्याची गरज यावेळी मेळाव्यामध्ये व्यक्त केली. सिनेकलाकार गौरी कर्णिक, रवी वालेचा, चाहत खन्ना, शेफाली सेठी यांनी यावेळी आम आदमी पक्षाच्या काम की राजनीतिला जाहीर पाठिंबा दिला आणि अशा पद्धतीच्या सकारात्मक राजकारणाला सर्वच नागरिकांनी सहकार्य केलं पाहिजे अशी भावना यावेळी व्यक्त केली.किरण कद्रे, विद्या यंदे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर आनंद अंकुश यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने अनेक लोकांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला.

निर्बंध नको असतील तर शिस्त पाळा, मास्क वापरा, लसीकरण करुन घ्या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

0

मुंबई, दि. २ : कोविड पुन्हा डोके वर काढत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोविड बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. राज्य शासन पुढील पंधरा दिवस लक्ष ठेवून असेल. निर्बंध नको असतील, तर नागरिकांनी स्वतःहून शिस्त पाळावी. मास्क वापरावा, लसीकरण करून घ्यावे, हात धुवावे आणि अंतर ठेवावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्र्यांनी आज सायंकाळी कोविड टास्क फोर्स समितीच्या सदस्यांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

वर्षा निवासस्थानी असलेल्या समिती कक्षात झालेल्या या बैठकीस मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, मुख्यमंत्री यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास, मुख्यमंत्री यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह आदी उपस्थित होते.

प्रारंभी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील कोविड विषाणूच्या संसर्गाबाबत सविस्तर माहिती दिली.

१६ एप्रिल २०२२ रोजी राज्यात सर्वात कमी ६२६ सक्रिय रुग्ण होते. आज दीड महिन्यात त्यात सात पटीने वाढ झाली असून ती संख्या ४५०० वर गेली आहे असे सांगून आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, मुंबई, ठाणे, पुणे तसेच महानगर क्षेत्रात राज्याच्या एकूण रुग्ण संख्येच्या ९७ टक्के रुग्ण आहेत. मुंबईचा पॉझिटीव्हीटी दर ६ टक्के असून राज्याचादेखील वाढून ३ टक्के झाला आहे असेही ते म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत कोविड रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार कोविड आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन पुढील पंधरा दिवस परिस्थितीवर लक्ष ठेवून असेल. कोविडचा प्रसार वाढू नये यासाठी नागरिकांनी कोविड अनुकूल व्यवहार करण्यावर भर दिला पाहिजे.

फिल्ड रुग्णालये सुसज्ज ठेवा

कोविड कालावधीत उभारण्यात आलेली फिल्ड रुग्णालये व्यवस्थित आहे का पाहा. त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन घ्यावे. या  ठिकाणी वैद्यकीय कर्मचारी आहेत का, आवश्यक पायाभूत सुविधा आहेत का याचा आढावा घ्यावा, अशा सूचना आरोग्य विभागाला दिल्या.

कोविड चाचण्यांचे प्रमाण कमी झाले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कोविड विषाणूचा नवीन व्हेरियंट आहे का, असल्यास त्याची संसर्ग क्षमता किती आहे, यावर लक्ष ठेवा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

लवकरच शाळा सुरू होतील. शाळेच्या बाबत जागतिक स्तरावर काय निर्णय घेतले गेले आहेत, तेथील मुलांना संसर्ग होण्याची स्थिती काय आहे, याबाबत माहिती घ्यावी, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी कोविड टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉ. संजय ओक, डॉ. अजित देसाई, डॉ. बजान, डॉ. शशांक जोशी, डॉ. राहुल पंडित, डॉ. वसंत नागवेकर, डॉ. तात्याराव लहाने यांनी दूरदृष्यप्रणालीव्दारे आपली मते मांडली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नागरिकांना आवाहन

ताप, सर्दी, घशात दुखत असल्यास तात्काळ कोविड चाचणी करुन घ्या

गर्दीच्या ठिकाणी मास्क आवर्जून वापरावा

बारा ते अठरा वयोगटातील लसीकरण वाढवा.

ज्येष्ठ, सहव्याधी नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, बूस्टर लस घ्यावी

आरोग्य व्यवस्थेने पायाभूत सुविधांची तयारी करुन ठेवावी

ऑक्सिजन, औषधे यांचा साठा करुन ठेवावा.

येणाऱ्या पावसाळ्यामुळे जलजन्य आजारदेखील डोके वर काढतात, त्यांची लक्षणे कोरोना सारखीच असल्याने डॉक्टरांनीदेखील अशा रुग्णांना वेळीच चाचण्या करून घेण्यास सांगावे.

भव्य शोभायात्रा व ढोल-ताशांच्या गजरात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

पुणे शहरातील समस्त राजपूत समाजाच्या वतीने आयोजन ; वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची ४८२ वी जयंती

पुणे – ढोल-ताशांचा गजर… बँडचा निनाद… शंख नाद व पुष्पवृष्टी अशा पारंपरिक वातावरणात वीरशिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या ४८२ व्या जयंतीनिमित्त पुणे शहरातील समस्त राजपूत समाजाच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान येथून शोभायात्रेला प्रारंभ झाला.

