Home Blog Page 1454

लवकरच मंत्रिमंडळ विस्तार:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – अमित शहांसोबत सहकार क्षेत्रातील बदलांवर चर्चा

नवी दिल्ली – राज्यातील साखर कारखाने आणि सहकार क्षेत्राविषयी दिल्लीत आज अमित शहा यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्याबाबतच्या वक्तव्यावरही चर्चा झाली. तसेच लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होईल असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.आज महत्वाची बैठक अमित शहांसोबत झाली. सहकार क्षेत्राशी संबंधीत बैठकीनंतर सीएम एकनाथ शिंदे म्हणाले, इथेनाॅल आणि को जनरेशन यासह साखर उद्योग आणि त्यातील अडचणी व सशक्त उपाययोजना यावर चर्चा झाली. सहकारमंत्र्यांनी सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर नव्हे तर साखर उद्योगावर चर्चा झाली.

दिल्लीत अमित शहांसोबत झालेल्या बैठकीत शिंदे गट आणि भाजप यांच्यातील मंत्रिमंडळ विस्तारात कुणाला किती मंत्रिपदे याचे गणित लावले जात असण्याची शक्यता आहे. मंत्रिमंजळ विस्ताराचे त्रांगडे अमित शहा यांच्या सूचनेनुसार आणि अनुमतीने सोडवण्यावर उभय नेत्यांचा भर दिसतो. यावर सीएम शिंदे म्हणाले की, लवकरच राज्यमंत्रिमंडळ विस्तार होईल.

महाराष्ट्रातील राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे राज्यपाल पदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली. राज्यपालांच्या या भूमिकेबाबत आजच्या बैठकीत चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रातल बदलांची शक्यता असून याही एका महत्वाच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शहा यांच्यासोबत एक बैठक झाली. यात काही महत्वाचे निर्णय घेतले गेले. विशेषतः या बैठकीला भाजप नेत्या पंकजा मुंडे याही उपस्थित हेत्या.

सहकार क्षेत्राची पुर्नरचना, ​​​​​​​​​​​​​​अडचणीतील साखर कारखान्याला सहकार्य, आजारी साखर कारखान्याला कर्ज स्वरुपात मदत यासह विविध मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सहायक कक्ष अधिकारी पदाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी, तात्पुरती निवड यादी प्रसिद्ध

मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कक्ष अधिकारी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा – २०२२ मधील उमेदवारांची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याआधारे उमेदवारांकडून भरतीप्रक्रियेतून बाहेर पडण्याचे (Opting Out) विकल्प मागविण्यात आले आहेत.

परिक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरिता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे. ही वेबलिंक दि. २५ जानेवारी, २०२३ रोजी १२.०० वाजेपासून दि. ३१ जानेवारी, २०२३ रोजी २३.५९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

ऑनलाईन पद्धतीखेरीज अन्य कोणत्याही प्रकारे पाठविलेला भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा पर्याय ग्राह्य धरला जाणार नाही. तसेच याबाबत उमेदवारांची कोणतीही बाब / निवेदने / पत्रव्यवहार तद्नंतर विचारात घेतली जाणार नाही.

भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याच्या (Opting Out) विकल्पाआधारे अंतिम निकाल / शिफारशीसंदर्भात कार्यवाही करण्यात येईल. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा विकल्प निवडणाऱ्या उमेदवारांचा अंतिम निकाल प्रक्रियेत समावेश करण्यात येणार नाही. विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या १८००- १२३४-२७५ किंवा ७३०३८२१८२२ या टोल फ्री क्रमांकावर अथवा Support – online@mpsc.gov.in या ई-मेल पत्त्यावर विहित कालावधीत संपर्क साधता येईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कळविले आहे.

झवेरी बाजार लूट प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक; ३ संशयितांचा शोध सुरू

मुंबई- झवेरी बाजार लूट प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक करण्यात आली आहे. तसेच ३ संशयितांचा शोध सुरू आहे. सहा पथक आरोपीच्या मागावर होते. अटक करण्यात आलेल्या महिलेचं नाव विशाखा मुधूळे असं असून ती खेडची रहिवासी आहे. चोरी झालेल्या सोन्यापैकी अडीच किलो सोने हस्तगत करण्यात आले आहे.झवेरी बाजारात ईडीचे अधिकारी असल्याचं भासवून छापा टाकून व्यावसायिकाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.झवेरी बाजारातील एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर काल दुपारी दोनच्या सुमारात अज्ञातांनी ईडी अधिकारी असल्याचं सांगत बनावट छापा टाकला. बनावट अधिकाऱ्यांनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि जवळपास तीन किलो सोनं लुटलं आहे. सोन्याची किंमत जवळपास १ कोटी ७० लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे.

व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर पोलिसांनी काही अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ३९४, ५०६ (२) आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तसेट सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने आरोपींचा शोध सुरु असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितलं. दरम्यान लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी या प्रकरणात दोन जणांना ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरु आहे. तसंच आरोपींचा शोध घेण्यासाठी पुणे, दहिसर आणि इतर काही ठिकाणी पथकं रवाना झाली आहेत.

