मुंबई, दि. 30 :- मुंबई किनारी रस्ते प्रकल्पातील बोगदे खणनाचा टप्पा मावळा-टीबीएम यंत्राने पूर्ण केला आहे. या प्रकल्पामुळे मुंबईकरांचा प्रवास आरोग्यदायी, आरामदायी आणि वाहतूक कोंडीमुक्त होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला. या प्रकल्पामुळे मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एक महत्त्वपूर्ण अशी भर पडल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मुंबई किनारी रस्ता प्रकल्पातील स्वराज्यभूमी-गिरगाव चौपाटी ते प्रियदर्शनी पार्क दरम्यानचा बोगदा खणण्याचा अखेरचा टप्पा- ब्रेक थ्रू मुख्यमंत्री श्री. शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते कळ दाबून करण्यात आला. याप्रसंगी मुंबई महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. आय. एस. चहल, अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, एल ॲण्ड टी कंपनी तसेच या प्रकल्पातील सल्लागार कंपन्यांचे अभियंते, अधिकारी, कर्मचारी आदी उपस्थित होते. प्रियदर्शनी पार्क येथे टीबीएम यंत्राने खोदाईचा हा अखेरचा टप्पा पूर्ण करून बोगदा पूर्ण करताच, या ठिकाणी काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी, कर्मचारी-कामगारांनी एकच जल्लोष केला.
या किनारा रस्ता प्रकल्पाला छत्रपती संभाजीराजे यांचे नाव देण्याचे यापूर्वीच जाहीर केल्याचे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले की, एमटीएचएल हा समुद्री सेतूही आता पूर्ण होतो आहे. हा मार्ग पुढे वरळीला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे पश्चिम महामार्गावरील ताण कमी होणार आहे. मेट्रोचे विविध मार्ग, उड्डाणपूल यांचे काम पूर्ण होण्यामुळे पश्चिम उपनगरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, मुंबईच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पातील हा बोगदा खोदाईचा टप्पा पूर्ण होणे एक महत्त्वाचा टप्पा आहे. या क्षणांचे साक्षीदार होण्याचे भाग्य आपल्याला लाभले आहे. या प्रकल्पाचे काम मार्गी लागावे यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी विशेष सहकार्य केले. मुख्यमंत्री श्री. शिंदे हे देखील या प्रकल्पाच्या कामावर सातत्याने लक्ष ठेवून होते. हा प्रकल्प लवकरात लवकर पूर्ण होईल. तो जनतेसाठी खुला होईल, असे प्रयत्न आहेत. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन वाहतूक सुविधेत एक महत्त्वाची भर पडणार आहे. हे आव्हानात्मक काम पूर्ण केल्याबद्दल या प्रकल्पासाठी झटणाऱ्या सर्वांचेच कौतुक करावे लागेल.
मुंबई किनारा रस्ता प्रकल्पाविषयी…
बोगदा खणणाऱ्या यंत्राने (TBM) खोदण्यात येणारा भारतातील सर्वात मोठ्या व्यासाचा (व्यास १२.१९ मी.) बोगदा आहे.
प्रकल्पातील बोगद्याला ३७५ मि.मी. जाड काँक्रिट अस्तर. त्यावर अग्निप्रतिबंधक उपाययोजने अंतर्गत फायरबोर्डची व्यवस्था. यामध्ये भारतात प्रथमच सकार्डो वायूविजन प्रणालीची व्यवस्था.
दुहेरी बोगद्यासाठी अद्ययावत वाहतूक व्यवस्थापन नियंत्रण प्रणालीची व्यवस्था. भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) बांधून पुलांची उभारणी.
प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे-वरळी सागरी सेतू वरळी टोकापर्यंतच्या या एकाच प्रकल्पामध्ये रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग, आच्छादित बोगदा, समुद्र तसेच टेकडीखालून बोगदा, हरितक्षेत्राची निर्मिती.
पर्यावरणपूरक पद्धतीनं काम. प्रवाळ (Coral)स्थलांतर व अस्तित्व टिकविण्याची कार्यवाही यशस्वी.
या सागरी किनारी रस्त्यामुळे अंदाजे ७० टक्के वेळेची बचत, ३४ टक्के इंधन बचत. इंधन बचतीमुळे प्रती वर्षी विदेशी चलनाची मोठ्या प्रमाणात बचत.
ध्वनी प्रदूषण व वायू प्रदूषण कमी होण्यास मदत. अतिरिक्त जवळजवळ ७० हेक्टर हरितक्षेत्र निर्मितीमुळे प्रदूषण कमी होऊन पर्यायाने मुंबईकरांचे जीवनमान सुधारण्यास मदत. सुरक्षित, जलद, कमी खर्चात प्रवास
या प्रकल्पात हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक (Cycle tracks), सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, (Jogging tracks), खुले प्रेक्षागृह (Open Theatre) इत्यादी समाविष्ट
हाजीअली व महालक्ष्मी मंदिर या दोन्ही ठिकाणी वरळी येथे पार्किंगची सुविधा उपलब्ध
प्रकल्पाचा अंदाजित खर्च रु. १२ हजार ७२१/-कोटी (बांधकाम खर्च रु. ८४२९/- कोटी).
रस्त्याची लांबी – १०.५८ कि.मी. मार्गिका संख्या – ८ (४+४), (बोगद्यांमध्ये ३+३)
पुणे- मराठी सिनेमाच्या शुटिंगसाठी पहाटे ४ वाजता निघालेल्या सहकलावंतांना लुटणाऱ्या दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. स्वप्नील दादा कोतवाल (वय २३ ,रा.शिंदेवस्ती ,हडपसर ) आणि महेश बबन गाजेसिंह (वय २९ रा.भीमनगर ,मुंढवा )अशी या २ चोरट्यांची नावे आहेत .
दि.२१/०५/२०२३ रोजी पहाटे ०४/०० वा. चे सुमारास पहाटे ०४/०० वा.च्या सुमारास फिर्यादी, व त्यांचे दोन मित्र असे सासवड, जि. पुणे येथे मराठी पिक्चरचे शुटींकरीता जाण्याकरीता स्वारगेट येथून असलेली बस पकडणे करीता निघालेले असताना, वानवडी पोलीस ठाणे हददीतील ९३ अॅव्हॅन्यू मॉल, पुणे सोलापूर रोड, येथील बी. टी. कवडे रोडचे लगत असलेल्या चहाच्या टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले असता, तेथे उभा असलेल्या एका इसमाने जाणीवपूर्वक फिर्यादीस धक्का मारून फिर्यादीस हाताला धरून खेचून त्याचेसोबत टपरी मागील हमरस्त्या लगतचे मोकळया व अडचणीच्या जागेत घेवून जावून, तेथे त्या इसमाचे उभे असलेले साथीदारापैकी एकाने त्याचेकडील धारदार हत्यार काढून फिर्यादीचे मानेवर ठेवले, व फिर्यादीचे पॅन्टच्या खिशातील मोबाईल जबरदस्तीने काढून घेवून धमकी दिली व फिर्यादीला घेवून आलेल्या इसमाने फिर्यादीकडील पॅन्टचे खिशातून जबरदस्तीने असलेले पैसे काढून घेतले. तसेच फिर्यादीचे मित्र हेही फिर्यादीस पाहण्यासाठी आले असता तेथे असलेल्या आणखी दोन इसमांनी त्यांना हाताने मारहाण करून त्याचेकडील असलेले पैसे असा एकूण १९,६०० /- रुपये ( एकोणीस हजार सहाशे रुपये फक्त) किंमतीचे एक मोबाईल हॅन्डसेट व रोख रक्कम जीवे मारण्याची धमकी देवून जबरदस्तीने काढून स्वतःचे फायदयाकरीता चोरुन नेली आहे. म्हणून फिर्यादीने वरील अनोळखी इसमांविरुध्द कायदेशीर तक्रार दिल्याने गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक संतोष सोनवणे तपास पथक, वानवडी पोस्टे हे करत आहेत. सदर दाखल गुन्हयाचे अनुषंगाने तपास पथक प्रभारी पोउपनि संतोष सोनवणे यांनी तपासकरत असताना,बी.टी.कवडे रोड येथील गुन्हयातील घटनास्थळावरील साक्षीदार, सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषन करून, वानवडी पोलीस ठाणे कडील तपास पथकातील पो.अं./ राठोड, गायकवाड, चोरमले, साळवे, सतार व इतर सर्व पोलीस अंमलदार यांनी मोठ्या शिताफिने व कौशल्याने गुन्हयातील खालील नमूद आरोपीत यांना जेरबंद करून अटक केली व त्यांचेकडुन गुन्हयातील व्हीवो कंपनीचा मोबाईल, कोयता तसेच गुन्हयात वापरणेत आलेली दुचाकी मोपेड गाडी असे एकुण रू. ७४,२००/- रक्कमेचा गुन्हयातील मुददेमाल हस्तगत करणेत आलेला आहे. गुन्हयातील जबरी चोर आरोपीतांची नावे खालीलप्रमाणे. १) स्वप्नील दादा कोतवाल, वय २३ वर्षे, धंदा. राहणार शिंदे वस्ती, हडपसर, पुणे २ ) महेश बबन गजेसिंह, वय. २९ वर्षे, राहणार राहणार भिमनगर, मुंढवा, पुणे सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर रंजनकुमार शर्मा, पोलीस उपआयुक्त परि ५, पुणे शहर विक्रांत देशमुख, सहा. पोलीस आयुक्त वानवडी विभाग पुणे शहर सौ. पौर्णिमा तावरे यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक भाऊसाहेब पटारे, पोलीस निरिक्षक गुन्हे संदिप शिवले व तपास पथकातील पोलीस उपनिरिक्षक संतोष सोनवणे, पो.अंम.अमोल गायकवाड, विठठल चोरमले, अतुल गायकवाड, पोहवा / अमजद पठाण, संतोष नाईक, हरीदास कदम,महेश गाढवे, विनोद भंडलकर, पोअं / संदिप साळवे, विष्णु सुतार, राहुल गोसावी, निलकंठ राठोड, व मनिषा सुतार, सोनम भगत यांनी केली आहे.
केंद्र शासनाने सर्व २९ कामगार कायदे एकत्र करून ४ कामगार संहिता तयार केल्या असून आज व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता (Code on Occupational Safety, Health and Working Conditions), 2020 या चौथ्या संहितेस राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. नवीन कामगार नियमांना मान्यता दिल्याने लाखो कामगारांचे हित जपण्यात आले आहे असा दावा करण्यात आला आहे..
व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहितेस मान्यता देण्यात आली आहे. यातील ठळक बाबी पुढीलप्रमाणे – 100 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यांमध्ये उपहारगृह बंधनकारक, 250 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात कल्याण अधिकारी, 50 पेक्षा जास्त कामगार असलेल्या कारखान्यात पाळणा घर अशा काही तरतुदी असतील.
यापूर्वी वेतन संहिता (Code on Wages), 2019, औद्योगिक संबंध संहिता (Code on Industrial Relations), 2020, सामाजिक सुरक्षा संहिता (Code on Social Security) 2020 या 3 संहितांच्या नियमांना राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
केंद्र शासनाने 1999 मध्ये माजी केंद्रीय कामगार मंत्री रविंद्र वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा श्रम आयोग नेमला होता. या आयोगाने सर्व 29 कामगार कायदे एकत्रित करुन या 4 कामगार संहिता (Labour Codes) तयार करण्याची शिफारस केली होती. या 4 संहिता अधिनियम संसदेने पारित केले आहेत.