यावेळी रा.स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, माजी नगरसेवक रवींद्र धंगेकर, अजय खेडेकर, डॉ.मिलिंद भोई यांच्या हस्ते महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे व पालखीचे पूजन झाले. अ‍ॅड. प्रताप परदेशी, किशोर राजपूत, स्वप्नील नाईक, सुदेश काची, शैलेश बढाई, विजय परिहार, राजेश ठाकूर, सोमनाथ परदेशी, रवींद्र परदेशी, मधुबाला परदेशी, विनायक काची, मनिष साळुंके आदींनी सोहळ्याचे आयोजन केले. ब-याच वर्षांनी पुणे शहरातील व उपनगरातील राजपूत समाज एकत्र आला.

महाराणा प्रताप उद्यानातील महाराणा स्मारकातील पुतळ्यास सकाळी पुष्पहार अर्पण व अभिवादन केल्यावर गुणवंत व कर्तबगार व्यक्तिंचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर अन्नदानाचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता.

महाराणा प्रताप यांची जयंती तिथीनुसार मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे ठरले. महाराष्ट्र सरकारने शासन परिपत्रक काढुन राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात महाराणा जयंती शासकीय पध्दतीने साजरी करण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर वीरशिरोमणी महाराणाजींना शासनाने राष्ट्रपुरुष म्हणून घोषित केल्याने यावर्षी संपुर्ण राज्यांमधे व पुणे शहरात यंदाची जयंती मोठ्या प्रमाणात विविध सामाजिक, धार्मिक मिरवणूक व अभिवादन करुन साजरी करण्यात आली.

शोभायात्रेला महाराणा प्रताप उद्यान येथून सुरुवात झाली. चिंचेची तालीम , सेवा मंडळ, फडगेट पोलीस चौकी शितळादेवी चौकातून मिठगंज पोलीस चौकी मार्गे कस्तुरे चौकात समारोप झाला. मिरवणुकीत ढोल ताशा पथक व बँड पथक देखील सहभागी झाले होते. राजस्थानी राजपूत सेवा संघ कात्रज कोंढवा विभागातील समाजबांधव दुचाकी रॅलीद्वारे सहभागी झाले होते. संपूर्ण सोहळ्यात ५ ते ६ हजार समाजबांधवांनी सहभाग घेतला.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेची बुधवार पेठेतील मटका अड्ड्यावरही धाड

बुधवार पेठेतील एका इमारतीत सुरु असलेल्या जुगार अड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून 12 जणांना अटक केली.पोलिसांनी केलेल्या या कारवाईत रोख रक्कम तसेच जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य असा एकूण 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींवर फरासखाना पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता,पोलीस सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळेपोलीस उपायुक्त गुन्हे श्रीनिवास घाडगे,यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक,पोलीस उपनिरीक्षक श्रीधर खडके पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत,,निलम शिंदे, प्रमोद मोहिते, इरफान पठाण, अश्विनी केकाण यांच्या पथकाने केली.

या प्रकरणी अतुल अरुण उमापती , सुहास संतोष दाकले, महादेव गौतम डोकेफोडे , भोलेनाथ राजू बनसोडे , इंद्रजीत विनोद पाटील निखिल मारुती मारणे परशुराम चर्मकानी नाडर तुकाराम तानाजी मारणे , मंदार बंडोपंत काळे तुषार मिलिंद बहुले निखिल नंदकुमार क्षीरसागर ऋषिकेश दत्तात्रय जाधव यांना अटक केली आहे. (Pune Crime)बुधवार पेठेतील क्रांती हॉटेलजवळील एका इमारतीमध्ये जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. त्यानुसार पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी जुगार अड्ड्याचा मालक तसेच जुगार खेळण्यासाठी आलेल्या आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 77 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