पुणे-सोलापूर महामार्गावर लक्झरीच्या धडकेमुळे दोन महिलांचा मृत्यू

पुणे :पुणे – सोलापूर महामार्गावर लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळीमळा येथे रस्ता ओलांडताना लक्झरी बसने चिरडल्याने दोन महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी पावणेसहाच्या सुमारास घडली. या अपघातात मुलीचा जागीच मृत्यू, तर तिच्या मावशीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.माळीमळा येथे राहत असलेल्या आजारी वडिलांना भेटण्यासाठी त्या दोघी गुलबर्गा येथून आल्या होत्या. मुलगी सुरेखा नरसिंग घायाळू (वय ३८) व मावशी मंमादेवी सूर्यवंशी (वय ४७, दोघेही रा. खंडाळा, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) अशी अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

सुरेखा घायाळू यांचे वडील तुळशीराम माणिक मुळे (वय ६५, रा. माळीमळा, लोणी काळभोर, ता. हवेली) मागील काही दिवसांपासून आजारी होते. त्यांना भेटण्यासाठी मुलगी सुरेखा घायाळू व मावशी मंमादेवी सूर्यवंशी या गुलबर्गा येथून लक्झरी बसने सोमवारी (दि. २३) निघाल्या होत्या. पहाटे त्या हडपसर येथे उतरून सव्वा पाचच्या सुमारास रिक्षा करून लोणी येथे आल्या. माळीमळा येथे पावणे सहाच्या सुमारास उतरून पुणे – सोलापूर महामार्ग ओलांडत असताना सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एका लक्झरी बसने त्यांना धडक दिली. या अपघातात मुलगी सुरेखा घायाळू यांचा जागीच मृत्यू झाला, तर मावशी मंमादेवी सूर्यवंशी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यांना लोणी काळभोर येथील खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारदरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.

“शेवटचा घोट” नाटिका आणि “फुलवूया ही वनराई” नृत्यगीताने जिंकला “वनराई करंडक”

“फुलवूया ही वनराई” या गीत नृत्याने रसिकांची मने जिंकली…
पुणे, दि. २४ जानेवारी : नव्या पिढीकडून बळीराजाला जगण्याची नवीन उमेद देत त्याला येणार्‍या संकटावर मात करून आत्महत्येपासून परावृत्त करण्याचा संदेश देणार्‍या “शेवटचा घोट” या सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यानी सादर केलेल्या नाटिकेस वनराई करंडक मिळाला. तर सुरेल गीत गायन, वाद्यांची उत्तम साथसंगत, विद्यार्थ्यांच्या समूहाने सादर केलेल्या “फुलवूया ही वनराई, वनराईची नवलाई” या गीत नृत्याने रसिकांची मने जिंकली. डी.ई.एस.सेकंडरी शाळेने सादर केलेले या पर्यावरण संवर्धन नृत्यगीतास प्रथम परितोषिक मिळाले आहे. कै. अण्णासाहेब बेहेरे सन्मानचिन्ह, रोख रक्कम, प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.
स्पर्धेची अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ नुकताच बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला. बक्षीस समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे बालकलाकार आर्या घारे, दिग्दर्शक सतीश फुगे, वनराईचे विश्वस्त रोहिदास मोरे, धन्यकुमार चोरडिया, सागर धारिया, सचिव अमित वाडेकर, वनराई पर्यावरण वाहिनी प्रकल्प संचालक भारत साबळे, बॅक टू स्कूल या चित्रपटातील सर्व कलाकार उपस्थितीत होते. कै. इंदिरा बेहेरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बेहेरे यांचे या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभले.
नाटिका विभागात – प्रथम- सौ. सुशीलाबाई वीरकर हायस्कूल, द्वितीय- चंद्रकांत दरोडे माध्यमिक विद्यालय, तृतीय- न्यू इंग्लिश स्कूल, टिळक रोड, उत्तेजनार्थ- चं. बा. तुपे साधना विद्यालय, हडपसर आणि एन. सी. एल. इंग्लिश मेडियम प्रायमरी स्कूल यांना परितोषिक मिळाले.
नृत्य विभागात प्रथम- डी. ई. एस. सेकंडरी स्कूल, द्वितीय- मॉडर्न इंग्लिश मेडियम स्कूल, तृतीय- विद्यापीठ हायस्कूल पुणे, उत्तेजनार्थ- आदर्श विद्यालय नातूबाग शाळा आणि महिलाश्रम हायस्कूल, कर्वे नगर यांना परितोषिक मिळाले.
स्पर्धेचे परीक्षण ज्योती रावेरकर, जतीन पांडे, किरण तिवारी यांनी केले.
वनराई संस्थेच्या वतीने पुण्यातील शाळांसाठी वनराई पर्यावरण वाहिनी अंतर्गत वनराई करंडक दरवर्षी आयोजीत केला जातो. यंदा हे स्पर्धेचे २० वे वर्ष आहे. सिंहगड रोड येथील सानेगुरुजी स्मारक स्व. निळू फुले सभागृह येथे करंडकाची प्राथमिक फेरी झाली होती. यावेळी ३० शाळांनी सहभाग घेतला होता. पर्यावरण जनजागृती संबंधी नाटिका, गायन-नृत्य सादरीकरण हा “वनराई करंडकाचा” मुळ उद्देश आहे.  नाटिका, गीत, पर्यावरण संदेश, समूह नृत्याविष्कार, काव्य व संगीत या निकषांच्या आधारे स्पर्धेचे मुल्यांकन होते. विद्यार्थ्यांवर पर्यावरण संरक्षणाचे संस्कार घडावे, पर्यावरणाविषयी त्यांच्यात प्रेम निर्माण व्हावे यासाठी हा करंडक दरवर्षी पुण्यामध्ये आयोजित केला जातो.