कामगार हा विषय समवर्ती सूची मध्ये समाविष्ट असल्याने केंद्र शासनाने सर्व राज्यांसाठी एकत्रित संहिता तयार केली आहे. सर्व संहितांची अंमलबजावणी सर्व राज्यांमध्ये एकत्रितरित्या करावयाची असल्याने राज्यांनी संबंधित संहितांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने नियम पारित करणे आवश्यक आहे. त्यानुसार केंद्र शासनाने व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती संहिता अधिनियम, 2020 प्रसिद्ध केले आहेत.
या अधिनियमात राज्यांना समुचित शासन व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामाची स्थिती (कामगार) संहिता नियम तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार या संहितेस मान्यता देण्यात आली आहे.
केवळ एक रुपयात पीक विमा योजनेचा लाभ; लाखो शेतकऱ्यांना दिलासा
राज्यात सर्व समावेशक पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरुन पीक विमा योजनेचा लाभ देण्यात येईल. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी पिकांचे सरासरी नुकसान काढताना किमान 30 टक्के तंत्रज्ञान आधारित उत्पादन व पिक कापणी प्रयोगांतर्गत प्राप्त होणाऱ्या उत्पादनाचा मेळ घालून उत्पादन निश्चित करण्यात येईल. ही योजना खरीप व रब्बी हंगाम 2023-24 ते 2025-26 या तीन वर्षाच्या कालावधीसाठी निविदा प्रक्रीयेने राबविण्यात येईल. विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे नफा आणि तोटा शेअरींग मॉडेल किंवा कप अँड कॅप मॉडेल (80:110) नुसार मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीक विमा समन्वय समितीच्या मान्यतेने उचित पर्यायासह राबविण्यात येईल.
योजनेसाठी अंमलबजावणी यंत्रणांची निवड झाल्यानंतर कार्यारंभ आदेश देते वेळी मागील हंगामातील राज्य हिस्सा विमा हप्ता रकमेच्या 50 टक्के रक्कम केंद्र व राज्य शासनाच्या एस्क्रो अकाऊंटमध्ये जमा करण्यास मान्यता देण्यात आली.
नमो शेतकरी महासन्मान निधी योजना राबविणार; पीएम किसान योजनेची कार्यपद्धती सुधारणार
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याचा आणि “नमो शेतकरी महासन्मान निधी” योजना राबविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
2023-24 च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये घोषित केल्याप्रमाणे अन्नदाता बळीराजाच्या उत्पन्नवाढीसाठी प्रधानमंत्री कृषी सन्मान निधी योजनेत राज्य शासनाच्या अनुदानाची भर घालणारी “नमो शेतकरी महासन्मान निधी” ही योजना राबविण्यात येईल. या योजनेतून प्रति वर्ष रक्कम 6 हजार रुपये लाभ (दर चार महिन्यांनी रु. 2000/- अशी वार्षिक समान तीन हप्त्यात) पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येतील. पहिला हप्ता एप्रिल ते जुलै 2 हजार रुपये, दुसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर 2 हजार रुपये, तिसरा हप्ता डिसेंबर ते मार्च 2 हजार रुपये.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पी.एम.किसान पोर्टलवर नोंदणी करणे व पात्र लाभार्थींना मान्यता देण्यासंदर्भात कार्यपद्धतीत सुधारणा करण्यात आली. संनियंत्रणासाठी ग्रामस्तरीय, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय तसेच राज्यस्तरीय समित्या देखील गठित करण्यात येतील.
डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनची व्याप्ती वाढविली
राज्यात नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशनला मुदतवाढ देण्याचा तसेच राज्यभर व्याप्ती वाढविण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या योजनेस 2027-28 पर्यंत मुदतवाढ देण्यात येईल. या मिशनअंतर्गत 1 हजार 83 कोटी 29 लाख रुपये आर्थिक तरतुदीस तसेच राष्ट्रीय नैसर्गिक शेती अभियान व मोठ्या क्षेत्राचे प्रमाणीकरण योजनेंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाचे मिळून 837 कोटी 70 लाख रुपये आर्थिक तरतुदीसही मान्यता देण्यात आली.
यावेळी अधीक्षक कृषी अधिकारी, कृषी उपसंचालक आणि तंत्र अधिकारी यांच्या 38 अतिरिक्त पदांना देखील मान्यता देण्यात आली. यापूर्वी मिशनच्या पहिल्या टप्प्यात अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा या 6 जिल्ह्यात हे मिशन राबविण्यात येत होते. आता याची व्याप्ती वाढविण्यात आल्यामुळे येत्या 3 वर्षात राज्यातील 25 लाख हेक्टर क्षेत्र नैसर्गिक शेतीखाली आणण्यात येईल. तसेच 1000 जैवनिविष्ठा स्त्रोत केंद्रे स्थापन करण्यात येतील.
मिशनच्या पहिल्या टप्प्यात 416 गट स्थापन झाले असून त्यातून त्यात 7855 शेतकरी आहेत. या गटांचे भागभांडवल 2 कोटी 47 लाख इतके आहे. याशिवाय 36 शेतकरी उत्पादक कंपन्यांची देखील स्थापना झाली आहे.
सिल्लोड तालुक्यात मका संशोधन केंद्र स्थापन करणार
सिल्लोड तालुक्यातील मौजे कोटनांद्रा व डोईफोडा येथे शासकीय जागेवर मका संशोधन केंद्र स्थापन करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातंर्गत मौजे कोटनांद्रा व डोईफोडा येथील शासकीय जागेवर मका संशोधन केंद्र सुरु करण्यात येईल. या मका संशोधन केंद्रासाठी २२.१८ कोटी इतक्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच, या मका संशोधन केंद्रासाठी आवश्यक २१ पदे व बाह्यस्त्रोताद्वारे १८ पदे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या मान्यतेच्या अधीन राहून निर्माण करण्यात येतील.
पर्यटन व्यवसायात महिलांना अधिक वाव देण्यासाठी “आई”पर्यटन धोरण
महिलांना पर्यटन व्यवसायात अधिकाधिक वाव मिळावा आणि त्यांचे सक्षमीकरण व्हावे म्हणून “आजादी का अमृत महोत्सव” अंतर्गत “आई” हे महिला केंद्रित (Gender Inclusive) पर्यटन धोरण राबविण्यास आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
त्याचप्रमाणे काही पर्यटन स्थळी महिला बाईक-टॅक्सी सेवा सुरु करण्यास सुद्धा यावेळी मान्यता देण्यात आली. हे धोरण पर्यटन संचालनालय व महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्यामार्फत सर्व संबंधित विभागांच्या विविध योजनांशी समन्वय साधून राबविण्यात येईल. याकरीता पर्यटन संचालनालयामध्ये महिला पर्यटन धोरण कक्ष तयार करण्यात येईल.
या धोरणात महिला उद्योजगता विकास, महिलांकरीता पायाभुत सुविधा, महिला पर्यटकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देणे, महिला पर्यटकांसाठी कस्टमाईज्ड उत्पादने, सवलती व प्रवास आणि पर्यटन विकास या पंचसुत्रीचा अवलंब करण्यात येणार आहे. महिलांना पर्यटन क्षेत्रात व्यवसाय व रोजगाराच्या संधी तसेच महिला पर्यटकांना सुरक्षित पर्यटनाचा लाभ घेता यावा याकरीता विविध उपाययोजना राबविण्यात येणार आहेत. या धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीकरीता पर्यटन मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली कार्यदलाची स्थापना करण्यात येणार आहे.
यामध्ये राज्यातील प्रत्येक तालुक्यामधील पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिलांच्या मालकीच्या व त्यांनी चालविलेल्या 10 पर्यटन व्यवसायांना (होमस्टे, हॉटेल / रेस्टॉरंट, टूर ॲन्ड ट्रॅव्हल एजन्सी इ.) पर्यटन व्यवसाय उभारणीसाठी सहाय्य करण्यात येणार आहे. या महिलांना बँकांमार्फत घेतलेल्या कर्जाच्या रक्कमेवरील व्याजाची 15 लाखापर्यंतच्या मर्यादेत व 7 वर्षे किंवा 4.5 लाखापर्यंतची मर्यादा यापैकी जे आधी घडेल तोपर्यंत प्रतिपूर्ती करण्याकरीता योजना असेल. तसेच, पर्यटन संचालनालयाकडे नोंदणीकृत महिला टूर ऑपरेटरर्स यांचा वार्षिक विमा हप्ता पहिली 05 वर्षे शासनामार्फत भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन बुकींगमध्ये 50 टक्के सूट
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 1 ते 8 मार्च या कालावधीत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट्स/युनिट्समध्ये सर्व महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकींगमध्ये 50 टक्के सूट देण्यात येईल. वर्षभरात एकूण 30 दिवस महामंडळाच्या सर्व रिसॉर्ट्समध्ये महिला पर्यटकांना ऑनलाईन बुकींगमध्ये 50 टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच, महिला पर्यटकांच्या विविध गटांसाठी अनुभवात्मक टूर पॅकेजेसचे आयोजन करण्यात येईल व महिला बचत गटांना महामंडळाच्या रिसॉर्ट्समध्ये हस्तकला, कलाकृती, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ इत्यादींच्या विक्रीसाठी स्टॉल किंवा जागा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता; २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार
कापूस उत्पादक क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासाठी नव्या वस्त्रोद्योग धोरणास मान्यता देण्याचा तसेच येणाऱ्या काळात २५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
या धोरणाची ठळक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे :-
1) पुढील 5 वर्षात कापसाची प्रक्रिया क्षमता 30% वरून 80% पर्यंत वाढवणे तसेच 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करणे आणि 5 लाखांपर्यंत रोजगार निर्मिती करणे.
2) वस्त्रोद्योग आयुक्तालय आणि रेशीम संचालनालयाचे विलीनीकरण करून वस्त्रोद्योग व रेशीम आयुक्तालयाची निर्मिती करण्यात येईल, प्रादेशिक स्तरावर या कार्यालयाला प्रादेशिक वस्त्रोद्योग व रेशीम उपायुक्तालय असे संबोधण्यात येईल.
3) आजारी सहकारी संस्थांच्या पुनर्वसनासाठी, सहकारी सुतगिरणी भाडेतत्वावर देण्यासंदर्भात तसेच सहकारी सुतगिरणीकडील अतिरिक्त जमीन विक्रीसाठी परवानगी देण्याची योजना विभाग तयार करेल.
4) वस्त्रोद्योग क्षेत्राचा विकास आणि वस्त्रोद्योगासाठी कच्च्या मालाच्या उपलब्धतेवर आधारित 4 झोननुसार प्रोत्साहन दिले गेले आहे. सहकारी घटकांना जास्तीत जास्त 45% शासकीय भागभांडवल. प्रकल्पाच्या आकारानुसार आणि झोननुसार खाजगी घटकांना भांडवली अनुदान -एमएसएमईसाठी जास्तीत जास्त 45%, मोठ्या उद्योगांसाठी 40% पर्यंत, विशाल प्रकल्पासाठी 55% पर्यंत किंवा रु. 250 कोटी यापैकी जे कमी असेल ते आणि महा टेक्नोलॉजी अपग्रेडेशन फंड योजनेसाठी (MAHA-TUFS) 40% पर्यंत किंवा रु.25 कोटी यापैकी जे कमी असेल ते. अति-विशाल प्रकल्पासाठी प्रोत्साहन म्हणून विशेष पॅकेज दिले जाईल.
5) अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर तांत्रिक वस्त्रोद्योगात वाढ होत असल्याने, सदर धोरण या क्षेत्रावर लक्षणीय भर देणार आहे आणि राज्यात सहा (6) तांत्रिक वस्त्रोद्योग पार्क स्थापन करण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय, तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्राची आक्रमक वाढ सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र तांत्रिक वस्त्रोद्योग मिशन घेण्यात येईल. तांत्रिक वस्त्रोद्योग क्षेत्र तंत्रज्ञानातील आदर्श बदलातून जात आहे, ज्यामुळे वेगवान आणि अधिक कार्यक्षम यंत्रणा निर्माण होत आहे. या उदयोन्मुख तंत्रज्ञानातील संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी, दर वर्षी ५० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली जाईल.
6) राज्यातील वस्त्रोद्योगाच्या वाढीसाठी शाश्वत आणि सुपीक वातावरण निर्माण करण्यासाठी विद्यमान 3 महामंडळांच्या कार्यात्मक विलीनीकरणाद्वारे एक वैधानिक महामंडळ- “महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग विकास महामंडळ (MSTDC)” तयार करण्यात येईल.
7) या धोरणाने पर्यावरणपूरक आणि शाश्वत उत्पादनासाठी हरित तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर दिलेला आहे. वस्त्रोद्योग घटकांना 50 टक्के भांडवली अनुदान देऊन प्रकल्पांना प्रोत्साहन दिले आहे, जसे की इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट्स (ETP) -जास्तीत जास्त 5 कोटी, झिरो लिक्विड डिस्चार्ज (ZLD) -जास्तीत जास्त 10 कोटी, कॉमन स्टीम जनरेशन प्लांट -जास्तीत जास्त 1 कोटी आणि रिसायकलिंग प्रकल्प- जास्तीत जास्त 2 कोटी.
8) आर्थिक विकासाचे नवे मॉडेल बनवून त्याला चालना देण्यासाठी, जास्तीत जास्त 4 मेगावॅट क्षमतेपर्यंतच्या सोलर प्रकल्पाच्या स्थापनेसाठी भांडवली अनुदान दिले जाईल आणि वस्त्रोद्योग घटकासाठी नेट मीटरिंगवर 1 मेगावॅटची मर्यादा नसेल. या धोरणामुळे सौर ऊर्जेच्या वापरामुळे होणारी अंदाजित बचत धोरण कालावधीत रु.3000-4000 कोटी इतकी असेल.
9) महाराष्ट्रातील पाच कापड- पैठणी साडी, हिमरू, करवठ काटी, खाना फॅब्रिक आणि घोंगडी हे पारंपरिक कापड म्हणून ओळखले जातात. या धोरणाचे उद्दिष्ट या विणकरांच्या उपजीविकेचे संरक्षण सुनिश्चित करून पारंपारिक कापड विणकरांना इतर रोजगारांकडे वळविण्यापासून परावृत्त करण्यासाठी प्रोत्साहन देणे आहे. प्रतिवर्ष प्रमाणित व नोंदणीकृत पुरुष विणकरांना रु.10,000 व महिला विणकरांना रु.15,000 इतका उत्सव भत्ता प्रदान करण्यात येईल. पारंपरिक कापड विणकरांसाठी “वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजने”च्या रूपात सामाजिक सुरक्षा कवच आणण्याचे या धोरणाचे उद्दिष्ट आहे.
10) राज्यातील रेशीम सेवांच्या विकासासाठी आणि विस्तारासाठी राज्याने विविध प्रोत्साहने आणि उपाययोजना केल्या आहेत. 100 डिसीज फ्री लेइंग (DFLs) च्या प्रति बॅचमध्ये सरासरी ककून उत्पादन 60 किलो वरून 70 किलोपर्यंत वाढविण्याचे धोरणाचे उद्दिष्ट आहे.
11) रेशीम उद्योगाच्या विकासासाठी राज्य रेशीम-समग्र 2 ही एकात्मिक योजना राबवणार आहे. याव्यतिरिक्त, ऑटोमॅटिक रीलिंग मशीन युनिट (ARM) आणि मल्टी-एंड रीलिंग मशीन युनिट (MRM) शेड उभारण्यासाठी अनुदान प्रदान केले जाईल.
12) विपणन कार्यक्रमांना प्रोत्साहन देऊन हे धोरण देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर हातमाग उत्पादनांना विशेष ओळख प्रदान करेल.
13) दारिद्र्य रेषेखालील प्रत्येक कुटुंबाला दरवर्षी एक मोफत साडी उपलब्ध करून देण्यासाठी विभाग तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वांसह एक योजना तयार करेल.
हे धोरण स्वच्छ ऊर्जा आणि पर्यावरण अनुकूल उपायांच्या वापरावर भर देते. या धोरणामध्ये जिनिंग, स्पिनिंग, पॉवरलूम, हातमाग, प्रक्रिया, विणकाम, होजियरी आणि गारमेंटिंग, रेशीम उद्योग, लोकर, अपारंपरिक आणि सिंथेटिक सूत/फायबर आणि तांत्रिक कापड यासह प्रत्येक उप-क्षेत्राला प्रोत्साहन देऊन संपूर्ण कापड मूल्य शृंखला समाविष्ट आहे.
विद्यमान वस्त्रोद्योग पायाभूत सुविधांना बळकट करणे आणि राज्यातील संपूर्ण वस्त्रोद्योग मूल्य शृंखलेत शाश्वतता आणि तांत्रिक प्रगतीला प्रोत्साहन देणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. याव्यतिरिक्त, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण आणि मागासवर्गीय, अल्पसंख्याक आणि माजी सैनिकांना अतिरिक्त सहाय्य प्रदान करणे हे धोरणाचे उद्दिष्ट आहे. या धोरणाचा उद्देश महाराष्ट्रातील वस्त्रोद्योग क्षेत्राला लक्षणीय भरारी देणे आणि तरुणांसाठी पुरेसा रोजगार निर्माण करणे हा आहे.
सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक करण्यासाठी क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट
सहकारी संस्थांचे कामकाज परिणामकारक व्हावे म्हणून अक्रियाशील सदस्यांना निवडून येण्यास किंवा स्वीकृत म्हणून जाण्यास प्रतिबंध करण्याचा तसेच क्रियाशील सदस्यांची व्याख्या स्पष्ट करण्याच्या अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० मधील कलम २ मधील खंड (१९) मधील उपखंड (अ-१) मधील क्रियाशील सभासदाची व्याख्या, कलम २६ मध्ये अक्रियाशील सभासदाची तरतूद तसेच, कलम 27 मध्ये सभासदास मतदानाच्या अधिकाराची तरतूद व त्यानुषंगाने, कलम 73अ मधील अक्रियाशील सभासदास संस्थेचा पदनिर्देशित अधिकारी होण्यास प्रतिबंध करण्याची तरतूद दि. २८ मार्च २०२२ रोजीच्या राजपत्रान्वये वगळण्यात आली होती. यामुळे जे सभासद ५ वर्षाच्या कालावधीत सर्वसाधारण सभेच्या किमान एका बैठकीस उपस्थित राहणार नाहीत. तसेच संस्थेच्या उपविधीनुसार विहित केलेल्या सेवांचा वापर करणार नाहीत अशा सर्वच सभासदांना मतदानाचा व निवडणूक लढविण्याचा अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे संस्थेशी आर्थिक व्यवहार नसणाऱ्या तसेच संस्थेच्या कामकाजात सहभागी न होणाऱ्या सभासदांचा संचालक मंडळावर प्रभाव वाढल्याने संस्थेच्या कामकाजावर विपरीत परिणाम झाला.
ही वस्तुस्थिती विचारात घेऊन वगळण्यात आलेल्या तरतुदी पुनर्स्थापित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे क्रियाशील सभासदाची व्याख्या नव्याने समाविष्ट करण्यात येईल, जे सदस्य पाच वर्षाच्या कालावधीमध्ये अधिमंडळाच्या किमान एका बैठकीला उपस्थित राहत नाहीत तसेच, संस्थेच्या उपविधीमध्ये विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे सहकारी संस्थेच्या सेवांचा कोणताही लाभ घेत नाहीत अशा सर्व सहकारी संस्थांमधील सदस्यांना अक्रियाशील सदस्य म्हणून समजण्यात येईल. जो क्रियाशील सदस्य संस्थेच्या कामकाजात सहभागी होण्यास आणि वेळोवेळी किमान मर्यादेपर्यंत सेवांचा वापर करण्यास कसूर करील तो सदस्य क्रियाशील सदस्य असण्याचे बंद होऊन आणि तो मतदान करण्यास हकदार असणार नाही ही तरतूद समाविष्ट करण्यात येईल.
अक्रियाशील सभासदास संस्थेचा पदनिर्देशित अधिकारी म्हणून निवडून येण्यास, स्वीकृत किंवा नामनिर्देशीत केला जाण्यास प्रतिबंध करण्याची तरतूद देखील करण्यात येईल. ज्या सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत तथापी, मतदार यादी अंतिम झाली नाही अशा सर्व सहकारी संस्थांना वर नमूद केलेल्या कलमातील सुधारणा लागू राहतील.
बृहन्मुंबईतील समूह पुनर्विकासाला मोठे प्रोत्साहन अधिमूल्यात ५० टक्के सवलत
बृहन्मुंबईमध्ये समूह पुनर्विकासास मोठे प्रोत्साहन देण्यासाठी अधिमूल्य तसेच विकास अधिभारामध्ये ५० टक्के सवलतीचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
यापूर्वी २० ऑगस्ट २०१९ रोजी दिलेल्या निदेशाच्या धर्तीवर विनियम ३३ (९) अंतर्गत समूह पुनर्विकासामध्ये पुढील १ वर्षाच्या कालावधीकरिता फंजीबल चटईक्षेत्र निर्देशांकासाठीचे अधिमूल्य तसेच विकास अधिभारामध्ये ५० टक्के सवलत देण्यात येईल.
या निर्णयाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेस मोकळ्या जागा, जिने, उदवाहन याबाबतच्या मिळणाऱ्या अधिमुल्यामध्ये ५० टक्के सवलत देण्यामागे महापालिकेला निर्णय घेण्याचे कळविण्यात आले आहे.
अभियांत्रिकी, औषधनिर्माण महाविद्यालयांत प्राध्यापकांच्या पदांची निर्मिती
राज्यातील शासकीय अभियांत्रिकी, औषधनिर्माण पदवी व पदव्युतर पदवी महाविद्यालयांत तसेच लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात प्राध्यापकांची १०५ पदे निर्मिती करण्याचा आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
ग्रेड वेतन 7600 किंवा त्यापेक्षा जास्त ग्रेड वेतनाची ही पदे असतील. यामध्ये प्राचार्य, प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख, अधिष्ठाता, संचालक अशी विविध पदे असतील. यासाठी 23 कोटी 52 लाख खर्चास मान्यता देण्यात आली.
नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देणार अतिरिक्त १७१० कोटीच्या खर्चास मान्यता
नांदुरा येथील जिगाव प्रकल्पाला गती देण्यासाठी अतिरिक्त १७१० कोटीच्या खर्चास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.
