राज ठाकरे यांनी भोंग्याबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांना प्रत्येक घराघरात जाण्याचं आव्हान केलेय. राज ठाकरे यांनी एक पत्र लिहून आपला मुद्दा पुन्हा एकदा पटवून देण्याचा प्रयत्न केलाय. तसेच पत्रात भोंग्याचा विषय कायमचा संपवायचा असल्याचेही त्यांनी सांगितलेय. त्यासाठी त्यांनी एक पत्र लिहिलेय. हे पत्र प्रत्येक पदाधिकाऱ्यांपर्यंत मराठी, इंग्रजी आणि हिंदी या भाषेत पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवलेय. ते पत्र मनसे सैनिकांना प्रत्येक घरात पोहचवण्याची विनंती केली आहे. व्यापक लोकसहभागाशिवाय आपलं हे आंदोलन यशस्वी होणार नाही, असेही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलेय.
पत्रात नेमके म्हटलेय काय?
माझ्या प्रिय महाराष्ट्र सैनिकांनो, अशी सुरुवात असलेल्या पत्रात राज ठाकरे म्हणतात की, मशिदींवरील भोंग्यांच्या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने हात घातल्यानंतर राज्यातलेच नव्हे तर देशातले राजकारण ढवळून निघाले. आता हा विषय आपल्याला कायमचा संपवायचा आहे. त्यासाठी आपला विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायलाच हवा. म्हणूनच माझे एक पत्र मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेत आपल्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आले आहे. ते त्यांच्याकडून घ्या आणि कामाला लागा. तुम्ही एकच करायचे आहे. माझे पत्र तुम्ही राहता त्या परिसरातील – घराघरात स्वतः नेऊन द्यायचे आहे. कारण व्यापक लोकसहभागाशिवाय आपले हे आंदोलन यशस्वी होणार नाही. मला खात्री आहे; जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पत्र पोहोचवण्याच्या कामात तुमच्याकडून जराही कुचराई होणार नाही.