2022 मध्ये फास्टैग द्वारे इलेक्ट्रॉनिक पथकर संकलन 46% नी वाढले

नवी दिल्ली, 24 जानेवारी 2023

मागील काही वर्षात फास्टैग द्वारे केलेल्या इलेक्ट्रॉनिक पथकर संकलनात सातत्यपूर्ण वाढ दिसून येत आहे.  वर्ष 2022 मध्ये राज्य महामार्गांवरील टोलनाक्यांसह इतर टोलनाक्यांवर फास्टैग द्वारे झालेल्या एकूण टोल संकलनात 2021 च्या 34,778 कोटी रुपये संकलनाच्या  तुलनेत अंदाजे 46 टक्क्यांनी वाढ होऊन ते 50,855 कोटी रुपये झाले आहे. 

डिसेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर फास्टैग द्वारे सरासरी दैनिक पथकर संकलन 134.44 कोटी रुपये झाले आणि एका दिवसातील सर्वाधिक  संकलन 24 डिसेंबर 2022 रोजी 144.19 कोटी रुपये झाले.

याचप्रमाणे वर्ष 2022  मध्ये फास्टैग व्यवहारांमध्ये वर्ष 2021च्या तुलनेत 48%नी वाढ दिसून आली. वर्ष 2021 आणि वर्ष 2022 मध्ये अनुक्रमे 219 कोटी आणि 324 कोटी फास्टैग व्यवहार झाले.

आजमितीला एकूण 6.4 कोटी फास्टैग वितरीत करण्यात आले आहेत तर  फास्टैग उपलब्ध असलेल्या टोलनाक्यांच्या संख्येतही  वाढ झाली असून ती 2022 मध्ये 1,181 (323 राज्य महामार्ग टोलनाके ) इतकी झाली आहे मागील वर्ष 2021 मध्ये ही संख्या 922 होती.

यात उल्लेखनीय गोष्ट अशी आहे की, फास्टैग कार्यक्रमांतर्गत आगमनानंतरच्या ऑन-बोर्डिंग राज्य टोलनाक्यांसाठी  29 वेगवेगळ्या राज्यांच्या  संस्था/अधिकारिणी सह  सामंजस्य करार करण्यात आले आहेत ज्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक इत्यादी राज्यांचा समावेश आहे.

झवेरी बाजारात बनावट ईडी अधिकाऱ्यांनी छापे टाकून केली करोडोंची लूट

मुंबई : मुंबईच्या झवेरी बाजारामध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तुम्ही ‘स्पेशल २६’ हा सिनेमा पाहिलाच असेल. अगदी तसाच प्रकार इथे घडला आहे. या सिनेमात खोटे अधिकारी बनून लूट करण्यात आली होती. अशाच पद्धतीने झवेरी बाजारात बनावट ईडी अधिकाऱ्यांनी छापे टाकून करोडोंची लूट केली. खरंतर, राज्यात ईडी म्हटलं की लोकांना घाम फुटतो. याचाच फायदा घेत भामट्यांनी खोटे ईडी अधिकारी बनून छापा टाकला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यावसायिकाच्या कार्यालयावर ४ अज्ञात लोकांनी खोटा छापा टाकला. यावेळी त्यांनी स्वतःला ईडीचे अधिकारी असल्याचं सांगितलं. इतकंच नाहीतर आरोपींनी तक्रारदार व्यावसायिकाच्या कार्यालयातील एका कर्मचाऱ्यालाही हातकडी घातल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. यानंतर आरोपींनी कार्यालयातून २५ लाख रुपये रोख आणि ३ किलो सोने चोरून नेले.या सोन्याची एकूण किंमत एक कोटी ७० लाख असल्याचं सांगण्यात येत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ अज्ञात आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३९४, ५०६ (२) आणि १२० ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती आहे. दरम्यान, सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध सुरू असल्याचंही पोलीस सूत्रांनी सांगितलं.

माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीत बदल

नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

पुणे, दि. २४: माघी श्रीगणेश जयंतीच्या पार्श्वभूमीवर शिवाजी मार्गावरील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर येथे दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता २५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजेपासून गर्दी संपेपर्यंत वाहतूकीस बंदी करण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले आहे. नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन शहर पोलीस वाहतूक शाखेतर्फे करण्यात आले आहे.

अग्नीशमन वाहने, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी अत्यावश्यक सेवेतील वाहनांना ही बंदी असणार नाही. स. गो. बर्वे चौक येथून शिवाजी रोडने स्वारगेटकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहतूकीस पीएमपीएमएल बसेस वगळून बंदी असेल. प्रीमियर गॅरेज चौक ते मंगला सिनेमागृहासमोरुन नागदेव ऑईल डेपो चौक दरम्यान तात्पुरत्या स्वरुपात नो-पार्किंग, नो-हॉल्टींग करण्यात येत आहे.

पीएमपीएमएल बसेसचे मार्ग : या कालावधीत पीएमपीएमएल बसेससाठी प्रीमियर गॅरेज चौक, मंगला सिनेमागृहासमोरुन उजवीकडे वळून खुडे चौक, उजवीकडे वळून पुणे मनपा कोर्ट कॉर्नर, प्रीमियर गॅरेज चौक असा पुणे मनपा येथील वर्तुळाकार बस मार्ग राहील. स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला सिनेमागृहासमोरुन पुढे उजवीकडे वळून खुडे चौक, बालगंधर्व चौक, डावीकडे वळून खंडोजीबाबा चौक, अलका टॉकीज चौक, टिळक रोडने पुरम चौक मार्गे जातील.