जिगाव प्रकल्प विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ, नागपूर अंतर्गत, तापी खोऱ्यातील पूर्णा उपखोऱ्यात आहे. ही योजना पूर्णा नदीवर बांधण्यात येत असून विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाच्या सर्वसाधारण प्रदेशामध्ये आहे. या प्रकल्पाद्वारे बुलडाणा जिल्ह्यातील 6 तालुक्यातील 268 गावातील 79,840- हे. व अकोला जिल्ह्यातील 2 तालुक्यातील 19 गावातील 7740 हे. असे एकूण 87,580 हे. क्षेत्र 15 उपसा सिंचन योजनेद्वारे सिंचनाखाली आणण्यात येणार आहे. या प्रकल्पास तिसरी सुधारित प्रशासकीय मान्यता 2019 मध्ये देण्यात आली होती.
राज्याला माहिती तंत्रज्ञानात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणास मान्यता; ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करणार
राज्याला माहिती तंत्रज्ञानात देशात आघाडीवर नेणाऱ्या नवीन माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या धोरणात या क्षेत्रात ९५ हजार कोटींची गुंतवणूक आकर्षित करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील विकासक, तज्ज्ञ प्रतिनिधी, कंपन्यांचे संचालक, नॅसकॉम, टेलिकॉम उद्योगाचे प्रतिनिधी, इतर संबंधित संस्था व राज्य शासनामार्फत नियुक्त आर्थिक सल्लगार परिषद यांच्याशी विस्तृत चर्चा करुन हे धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणामध्ये रु. 95,000 कोटी नवीन गुंतवणूक, 3.5 दशलक्ष रोजगार निर्मिती तसेच रु. 10 लक्ष कोटी एवढी निर्यात करणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
माहिती पोर्टल:-
राज्यामध्ये माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवांकरीता आवश्यक असलेल्या परवानग्या प्राप्त करण्यासाठी तसेच प्रक्रियेच्या सुलभतेसाठी माहिती कक्ष हे एक खिडकी यंत्रणा म्हणून काम करणार आहे.
माहिती तंत्रज्ञान /माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकांसाठी आर्थिक प्रोत्साहने
मुद्रांक शुल्कात सूट (झोन-1 व 2 वर्गीकरणानुसार 50 ते 100 टक्के मुद्रांक शुल्क सवलत)
विद्युत शुल्क भरण्यापासून सूट (झोन-1 मध्ये 10 वर्षाकरिता व झोन-2 मध्ये 15 वर्षाकरिता विद्युत शुल्क माफी)
भांडवली अनुदान:- एव्हीजीसी घटक (एकूण स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 25 टक्के किंवा कमाल रु. 25 कोटी इतक्या मर्यादेत 5 वर्षाकरिता) नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान घटक (एकूण स्थिर भांडवली गुंतवणुकीच्या 20 टक्के किंवा कमाल रु. 1 कोटी इतक्या मर्यादेत 5 वर्षाकरिता) इमारत व जमीन खर्च वगळून)
वीज दर अनुदान एव्हीजीसी तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान घटक राज्यात कोणत्याही क्षेत्रात स्थापित झाल्यास अशा घटकांना 5 वर्षापर्यंत प्रति युनिट रु. 1/- इतके वीज दर अनुदान.
औद्योगिक दराने वीज पुरवठा.
निवासी दराच्या सममूल्य दराने मालमत्ता कर.
पेटंट संबंधित सहाय्य (भारतीय पेटंटसाठी रु.5 लाख आणि आंतरराष्ट्रीय पेटंटसाठी रु. 10 लाख किंवा एकूण खर्चाच्या 50 टक्के यापैकी जे कमी असेल तेवढ्या खर्चाचा परतावा देण्यात येईल.
बाजार विकास सहाय्य (माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सुक्ष्म, लघु व मध्यम घटकांना तसेच स्टार्टअप्सना सहभाग शुल्काच्या (जागा खर्च/भाडे) 50 टक्के अथवा प्रति घटक रुपये 3 लाख एवढया मर्यादेत सहाय्य देण्यात येईल.
डेटा सेंटर प्रवर्तन :-
राज्य शासन डेटा सेंटरसना प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक असून झोन -1 मधील शहरात विशेषत: मुंबई आणि नवी मुंबई क्षेत्राला डेटा सेंटर हब म्हणून विकसित करण्याचे राज्य शासनाचा मानस आहे. शाश्वत वीज पुरवठा, समुद्राखालील केबल लँडिंगची सुविधा आणि प्रशिक्षित तांत्रिक मनुष्यबळाची उपलब्धता याबाबीमुळे झोन I हे आशिया-पॅसिफिक मधील डेटा सेंटर हब म्हणून विकसित होत आहे. त्यामुळे या क्षेत्राला विविध प्रोत्साहने अनुज्ञेय करण्यात आली आहेत. त्यामध्ये मुद्रांक शुल्क माफी, विद्युत शुल्क माफी, वीज दर अनुदान, ओपन ॲक्सेस द्वारे वीज वापरास परवानगी, अत्यावश्यक सेवेचा दर्जा, वीज वितरण परवाने इत्यादी प्रोत्साहने अनुज्ञेय करण्यात आली आहेत.
एव्हीजीसी घटकाचे प्रवर्तन :-
एव्हीजीसी हे संपत्ती आणि रोजगार निर्मितीची अफाट क्षमता असणारे उगवते क्षेत्र आहे. एव्हीजीसी क्षेत्र राज्यातील सर्जनशील क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल ज्यात संवाद, व्हिडिओग्राफी, थिएटर, प्रादेशिक भाषा, मीडिया, प्रकाशने आणि बरेच काही समाविष्ट आहे.
या धोरणात या क्षेत्रातील लोकांसाठी मागणी-पुरवठ्यातील तूट भरून काढून, या क्षेत्रातील जागतिक कंपन्यांना आकर्षित करणे, आउटसोर्स केलेल्या आंतरराष्ट्रीय AVGC कामाचा मोठा वाटा मिळवणे आणि योग्य परिसंस्था विकसित करण्याकरिता या क्षेत्रास प्रोत्साहन देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यामध्ये भांडवली अनुदान, मुद्रांक शुल्क माफी, विद्युत शुल्क माफी, वीज दर अनुदान इत्यादी प्रोत्साहने अनुज्ञेय करण्यात आली आहेत.
उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे प्रवर्तन :-
नवीन माहिती तंत्रज्ञान धोरणामध्ये उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे प्रवर्तन या नवीन घटकाचा समावेश करण्यात आला आहे. उदयोन्मुख तंत्रज्ञान हे संपत्ती आणि रोजगार निर्मितीची अफाट क्षमता असणारे उगवते क्षेत्र आहे. या तंत्रज्ञानामध्ये व्हर्च्युअल रिॲलिटी, ऑगमेंनटेड रिॲलिटी, आर्टीफिशिअल इंटेलिजन्स (जनरेटिव्ह आर्टीफिशिअल इंटेलिजन्ससह), वेब 3, मशिन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज, ब्लॉक चेन, रोबोटिक प्रोसेस ऑटोमेशन (आरपीए), स्पेटल काम्पुटींग, बिग डाटा ॲनालिस्टीक्स, क्लाऊड कॉम्पुटिंग, मोबाईल टेक, साइबर सिक्युरिटी, 3डी प्रिटींग, इत्यादी बाबींचा समावेश होतो उदयोन्मुख तंत्रज्ञानामुळे महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहन उत्पादकांना आकर्षित करण्यात यश आले असून त्यामुळे भविष्यात शहरातील वाहतूक सुरळीत करता येईल. तसेच रोगांचा शोध व त्यावरील उपचार करणाऱ्या आरोग्य सेवा आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) ड्रोनद्वारे कृषी क्षेत्रासह नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात मदत होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रास प्रोत्साहन देण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. त्यामध्ये भांडवली अनुदान, मुद्रांक शुल्क माफी, विद्युत शुल्क माफी, वीज दर अनुदान इत्यादी प्रोत्साहने अनुज्ञेय करण्यात आली आहेत.
महाराष्ट्र हब (M-HUB) :-
महाराष्ट्र शासनाद्वारे अग्रगण्य तांत्रिक संस्था, बिझनेस स्कूल आणि खाजगी संस्था यांच्या सहकार्याने स्टार्टअपला सहकार्य करण्यासाठी एक एकात्मिक सेंटर ऑफ एक्सलन्स (सीओई) स्थापित करण्यासाठी पुढाकार घेण्यात येईल. राज्यातील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ- नॅसकॉम स्टार्टअप वेअरहाऊस कार्यक्रमाच्या धर्तीवर अशा एम -हब द्वारे नावीन्यपूर्ण क्लस्टर विकसित करण्यात येतील, ज्यामध्ये नवीन तंत्रज्ञानाचा उगम, भांडवल, कौशल्य आणि गुणवत्ता या आधारे नवीन उद्योगांचा विकास तसेच व्यवसाय करण्यासाठीच्या नवीन पद्धतींना प्रोत्साहन देण्यात येईल. महाराष्ट्र औद्योगिक धोरण-2019 मध्ये नमूद केल्याप्रमाणे M-Hub हे उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी “राज्य शिखर संस्था” (State Apex Institute) म्हणूनही काम करेल. कळंबोली, जिल्हा-रायगड येथे महाराष्ट्र राज्य लघु औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमएसएसआयडीसी) जागेवर त्याची स्थापना केली जाणार आहे. ही एक अत्याधुनिक इमारत असेल ज्यामध्ये 300 विद्यार्थ्यांकरीता प्रशिक्षण सुविधा असतील तसेच त्यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षक/शैक्षणिक कर्मचाऱ्यांसाठी निवासाची व्यवस्था देखील असेल. स्टार्टअप्सना उत्तम तंत्रज्ञान, गुणवत्ता, व्यवसाय नेटवर्क आणि निधी मिळविण्याकरीता मदत करणे कार्यक्षेत्र, तंत्रज्ञान प्रयोगशाळा, कॉर्पोरेट्स, सरकार, गुंतवणूकदार, मार्गदर्शक, शिक्षणतज्ज्ञ इत्यादींमध्ये समन्वय प्रस्थापित करुन समग्र वातावरण निर्मिती तयार करणे.
कौशल्य विकास व भविष्यातील कार्यबल :-
राज्यात माहिती तंत्रज्ञान व माहिती तंत्रज्ञान सहाय्यभूत सेवा घटकामध्ये उच्च रोजगारक्षम आणि गुणवत्ता पूर्ण मनुष्यबळाची निर्मिती सुनिश्चित करण्याकरिता या धोरणांतर्गत कौशल्य विकासाच्या अभ्यासक्रमावर (Super Specialised Job Roll) लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्याकरीता उच्च व तंत्र शिक्षण विभाग तसेच कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग यांचे सहकार्याने महाराष्ट्रातील नामवंत शैक्षणिक संस्था / अभियांत्रिकी महाविद्यालय व उबवणी केंद्रामध्ये अभ्यासक्रमावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये कॉर्नेल महा 60 बिझनेस एक्सेलेटर, मुंबई आयआयटी, बॉम्बे, मुंबई, सिमबायोसीस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, पुणे, CSIR-राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था, नागपूर यांच्यासह कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांनी घोषित केलेल्या इतर 17 (सतरा) शैक्षणिक संस्था / इनक्युबेशन सेंटरचा समावेश आहे.