धनकवडीत आणखी एका मटका अड्ड्यावर छापा २१ जणांना अटक – दोघांचा शोध जारी

पुणे- केके मार्केट जवळील महापालिकेच्या तर्क टर्मिनस मध्ये चालू असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकलेल्या पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या गुन्हे शाखेने धनकवडीत आणखी एका मटका अड्ड्यावर छापा टाकून २३ जणांवर कायदेशीर कारवाई केली आहे. हा मटका अड्डा सावरकर चौकातील फाईव स्टार सोसायटी तील तळमजल्यावरील एका सदनिकेत सुरु होता. हा अड्डा चालविणारे सुनील नारायण निर्मल (वय -३५ सावरकर चौक ,फाईव्ह स्टार सोसायटी ,धनकवडी )आणि किशोर लक्ष्मण कांबळे (रा. तळजाई माता वसाहत, पद्मावती) या दोघांचा पोलीस शोध घेत आहेत . यातील कांबळे हाच ट्रक टर्मिनस येथील मटका अड्ड्यावर देखील मालक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानाव्ये , आणि मार्गदर्शनाखाली सहआयुक्त संदीप कर्णिक ,भाग्यश्री नवटके ,उपायुक्त श्रीनिवास घाडगे,पोईल्स निरीक्षक राजेश पुराणिक फौजदार श्रीधर खडके सुप्रिया पंढरकर,पोलीस अंमलदार कुमावत,कांबळे ,पठाण ,कोलगे चव्हाण आदींनी हि कारवाई केली. पोलिसांनी तब्बल २१ जणांना येथून अटक केली आणि जुगाराचे साहित्य व १ लाखावर रोकड येथून जप्त केली . कांतीलाल लक्ष्मण काळे, इसाक वजीर शेख ,संदीप हनुमंत कांबळे,बबन मनसिद्ध रणखांबे, विकास चंद्रकांत कसबे,समाधान बाळू वाघमारे ,सिद्धराम शरणाप्पा पाटील,संतोष मारुती शेवते ,विनोद मारुती पवार,सुनील आनंद सूर्यवंशी,संजय शिवाजी शिंदे ,अनिल जयसिंग गायकवाड ,अर्जुन बाळासाहेब कदम ,पांडुरंग तुकाराम इंगळे,अजित रामचंद्र सपकाळ ,विष्णू रघुनाथ ढगे ,संदीप विश्वनाथ विनपुरे,विनायक नागू डांगे,चंद्रकांत वैजनाथ तोडकरी ,ज्ञानेश्वर गुलाब कुचेकर,दिगंबर काशिनाथ संग रकर अशी अटक केलेल्या २१ जणांची नावे आहेत

महापालिकेच्या जागेतील मटका :जुगार अड्ड्यावर अखेरीस छापा

पुणे- अनेक वर्षे कुणा राजकीय पुढाऱ्याच्या आशीर्वादाने सुरु असल्याची चर्चा असलेला केके मार्केट जवळील महापालिकेच्या ट्रक टर्मिनस च्या जागेत सुरु असलेल्या मटका – जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून ६ जणांना अटक केली तर दोघांचा शोध सुरु आहे. महापालिकेने ट्रक टर्मिनस साठी आरक्षित ठेवलेल्या जागेत हा गैर, बेकायदा धंदा अनेक वर्षे सुरु होता . विशेष म्हणजे याबाबत तक्रार करणाऱ्यांना दमदाटी करण्यात येत होती . पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानाव्ये , आणि मार्गदर्शनाखाली सहआयुक्त संदीप कर्णिक ,भाग्यश्री नवटके ,उपायुक्त श्रीनिवास घाडगे,पोईल्स निरीक्षक राजेश पुराणिक फौजदार श्रीधर खडके सुप्रिया पंढरकर,पोलीस अंमलदार कुमावत,कांबळे ,पठाण ,कोलगे चव्हाण आदींनी हि कारवाई केली. एका पत्र्याच्या शेड मध्ये हा जुगार अड्डा सुरु होता. जुगाराचे साहित्य आणि सुमारे २६ हजाराची रोकड जप्त केली आहे. गणेश विजय जगताप (वय ३५ ),किशोर लक्ष्मण कांबळे (वय ३८ ) दोघे रा. स. नंबर ६५ रा. तळजाई माता वसाहत , पदमावती,पुणे हे हा जुगार अड्डा चालवीत होते पोलीस,त्यांचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलिसांनी कळविले आहे. याशिवाय सुनील भानुदास क्षीरसागर ,उद्या चंद्रकांत कहार यांच्यासह ६ जणांना अटक करण्यात आली आहे. सामाजिक सुरक्षा विभाग , गुन्हे शाखा यांनी हि कारवाई केली

पुणे शहर परिसरातील टेकडयावर 4 व 5 जून लोकसहभागातून स्वच्छता मोहिम-उपवनसंरक्षक राहुल पाटील

पुणे दि.2: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वनविभागामार्फत टेकडी संवर्धनाच्या दृष्टीने व नागरिकांमध्ये निसर्गाविषयी आवड निर्माण होण्यासाठी पुणे शहर परिसरातील टेकड्यांवर 4 व 5 जून रोजी स्वयंसेवी संस्था, पर्यावरणाविषयी आवड असणारे नागरिक, विविध टेकडी गृप यांच्या लोकसहभागातून स्वच्छता मोहिम राबविण्यात येणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी दिली.

4 जून रोजी हनुमान टेकडी, म्हातोबा टेकडी, वेताळ टेकडी, मोहमंदवाडी, वानवडी येथील टेकडी व 5 जून रोजी वारजे, हिंगणे, तळजाई, सिंहगड, बावधन, घोराडेश्वर येथील टेकडी परिसरात लोकसहभागातून स्वच्छता मोहिम सकाळी  7 ते 9 या वेळेत राबविण्यात येणार आहे. सहभाग नोंदविण्यासाठी  वनपरिक्षेत्र अधिकारी, पुणे, भांबुर्डा व नोंदणीसाठी ९८३४५२८०३० या भ्रमणध्वनी क्रमांकावर  संपर्क साधावा.