स. गो. बर्वे चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने पुणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेस प्रीमियर गॅरेज चौकातून डावीकडे वळून मंगला थिएटर समोरुन पुढे डावीकडे वळून राष्ट्रवादी काँग्रेस भवन उजवीकडे वळून कुंभारवेस चौक डावीकडे वळून शाहिर अमर शेख चौक मार्गे जातील. कोथरुडकडून येणाऱ्या व अप्पा बळवंत चौक मार्गे पुणे स्थानककडे जाणाऱ्या पीएमपीएमएल बसेस बाजीराव रोडने गाडगीळ पुतळा चौक उजवीकडे वळून कुंभार वेस चौक मार्गे पुणे स्थानकाकडे जातील.

दुचाकी व हलक्या चारचाकी वाहनांसाठी मार्ग: ही वाहने स. गो. बर्वे चौकातून सरळ जंगली महाराज मार्गाने बालगंधर्व चौकातून डावीकडे वळून इच्छितस्थळी जातील.

जिजामाता चौकातून छत्रपती श्री शिवाजी महाराज मार्गाने स्वारगेटकडे जाण्याकरीता पर्यायी मार्गाचा वापर वापर करावा. जिजामाता चौक डावीकडे वळून गणेश रोडने फडके हौद चौक, देवजीबाबा चौक, उजवीकडे वळून हमजेखान चौक सरळ महाराणा प्रताप रोडने किंवा उजवीकडे वळून लक्ष्मी रोडने सोन्या मारुती चौक, बेलबाग चौक, डावीकडे वळून शिवाजी रोडने इच्छितस्थळी जातील. शिवाजीपुलावरुन गाडगीळ पुतळा चौक. डावीकडे वळून कुंभारवेस चौक, शाहिर अमर शेख चौक मार्गे इच्छितस्थळी जातील. शिवाजीपुलावरून गाडगीळ पुतळा चौक मार्गे फडके हौद चौकाकडे जाताना (प्रेमळ विठोबा मंदिराकडे जाणारा रस्ता वगळून) वाहने जिजामाता चौकातूनच डावीकडे वळून जातील.

अप्पा बळवंत चौकातून बुधवार चौकाकडे जाणारी सर्व वाहतूक पर्यायी मार्गातून वळविण्यात येत असून ही वाहने अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोडने इच्छितस्थळी जातील.

बाजीराव रोडने सायंकाळी महत्वाच्या व मानाच्या गणपतींच्या मिरवणुका सुरु झाल्यानंतर आवश्यकतेप्रमाणे पुरम चौकातून बाजीराव रोडने मनपाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार इतर मार्गावर वळविण्यात येईल. सदरची वाहने पुरम चौकातून टिळक रोडने अलका टॉकीज चौक, खंडोजीबाबा चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.

त्याचप्रमाणे मानाचे गणपतींच्या मिरवणुकीच्या अनुषंगाने तसेच शहराचे मध्यवर्ती भागातील वाहतूकीची परिस्थती पाहून शिवाजी रोड, बाजीराव रोड, गणेश रोड, लक्ष्मी रोड व इतर मिरवणुक मार्गावरील अंतर्गत वाहतूकीत आवश्यकतेप्रमाणे बदल करण्यात येणार असल्याचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी कळविले आहे.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

पुणे, दि. २४: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या भारत सरकार शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता इत्यादी योजनेचे सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अर्ज विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवरुन भरावेत असे आवाहन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्यातील अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले शिष्यवृत्तीचे अर्ज https://mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर ऑनलाईन भरून ऑफलाईन पद्धतीने आपल्या महाविद्यालयात जमा करणे आवश्यक आहे.

सन २०२२-२३ या वर्षात १०० टक्के विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली नसल्याने सर्व महाविद्यालयातील प्राचार्यांनी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत १०० टक्के नोंदणी होईल याची दक्षता घ्यावी. तसेच महाविद्यालयाकडील प्रलंबित अर्जही २ दिवसात सहायक आयुक्त कार्यालयाकडे सादर करावेत.

जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी प्रवेशित एकही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घ्यावी. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास आणि त्यामुळे एखादा पात्र मागासवर्गीय विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिल्यास त्यास सामाजिक न्याय विभाग आणि इतर मागास बहुजन कल्याण विभाग जबाबदार राहणार नाहीत, असे समाज कल्याण सहाय्यक आयुक्त संगिता डावखर यांनी कळविले आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने ‘वाचक वाढवा अभियान’

पुणे, दि.२४: स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या स्थापनेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘वाचक वाढवा अभियान’ राबविण्यात येत आहे. या अंतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत नवीन वैयक्तिक व संस्था सभासद नोंदणी करण्यात येत आहे.

ग्रंथालयात १ लाख २५ हजार ४०० हून अधिक ग्रंथसंपदा आहे. यामध्ये अनेक संदर्भ ग्रंथ, कथा, कादंबऱ्या, व्यक्तीमत्व विकास, महिलांसाठींचे ग्रंथ, बालवाङ्मय, स्पर्धा परीक्षा आदी विषयांचे ग्रंथ मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील उपलब्ध आहेत. या ग्रंथालयात १ हजार ४७८ वैयक्तिक व २० संस्था सभासद आहेत.