या नवीन धोरणात खालील प्रमाणे तरतुदींचा समावेश असेल.
अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक :-
अ.क्र.
2015च्या धोरणातील तरतूद
सन 2023 च्या धोरणातील तरतूद
वर्गवारी
अनुज्ञेय चटई क्षेत्र
वर्गवारी
अनुज्ञेय चटई क्षेत्र
1
पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर व अंबरनाथ नगरपरिषद
मूळ चटई क्षेत्र निर्देशांक 1.00 पेक्षा जास्त असला तरी 100 % अथवा 200 % अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांक धरुन एकूण चटई क्षेत्र निर्देशांकाची कमाल मर्यादा 3.00 एवढी अनुज्ञेय
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राकरिता.
रस्त्याची रुंदी12 मी – 3 पर्यत18 मी. – 4 पर्यंत27 मी. – 5 पर्यंत
2
वरील क्षेत्र वगळून तसेच विना उद्योग जिल्हे, नक्षलक्षेत्र भाग वगळून राजाच्या इतर भागात
उर्वरित महाराष्ट्राकरिता
12 मी – 3 पर्यत18 मी. – 3.5 पर्यंत27 मी. – 4 पर्यंत
अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकाकरिता आकारावयाचे अधिमुल्य :-
अ.क्र.
2015च्या धोरणातील तरतूद
सन 2023 च्या धोरणातील तरतूद
वर्गवारी
दर
वर्गवारी
दर
1
पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर व अंबरनाथ नगरपरिषद
प्रचलित रेडीरेकनर दराच्या 30 %
1) बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात
प्रचलित DCPR-2034 मध्ये नमूद दराच्या 50 % दराने
2
वरील क्षेत्र तसेच विना उद्योग जिल्हे, नक्षलक्षेत्र भाग वगळून राजाच्या इतर भागात
प्रचलित रेडीरेकनर दराच्या 10 %
2) विदर्भ, मराठवाडा, धुळे, नंदुरबार रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग
अतिरिक्त चटई क्षेत्र निर्देशांकांकरीता अधिमूल्य आकारले जाणार नाही.
3) वरील 1) व 2) येथील क्षेत्र वगळता राज्याच्या इतर भागात
प्रचलित UDCPR मध्ये नमूद दराच्या 50 % दराने
अतिरिक्त चटई क्षेत्राकरिता आकारले जाणारे अधिमुल्य हप्त्याहप्त्याने भरण्याची विकासकास मुभा देण्यात आली आहे.
माहिती तंत्रज्ञान उद्यानातील जागेचा वापर:-
सन 2015 च्या धोरणातील तरतूद
सन 2023 च्या धोरणातील तरतूद
अ.क्र.
वर्गवारी
क्षेत्र वापराचे प्रमाण
वर्गवारी
क्षेत्र वापराचे प्रमाण
1
पुणे, पिंपरी-चिंचवड, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर व अंबरनाथ नगरपरिषद
80 % मा.तं.20 % पूरक सेवा
झोन -1 मधील पीएमआर व एमएमआर महानगरपालिका क्षेत्र
60 % मा.तं.40 % पूरक सेवा
2
वरील क्षेत्र वगळून राजाच्या इतर भागात
60 % मा.तं.40 % पूरक सेवा
झोन -1 मधील क्षेत्र वगळता राज्यातील इतर क्षेत्रात
50 % मा.तं.50 % पूरक सेवा
3
पूरक सेवेमध्ये ज्या बाबींचा समावेश नसेल त्यांची यादी तयार करण्यात आली.
पूरक सेवेमध्ये प्रदूषण निर्माण करणारे उपक्रम वगळता सर्व व्यवासायिक तसेच निवासी उपक्रम अनुज्ञेय करण्यात आले आहेत.
एकात्मिक माहिती तंत्रज्ञान नगरे :-
सन 2015 च्या धोरणातील तरतूद
सन 2023 च्या धोरणातील तरतूद
1
आवश्यक क्षेत्र – किमान 25 एकर
आवश्यक क्षेत्र – किमान 10 एकर
2
बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी – 5 वर्ष
बांधकाम पूर्ण करण्याचा कालावधी – उद्यानाचे क्षेत्रफळ 10 ते 25 एकर पर्यंत असल्यास साडेसात वर्ष व 25 एकर पेक्षा जास्त असल्यास 10 वर्ष एवढा
3
क्षेत्र वापराचे प्रमाण – 60 % मा.तं -40 % पूरक सेवा
क्षेत्र वापराचे प्रमाण – 50 % मा.तं – 50 % पूरक सेवा
पदके गंगेत विसर्जित करण्यासाठी पैलवान हरिद्वारला..पण तिथेही गंगा समितीचा विरोध,समिती आंदोलनाला म्हणाली ' हे तर राजकारण'नरेश टिकैत हरिद्वार येथे पोहोचले जेथे कुस्तीपटू लैंगिक छळाच्या आरोपांबद्दल WFI प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या निषेधार्थ त्यांची पदके गंगा नदीत विसर्जित करण्यासाठी जमले आहेत. त्याने पैलवानांकडून पदके घेतली आणि पाच दिवसांचा वेळ मागितला.
पानिपत-भाजपाचे खासदार आणि भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी केंद्र सरकारचा निषेध म्हणून त्यांची पदकं गंगेत विसर्जित करण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व कुस्तीपटू पदकांनी भरलेल्या बॅगा घेऊन हरिद्वार येथे गंगा किनाऱ्यावर जमले आहेत. परंतु या निर्णयाला श्रीगंगा सभेनं विरोध केला आहे.गंगा हे श्रीक्षेत्र आहे आणि त्याला राजकारणाचा आखाडा बनवू नका, असं आवाहन श्रीगंगा सभेचे अध्यक्ष नितीन गौतम यांनी केलं आहे. सर्व खेळ हे अमर असतात आणि पदकांना अस्थी समजून विसर्जित करू नका, असंही नितीन गौतम यांनी म्हटलं आहे. गंगेच्या तिरावर पूजा केली तरी चालेल, पण असे प्रकार करु नका, असं त्यांनी म्हंटलं आहे. गंगेत पदकं प्रवाहित करण्याच्या कुस्तीपटूंच्या निर्णयाला श्रीगंगा सभेने विरोध केला आहे.
#WATCH | Naresh Tikait arrives in Haridwar where wrestlers have gathered to immerse their medals in river Ganga as a mark of protest against WFI chief and BJP MP Brij Bhushan Sharan Singh over sexual harassment allegations. He took medals from the wrestlers and sought five-day… pic.twitter.com/tDPHRXJq0T
बृजभूषण शरण सिंह यांच्या अटकेसाठी कुस्तीपटू जंतर-मंतरवर आंदोलन करत होते. रविवारी पोलिसांसोबत झालेल्या धुमश्चक्रीनंतर ते जंतर-मंतरवरून परतले.
साक्षी मलिकने म्हटले आहे की, ही पदके आम्ही पवित्रतेने मिळवली होती. ती परिधान करून पांढरपेशी व्यवस्था केवळ स्वतःचा प्रचार करते. त्यानंतर आमचे शोषण करते. राष्ट्रपती व पंतप्रधानांनी आमची काळजी केली नाही. त्यामुळे आम्ही ही पदके त्यांना परत करणार नाही. कुस्तीपटूंनी आता इंडिया गेटवर आमरण उपोषणाला बसण्याची घोषणा केली आहे.
दरम्यान, बृजभूषण शरण सिंह यांनी 5 जून रोजी अयोध्येत मोठी रॅली बोलावली आहे. यात संत सहभागी होणार आहेत. पॉक्सो कायद्याचा गैरफायदा घेतला जात असल्याचे बृजभूषण आणि संतांचे म्हणणे आहे.
दिल्ली पोलिसांनी सांगितले- कुस्तीपटूंना इंडिया गेटवर आंदोलन करू दिले जाणार नाही. राष्ट्रीय स्मारक हे आंदोलनाचे ठिकाण नाही.
हरिद्वार पोलिसांनी सांगितले की, ते कुस्तीपटूंना पदके विसर्जित करण्यापासून रोखणार नाहीत. हरिद्वारचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक अजय सिंग म्हणाले की, कुस्तीपटू त्यांना हवे ते करण्यास मोकळे आहेत.
कुस्तीपटूंना रोखण्यासाठी मुझफ्फरनगर येथील खाप चौधरी हरिद्वारला रवाना झाले आहेत. यासोबतच अनेक कुस्ती आखाडेही त्यांच्यासोबत आहेत.
हरिद्वारमध्ये कुस्तीपटूंच्या पदकांच्या विसर्जनाच्या कार्यक्रमाला गंगा सभा विरोध करणार आहे. गंगा सभेचे हरिद्वारचे अध्यक्ष नितीन गौतम यांनी सांगितले की, जर कुस्तीपटूंनी येथे येऊन पदकांचे विसर्जन केले तर गंगा सभा त्यांना रोखेल.
जंतरमंतरवरून नव्या संसदेपुढील महापंचायतीला जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुस्तीपटूंची रविवारी दिल्ली पोलिसांशी झटापट झाली. त्यानंतर कुस्तीपटू विनेश फोगाट, बजरंग पुनिया, साक्षी मलिक व संगीता फोगाट यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यानंतर कुस्तीपटू घरी परतून आपली पुढील रणनीती आखली.
माँ गंगा को राजनीति का अखाड़ा ना बनायें 🙏
आज गंगा दशहरा है, आज के पवित्र दिन में पहलवान विपक्ष के बहकावे में आकर माँ गंगा की पवित्रता मेडल फेंककर धूमिल करने की कोशिश ना करें 🙏
मेडल अकेले किसी एक खिलाड़ी के नहीं देश के होते हैं।
मुंबई, दि. 30 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत कार्यरत असलेल्या संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत चर्मकार समाजातील व्यक्तींचा शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक विकास होण्यासाठी जिल्हा कार्यालयामार्फत एन.एस.एफ.डी.सी. मुदती कर्ज योजना, महिला समृद्धी योजना, लघु ॠण योजनेअंतर्गत कर्ज प्रस्ताव मागविण्यात आले होते. ज्या अर्जदारांनी जिल्हा कार्यालय, मुंबई शहर व मुंबई उपनगर येथे अर्ज दाखल केले होते, त्यांनी कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक आरती पुराणिक यांनी केले आहे.
एन.एस.एफ.डी.सी., नवी दिल्ली यांच्याकडून कर्ज प्रस्तावासाठी निधी प्राप्त झालेला आहे. ज्या अर्जदारांनी अर्ज केले होते, त्यांच्या कर्ज प्रस्तावातील त्रुटींच्या कागदपत्रांची पूर्तता करुन घेऊन कर्जाचे वितरण करावयाचे आहे. तरी सर्व अर्जदारांनी तत्काळ संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाचे जिल्हा कार्यालय, गव्हर्नमेंट लेदर वर्किंग स्कूल कम्पाऊंड, खेरवाडी वांद्रे (पूर्व) मुंबई-४०००५१ या कार्यालयाशी संपर्क साधावा.