पुणे शहर परिसरातील वनविभागाचे अधिनस्त असणाऱ्या टेकडीवर स्वच्छता मोहिम महिन्यातून एकदा पहिल्या शनिवारी लोकसहभागातून उस्फूर्तपणे  सामाजिक संस्था व इतर सेवाभावी संस्थाच्या   सहभागाने राबविण्यात  येणार आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था, विविध टेकडी गृप यांनी या मोहिमेत उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन उपवनसंरक्षक श्री. पाटील यांनी केले आहे

“ऑपरेशन महिला सुरक्षा” या संपूर्ण भारतभर झालेल्या मोहिमेदरम्यान रेल्वे पोलिस दलाने 150 मुली,महिलांची केली सुटका

0

महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या 7000 हून अधिक जणांना अटक

नवी दिल्ली- भारतीय रेल्वेने महिलांची सुरक्षा आणि सुरक्षितता याला नेहमीच प्राधान्य दिले आहे. रेल्वे सुरक्षा  दल (RPF) आणि रेल्वेत आघाडीवर काम करणारे कर्मचारी भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांचा सुरक्षित आणि संरक्षित होईल,हे सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करत असतात.  महिला सुरक्षेच्या या उद्दिष्टाला समर्पित असलेली “ऑपरेशन महिला सुरक्षा” मोहीम दिनांक 3 ते 31 मे 2022 दरम्यान संपूर्ण भारतात राबवण्यात आली.

या मोहिमेदरम्यान आरपीएफने महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यातून अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या 7 हजारांहून अधिक व्यक्तींना अटक केली आहे.  आरपीएफने 150 मुली/महिलांना मानवी तस्करीचे बळी होण्यापासून वाचवले.

 रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना त्यांच्या संपूर्ण प्रवासासाठी अधिक संरक्षण आणि सुरक्षितता प्रदान करण्याच्या उद्देशाने “मेरी सहेली” हा उपक्रम संपूर्ण भारतभर  कार्यरत आहे.283 प्रशिक्षित महिला अधिकारी आणि कर्मचारी असलेल्या या  चमूने (223 स्थानके व्यापणारा ) विविध ठिकाणी दररोज सरासरी एकूण 1125 महिला आरपीएफ कर्मचारी तैनात केले आहेत, ज्यांनी या कालावधीत 2 लाख 25 हजारांहून अधिक महिलांशी संवाद साधला आणि त्यांना पूर्णतः मदत केली.

 या काळात पुरुष आणि महिला आरपीएफ कर्मचार्‍यांच्या मिश्र तुकड्या असलेले ट्रेन एस्कॉर्ट देखील मोठ्या प्रमाणावर तैनात करण्यात आले होते.मिश्र तुकड्या काही महिन्यांपूर्वी सुरू झाल्या आहेत आणि त्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे.

 रेल्वे प्रवास करणाऱ्यांना  त्यांच्या प्रवासादरम्यान त्यांच्या सुरक्षिततेसाठी  काय करावे  आणि काय टाळावे,याबद्दल शिक्षित करण्यासाठी, 5742 जागरुकता मोहिमा आयोजित करण्यात आल्या होत्या.  या महिनाभर चाललेल्या कार्यवाहीमध्ये, आरपीएफ जवानांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून, चालत्या ट्रेनमध्ये चढताना/ उतरताना घसरलेल्या आणि चालत्या ट्रेनखाली येण्याची शक्यता असलेल्या 10 महिलांचे प्राण वाचवले.

ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या “मनातला पाऊस” पुस्तकाचे प्रकाशन

0

मुंबई, दि. 2 : जो लिहितो तोच लेखक आहे असे नाही तर जो विचार करतो, जो काही तरी सांगू पाहतो तो खऱ्या अर्थाने लेखक असतो. आपल्या मनात आलेले विचार सहजपणे सुचणे आणि लिहिणे यासारखा सुंदर उपक्रम असू शकत नाही. कारण याच लेखनाच्या माध्यमातून आपण सहजपणे अनेक पिढयांशी जोडले जातो असे लेखक आणि दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी सांगितले.

ज्येष्ठ नेते, साहित्यिक यशवंतराव गडाख यांच्या “मनातला पाऊस” या अरुण शेवते यांनी संपादित केलेल्या, ऋतूरंग प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन प्रख्यात दिग्दर्शक, कवी नागराज मंजुळे यांच्या हस्ते आणि मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या उपस्थितीत आज यशवंतराव चव्हाण सेंटरच्या मुख्य सभागृहात झाले.या पुस्तक प्रकाशन सोहळयास अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, खासदार विनायक राऊत, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार मंजुळाताई गावीत, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार शहाजी बापू पाटील, आमदार दिपक केसरकर, आमदार कैलास घाडगे पाटील, आमदार शेखर निकम, आमदार महेंद्र थोरवे, आमदार किशोर जोरगे, माजी राज्यमंत्री दीपक केसरकर, ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अंबरीश मिश्र, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, ज्येष्ठ नेते उल्हास पवार, डॉ.डी.वाय.पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.डी.पाटील, लेखक विश्वास पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना श्री. मंजुळे म्हणाले की, फॅण्ड्री केल्यानंतर अनेक लोकांचा संपर्क येऊ लागला. गडाख कुटुंबियांशी माझी त्यानंतर ओळख झाली. यशवंतराव गडाख यांना मी गेल्या 9 ते 10 वर्षांपासून ओळखत असून प्रत्येक वेळी त्यांना भेटल्यावर मला त्यांच्याबद्यल वेगळा जिव्हाळा वाटतो. आज त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन सोहळयासाठी मला निमंत्रित करण्यात आले आहे हा माझा सन्मान वाटतो.
समाजात राहताना संवेदनशील असणे गरजेचे आहे. या पुस्तकातून यशवंतराव स्वत: बोलल्याचा भास होतो.