जिल्ह्यातील जेष्ठ नागरिक, महिला, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी व शिक्षक, संशोधक आदी तसेच शासनमान्य सार्वजनिक व ग्रामपंचायत ग्रंथालये, संशोधन ग्रंथालये, जिल्हा व तालुका ग्रंथालय संघ, शाळा, महाविद्यालये व इतर नोंदणीकृत संस्थांनी जिल्हा ग्रंथालय, ९६६/१, सरदार बिल्डींग, गुरुद्वारासमोर, रविवार पेठ, पुणे येथे भेट देऊन सभासद होण्याचे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांनी केले आहे.

 एकाच कुटुंबातील 7 मृतदेह सापडल्याने खळबळ

पुणे-पुणे जिल्ह्यातल्या पारगाव (ता. दौंड) येथे एकाच कुटुंबातील 7 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. बदलत्या काळात आतंरधर्मीय, आंतरजातीय लग्न मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहेत. मात्र, अद्याप जुन्या रितीरिवाजांना पाळून असलेल्या एका कुटंबातील मुलाने लग्नाकरिता एका महिलेस पळवून नेल्याच्या रागातून मुलाच्या पित्यासह कुटुंबाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

पोलिसांना सर्व मृतदेहांची ओळख पटवण्यात यश आले आहे. यात तीन लहान मुलांचा समावेश असल्याने हळहळ व्यक्त होत आहे.दौंड तालुक्यातील पारगाव येथे भीमा नदी पात्रात सोमवारी एकाच कुटुंबातील चार जणांचे मृतदेह सापडले होते. आज मंगळवारी, 24 जानेवारी रोजी दुपारी 1 नंतर या नदीपात्रात पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले आहेत. या सर्व मृतदेहांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. मोहन उत्तम पवार (अंदाजे वय 50 वर्षे) संगीता मोहन पवार (अंदाजे वय 45 वर्षे, दोघे रा. खामगाव, ता.गेवराई) त्यांचे जावई श्यामराव पंडित फुलवरे (अंदाजे वय 32 वर्षे) त्यांची पत्नी राणी श्यामराव फुलवरे (अंदाजे वय 27 वर्षे) श्यामराव फुलवरे यांचा मुलगा रितेश श्यामराव फुलवरे (वय 7 वर्षे) छोटू श्यामराव फुलवरे (वय 5 वर्षे) आणि कृष्णा (वय 3 वर्षे) असे एकूण 7 जणांचे मृतदेह या नदीपात्रात आढळून आले आहेत. याबाबत यवत पोलिस ठाण्यात अक्समात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन पवार हे मुळचे बीड जिल्हयातील गेवराई परिसरातील रहिवासी असून एक वर्षापूर्वी कुटुंबासह दौंड परिसरातील पारगाव येथे रहाण्यास आले होते. शेतमजुरी, माती खोदकाम, उसतोडणी अशी कामे ते करत होते. मोहन पवार हे निघोज गावात पालावर राहत असताना त्यांचा छोटा मुलगा अनिल पवार (वय-20) याने त्यांच्याच समाजातील पतीपासून विभक्त राहत असलेल्या महिलेला 17 जानेवारी रोजी लग्नाकरिता पळवून नेले होते.अनिलने महिलेला पळवून नेल्याचे समजताच मोहन पवार यांनी त्यांच्यापासून पुण्यात विभक्त राहत असलेला मोठा मुलगा राहुल पवार यास फोन करून माहिती दिली. तुझ्या छोट्या भावाने एकाची मुलगी पळवून नेली आहे. त्यामुळे ती परत आणण्यास त्याला सांग, अन्यथा आम्ही विष घेऊन कुटुंबासह आत्महत्या करू असे सांगितले होते. त्यानंतर त्या दिवशी रात्री मोहन पवार हे त्यांच्या पालासह कुटुंबास घेऊन समाजात बदनामी होईल या भीतीने दुसरीकडे निघून गेले. त्यानंतर त्यांचा ठावठिकाणा मिळून येत नव्हता.

पोलिसांना 18 ते 22 जानेवारी दरम्यान भीमा नदीपात्रात एकाच कुटुंबातील चार मृतदेह मिळून आले होते. घातपाताचा संशय व्यक्त केला जाऊ लागल्याने पोलिसांनी एनडीआरएफ पथकाच्या मदतीने नदीपात्रात शोधकार्य सुरू केल्यावर मंगळवारी आणखी तीन मृतदेह बचावकार्य पथकास नदीपात्रात सापडले. घटनेची माहिती मिळताच, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक अंकित गोयल यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. एकाच कुटुंबातील सातजणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. पुढील तपास यवत पोलिस करत आहेत.

मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन – राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित

पुणे, दि. 24 : मराठी विश्वकोश हे ज्ञानाच्या लोकशाहीकरणाचे साधन असून मराठी भाषेचे संवर्धन व वृद्धीमध्ये विश्वकोशाचे मोलाचे योगदान असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. राजा दीक्षित यांनी केले.

मराठी भाषा संवर्धन पंधरवाड्यानिमित्त विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा माहिती कार्यालय, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘विश्वकोशाची जडणघडण आणि मराठी भाषा’ या विषयावर आयोजित व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी पुणे विभागीय माहिती उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे, भाषा संचालनालयाचे अधीक्षक सुनील सिरसाट आदी उपस्थित होते.