पुणे- राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक सेल मध्ये काम करणाऱ्या प्रसिद्ध अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी सांस्कृतिक विभागाच्या प्रदेशअध्यक्षांच्या कार्यपद्धतीला कंटाळून भाजपात प्रवेश केल्यावर आता प्रिया बेर्डे यांना टक्कर द्यायला स्वर्गीय निळू फुले यांच्या कन्या गार्गी फुले यांना आज विरोधी पक्षनेते अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला आहे. आता राजकारणात मुख्य प्रवाहात येत काम करायचे, पक्षाने तिकीट दिले तर का नाही लढायचे असे मत गार्गी फुले यांनी व्यक्त केले आहे.
गार्गी फुले म्हणाल्या की, खूप दिवसांपासून अजित पवार यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती. पक्षासोबत काम करण्याचे मला अनेक दिवसांपासून वाटत होते. यात माझ्या वडीलांचे आणि शरद पवारांचे चांगले संबंध होते. आता पक्षासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. त्यातच मला पक्षात काम करण्यासंदर्भात विचारणा झाल्यानंतर लगेचच हो म्हटले. राष्ट्रवादी पक्षाची जी विचारसरणी आणि विचार आहेत. त्याच विचारसरणीचे माझे बाबा निळू फुले होते. त्यामुळे माझ्या वडिलांचे जे विचार होते. त्या विचारांना राष्ट्रवादी काँग्रेसला न्याय देईल. आता नुसते किनाऱ्यावर बसून पाहायचे नाही आहे त्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येऊन प्रवाहात येईल.
गार्गी फुले म्हणाल्या की, अनेक तरुणांना वाटते की आपण राजकारणात यावे आणि काही तरी बदल घडावा. मी याच साठी काम करणार आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. तर पक्षांने संधी दिली तिकीट दिले तर मी निवडणूक का नाही लढणार, असे म्हणत आपली निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
पुणे -विना हेल्मेट जात असलेल्या एका तरुणाला पोलिसांनी अडवून त्यास वाहनाची कागदपत्रे, लायसन्स दाखविण्यास सांगितले. परंतु तरुणाने पोलिसांशी वाद घातल्याने त्यास बिबवेवाडी पोलिस ठाण्यात आणले असता संबंधित तरुणाने 57 वर्षीय सहाय्यक पोलिस फाैजदाराचे कानाखाली जाेरात मारल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 2 जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
गाैरव हरीश वालावकर (वय-29) व सुचेता चेतन घुले (28,दाेघे रा.चिंतामणी रेसीडन्सी, बिबवेवाडी,पुणे) असे अटक केलेल्या आराेपींचे नाव आहे. याबाबत सहाय्यक पोलिस फाैजदार रामदास महादेव बांदल (वय-57) यांनी आराेपी विराेधात बिबवेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहीतीनुसार, तक्रारदार पोलिस रामदास बांदल व सहाय्यक पोलिस निरीक्षक एस बरडे व इतर सहकारी 28 मे राेजी रात्री बिबवेवाडी परिसरात विमल विहार साेसायटीचे बाजुस नाकाबंदी करत हाेते. त्यावेळी आराेपी गाैरव वालावकर हा दुचाकीवरुन विना हेल्मेट जात असताना, पोलिसांनी त्याला थांबवले. त्याच्याकडे आरसीबुक व लायसन दाखवायला सांगितले असता, आराेपीने काेणतीही कागदपत्रे न दाखवता पोलिसांशी विनाकारण हुज्जत घातली.त्यानंतर त्याने मैत्रीण आराेपी सुचेता घुले हिला सदर जागी बाेलावून घेवून पुन्हा पोलिसांशी वाद घातला. त्यामुळे त्यास नंतर बिबवेवाडी पोलिस ठाणे येथे आणल्यानंतर आराेपी गाैरव याने अचानक पोलिस अधिकारी रामदास बांदल यांचे कानाखाली मारुन ‘आता काय करायचे ते करा’ असे बाेलून तक्रारदार करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण केला आहे. याबाबत बिबवेवाडी पोलिस पुढील तपास करत आहे.
पुणे – औंध रोड-खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथे सातत्याने होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत असून, त्यातून वाहतूकीचा प्रश्न मार्गी लागेल, अशी माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (मंगळवारी) दिली.
छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्यांविषयी पुणे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांचेसमवेत बैठक झाली. बैठकीत प्रामुख्याने औंध रोड-खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथील वाहतूक कोंडी सोडविण्यावर चर्चा करण्यात आली.
औंध रोड-खडकी रेल्वे स्टेशन जंक्शन येथे सततची वाहतूक कोंडी होत असते. नागरिकांना या वाहतूक कोंडीचा प्रचंड त्रास होतो. याबाबत नागरिकांच्या अनेक तक्रारी माझ्याकडे आल्या होत्या. मी स्वतः आणि वाहतूक विभागाचे पोलीस उप आयुक्त, पुणे महापालिका पथ विभागाचे अधिकारी, ॲम्युनिशन फॅक्टरीचे अधिकारी, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेसमवेत पाहणी केली होती. त्या ठिकाणी असे निदर्शनास आले होते की, ॲम्युनिशन फॅक्टरी, डिफेन्स इस्टेट ऑफिस, खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड, पुणे महापालिका आणि राज्य सरकारचे सार्वजनिक बांधकाम विभाग या सर्वच विभागांमध्ये रस्त्याच्या मालकीबाबत समन्वयाचा अभाव असल्याचे मला आढळले होते, असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.
ही समस्या सोडविण्यासाठी या सर्व विभागांची एकत्रित बैठक आज घेण्यात आली आणि वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तपशीलवार आराखडा तयार करण्यात येणार असून त्यातून लवकरच येथील वाहतूक कोंडी सुटेल, असा विश्वास शिरोळे यांनी व्यक्त केला.
खा.श्रीनिवास पाटील,आ.श्री.छ.शिवेंद्रसिंहराजे भोसले,राजा माने यांची उपस्थिती
सातारा-येथे महाराष्ट्र लाईव्ह न्युज चॅनल च्यावतीने ‘महाराष्ट्र सन्मान २०२३’ या दिमाखदार सोहळा संपन्न झाला ,या सन्मान सोहळ्यासाठी सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील, आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व वरिष्ठ संपादक माध्यम तज्ञ व डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने, भाजपा नेते मनोज दादा घोरपडे , कोरेगाव पंचायत समितीचे सभापती राजाभाऊ जगदाळे उपस्थित होते. यावेळी सातारा, सांगली, कोल्हापूर,सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक ,साहित्यिक ,सांस्कृतिक ,कला ,क्रीडा ,शैक्षणिक,पत्रकारिता क्षेत्रातील १४ मान्यवरांचा सन्मान करण्यात आला यावेळी यशवंत संभाजीराव पाटणे(प्रतिभावंत लेखक व व्याख्याते,डॉ. राजेंद्र नानासो सरकाळे(मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सातारा), हिंदुराव शंकरराव पाटील(माजी कृषी सभापती, जिल्हा परिषद सातारा),विकास दिलीपराव थोरात ,रेल्वे लढयाचे प्रवर्तक(तारगांव, ता. कोरेगांव जि सातारा,श्रीमती संघमित्रा भिमराव ढापरे,सेवानिवृत्त मुख्यादयापिका(मु.पो.कापील ता कराड जि सातारा),मंगेश सुभाष पाटील,कोल्हापूर(उपकार्यकारी अभियंता, ), कु. मोहित संतोष जगतापअथलॅटिक्स खेळाडू(निगडी ता.कोरेगांव जि सातारा),अजित सिताराम सांडगे उद्योजक,कराड (आगाशिवनगर, कराड जि. सातारा),राजू सर्जेराव शेळके(जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना,सातारा) जावळवाडी पो. वेणेगाव, ता.जि. सातारा, मारुती शिवराम मोळावडेसदस्य, सातारा जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) मु.मोळावडेवाडी, पो.कुठरे, ता.पाटण जि.सातारा,ह.भ.प. डॉ. सुहास नथुराम फडतरे महाराज (कुमठे, ता.कोरेगांव जि.सातारा),उमेश हिंदुराव बांबरे,दैनिक सकाळ सह मुख्य बातमीदार(मु पो भरतगांववाडी ता जि सातारा), सुहास जगन्नाथ माने(कृषी)मु.पो. राहुडे, ता.पाटण जि. सातारा,ओंकार तानाजी डांगेउपकार्यकारी अभियंता यांना महाराष्ट्र सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, महाराष्ट्राच्या जडणघडणीग सातारा जिल्ह्याचे योगदान खूप मोलाचे असून या सातारा जिल्ह्यातील कर्तृत्ववान १४ हिऱ्यांचा होणारा सत्कार म्हणजे राजधानी सातारा साठी गौरवशाली बाब आहे आपल्या सातारा जिल्ह्याचे नाव जगाच्या पातळीवर पोहोचवण्यासाठी आजच्या तरुण पिढीने पुढाकार घ्यावा यासाठी सर्वतोपरी आमचे सहकार्य राहील. वरिष्ठ संपादक व माध्यम तज्ञ राजा माने यावेळी म्हणाले देशभरात बदलत्या तंत्रज्ञानामुळे मीडिया क्षेत्रात देखील मोठा बदल झाला असून डिजिटल मीडिया आता नवी झेप घेत आहे या डिजिटल मीडियाच्या माध्यमातून नव्या दिशा देखील समाजाला मिळत आहेत राजधानी साताऱ्याचा इतिहास जगासमोर मांडण्याचे काम डिजिटल मीडिया नक्की करेल व तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कारासारखे विविध उपक्रम राबवावेत यावेळी आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मनोजदादा, घोरपडे, माजी जिल्हा परिषद सदस्य हिंदुराव पाटील ,प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, डाॅ.राजेंद्र सरकाळे, यांनी देखील मनोगत व्यक्त केले. यावेळी सातारा सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र लाईव्ह न्युज चॅनलचे संपादक विकास भोसले यांनी केले, सूत्रसंचालन वसुंधरा खांडके यांनी केले तर आभार प्रतिक भोसले यांनी मानले.
पश्चिम महाराष्ट्राचे आयडाॅल
महाराष्ट्र सन्मान २०२३ पुरस्काराने सन्मानित झालेले १४ हिरे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील आयडॉल असून आपापल्या क्षेत्रात उच्च कामगिरी करणारे व्यक्तिमत्व आहे राजधानी सातारा मध्ये महाराष्ट्र सन्मान सोहळा होत असून ही परंपरा कायम राहावी यासाठी सर्वतोपरी सहकार्य सर्वांचे असेल असा विश्वास सिक्कीम राज्याचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील यांनी व्यक्त केला.
शिर्डी, दि. ३१ :- निळवंडे धरण लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी आजचा दिवस आनंदाचा व ऐतिहासिक आहे. निळवंडे धरण कालव्यांच्या उर्वरित कामासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. हे शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. धरणामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांना मोबदल्यापासून वंचित ठेवले जाणार नाही, अशीही ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
अहमदनगर व नाशिक जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी जीवनदायी ठरणाऱ्या निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची प्रथम चाचणी मुख्यमंत्री श्री. शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज निब्रळ येथे झाली. कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते जलपूजन करून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, खासदार सदाशिवराव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे-पाटील, जलसंपदा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव दीपक कपूर, नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय भोगले, अधीक्षक अभियंता अरुण नाईक, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री मधुकरराव पिचड, अण्णासाहेब म्हस्के पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड आदी उपस्थित होते.
या शासनाने पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीत शेतकरी, कष्टकरी यांच्या हिताचे निर्णय घेतले असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शासनाने ११ महिन्यांच्या कालावधीत २९ प्रकल्पांना तत्काळ सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे राज्यातील ६ लाख ८ हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्यांना केंद्रबिंदू ठेवून शासन काम करत आहे. केंद्राच्या धर्तीवर राज्याने शेतकऱ्यांना ‘नमो महासन्मान’ योजना सुरू केली आहे. यात शेतकऱ्यांना केंद्राप्रमाणे ६ हजारांची मदत दिली जाणार आहे. एक रूपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांना निकषाच्या दुपटीने मदत देण्यात आली . राज्याने २५ लाख हेक्टर क्षेत्रावर सेंद्रीय शेतीचे उद्दिष्ट ठेवले असून जलयुक्त शिवार योजना टप्पा २ सुरू करण्यात आला आहे. ‘निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांना ५३ वर्षे वाट पाहावी लागली. आता ही प्रतीक्षा फक्त या शासनाने घेतलेल्या कल्याणकारी निर्णयामुळे संपली आहे, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, निळवंडे प्रकल्पाचा इतिहास मोठा आहे. सुरूवातीला ८ कोटी रुपयांचा असलेला हा प्रकल्प आज ५ हजार १७७ कोटी रुपयांचा झाला आहे. २०१७ मध्ये या प्रकल्पास अडीच हजार कोटी रुपयांची सुधारित प्रशासकीय मान्यता दिली आणि या प्रकल्पास गती मिळाली. धरणाच्या सुरूवातीच्या २२ किलोमीटरला स्थानिक शेतकरी व आदिवासींना विश्वासात घेऊन गती देण्यात आली.
यावर्षीच्या अर्थसंकल्पात गोसीखुर्द नंतर सर्वाधिक निधी निळवंडे धरणासाठी देण्यात आला आहे. त्यामुळे या धरण कालव्यांचे काम कोठेही थांबणार नाही. धरणाच्या उजव्या कालव्याचे काम पुढील दोन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल. अशी ग्वाही उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी दिली.
जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून २०१४ ते २०१९ या काळात अहमदनगर जिल्ह्यातील २ लाख,९८ हजार हेक्टर शेती संरक्षित सिंचनाखाली आली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.
महसूलमंत्री श्री. विखे-पाटील म्हणाले की, अकोले व परिसरातील शेतकरी, आदिवासी बांधवांच्या प्रदीर्घ लढा व संघर्षामुळे आज निळंवडे धरण कालव्यातून पाण्याचा विसर्ग होत आहे. आता यापूर्वीचे सर्व वाद निळवंडे कालव्याच्या पाण्यात विसर्जित करून आपण आजच आनंद साजरा करूया. पुढील दोन महिन्यात उजव्या कालव्यातून पाणी सोडण्यात येईल.
यावेळी खासदार श्री. लोखंडे, माजी आमदार श्री. पिचड यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुंबई, दि. ३० : राज्यातील विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून ४२४ अंगणवाड्या दत्तक देत आहोत. तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शासनातर्फे राज्यातील २७ हजार ८९७ ग्रामपंचायती मधील ५५ हजार ७९७ कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिली.
सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित सामंजस्य कराराप्रसंगी महिला व बालविकास मंत्री श्री. लोढा बोलत होते. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय. ए.कुंदन, एकात्मिक बाल विकासच्या आयुक्त रूबल अग्रवाल, उपआयुक्त विजय क्षीरसागर, विपला फाऊंडेशन, ग्रामसेवा प्रतिष्ठान, स्पर्श चॅरिटेबल ट्रस्ट, कार्बेट फाऊंडेशनचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंत्री श्री. लोढा म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त राज्यातील २७ हजार ८९७ ग्रामपंचायती मधील दोन कर्तबगार महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे. राज्यात १ लाख १० हजार ४४६ अंगणवाड्या कार्यरत आहेत. राज्याच्या महिला आणि बाल विकास विभागाने लोकसहभागातून ‘अंगणवाडी दत्तक’ धोरण आणले आहे. सर्वच अंगणवाड्यांचा विकास व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ४ आक्टोबर २०२२ रोजी अंगणवाडी दत्तक धोरणासंदर्भात शासनाने सूचना निर्गमित केल्या होत्या. या धोरणांतर्गत कॉर्पोरेट संस्था, कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी, अशासकीय स्वयंसेवी संस्था, ट्रस्ट इ. आणि व्यक्ती, कुटुंब आणि समूहांच्या माध्यमातून गुंतवणूक करू शकतात. शासन अंगणवाड्यांच्या बळकटीकरणासाठी विविध योजना राबवत आहे. अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत ४ ऑक्टोबर २०२२ पासून विविध १५६ सामाजिक संस्थांनी आतापर्यंत ४ हजार ८६१ अंगणवाड्या दत्तक घेतल्या आहेत. आज विपला फाऊंडेशनने पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील ३६८, ग्रामसेवा प्रतिष्ठानने रायगड आणि ठाणे मधील ३०, स्पर्श चॅरिटेबल ट्रस्टने मुंबई उपनगर आणि नाशिक मधील १०, कार्बेट फाऊंडेशनने सिंधुदुर्ग आणि पुणे मधील १६ अंगणवाड्या क्षमता वृद्धीसाठी दत्तक घेतल्या आहेत.
पुणे दि. ३० : उप प्रादेशिक परिवहन कार्यालय पिंपरी-चिंचवडमार्फत खासगी चारचाकी वाहनांसाठी सुरु होणाऱ्या ‘केडब्लू’ या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक शुल्क भरुन राखून ठेवण्याकरिता आगाऊ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नवीन सुरू होणाऱ्या मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचा क्रमांक विहित शुल्क भरुन हवा असल्यास त्यासाठी विहित नमुन्यात अर्ज करणे आवश्यक आहे. हा अर्ज आणि धनाकर्ष (डीडी) १ जून रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० दरम्यान कार्यालयाच्या नवीन वाहन नोंदणी विभागात पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह स्वतः जमा करणे आवश्यक राहील.
एकाच क्रमांकाकरिता एकापेक्षा जास्त अर्ज आल्यास त्यांची यादी २ जून रोजी कार्यालयीन सूचनाफलकावर लावण्यात येईल. या यादीतील अर्जदारांनी लिलावासाठी जास्त रक्कमेचा एकच धनाकर्ष (डीडी) त्याच दिवशी दुपारी २.३० वाजेपर्यंत सीलबंद लिफाफ्यात घालून कार्यालयात जमा करावा. धनाकर्ष ‘डीवाय. आर.टी.ओ. पिंपरी-चिंचवड’ या नावाने राष्ट्रीयकृत किंवा अनुसूचित बँकेचा पुणे येथील असावा. त्याच दिवशी दुपारी ३.३० वाजता लिफाफे उघडून ज्या अर्जदाराने जास्तीत जास्त रकमेचा धनाकर्ष सादर केला असेल त्यास पसंती क्रमांक वितरीत केला जाईल.
एकदा राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक बदलून देता येणार नाही. नोंदणी क्रमांक राखून ठेवलेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत नोंदणीसाठी वाहन सादर केले नाही तर राखून ठेवलेला नोंदणी क्रमांक आपोआप रद्द होईल व भरलेले शुल्क शासनाच्या तिजोरीत जमा होईल. प्रदान केलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही. आकर्षक क्रमांकाचे शुल्क बदल झाल्यास त्यावेळी विहीत करण्यात आलेले शुल्क लागु राहील, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी-चिंचवड यांनी कळविले आहे.
भारतात इतर देशांच्या मानाने तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असल्याचा अंदाज आहे. दि. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा मुख आरोग्य अधिकारी डॉ. रोहन वायचळ लिखित हा लेख… या वर्षीचे घोषवाक्य वुई नीड फूड, नॉट टोबॅको आहे.
तंबाखूमुळे दर ८ सेकंदाला ‘एक’ मृत्यु होतो. भारतात, तंबाखू संबंधित मृत्यूची एकूण संख्या दर वर्षी ८ ते ९ लाख इतकी असेल. तंबाखूपासून दूर राहिल्यास एका किशोर/किशोरीचा जीवनकाळ २० वर्षाने वाढू शकेल.
तंबाखूच्या सेवनाने अनेक दुष्परिणाम :
तोंड, ओठ, जबडा, फुफ्फुस, घसा, पोट, किडनी व मूत्राशयाचा कॅन्सर तंबाखू सेवनाने होतो. भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ९० टक्के फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे कारण हे धूम्रपान आहे.
भारतात तंबाखूच्या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग असलेल्या रूग्णांची संख्या सर्वांत मोठी आहे. भारतात, ५६.४ % स्त्रियांना आणि ४४.९ % पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. भारतात ८२ % फुफ्फुसाच्या दीर्घकालीन रोगांचे कारण धूम्रपान हे आहे.
तंबाखू हे क्षयरोग होण्याचे अप्रत्यक्ष कारण आहे. कधी-कधी धूम्रपान करणाऱ्यांमध्ये देखील टीबी, तिप्पट अधिक आढळतो. सिगरेट किंवा बिड़ीचे धूम्रपान, जितके अधिक, तितके अधिक टीबीचे प्रचलन वाढू शकते. धूम्रपान/ तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढविते आणि हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते.
यामुळे पायाकडे होणाऱ्या रक्तप्रवाहात देखील कमतरता येते आणि पायात गैंग्रीन होऊ शकते. तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमन्यांच्या पापुद्र्यास नुकसान पोहोचवते.
मुलांच्या आरोग्यावर धूम्रपानाचा वाईट परिणाम होतो आणि कुटुंबातल्या इतर सदस्यांवर देखील धूम्रपानाच्या धुराने त्रास होतो. धूम्रपान करणाऱ्या सोबत राहिल्यास त्याच्या २ पाकिटे सिगारेटमुळे धुम्रपान न करणाऱ्यास धूम्रपान करणाऱ्याइतका त्रास होतो, हे मूत्रातील निकोटिनच्या पातळीचा अभ्यास करता आढळून आले आहे.
तंबाखू किंवा धूम्रपानामुळे मधुमेह होण्याची शक्यता जास्त बळावते. तंबाखूमुळे रक्तातील चांगल्या कोलेस्ट्राँलचे प्रमाण कमी होते. धूम्रपान करणारे/तंबाखू सेवन करणारे यांच्यात, धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत हृदय रोग व पक्षाघात होण्याचा धोका २ ते ३ पट अधिक वाढतो.
धूम्रपान / तंबाखूचे स्त्री व पुरुषांवर दुष्परिणाम होतात. याचे सेवन पुरुषांमध्ये नपुंसकतेचे कारण आहे. धूम्रपान / तंबाखूचे सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ति लवकर होते. धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते. ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो.
ज्या गरोदर स्त्रिया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गर्भपाताची शक्यता वाढते, किंवा मूल कमी वजनाचे होते, किंवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात, किंवा बाळाचा अचानक मृत्यू देखील ओढवू शकतो.
तंबाखू सोडण्याचे शारीरिक फायदे
तुमच्यातील कॅन्सर वा हृदयरोग होण्याचे धोके कमी होतात. हृदयावर येणारा दाब कमी होतो. आपल्या धुम्रपानाचा इतरांना त्रास होणार नाही. धूम्रपानामुळे होणारा खोकला (सारखा होणारा खोकला व कफ) नाहीसा होईल. तुमचे दात स्वच्छ व शुभ्र होतील.