अनेकदा त्या त्या वेळी त्या त्या गोष्टी करणे गरजेचे असते, त्यामुळे काहीतरी सुचले तर ते लिहून काढणे अत्यंत गरजेचे आहे. शाळेत असताना अभ्यासावरुन वडिलांकडून खूप मार खाल्ला पण आज वडिल नसल्यावर वडिलांची माया कळून येते.दहावीत नापास झाल्यावर किंवा नोकरी सोडल्यावरही आपले वडिल आपल्या मागे किती भक्कमपणे उभे होते हे सांगताना श्री. मंजुळे हळवे झाले.

अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. भुजबळ म्हणाले की, मनात सतत वाईट भावना असतील तर मनात चांगले विचार येऊन ते मांडणे कठीणच असते. पण यशवंतराव गडाख यांनी राजकारणात असूनही समाजकारण करीत सोनई गावाचे सोने केले. राजकारणात असूनही शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम केले. 1970 मध्ये अहमदनगरमध्ये साहित्य संमेलन भरवून त्यांनी आपले साहित्यावर किती प्रेम आहे हे दाखवून दिले आहे.

ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अंबरीश मिश्र यावेळी म्हणाले की, लेखक आणि पत्रकार हे अनोळखी वाचकांच्या प्रेमावर जगत असतात. माझी आणि यशवंतराव यांची रोज भेट होत नसली तरी आमची चांगली मैत्री आहे. माझ्या मते रोजगार हमी योजनेचे कामगार आणि लेखक यामध्ये फारसा फरक नाही कारण रोजगार हमी योजनेचे कामगार दररोज दगड फोडतात तर लेखक हे दररोज शब्द फोडत असतात, भाषेशी खेळत असतात. आपल्या लेखनाशी संवेदना आणि प्रामाणिकता असेल तर सोनई असो किंवा सॅन फ्रॅन्सिस्को लेखनातला आनंद मिळतच राहतो.

ज्येष्ठ नेते उल्हास पवार यावेळी म्हणाले की, मनातला पाऊस हे पुस्तक अत्यंत सुंदर आहे. राजकारण करीत असताना समाजकारण कसे करता येते, आपल्या अवती भवती आपल्यासाठी काम करणारे, आपल्या परिचयातले किती महत्वाचे असतात हे त्यांनी खूप चांगल्या शब्दांमध्ये मांडले आहे. आजच्या काळात आपल्याला सूचत असलेल्या गोष्टी लिहून ठेवणे आवश्यक आहे.

एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर म्हणाले की, सालसपणा, सुस्वभावीपणा आणि संस्कृतपणा यशवंतराव चव्हाण आणि यशवंतराव गडाख यांनी नेहमीच जपला. यशवंतराव गडाख यांचे लिखाण हे ग्रामीण जीवनाशी नाळ जोडणारा आहे. त्यांनी आपल्या लेखनातून प्रत्येक गावाचे काय वेगळे वैशिष्टय असू शकते हे उत्तमपणे मांडले आहे. सध्या वाढत्या शहरीकरणामुळे गावाचे अस्तित्व कमी होत असताना मनातला पाऊस हे मनाला आनंद देणारे पुस्तक आहे.

या पुस्तकाविषयी बोलताना अरुण शेवते म्हणाले की, यशवंतराव गडाख आणि माझी अनेक वर्षांपासूनची मैत्री आहे. 1993 साली मी त्यांची पहिली मुलाखत घेतली आणि आज इतक्या वर्षांनी त्यांची अनेक पुस्तके संपादित केल्यानंतर मनातला पाऊस हे पुस्तक प्रकाशित होत आहे याचा आनंद आहे.

यापूर्वी यशवंतराव गडाख यांचे अर्धविराम आत्मचरित्र, अंर्तवेध, सहवास, माझे संचित ही पुस्तके प्रकाशित झाली असून अर्धविराम हे आत्मचरित्र, पुणे विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झाले होते. त्यांच्या अनेक पुस्तकांना विविध पुरस्कार लाभले आहेत.यशवंतराव गडाख यांच्या 80 व्या वाढदिवसानिमित्त ऋतूरंग मधल्या निवडक लेखांचे हे पुस्तक असूनया पुस्तकाचे संपादन करणाऱ्या अरुण शेवते यांनी केले आहे.

ड्रायव्हिंग लायसन आता मिळणार ऑनलाईन – परिवहनमंत्री ॲड. अनिल परब

0

मुंबई दि 2 : परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या 115 सेवांपैकी ८० सेवा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येत आहेत. आता परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कार्यालयात वाहन चालक (लायसन्स) अनुज्ञप्तीचे नूतनीकरण, दुय्यम वाहन चालक अनुज्ञप्ती, वाहन-चालक अनुज्ञप्तीमधील पत्ता बदल, दुय्यम वाहन नोंदणी प्रमाणपत्र, वाहन नोंदणी प्रमाणपत्राचा पत्ता बदल तसेच बाहेरील राज्यात जाण्यासाठी  ना-हरकत प्रमाणपत्रासाठी जावे लागणार नाही. आता या सहा सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांनी दिली.

परिवहन आयुक्त कार्यालयात आज या सहा सेवांचे लोकार्पण मंत्री श्री. परब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कार्यक्रमास परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे, अप्पर परिवहन आयुक्त जितेंद्र पाटील, सह परिवहन आयुक्त दिनकर मनवर, एनआयसीचे तांत्रिक संचालक दीपक सोनार आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. परब म्हणाले, विभागामार्फत ११५ अनुज्ञप्ती, नोंदणी प्रमाणपत्र, परवाना संबंधित सेवा देण्यात येत असून, केंद्र शासनाच्या सूचनांनुसार ८० सेवा ऑनलाईन असून, आज सहा सेवा ऑनलाईन पद्धतीने सुरू केल्या आहेत. याचा तब्बल २० लाख लोकांना लाभ मिळेल. पारदर्शक सेवा नागरिकांना मिळावी यासाठी या सेवा आधारकार्डसोबत जोडण्यात आल्या असल्याचेही त्यांनी सांगितले.

अर्जदार अर्ज, पेमेंट व कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करु शकतो. या सेवांचा लाभ घेण्याकरिता  आधार क्रमांकचा वापर करण्यात येणार असून, आधार कार्डशी लिंक असलेल्या मोबाईलवर OTP पाठविण्यात येणार, त्यानंतर  त्याची नोंदणी परिवहन या संकेतस्थळामध्ये केल्यास अनुज्ञप्ती / नोंदणी प्रमाणपत्रामधील अर्जदाराची माहिती व आधार अभिलेखातील अर्जदाराची माहिती याची खातरजमा झाल्यानंतरच पुढे अर्ज करणे शक्य होणार आहे. अर्जदाराचे नाव, पत्ता, जन्म तारीख व मोबाईल क्रमांक याची खातरजमा झाल्यामुळे आता पुढील नमुद ६ अर्जाकरिता कार्यालयामध्ये येण्याची आवश्यकता नाही. तसेच नवीन अनुज्ञप्ती (लायसन्स) / नोंदणी प्रमाणपत्र अर्जदारास पोस्टाने पाठविण्यात येणार आहे.

राज्यामध्ये दुय्यम नोंदणी प्रमाणपत्राकरिता वर्षभरात एक लाख अर्ज प्राप्त होतात. ना-हरकत प्रमाणपत्राकरिता वर्षभरात ३०,००० तर, नोंदणी प्रमाणपत्रावरील पत्ता बदलाकरिता २०,००० अर्ज, (लायसन्स)अनुज्ञप्तीचे दुय्यमीकरण प्रमाणपत्राकरिता दोन लाख अर्ज, अनुज्ञप्तीवरील (लायसन्स) पत्ता बदलकरिता दोन लाखाहून अधिक अर्ज प्राप्त होतात. अनुज्ञप्तीच्या नूतनीकरणाकरिता १४ लाख अर्ज प्राप्त होतात. आता ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने पूर्ण होणार आहे.

जादुगार जशी जादू रंगमंचावर करून दाखवतो तशीच जादू व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्रामुळे चित्रपटाच्या पडद्यावर घडते: पी.सी.सनथ

मुंबई, 2 जून 2022

जादुगार जशी जादू रंगमंचावर करून दाखवतो तशीच जादू व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्रामुळे चित्रपटाच्या पडद्यावर घडून येते. चित्रपटाच्या कथेवर हे तंत्र जादूची कांडी फिरविते आणि त्या कथेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाते असे बाहुबली चित्रपटाचे व्हीएफएक्स पर्यवेक्षक आणि सर्जनशील दिग्दर्शक पी.सी.सनथ यांनी म्हटले आहे.

ते म्हणाले, “जेव्हा एखादा चित्रपट निर्माता अथवा तंत्रज्ञ चित्रपट तयार करताना एखादी गोष्ट घडवू शकत नाहीत तेव्हा ते व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्राची मदत घेण्याचा विचार करतात. व्हीएफएक्स तंत्रामुळे कोणतीही गोष्ट घडविता येते, सर्जकाची कल्पनाशक्ती जितकी अमर्याद तितकीच या तंत्राची आविष्काराची शक्ती देखील अपरंपार असते.”

सध्या सुरु असलेल्या 17 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये आज आयोजित करण्यात आलेल्या ‘व्हीएफएक्स : कथाकथनाकरिता सतत नव्याने उदयाला येत असलेले साधन’ या विषयावरील कार्यशाळेत बोलताना प्रख्यात व्हीएफएक्स पर्यवेक्षक सनथ यांनी हे प्रतिपादन केले.

व्हीएफएक्स तंत्राचे महत्त्व अधिक ठळकपणे सर्वांसमोर मांडताना ते म्हणाले की, आजच्या जमान्यात व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्राचा वापर केलेला नाही असा एकही चित्रपट दिसत नाही. “नव्या तांत्रिक साधनांच्या आगमनामुळे, व्हीएफएक्स तंत्राचा परीघ अधिक रुंदावला आहे, मात्र एखाद्या व्हीएफएक्स तंत्रज्ञाने कधीही हे तंत्रज्ञान अथवा अशा इतर चित्रपटांमध्ये वापरण्यात आलेले तंत्रज्ञान यांच्या प्रभावाखाली राहता कामा नये. त्याने नेहमीच त्याच्या हातातील कथेचे सार जाणून घेतले पाहिजे,” एका प्रश्नाच्या उत्तरादाखल त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, चलतचित्रांच्या तंत्रज्ञानाच्या शोधापासूनच व्हिज्युअल इफेक्ट्स हा चित्रपटीय कथाकथनाचा अविभाज्य भाग बनून राहिला आहे. विसाव्या शतकात जेव्हापासून चित्रपट हे कथाकथनाचे लोकप्रिय माध्यम म्हणून उदयाला आले तेव्हाच व्हिज्युअल इफेक्ट्स हे तंत्र देखील अनेक नवी तंत्रे आणि तंत्रज्ञान यांचा स्वीकार करून चित्रपट निर्मात्यांना त्यांच्या गोष्टी चित्रपटाच्या माध्यमातून अधिक उत्तम प्रकारे सादर करण्यात मदत करत आहे.

चित्रपट तयार करणाऱ्यांना त्यांच्या चित्रपटीय स्वप्नांची कल्पना करण्यासाठी आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात साकार करण्यासाठी व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्राने कशा प्रकारे मदत केली आहे याचे देखील दर्शन या कार्यशाळेच्या वर्गामध्ये घडविण्यात आले. तसेच एआर अर्थात वाढीव सत्यता आणि व्हीआर अर्थात आभासी सत्यता यांसारख्या साधनांच्या मदतीने भविष्यातील चित्रपट निर्मात्यांना व्हीएफएक्स तंत्र नव्या सीमा पार करण्यासाठी उपलब्ध करून देऊ शकणाऱ्या शक्यतांकडे देखील यावेळी निर्देश करण्यात आला.

पी.सी.सनथ हे हैदराबाद येथील फायरफ्लाय क्रिएटिव्ह स्टुडिओचे सह-संस्थापक आणि संचालक आहेत. गेल्या अडीच दशकांपासून ते व्हिज्युअल इफेक्ट्स तंत्राचा उत्तम वापर करत आहेत. बाहुबली-द बिगिनिंग (2015), रोबो (2010), ईगा (2012), पुलीमुरुगन (2016) आणि मलिक (2021) या चित्रपटांसह अनेक तुफान लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांसाठी व्हीएफएक्स तंत्रज्ञ अनि सर्जनशील दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. सर्वोत्तम व्हिज्युअल इफेक्ट्ससाठीच्या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरील चित्रपट पुरस्कारांसह त्यांनी अनेक प्रतिष्ठित पुरस्कार प्राप्त केले आहेत. चित्रपट उद्योग क्षेत्रातील टीव्हीएजीए (तेलंगणा व्हीएफएक्स,अॅनिमेशन अँड गेमिंग असोसिएशन ) सारख्या अनेक संस्थाच्या कार्यात ते सहभागी आहेत. पुण्याची चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था, अहमदाबादची राष्ट्रीय डिझाईन संस्था आणि केरळच्या के.आर.नारायणन राष्ट्रीय व्हिज्युअल विज्ञान आणि कला संस्था यांसारख्या विविध कला आणि चित्रपट निर्मितीशी संबंधित शैक्षणिक संस्थांमध्ये व्याख्याते तसेच शैक्षणिक सल्लागार म्हणून देखील कार्यरत आहेत.

भोंग्यांचा विषय कायमचा संपवायचाय:राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश; भोंगा पुन्हा ऐरणीवर

 राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना प्रत्येक घराघरात जाण्याचं आव्हान केलेय. राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून आपला मुद्दा पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. तसेच पत्रात भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा असल्याचेही त्यांनी सांगितलेय. त्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिलेय. हे पत्र प्रत्येक पदाधिकाऱ्यांपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषेत पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेय. ते पत्र मनसे सैनिकांना प्रत्येक घरात पोहचवण्याची विनंती केली आहे. व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलेय. 

 पत्रात नेमके म्हटलेय काय?

माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, अशी सुरुवात असलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलेच नव्हे तर देशातले राजकारण ढवळून निघाले. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझे एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचे आहे. माझे पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील – घराघरात स्वतः नेऊन द्यायचे आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपले हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.

ऊर्जा क्षेत्रातील कोळशाची आयात 40 टक्क्यांनी घटली

0

नवी दिल्ली, 2 जून 2022

कोळशाची आयात,जी 2019-20 मध्ये 248 दशलक्ष टन (दशलक्ष टन) इतक्या उच्च स्तरावर पोहोचली होती, त्यामध्ये पुढील दोन वर्षात सातत्याने घट झाली आहे. 2020-21 मध्ये 215 दशलक्ष टन आणि पुढे 2021-22 मध्ये 209 दशलक्ष टनांपर्यंत खाली आली आहे.

वास्तविक कोळशाच्या मागणीत 2019-20 मध्ये 956 दशलक्ष टनांवरून 2021-22 मध्ये 1027 दशलक्ष टनांपर्यंत सतत वाढ होऊनही, कोळशाची आयात वाढलेली नाही. 2009-10 ते 2013-14 या कालावधीत कोळशाची आयात 22.86% अशा वार्षिक चक्रवाढीच्या गतीने  (CAGR) वाढली.या वार्षिक चक्रवाढीच्या गतीने (CAGR ), कोळशाची आयात 2020-21 मध्ये 705 दशलक्ष टन आणि पुढे 2021-22 मध्ये 866 दशलक्ष टन वर पोहोचली असती.देशांतर्गत पुरवठा कायम ठेवूनच कोळशाची ही आयातीतली वाढ नियंत्रणात ठेवली जाऊ शकते.

अखिल भारतीय कोळसा उत्पादन 2020-21 मध्ये 716 दशलक्ष टन वरून 2021-22 मध्ये 777 दशलक्ष टन पर्यंत वाढले आहे परिणामी 61 दशलक्ष टन  इतकी वाढ झाली आहे.  त्यामुळे, 2020-21 मधील मागणीत 906 दशलक्ष टन वरून 2021-22 मध्ये 1027 दशलक्ष टन पर्यंत सतत प्रचंड वाढ होऊनही, 2020-21 मधील देशांतर्गत उत्पादन 691 दशलक्ष टन आणि 2021-22 मध्ये 818 दशलक्ष टनांपर्यंत वाढल्यामुळे कोळशाची ही  आयात रोखली गेली असू शकेल. 

2020-21 मध्ये 101 दशलक्ष टन ते 2021-22 मध्ये 104 दशलक्ष टनाने देशांतर्गत संप्रेषण केवळ ऊर्जा क्षेत्रासाठीच नाही तर बिगर-उर्जा क्षेत्रात देखील वाढलेले आहे.

2021-22 मध्ये कोळशाच्या आयातीतील घट मुख्यत्वे ऊर्जा क्षेत्रातील आयात कमी झाल्यामुळे झाली आहे; जी 2020-21 मध्ये 45 दशलक्ष टनांवरून 2021-22 मध्ये 27 दशलक्ष टनांपर्यंत खाली आली, म्हणजे जवळजवळ 40% ची घसरण झाली आहे. 2021-22 मधील उर्जा क्षेत्रासाठी कोळशाच्या आयातीची तुलना 2019-20 च्या कोविडपूर्व  वर्षाशी केली तर ही घट अधिक तीव्र झालेली दिसून येते,जेव्हा ही आयात 69 दशलक्ष टन इतकी होती.देशातील एकूण औष्णिक उर्जा उत्पादन 2020-21 मध्ये 1032 BU वरून 2021-22 मध्ये 1115 BU पर्यंत वाढले आहे, त्यात 83 BU ची निव्वळ वाढ झाली आहे आणि टक्केवारीच्या दृष्टीने ती जवळजवळ 8% आहे.

स्टील क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या कोकिंग कोळशाच्या आयातीत 2021-22 मध्ये 11.65% वाढ होऊन ती 57 एमटी इतकी झाली होती.तथापि, 2019-20 या वर्षी कोविडपूर्व वर्षाच्या तुलनेत, कोकिंग कोळशाच्या आयातीत झालेली वाढ सुमारे 10 टक्के आहे.

राजधानीत महाराणा प्रतापसिंह जयंती साजरी

0

नवी दिल्ली, दि. 2 :  शूर योद्धा, महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह  यांची  जयंती आज महाराष्ट्र सदन  व  महाराष्ट्र परिचय केंद्रात साजरी करण्यात आली.

कोपर्निकस मार्गस्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात सहायक निवासी आयुक्त डॉ. राजेश अडपावार  यांनी  महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी उपस्थित महाराष्ट्र सदनाच्या अधिकारी व  कर्मचाऱ्यांनीही  प्रतिमेस  पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

महाराष्ट्र परिचय केंद्रात महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन

महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात  महाराणा प्रतापसिंह यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी  तथा उपसंचालक (अ.का.) अमरज्योत कौर अरोरा यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी माहिती अधिकारी अंजू निमसरकर, उपसंपादक रितेश भुयार यांच्यासह कार्यालयात उपस्थित  कर्मचाऱ्यांनी  प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.