डॉ. दीक्षित म्हणाले, मराठी विश्वकोश ज्ञानाचे साधन असल्याने निर्मिती प्रक्रियेमध्ये अचूकता आणि गुणवत्तेला महत्व देण्यात येत आहे. लोकशिक्षणाच्या अध्यापनशास्त्रात विश्वकोश हे मोलाचे साधन आहे. विश्वकोश भाषावृद्धी व समृद्धीला हातभार लावतो. परिभाषा व प्रमाणभाषा घडवण्यासाठी मंडळ जाणीवपूर्वक प्रयत्न करते. ग्रामीण भाग, आदिवासी पाडे, लहान बालकांपर्यत विश्वकोश पोहचवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मुद्रित आणि संगणकीय माध्यमांचा मेळ घालून ही वाटचाल चालू राहणार आहे.

मराठी विश्वकोशाच्या दुसऱ्या आवृत्तीसाठीचे काम सुरू झाले आहे. नोंदींमध्ये अचूकता व अद्ययावतता आणणे आणि वादग्रस्तता येऊ नये याची काळजी घेणे अशी त्रिसूत्री वापरून, मूळ छापील नोंदी आणि संकेतस्थळावरील नव्या नोंदी एकत्र करून दुसरी विस्तारित आवृत्ती तयार करण्यात येईल. कुमार कोशाचे दोन नवे खंड सुमारे सहा महिन्यांत, तर नवे माहितीपुस्तक येत्या वर्षभरात प्रकाशित करण्याचा प्रयत्न आहे.  येत्या काळात बालकोश आणि ऑलिंम्पिक कोशाची निर्मितीही प्रस्तावित आहे.

विश्वकोशाचे कार्य उत्तम रितीने चालावे यासाठी शासनाने सकारात्मक भूमिका घेतली आहे. मराठी भाषा विभागाचे मंत्री  दीपक केसरकर यांनी वाई येथील मराठी विश्वकोश कार्यालयाला भेट देऊन नव्याने अद्ययावत इमारत उभारणार असल्याची घोषणा केली आहे. शासनाच्या पाठिंब्यामुळे अधिक जोमाने कार्य करीत पुढील उपक्रम राबवण्याचा निर्धार डॉ. दीक्षित यांनी व्यक्त केला.

माहिती व तंत्रज्ञानाच्या वेगवान युगात तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्वकोश वाचकांपर्यत पोहचविण्यात येत आहे. मराठी विश्वकोश 2007 या वर्षी सीडीमध्ये, 2011 मध्ये संकेतस्थळावर, 2017 मध्ये पेनड्राईव्ह आणि 2018 मध्ये भ्रमणध्वनी उपयोजकावर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. दोन्ही  संकेतस्थळांना मिळून सुमारे तीन कोटी वाचकांनी भेट दिली आहे, असेही डॉ. दीक्षित म्हणाले.

डॉ. पाटोदकर म्हणाले, माहिती व जनसपंर्क महासंचालनालयाच्या वतीने शासनाच्या विविध लोककल्याणकारी निर्णयांची, ध्येयधोरणांची, उपक्रमांची माहिती प्रसिद्धीच्या माध्यमातून नागरिकांपर्यत पोहचविण्यात येते. नागरिकांपर्यंत अचूक व वस्तुनिष्ठ माहिती पोहचविण्यासाठी विभाग नेहमीच प्रयत्न करीत आहे. हे काम करीत असताना मराठी भाषेचे अचूक ज्ञान असणे फार गरजेचे असून यासाठी मराठी विश्वकोशाचा माहिती व जनसंपर्क विभागाला संदर्भ म्हणून नेहमीच उपयोग होत असतो, असेही ते म्हणाले.

दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, दि. 24 : मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्याने मुंबईत पायाभूत सुविधांवर विशेष भर देण्यात येत आहे. पुढील दोन वर्षात मुंबईतील सर्व रस्ते खड्डेमुक्त केले जातील. तसेच मुंबईचे सुशोभीकरण, कोळीवाड्यांचा विकास, चौपाट्या स्वच्छ करण्यावर भर दिला जाईल, असे उद्गार राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.

एबीपी माझाच्या बीकेसी येथे आयोजित ‘माझा महाराष्ट्र माझं व्हिजन’ कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी उद्याच्या महाराष्ट्राचे त्यांचे व्हिजन मांडले.

मुख्यमंत्री म्हणाले की, हे सरकार मुंबईच्या विकासाला प्राधान्य देऊन काम करत आहे. देशात आणि जगात महाराष्ट्राप्रती एक विश्वास आहे. दाओस येथील आर्थिक फोरममध्ये दीड लाख कोटींपेक्षा जास्त रकमेचे  सामंजस्य करार करण्यात आले, त्यामुळे प्रधानमंत्री यांच्या 5 ट्रिलियन उद्दिष्टपू्र्तीमध्ये महाराष्ट्राची 1 ट्रिलियन उद्दिष्टपूर्ती होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महाराष्ट्र हे देशातील मोठे औद्योगिक शहर असून येथे मोठ्या प्रमाणात थेट गुंतवणूक होत आहे. निर्यातीत राज्याचा वाटा जास्त असून विकासासाठी नवनवीन चांगले उपक्रम हाती घेण्यात आले आहे. उद्योगांनी राज्यात यावे यासाठी त्यांना जलद गतीने परवानग्या देण्यात येत आहे. उद्योगांना पोषक वातावरण देण्यात येत असून यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

नागपूर – मुंबई समृद्धी महामार्गामुळे राज्यात रस्त्यांची जोडणी वाढली असून यामुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. याचबरोबर पर्यावरणपूरक कॉरिडॉर करत असून यात पर्यावरणाची कोणतीही हानी होणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी केले.

राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी राज्यात नवीन वसाहती उभारणे, झोपडपट्टी निर्मूलन, फ्लेमिंगो करिता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, सौर ऊर्जेद्वारे 400 मे.वॅ. वीजनिर्मिती करणे, शेतकऱ्यांना शेतीसाठी मुबलक पाणी मिळावे यासाठी 18 नवीन प्रकल्प तयार करणे, शेतकऱ्यांचे उत्पादन वाढावे यासाठी नवीन तंत्रज्ञान आणणे यावर भर देण्यात येत आहे, असेही मुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी यावेळी सांगितले.

मुख्यमंत्री श्री.शिंदे पुढे म्हणाले की, आगामी वर्षात आम्ही रोजगार, स्वयंरोजगार यावर भर देणार असून मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. महिला, तरुणी आणि बालकाची मोठ्या प्रमाणात तपासणी करतोय. प्राथमिक आरोग्य केंद्राचे आधुनिकीकरण करण्यावर भर  देण्यात येत आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रावर भर देण्यात येईल. पोलीस वसाहती, महिला सन्मान, विजेवरील वाहने यावरही विशेष भर देण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

जेजुरी गडावर आज पासून भव्य आजादी का अमृत महोत्सव व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे-2023 बहू माध्यम प्रदर्शन

पुणे-दिनांक 24 जानेवारी, 2023
बहू माध्यमातून प्रदर्शित दूर्मिळ छायाचित्रे, लघूपट तसेच अत्यंत कमी वेळात भारतीय स्वातंत्र्य
लढ्याची माहिती श्री मार्तंड देव संस्थान जेजूरी येथे येण्यारा भाविंकाना व्हावी यासीठी आयोजित करण्यात
आलेल्या आजादी का अमृत महोत्सव व आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षे- 2023 या बहूमाध्यम प्रदर्शनाला भेटी
द्याव्यात,असे आवाहन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे, पत्र सूचना कार्यालय मुंबई व केंद्रीय संचार ब्यूरो,
पुणे (महाराष्ट्र व गोवा राज्य ) च्या अतिरिक्त महासंचालक श्रीमती स्मिता वत्स शर्मा यांनी उद्घाटन प्रसंगी
केले.
या प्रसंगी प्रमाद गायकवाड, उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कार्यालय, पुरंदर, निखिल देशमुख,
उपसंचालक,केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे, राजेद्र जगताप, मुख्याधिकारी, श्री मार्तंड देवस्थान जेजुरी, चारुदत्त
इंगोले, मुख्याधिकारी जेजुरी नगर परिषद, धनराज गिराम, बालविकास अधिकारी, पंचायत समिती पुरंदर,
डॉ. सारंग डांगे, वैद्यकिय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, बेलसर. श्री मार्तंड देवस्थान जेजुरीचे माजी
विश्वस्त सर्वश्री तुशार सहाणे, पंकज निकूडे पाटील, सॉलिसिटर प्रसाद शिंदे, अशोकराव संकपाळ,
व्यवस्थापक सतीश घाडगे, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, सहायक प्रचार अधिकारी पी.कुमार
आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.


या प्रदर्शनाचे आयोजन माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे केंद्रीय संचार ब्यूरो, प्रादेशिक कार्यालय पुणे व श्री
मार्तंड देव संस्थान जेजुरी, ता. पुरंदर, जि. पुणे यांच्या वतीने करण्यात आले असून या प्रदर्शनात भारतीय
स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासातील विविध महत्त्वाच्या घटना-घडामोडी, बहूमाध्यमातून प्रदर्शित करण्यात
आल्या आहेत. यात 1857 ते 1947 या कालखंडातील भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील महत्वाच्या घडामोडी
आणि महान स्वातंत्र्यसेनानी यांची जीवनगाथा अत्यंत संक्षिप्त माहिती आणि बहूमाध्यमातून अधूनिक
तंत्रज्ञानाच्या सहायाने दर्शविण्यात आली आहे.
संयूक्त राष्ट्र संघाने 2023 हे वर्षे आंतराष्ट्रीय तृणधान्य वर्षे म्हणून साजरे करण्याच्या निर्णय घेतला आहे,
भारत हा जगातील सर्वात जास्त तृणधान्य पिकविणारा देश आहे, ज्वारी,बाजरी,नाचणी, वरई,राळा,
राजगिरा या धान्यातून आरोग्यास लोह, कॅल्शियम, झिंक, आयोडिन आदी घटक मिळतात, सा सर्व धान्यांचा
प्रचार व प्रसार करण्यासाठी या प्रदर्शनस्थळी तृणधान्य प्रदर्शनही भरविण्यात आले आहे.
गडावर येणा-य़ा भाविकांना कमीत कमी वेळात आणि मनोरंजनाच्या माध्यमातून या प्रदर्शनाची माहिती
देण्यासाठी या प्रदर्शनात विविध स्वातंत्र्य सेनानींचे कटआऊट्स, बॅकलीट पॅनल्स्, एलइजी वॉल, प्रदर्शनी
पॅनल्स, लघू चित्रपट आदी माध्यमांचा वापर करण्यात आला आहे.