सामाजिक फायदे
तुम्ही स्वतः नियंत्रक व्हाल, सिगारेट तुमच्यावर नियंत्रण ठेवणार नाही. तुमची आत्म-शक्ती तथा आत्मविश्वास वाढेल. आज व या नंतर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक निरोगी पालक (पिता/माता) बनाल. तुमच्याकडे इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसा असेल.
धूम्रपान/तंबाखू सोडण्यासाठी युक्त्या
ऐशट्रे, सिगारेट, पान, जर्दा लपवून ठेवा, जे नजरेसमोर नसते ते आठवत नाही. हा एक सोपा, परंतु चागंला उपाय आहे. धूम्रपान करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या कारणांना ओळखा.
तुमचे सहकारी, मित्र सिगारेट, पान, जर्दा खातो कां ? असे असल्यास त्यांना टाळायचा प्रयत्न करा. तोंडात च्युइंगम, चॉकलेट, पेपरमिंट इ. ठेवण्याचा प्रयत्न करा व दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा. जेव्हा तल्लफ येईल तेव्हा, उभ्याने किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. एक पेला पाणी प्या आणि व्यायामाने देखील तल्लफ घालवण्यास मदत होते. जेव्हा तंबाखू सेवनाची तल्लफ येईल तेव्हा, तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल विचार करा व तुमच्यावर तंबाखूमुळे होणा-या भयंकर रोगांचा विचार करा. सेवन थांबवण्याची एक तारीख ठरवा. मदतनीसाची मदत घ्या. तुमचे वेळा-पत्रक सिगारेट, पान, जर्दा सोडून आखा.
जेव्हा तुम्हाला धूम्रपान/तंबाखूची तल्लफ लागेल तेव्हा काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करा. दोन सिगारेट ओढण्यास विलंब करा. दीर्घ श्वास घ्या, पाणी प्या. स्वतःसाठी सकारात्मक बोला. दररोज आरामाच्या तंत्रांचा वापर करा जसे (योग, चालणे, ध्यानधारणा, नृत्य, संगीत इत्यादी). कॅफीन आणि अल्कोहोलचे सेवन सीमित करा. या व्यतिरीक्त, सक्रिय बना आणि पोषक आहार करा नियमित व्यायाम करा निरोगी व स्वस्थ तंदुरुस्त जीवन जगा.
०००
डॉ. रोहन वायचळ, जिल्हा मुख आरोग्य अधिकारी, सोलापूर
मुंबई, दि.३० : जगविख्यात क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी राज्य शासनाच्या ‘स्वच्छ मुख अभियाना’चे सदिच्छादूत (ब्रँड ॲम्बेसेडर) म्हणून करार केला असून त्यांच्या आवाहनाला तरुणांसह सर्व स्तरातील नागरिकांमध्ये जनजागृती होवून अभियान अधिक यशस्वी होण्यास मदत होईल, असे प्रतिपादन करून निरोगी जीवनासाठी मौखिक आरोग्य जपणे महत्त्वाचे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्यावतीने स्वच्छ मुख अभियानासाठी सदिच्छादूत सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम आज येथे झाला, यावेळी ते बोलत होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य मंत्री गिरीष महाजन, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, आयुक्त राजीव निवतकर, वैद्यकीय संचालक डॉ. दिलीप म्हैसेकर, उपसंचालक डॉ.अजय चंदनवाले आदींसह विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले, “मौखिक आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. शाळेतील मुलांमध्येही तंबाखू, गुटखा, खर्रा अशा पदार्थांच्या सेवनामुळे कॅन्सर रोगाचे प्रमाण वाढत आहे. यासाठी जनजागृती महत्त्वाची आहे. प्रसिद्ध क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी आजपर्यंत कधीच तंबाखूजन्य पदार्थांची जाहिरात केली नाही. आरोग्यासाठी तडजोड न करणाऱ्या जगप्रसिद्ध अशा व्यक्तींनी सदिच्छादूत म्हणून शासनाच्या उपक्रमात सहभाग घेतला आहे. यामुळे येणारी पिढी व्यसनाचे दुष्परिणाम ओळखून, समजावून घेऊन स्वच्छ मुख ठेवण्यासाठी सावधगिरी बाळगेल”, असे त्यांनी सांगितले.
क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर म्हणाले, “भारत हा तरुणांचा देश आहे, पण किती तरुण निरोगी जीवन जगतात हे महत्त्वाचे आहे. जीवन जगताना तंदुरुस्त दिसणे आणि निरोगी असणे या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. निरोगी जीवन जगणे प्रत्येकाच्या हातात आहे. यासाठी मी जनजागृती करणार आहे. स्वतःचे मुख स्वच्छ ठेवा आरोग्यदायी जीवन जगा, आयुष्याची मॅच जिंकणे स्वतःच्या हातात आहे. राज्य शासनाने स्वच्छ मुख्य अभियान सुरू करून जनजागृतीच्या पहिल्या इनिंगला सुरुवात केली आहे. या उपक्रमात जास्तीत जास्त योगदान देण्याचा प्रयत्न करणार आहे, असे श्री. तेंडुलकर यांनी सांगितले.
मंत्री श्री. महाजन म्हणाले की, “सचिन तेंडुलकर आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्यामध्ये ‘स्वच्छ मुख अभियाना’साठी आज सामंजस्य करार स्वाक्षरी कार्यक्रम झाला. सचिन तेंडुलकर यांनी या अभियानाचे सदिच्छादूत पद स्वीकारल्यामुळे या अभियानाची सर्वदूर व्याप्ती पसरुन चांगला प्रतिसाद मिळेल”, असा विश्वासही मंत्री श्री. महाजन यांनी व्यक्त केला.
राज्यात वाढत्या मौखिक आजारांवर नियंत्रण आणण्यासाठी राष्ट्रीय मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत शिफारस करण्यात आलेल्या आणि जागतिक आरोग्य संघटनेने नमूद केलेल्या मौखिक आरोग्याबाबत कृती योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाने या वर्षापासून ‘महाराष्ट्र मौखिक आरोग्य अभियान’ म्हणजेच ‘स्वच्छ मुख अभियान’ राबविण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शासनाच्यावतीने हे अभियान जानेवारी 2023 पासून सुरू करण्यात आले आहे. कॅलेंडर, कॅम्प आणि कॅम्पेन या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी मोठ्याप्रमाणात अभियान राबवले जाणार असल्याचेही श्री. महाजन यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अश्विनी जोशी यांनी केले. आभार आयुक्त राजीव निवतकर यांनी मानले.
पुणे : ‘कर्करोगाच्या रुग्णांवर वेदनाशामक उपचार (पॅलिएटिव्ह केअर) प्रभावीपणे होण्यासाठी पुण्यातील मुकुल माधव फाऊंडेशन आणि गंगा प्रेम हॉस्पिस यांनी संयुक्तपणे पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत उत्तराखंडमधील डेहराडून, ऋषिकेश, हरिद्वार येथे कर्करोगाच्या रुग्णांना ‘पॅलिएटिव्ह केअर’ सुविधेचा लाभ घेता येणार आहे. मुकुल माधव फाउंडेशनच्या वतीने गंगा प्रेम हॉस्पीसला पॅलिएटिव्ह केअर युनिट वाहन सुपूर्द करण्यात आले. गेल्या वर्षी तमिळनाडूतील कन्याकुमारी येथे श्रीराम कॅन्सर ट्रस्टच्या माध्यमातून अशाच एका युनिटला मदत करण्यात आली होती.
ऋषिकेश (उत्तराखंड) येथे झालेल्या कार्यक्रमावेळी गंगा प्रेम हॉस्पिसचे वैद्यकीय संचालक ए. के. दिवाण, श्रद्धा कॅन्सर केअर ट्रस्टच्या संस्थापक विश्वस्त डॉ. रुपाली दिवाण, फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे महाव्यवस्थापक (विक्री-रिटेल/प्रोजेक्ट) अरुण ओझा, गंगा प्रेम हॉस्पिसच्या चीफ ऑफ ऑपरेशन्स पूजा डोगरा, विश्वस्त व आध्यात्मिक सल्लागार नानी माँ आणि ऋषिकेशमधील आरोग्यधाम येथील पुरस्कारप्राप्त आयुर्वेद डॉक्टर अमृत राज यांच्यासह मुकुल माधव फाउंडेशनचे हितचिंतक, पदाधिकारी उपस्थित होते. आगामी काळात रुग्णांची सदैव काळजी घेण्याच्या व त्यांना आधार देण्याच्या दृष्टीने टाकलेले हे एक पाऊल आहे.
या महत्त्वपूर्ण उपक्रमाबद्दल बोलताना मुकुल माधव फाऊंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितू प्रकाश छाब्रिया म्हणाल्या, “गंगा प्रेम हॉस्पिसला पॅलिएटिव्ह केअर युनिट वाहन सुविधा पुरविण्याची संधी मिळणे आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे. गेल्या १२ वर्षांपासून समर्पित भावनेने त्यांनी केलेले उल्लेखनीय काम प्रेरक आहे. पॅलिएटिव्ह केअर युनिट वाहनासह मुकुल माधव फाऊंडेशनने रुग्ण आणि त्यांची काळजी घेणाऱ्यांसाठी १८५० छोटे रेशन किट आणि चादरी दिल्या आहेत. सहकार्य भावनेवर फाउंडेशनचा नेहमीच विश्वास राहिला असून, या उपक्रमांत सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे आभार व्यक्त करावेसे वाटतात.
“आमचे मूळ असलेले हरिद्वार माझ्यासाठी खूप विशेष आहे. माझ्या आजीसह आमच्या पूर्वजांच्या अनेक आठवणी मला इथे परत घेऊन येतात. इथे धार्मिक विधीमध्ये बराच वेळ घालवलेला आहे. गंगेचा थंडगार परिसर, पुरी भाजीचा आस्वाद, बाजारात मनसोक्त फिरण्यासह सिंधूरच्या डोंगर आणि पायऱ्यांवर झगमगणारे दिवे पाहिले आहेत. या सगळ्या आठवणींसह मला मला पुन्हा सेवेची आणि माझ्या पूर्वजांचा वारसा चालवण्याची संधी मिळाली आहे,” अशा शब्दात छाब्रिया यांनी आठवणींना उजाळा दिला. सामाजिक कार्याचा रौप्य महोत्सव १९९९ मध्ये स्थापन झालेल्या मुकुल माधव फाऊंडेशन (एमएमएफ) यंदा सामाजिक कार्याचा रौप्य महोत्सव साजरा करत आहे. गेल्या २५ वर्षांत मुकुल माधव फाउंडेशनने देशभरात आरोग्य, शिक्षण, समाजकल्याण, जलसंधारण, कौशल्य विकास या क्षेत्रात भरीव काम केले आहे. समाजातील वंचित घटकांच्या, महिलांच्या सक्षमीकरणात बहुमोल योगदान दिले आहे. गरीब व गरजू रुग्णांना, विद्यार्थ्यांना अर्थसहाय्य पुरवले आहे. सामाजिक जाणिवेतून सुरु असलेले हे कार्य सर्वांसाठी आदर्शवत असेच आहे.