प्रदर्शनाच्या ठिकाणी तहसिल कार्यालय, पंचायत समिती, पुरंदर, जेजुरी नगर परिषद यांच्या द्वारे विविध
योजनांची माहिती देणारे स्टाल्स् मांडण्यात आले आहेत, यात महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने
तृणधान्यची माहिती देण्यासाठी या धान्यंपासून तयार करण्यात आलेल्या सकस आहाराचे प्रदर्शन
भरविण्यात आले आहे. आरोग्य विभागाद्वारे भाविकांची प्राथमिक तपासणी करुन त्यांना तात्पूरता उपचार
देण्यासाठी स्टाल उभारण्यात आला आहे. नगर परिषद जेजुरीच्या वतिने आयुषमाण भारत आणि प्रधानमंत्री
स्वनिधी योजनांचे लाभधारकांना कार्ड वाटप करण्यात आले या प्रदर्शन स्थळी जय मल्हार कलापथकाद्वारे
सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
हे प्रदर्शन दिनांक 24 ते 28 जानेवारी 2023 पर्यत सर्व भाविकांसाठी खूल ठेवण्यात आले असून सर्व
नागरिकांनी या प्रदर्शनास भेटी द्याव्यात असे आवाहन भारत सरकाच्या वतीने करण्यात आले आहे.

पुण्यातील केंद्रीय विद्यालयांमध्ये आयोजित चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

पुणे, 23 जानेवारी 2023

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या होत असलेल्या “पराक्रम दिना”निमित्त  केंद्रीय शिक्षण मंत्रालयातर्फे घेण्यात आलेल्या देशव्यापी चित्रकला स्पर्धा उपक्रमाचा भाग म्हणून आज गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालय तसेच लोहगाव येथील एअर फोर्स स्टेशन येथे असलेले केंद्रीय विद्यालय क्र.1 येथे जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. येत्या 27 जानेवारी 2023 रोजी होणार असलेल्या “परीक्षा पे चर्चा” या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांमध्ये परीक्षेविषयी असलेल्या तणावाचे निवारण करण्यासाठी देखील या अभिनव उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी झालेल्या  200 हून अधिक विद्यार्थ्यांना ई-प्रमाणपत्रे तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले “एग्झाम वॉरियर्स” या पुस्तकाच्या प्रती देऊन गौरविण्यात आले.

परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम दर वर्षी आयोजित करण्यात येतो आणि त्यात परीक्षेला सामोरे जाणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांशी पंतप्रधान अर्थपूर्ण संवाद साधतात. परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी आणि परीक्षेत उत्तम दर्जाचे यश मिळविण्यासाठी पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना 25 मंत्र दिले आहेत. आजच्या चित्रकला स्पर्धेच्या संकल्पना म्हणून हे 25 मंत्रच देण्यात आले होते. पुणे आणि परिसरातील विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला.

केंद्रीय विद्यालय क्र.1 एएफएस लोहगाव:

लोहगाव येथील केंद्रीय विद्यालय क्र.1 एएफएस मध्ये पुणे जिल्ह्यातील 21 शाळांमध्ये शिकणाऱ्या 105 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला. यामध्ये केंद्रीय विद्यालये, सीबीएसई तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. परीक्षक मंडळाच्या सदस्यांनी सर्व चित्रांचे बारकाईने परीक्षण करुन अंतिम निकाल घोषित केले. सर्वोत्कृष्ट चित्रासाठी पुढील पाच विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले: 1)भूमी जैवाल (डॉ.मर थिओफिलस शाळा), 2) हर्षल देवकर (एयर फोर्स शाळा, चंदननगर), 3)ओवी यादव (लष्करी शाळा, दिघी), 4)रितेश रोशन (केव्ही1 एएफएस) आणि 5)शिवानी गाडे (जवाहर नवोदय विद्यालय) ग्रुप कॅप्टन संजय पिसे, श्री राजेंद्र वडळकर, श्रीमती प्रफुल्ला शिंदे आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

केंद्रीय विद्यालय गणेशखिंड, पुणे 

गणेशखिंड येथील केंद्रीय विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत 22 शाळांच्या 100 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. यामध्ये केंद्रीय विद्यालये, सीबीएसई शाळा तसेच राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश होता.

परीक्षकांनी अंतिम निकाल जाहीर केले. चित्रकला स्पर्धेचे पाच विजेते पुढीलप्रमाणे आहेत:

  1. अवनी थोरात (डी.ए.व्ही. पब्लिक स्कुल, पुणे),
  2. श्वेता चव्हाण (केंद्रीय विद्यालय, गणेशखिंड, पुणे)
  3. सानिका संजय कुमार (केंद्रीय विद्यालय क्र.1 देहू रोड,पुणे)
  4. मुस्कान सोळंकी (जी.के.गुरुकुल, पिंपळे सौदागर, पुणे)
  5. उर्जिता राव (डी.ए.व्ही. सरकारी शाळा,औंध, पुणे

विद्यालयाच्या प्राचार्य शबाना खान, श्री उज्ज्वल आवारे यांच्यासह इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते.