Home Blog Page 112

कर्ज कमी करायला मदत म्हणून नॉयडा येथील जमीन विक्रीचे नियोजन

एवररेडी इंडस्ट्रीजने आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये एकत्रित महसूल आणि EBITDA मध्ये अनुक्रमे 10.1% आणि 13.0% इतकी भक्कम वाढ नोंदवली

कोलकाता, 5 फेब्रुवारी 2026

एवररेडी  इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (BSE: 531508 | NSE: EVEREADY) ने आज 31 डिसेंबर 2025 रोजी संपलेल्या तिमाही आणि नऊ महिन्यांचे लेखापरीक्षण न झालेले (अनऑडिटेड) आर्थिक निकाल जाहीर केले. आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीमध्ये महसूल वाढीची आणखी एक तिमाही नोंदवत सलग पाचव्या तिमाहीत वाढ कायम राहिली आहे.

आर्थिक वर्ष 26च्या तिसऱ्या तिमाहीमधील आर्थिक ठळक बाबी

·         कामकाजामधील एकत्रित महसूल 367.2 कोटी रु. इतका होता (आर्थिक वर्ष 25च्या तिसऱ्या तिमाहीत: 333.5 कोटी रु.), तर EBITDA वाढून 33.3 कोटी रु. झाला (आर्थिक वर्ष 25च्या तिसऱ्या तिमाहीत: 29.5 कोटी रु.). ही वाढ बॅटरी व्यवसायातील मजबूत कामगिरीमुळे झाली असून या विभागात 11.1% वाढ झाली आहे. यामध्ये अल्कलाईन बॅटरींमध्ये सर्वाधिक 72% वाढ झाली. लायटिंग व्यवसायातही हळूहळू सुधारणा दिसून आली असून 10.5% वाढ नोंदवली गेली.

·         नवीन कामगार संहिता अंमलबजावणीशी संबंधित 9.4 कोटी रु. च्या एकरकमी अपवादात्मक खर्चाच्या समावेशानंतर करपश्चात नफा (Profit after tax) 7.5 कोटी रु. इतका राहिला (आर्थिक वर्ष 25च्या तिसऱ्या तिमाहीत: 13.1 कोटी रु.)

·         जम्मू येथील अल्कलाईन बॅटरी प्रकल्पासाठी 167 कोटी रु. भांडवली खर्च (Capex) समाविष्ट करून एकूण निव्वळ कर्ज 317 कोटी रु. इतके आहे.

“आर्थिक वर्ष 26 ची तिसरी तिमाही ही एवररेडीसाठी स्थिर प्रगतीची आणखी एक तिमाही ठरली असून, आव्हानात्मक कामकाज वातावरण असूनही वाढ कायम राहिली आहे. बॅटरी व्यवसायाने कामगिरीचा आधारस्तंभ कणा म्हणून भूमिका बजावली असून, अल्कलाईन बॅटरींचा बाजारपेठेतील वाटा 19% या महत्वाच्या टप्प्यावर पोहोचला आहे. योग्य दर निर्धारण आणि प्रभावी हेजिंग धोरणांमुळे वाढलेल्या झिंक किमती आणि चलन अस्थिरतेचा परिणाम कमी करण्यास मदत झाली. काही श्रेणींमध्ये अल्पकालीन नरमाई दिसून आली असली तरी पोर्टफोलिओ सुधारणा, खर्च नियंत्रण आणि अंमलबजावणीतील सातत्य यावर आमचा सततचा भर कंपनीला मागणीच्या परिस्थितीत सुधारणा होताच अधिक चांगला कामकाज लाभ घेण्यास सक्षम करेल.”

– मुख्य कार्यकारी अधिकारी – अनिर्बन बॅनर्जी

“या तिमाहीत, आमच्या प्रमुख कामकाज आणि आर्थिक प्राधान्यांमध्ये आम्ही सातत्याने स्थिर प्रगती करत राहिलो. जम्मू येथे उभारण्यात येत असलेला आमचा नवीन अल्कलाईन बॅटरी उत्पादन प्रकल्प सध्याच्या आर्थिक वर्षाच्या अखेरीस पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आमचा दीर्घकालीन वाढीचा पाया अधिक मजबूत होत आहे. कर्ज कमी करण्यासाठी आणि ताळेबंदाची मजबुती वाढवण्यासाठी आम्ही नॉयडा येथील आमच्या जमिनीच्या भूखंडाची विक्री प्रक्रिया सुरू केली आहे. जोडीला, कंपनीच्या पहिल्यांदाच राबवण्यात येणाऱ्या कर्मचारी शेअर पर्याय योजनेस (Employee Stock Options Plan) संचालक मंडळाने दिलेली मान्यता ही एवररेडीच्या दीर्घकालीन मूल्यनिर्मितीशी सुसंगत असलेली प्रतिभा आकर्षित करण्याची, टिकवून ठेवण्याची आणि प्रेरित करण्याची आमची बांधिलकी दर्शवते.”

– कार्यकारी संचालक आणि मुख्य वित्तीय अधिकारी – बिबेक अगरवाल

बांधकाम कामगारांसाठी गोदरेज प्रॉपर्टीजचा ‘गोदरेज सहयोग’ हा मानसिक आरोग्य उपक्रम

पुणे –

भारतातील अग्रगण्य रिअल इस्टेट विकासकांपैकी एक असलेल्या गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडने (जीपीएल) ‘गोदरेज सहयोग’ या नवीन कामगार उपक्रमाची घोषणा केली आहे. कंपनीच्या प्रकल्पांच्या ठिकाणी काम करणाऱ्या बांधकाम कामगारांना मदत करण्यासाठी हा एक सुनियोजित मानसिक आरोग्य आणि कल्याण कार्यक्रम आहे.

यासंदर्भात मुंबई महानगर क्षेत्रातील सहा बांधकाम स्थळांवर सहा महिने प्रायोगिक तत्त्वावर हा कार्यक्रम राबवण्यात आला होता. यात मानसिक शिक्षणाच्या माध्यमातून 2,000 हून अधिक कामगारांना सहभागी करून घेण्यात आले होते. आता हा उपक्रम मुंबई, दिल्ली एनसीआर, बंगळूर, चेन्नई, पुणे, हैदराबाद, कोलकाता, गुजरात आणि छत्तीसगड यांसारख्या प्रमुख बाजारपेठांमधील 79 निवडक बांधकाम स्थळांवर सुरू केला जाईल, ज्यामुळे अंदाजे 30,000 कामगारांपर्यंत पोहोचता येईल.

या शुभारंभाबाबत गोदरेज प्रॉपर्टीजचे कार्यकारी अध्यक्ष पिरोजशा गोदरेज म्हणाले, आपली शहरे आणि पायाभूत सुविधा उभारणाऱ्या लाखो लोकांच्या माध्यमातून भारताचा विकास दररोज आकार घेतो आहे. राष्ट्र उभारणाऱ्यांच्या कल्याणाची काळजी घेणे ही केवळ व्यावसायिक जबाबदारी नाहीतर ती एक सामाजिक गरज आहे. गोदरेज सहयोगच्या माध्यमातूनआम्ही श्रम प्रतिष्ठेला मान्यता देऊ इच्छितो आणि मानसिक आरोग्य सुदृढ राहावे यासाठी प्रयत्न करणे,  हा सर्वसमावेशक विकास आणि राष्ट्रनिर्माणाबद्दलच्या आपल्या विचारांचा अविभाज्य भाग ठरेल याची खात्री देतो.”

भारतीय शहरांमध्ये मजबूत उपस्थिती असलेली व्यावसायिक मानसिक आरोग्य सेवा पुरवणारी आघाडीची कंपनी 1to1 हेल्पच्या भागीदारीने हा कार्यक्रम राबवला जात आहे.

बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांच्या भावनिक, मानसिक आणि सामाजिक कल्याणावर हा कार्यक्रम लक्ष केंद्रित करतो. कारण, येथे काम करणारे बरेच जण आपल्या कुटुंबापासून दूर असतात. प्रशिक्षित मानसिक आरोग्य व्यावसायिकांकडून २४/७ उपलब्ध असलेल्या सेवेद्वारे, हा उपक्रम सातत्यपूर्ण आणि खात्रीशीर आधार प्रदान करतो. कामाच्या ठिकाणी दरमहा गट चर्चासत्रे, वैयक्तिक समुपदेशन आणि समुपदेशन तसेच  आपत्कालीन मदतीसाठी चोवीस तास उपलब्ध असलेली दृकश्राव्य हेल्पलाइन यांचा या उपायांमध्ये समावेश आहे.

गोदरेज प्रॉपर्टीजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ गौरव पांडे म्हणाले, आम्ही घरे बांधतोपण ती बांधतानाच घरे बांधणाऱ्या लोकांची जबाबदारी घेणेहे  देखील आमचे काम आहेअसे मानतो. आमचे अनेक बांधकाम कामगार त्यांच्या कुटुंबांपासून आणि नेहमीच्या वातावरणापासून दूर राहतात. गोदरेज सहयोग ही त्यांच्या मनस्थितीची एक पोचपावती आहे. तसेच अशी बांधकाम स्थळे निर्माण करण्याची एक वचनबद्धता आहेजी केवळ कार्यक्षमच नाहीततर माणुसकी देखील जपतात.”

प्रायोगिक तत्त्वावर राबवण्यात आलेल्या या उपक्रमाच्या परिणामांवर प्रकाश टाकताना, गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्यांग दोशी म्हणाले, घरापासून लांब राहात असल्याने बांधकाम कामगार अनेकदा योग्य यंत्रणेअभावी वेगळा आधार शोधतात. मात्रकालांतराने यामुळे तणाव वाढू शकतो. या प्रायोगिक उपक्रमा दरम्यानसंरचित गट सत्रे आणि गुप्त समुपदेशनामुळे त्यांना विश्वास वाटतो आणि संवाद सुधारतो. यामुळे कामगारांचा देखील विश्वास बसतो आणि एखाद्याला काही त्रास होत असेल तर त्याचे वेळेवर निदान होते. 1to1 Help सोबत भागीदारी केल्यामुळे आम्हाला थेट कामाच्या ठिकाणी व्यावसायिकवैद्यकीयदृष्ट्या माहितीपूर्ण सहाय्य प्रदान करणे शक्य होतेजिथे या सुविधेची उपलब्धता सर्वात महत्त्वाची असते.”

भारतातील अनेक अभ्यासांनी हे अधोरेखित केले आहे की, स्थलांतरित बांधकाम कामगारांच्या मोठ्या संख्येला कुटुंबापासून लांब राहिल्याने आणि योग्य यंत्रणांच्या माध्यमातून दिलासा न मिळाल्याने मानसिक घुसमट सहन करावी लागते. ही एक अशी समस्या आहे, जिच्याकडे कायम दुर्लक्ष केले जाते.

गोदरेज सहयोग हा कार्यस्थळावरील आरोग्याबाबत कंपनीच्या विचारातील एक महत्त्वाचा टप्पा आहे, जो शारीरिक सुरक्षेवरील पारंपरिक दृष्टिकोनाच्या पलीकडे जाऊन मानसिक आरोग्याविषयी जागरूकता, आणि व्यावसायिक मदतीची उपलब्धतेचा समावेश असलेल्या अधिक सर्वसमावेशक मॉडेलकडे वाटचाल करतो.

सगळे कामगार आणि गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडच्या मुख्य मानव संसाधन अधिकारी मेघा गोयल; गोदरेज प्रॉपर्टीज लिमिटेडचे ​​मुख्य परिचालन अधिकारी संदीप नवलखे; गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे कॉर्पोरेट ऑडिट आणि ऍश्युरन्स विभागाचे व्ही. स्वामिनाथन; गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे कॉर्पोरेट सेवा विभागाचे ग्रुप हेड अजय भट्ट; गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दिव्यांग दोशी आणि 1 टू 1 हेल्पचे मुख्य विकास अधिकारी कुणाल अशोक यांच्या उपस्थितीत गोदरेज सिटी पनवेल येथे सुरू करण्यात आलेला हा उपक्रम, सर्वसमावेशक, लोक-केंद्रित विकास आणि जबाबदार व्यावसायिक पद्धतींप्रति गोदरेज प्रॉपर्टीजच्या दीर्घकालीन वचनबद्धतेला अधोरेखित करतो.

मुंबई महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन

मुंबई -महानगरपालिकेतील भाजपा पक्ष कार्यालयाचे उद्घाटन आज, ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.०० वाजता करण्यात आले. जवळपास ३-४ वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर हे कार्यालय पुन्हा एकदा राजकीय हालचालींसाठी खुले झाले आहे. मुंबई भाजपा अध्यक्ष अमीत साटम आणि गटनेते गणेश खणकर यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन समारंभ पार पडला.

उद्घाटन कार्यक्रमात भाजपचा ‘मराठी बाणा’ दिसून आला. उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेवकांनी पारंपारिक मराठी पेहराव केला होता. कार्यालयात सत्यनारायणाची पूजा आणि विधिवत पूजन करून नवीन सत्ताकाळाचा शुभारंभ करण्यात आला. मुंबई महानगरपालिकेतील भाजपच्या आगामी काळातील वाटचालीचा हा नवा अध्याय मानला जात आहे. ही एका नव्या पर्वाची सुरुवात आहे.

या प्रसंगी कार्यालयाबाहेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य रांगोळी काढण्यात आली होती आणि त्यावर “मुंबईच्या सुवर्णकाळाची सुरुवात” असा संदेश देण्यात आला होता. कार्यालयाच्या उद्घाटनाच्या वेळी महानगरपालिका निवडणूकीत निवडून आलेले सर्व नगरसेवक आणि नगरसेविका उपस्थित होते.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीनंतर भाजपाने पक्ष कार्यालय ताब्यात घेतले असून, येत्या ११ फेब्रुवारी २०२६ रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी पक्षाची रणनीती या कार्यालयातूनच आखण्यास सुरुवात केली आहे.

वगनाट्याची ‘परंपरा आणि योगदान’ सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित करणारे लोककला अभ्यासकांचे चर्चासत्रात प्रखर मत..

मुंबई – लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा कलेने समाजमनावर कोरलेली अमिट छाप आजही तितकीच तेजस्वी आहे. तमाशा परंपरेतील लोकसाहित्याचा अविभाज्य घटक असलेल्या वगनाट्याने एकेकाळी समाजप्रबोधनाची ज्योत प्रखरतेने पेटवून समाजाला दिशा दिली. काळाच्या प्रवाहात अनेक बदल झाले असले तरी या परंपरेची मुळे संस्कृतीच्या मातीत घट्ट रोवलेली असल्याने वगनाट्याची परंपरा आणि योगदान सांस्कृतिक क्षेत्रात अधोरेखित करणारे ठरते, असे प्रखर मत लोककला अभ्यासकांनी व्यक्त केले.

‘वगनाट्याची मौखिक परंपरा व योगदान’ या विषयावर गुरुवार, दि. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत सरकारच्या साहित्य अकादेमी तसेच मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमी आणि शाहीर अमरशेख अध्यासन यांच्या संयुक्त विद्यमाने कलिना येथील मुंबई विद्यापीठाच्या सांस्कृतिक भवनात लोककला अभ्यासकांचे एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.
राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभप्रसंगी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. यावेळी ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील, पद्मश्री प्रा. वामन केंद्रे, लोककला अकादमीचे माजी प्राध्यापक डॉ. प्रकाश खांडगे तसेच साहित्य अकादेमीचे प्रभारी अधिकारी ओम प्रकाश नागर यांची विशेष उपस्थिती होती.
या चर्चासत्रात वगनाट्य अभ्यासक प्रभाकर होवाळ, सोपान खुडे, डॉ. संतोष खेडलेकर, अभ्यासक-अभिनेते आदेश बांदेकर, मंत्रालयातील ज्येष्ठ पत्रकार खंडुराज गायकवाड, मुंबई विद्यापीठाच्या प्रा. डॉ. शामल गरुड, शिवाजी विद्यापीठाचे प्रा. रणधीर शिंदे यांनी आपापली संशोधनपत्रे सादर केली.
कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे लोककला अकादमीचे निमंत्रित व्याख्याते आणि तमाशा सम्राट रघुवीर खेडकर यांना यावर्षी भारत सरकारचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लोककला अकादमीच्या वतीने करण्यात आलेला विशेष सत्कार. यावेळी सत्काराला उत्तर देताना खेडकर म्हणाले की, “भारत सरकारने केलेला हा सन्मान लोककला क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणाऱ्या कलाकारांसाठी प्रेरणादायी ठरेल.”
या राष्ट्रीय चर्चासत्राचे नियोजन लोककला अकादमी प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात अकादमीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राज्यगीताने झाली. त्यानंतर नृत्य आणि गायन सादरीकरणांनी उपस्थितांची दाद मिळवली.
डॉ. मोनिका ठक्कर यांनी सूत्रसंचालन केले. तर डॉ. शिवाजी वाघमारे, हेमाली शेडगे, कृष्णा मुसळे ,योगेश चिकटगावकर विकास कोकाटे, पराग कुलकर्णी, जमीर शेख, अंतरीक्ष खरात, यशवंत जाधव, गोविंद मार्शिवणीकर, राजेंद्र कदम, दिलीप गुरव, संगीता बाई लोखंडे तसेच लोककला अकादमीच्या विद्यार्थ्यांनी पडद्यामागील जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या.
परिसंवादात बोलताना अभ्यासकांनी स्पष्ट केले की, वगनाट्य हे केवळ मनोरंजनाचे माध्यम नसून सामाजिक जाणीवा जागृत करणारे प्रभावी लोकशिक्षणाचे व्यासपीठ राहिले आहे. बदलत्या काळानुसार सादरीकरणात नवकल्पना आणताना मूळ परंपरेचे जतन करणे ही तमाशा कलावंतांची सांस्कृतिक जबाबदारी असल्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लोकपरंपरेचा समृद्ध वारसा पुढील पिढीकडे सक्षमपणे पोहोचवण्यासाठी तमाशा कलावंतांनी वगनाट्याची परंपरा जपली पाहिजे, असेही यावेळी नमूद करण्यात आले. या चर्चासत्रातून वगनाट्याच्या समृद्ध परंपरेचा वारसा आणि समाजघडणीत त्याचे मोलाचे योगदान अधोरेखित झाले.

उद्या 12 झेडपी, 125 पंचायत समित्यांसाठी मतदान:2193 जागा, 7438 उमेदवार; 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 मतदार करणार फैसला

मुंबई-राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 7) मतदान होत असून जिल्हा परिषदेच्या 731; तर आणि पंचायत समित्यांच्या 1 हजार 462 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. एकूण 7 हजार 438 इतके उमेदवार निवडणूक रिंगणात असून सर्व मिळून एकूण 2 कोटी 8 लाख 20 हजार 702 इतकी मतदार संख्या आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी पुरेशा पोलिस बंदोबस्ताचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.

राज्य निवडणूक आयोगाने रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदा आणि त्यांतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या निवडणूक कार्यक्रमाची घोषणा 13 जानेवारी 2026 रोजी केली होती. त्यानुसार 5 फेब्रुवारी 2026 रोजी मतदान होणार होते; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर झाल्यानंतर मतदानाच्या तारखेत बदल करण्यात आला. त्यानुसार आता उद्या (ता. 7) सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होणार आहे. मतमोजणी 9 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 वाजता सुरू होईल. त्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल.

सर्व बारा जिल्हा परिषदांच्या एकूण 731 जागा असून, त्यातील 369 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 83, अनुसूचित जमातींसाठी 25 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 191 जागा आरक्षित आहेत. जिल्हा परिषदांच्या या सर्व जागांसाठी एकूण 2 हजार 624 उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
सर्व 125 पंचायत समित्या मिळून एकूण 1 हजार 462 जागा असून, त्यातील 731 जागा महिलांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जातींसाठी 166, अनुसूचित जमातींसाठी 38 आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी 342 जागा आरक्षित आहेत. पंचायत समित्यांच्या या सर्व जागांसाठी एकूण 4 हजार 814 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

निवडणूक होत असलेल्या जिल्हा परिषदांच्या व त्यांतर्गतच्या पंचायत समित्यांच्या एकूण मतदारांमध्ये 1 कोटी 6 लाख 33 हजार 269 पुरुष, 1 कोटी 1 लाख 86 हजार 965 महिला; तर 468 इतर मतदारांचा समावेश आहे. त्यांच्यासाठी एकूण 25 हजार 471 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण मतदान प्रक्रियेसाठी सुमारे 1 लाख 28 हजार इतक्या मनुष्यबळाची व्यवस्था केली आहे. त्यात सुमारे 125 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 125 सहायक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या 25 हजार 471 मतदान केंद्रांची संख्या लक्षात घेऊन पुरेशा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांची (ईव्हीएम) व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात 51 हजार 537 कंट्रोल युनिट आणि 1 लाख 10 हजार 329 बॅलेट युनिटचा समावेश आहे. त्यासाठी सर्व सबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना वेळोवेळी प्रशिक्षणदेखील देण्यात आले आहे.

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका नेहमी एकाच वेळी घेण्यात येतात. त्यामुळे प्रत्येक मतदाराला एक मत जिल्हा परिषदेच्या निवडणूक विभागासाठी आणि एक मत पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी द्यावे लागते. जिल्हा परिषद निवडणूक विभागासाठी (गट) मतदान यंत्रावर म्हणजे बॅलेट युनिटवर (बीयू) पांढऱ्या रंगाची; तर पंचायत समितीच्या निर्वाचक गणासाठी बीयूवर गुलाबी रंगाची मतपत्रिका असते. उमेदवारांची संख्या कमी असल्यास एकाच बीयूवर या दोन्ही मतपत्रिका असतात; परंतु उमेदवारांची संख्या अधिक असल्यास आवश्यकतेनुसार एकापेक्षा जास्त बीयूचा वापर केला जातो.

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठीच्या मतदार यादीतील मतदाराचे नाव आणि मतदान केंद्र शोधण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने ‘मताधिकार’ (Matadhikar) हे मोबाईल ॲप उपलब्ध करून दिले आहे. ते ‘गुगल प्ले स्टोअर’वरून डाऊनलोड करता येईल. त्यात मतदाराचे ‘संपूर्ण नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येईल. मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यावरही मोबाईल ॲपप्रमाणेच मतदार यादीतील आपले नाव शोधता येईल.

ज्येष्ठ नागरिक व दिव्यांगासाठी मतदान केंद्रांवर ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, तान्ह्याबाळासह असणाऱ्या स्त्रिया, गरोदर स्त्रिया आदींना मतदानासाठी प्राधान्य दिले जाईल.अशा मतदारांसाठी मतदान केंद्रावर रॅम्पची व्यवस्था असेल. त्याचबरोबर व्हिलचेअरचीही व्यवस्था केली जाईल; तसेच मतदान केंद्रावर विजेची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची, सावलीची सुविधा, शौचालयाची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. सर्व मतदान केंद्रांमध्ये किमान सुविधा उपलब्ध करण्याचे निर्देश सर्व संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतच्या 125 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी उद्या (ता. 7) मतदान होत आहे. या निवडणुका म्हणजे आपले गाव व परिसराचे भवितव्य ठरविणाऱ्या असतात. म्हणूनच या निवडणुकांमध्ये मोठ्या संख्येने मतदान करून आपणही आपल्या गाव व परिसराच्या उन्नतीत मोलाचे योगदान देऊ शकतो. त्याचबरोबर या निवडणुकांच्या माध्यमातून आपण लोकशाहीचा पाया बळकट करण्यातही हातभार लाऊ शकतो. त्यामुळे जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये मतदान करून आपण मतदानाचा आपला बहुमोल हक्क बजवायलाच हवा, त्यासाठी आपण नक्की मतदान करावे, असे मी सर्व संबंधित मतदार बंधू- भगिनींना नम्रपणे आवाहन करतो, असे राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी म्हटले आहे.

‘शून्य कचरा प्रकल्पा’त दररोज कचरा संकलन-आमदार हेमंत रासने यांची माहिती

पुणे, ता. ६ : कसबा-भवानी विधानसभा मतदारसंघात महानगरपालिकेच्या वतीने प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणाऱ्या ‘शून्य कचरा प्रकल्पा’त अतिरिक्त ४०० कचरावेचकांची नियुक्ती करण्यात आली असून, आता या परिसरात ‘स्वच्छ संस्थे’च्या माध्यमातून दररोज कचरा संकलन करणार असल्याची माहिती आमदार हेमंत रासने यांनी दिली.

पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, अतिरिक्त आयुक्त पवनीत कौर, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त अविनाश सकपाळ, नगरसेवक अजय खेडेकर, कुणाल टिळक, स्वरदा बापट, पल्लवी जावळे, कल्पना बहिरट, स्नेहा माळवदे, ऐश्वर्या थोरात, विशाल धनवडे, देवेंद्र वडके, राघवेंद्र मानकर, महेश आवळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

रासने म्हणाले, “कचरावेचकांची संख्या वाढल्याने सुट्टीच्या दिवशी ही कचरा संकलनाची अखंडित सेवा देता येणार आहे. जुने वाडे, चाळी, बैठी घरे आणि वस्ती विभागातील रहिवाशांवर सेवा शुल्काचा भार पडू नये यासाठी महानगरपालिका कचरावेचकांना दरमहा घरटी ५० रुपये प्रोत्साहन भत्ता देणार आहे. लक्ष्मी रस्ता परिसरातील दुकाने आणि पथारी व्यावसायिकांकडून संध्याकाळीही कचरा संकलित केला जाणार आहे.”

राम म्हणाले, “डिसेंबर २०२६ पर्यंत पुणे शहर स्वच्छ व सुंदर करण्याचे उद्दिष्ट आहे. प्रत्येक घरातून कचरा संकलन हा या उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे. गेले वर्षभर आमदार रासने यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा मतदारसंघ स्वच्छ, सुंदर आणि विकसित करण्याचे अभियान प्रभावीपणे राबवले जात आहे. बहुतांश फिडर पॉईंट व क्रॉनिक स्पॉट बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे ‘शून्य कचरा प्रकल्प’ या मतदारसंघात प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. तो यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण शहरात राबवला जाणार आहे.”

मोदी मजा करत आहेत, परदेशात जात आहेत..त्यांनी अशी कोणती क्रांती केली की, लोक त्यांच्यावर हल्ला करतील

नवी दिल्ली- लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींसोबत संसदेत काही अघटित होण्याची शक्यता असल्यामुळे आपण त्यांना सभागृहात न येण्याची विनंती केल्याचे सांगितले होते.शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा ठाम दावा केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशी कोणती क्रांती केली की, लोक त्यांच्यावर हल्ला करतील. ते अत्यंत नॉर्मल जीवन जगत आहेत. मजा करत आहेत. परदेशात जात आहेत, असे ते मोदींना खोचक टोला हाणताना म्हणालेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विरोधकांनी संसदेत बोलू दिले नसल्याचा आरोप होत आहे. विशेषतः लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी मोदींसोबत संसदेत काही अघटित होण्याची शक्यता असल्यामुळे आपण त्यांना सभागृहात न येण्याची विनंती केल्याचे सांगितले होते. त्यांच्या या विधानावर देशाच्या राजकारणात वेगवेगळ्या चर्चा झडत असताना संजय राऊत यांनी मोदींची सुरक्षा उच्च कोटीची असल्याचा दावा करत त्यांच्यावर हल्ला होण्याची कोणतीही शक्यता नसल्याचा ठाम दावा केला आहे.

संजय राऊत शुक्रवारी दुपारी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, या जगात सर्वात सुरक्षित कुणी असेल तर ते या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत. त्यांची सुरक्षा व्यवस्था इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू व अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याहून जबरदस्त आहे. त्यानंतरही त्यांना का असुरक्षित वाटत आहे हे मला माहिती नाही. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशासाठी खलिस्तान्यांशी पंगा घेतला होता. जनरल वैद्य यांची हत्या झाली. राजीव गांधी यांना मारण्यात आले. राजीव गांधींनीही देश व सुरक्षेसाठी श्रीलंकेला मदत केली होती.

मोदींनी काय केले? पंतप्रधानांसोबत काहीही होणार नाही. ते आमचे पंतप्रधान आहेत. त्यांना काहीही होणार नाही. मोदींनी असे काय केले आहे की, लोक त्यांच्यावर हल्ला करतील. त्यांनी अशी कोणती क्रांतीकारी गोष्ट केली आहे? हे सांगा. त्यांनी काहीही केले नाही. ते नॉर्मल जीवन जगत आहेत. मजा करत आहेत. परदेशात जात आहेत. विशेष विमान आहे. जो व्यक्ती आपल्या पदाचा आनंद घेत आहे, त्याच्यावर कोण कशाला हल्ला करेल? असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी यावेळी भाजप खासदार नारायण राणे यांच्यावर मानहाणीचा गुन्हा दाखल केल्याचीही माहिती दिली. मी नारायणराव राणे यांच्यावर मानहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. कारण, ते खोटे बोललेत. शिवसेनेत कुणाला कोणते पद द्यावे, हा सर्वस्वी अधिकार शिवसेनाप्रमुख किंवा शिवसेना पक्षप्रमुख यांचा असतो. ते आम्हाला निर्देश देतात. त्यानुसार मग कुणी विरोधी पक्षनेता होतो, कुणी खासदार होतो. कुणी नेता होतो. त्या निर्देशांनुसार मी खासदार झालो, असे ते म्हणाले.

संजय राऊत यांनी यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या यांचा उल्लेख उपरोधिकपणे महात्मा म्हणूनही केला. आता आपण सत्र न्यायालयाच्या खाली उभे आहोत. 54 नंबरच्या न्यायालयात आमच्या सगळ्यांचे प्रिय महात्मा किरीट सोमय्या यांनी आमच्यावर खटला दाखल केला होता. त्यावर आम्ही अपिलात गेलो आहोत. त्यावर आता एकमेकांच्या भूमिका मांडण्याचे काम सुरू होते. त्यांच्या वकिलांनी त्यांची बाजू मांडली. आमच्याही वकिलांनी आमची बाजू जोरदारपणे मांडली. पुढे काय होते ते पाहू, असे ते म्हणालेत.

विद्यार्थ्यांनी कौशल्यपूर्ण शिक्षणातून स्वतः उभे रहावे-केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांचे विद्यार्थ्यांना आवाहन

फ्युएल शिक्षण संस्था समूह तर्फे वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट

पुणे, दि. ६ फेब्रुवारी: ” विकसीत भारत २०४७ हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. त्यांनी कोलोनियन विचारधारेला छेद देणारी नवी शिक्षण निती आणली. भारतीय शिक्षण आणि कौशल्य परिसंस्था मजबूत करण्यासाठी मूल्याधिारित नेतृत्व आणि सहयोगी प्रशासन महत्वाचे आहे. स्किल इंडिया या ब्रीद वाक्यानुसार विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता कौशल्यपूर्ण शिक्षणाच्या आधारे स्वतःच्या पायावर उभे राहून नोकरी देणारे बनावे.” असे आवाहन केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले.
फ्युएल शिक्षण संस्था समूहातर्फे ‘वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट-२०२६’ चे आयोजन फ्युएल कॅम्पसमध्ये करण्यात आहे. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते.
या प्रसंगी फ्युएल शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे,  सीओओ मयुरी देशपांडे  व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी शिक्षण क्षेत्रातील अद्वितीय कार्याच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती करण्यासाठी डॉ. केतन देशपांडे यांचा विशेष सत्कार राज्यापाल राजेंद्र आर्लेकर यांच्या हस्ते करण्यात आला.
तसेच भारताच्या सोशल स्टॉक एक्सचेंज फ्रेमवर्क अंतर्गत फ्यूएलच्या महत्वाच्या टप्पांची घोषणा केली.
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर म्हणाले,” फ्यूएलच्या प्रयत्नामुळे देशभरातील वंचित आणि पहिल्या पिढीतील विद्यार्थ्यांसाठी आकांक्षा आणि रोजगारक्षमता यांच्यातील दरी अर्थपूर्णपणे कमी झाली आहे. फ्यूएल शिक्षण संस्था  आगामी जागतिक दर्जाचे शिक्षण, कौशल्य आणि उद्योग यांना एकत्रित करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल उचलत आहे. भारताच्या भविष्यासाठी सज्ज प्रतिभा परिसंस्था आणखी मजबूत करेल.””समाजाने काय दिले यापेक्षा आम्ही समाजाला काय देऊ हा विचार करावा. स्वतःसाठी जगला तर मेला, दुसर्‍यासाठी जगाला तर जगला हे ब्रीद वाक्य कायमच विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावे असे ही त्यांनी सांगितले.”
डॉ. केतन देशपांडे म्हणाले, “प्रतिभा ही सर्वत्र असते परंतु योग्य संधी मिळत नाही. फ्यूएलचा गेल्या २० वर्षाच्या प्रवासात असे आढळते की जेव्हा कौशल्यपूर्ण शिक्षण व सन्मान हे रोजगाराशी जोडले जाते तेव्हा वंचित तरुण भारताच्या विकासात आत्मविश्वासाने योगदान देणारे बनू शकतात.”
व्हिडीओच्या माध्यमातून राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी संदेश दिला की, ” नव्या शिक्षण धोरणात कौशल्य विकासातून उद्योगधंद्यासाठी योग्य दिशा देण्याचा आम्ही प्रयत्न करू. फ्युएल गेल्या दोन दशकांपासून शिक्षण आणि युवा विकासाच्या क्षेत्रात प्रशंसनीय कार्य करीत आहे. शिक्षण आणि उद्योग यांच्यातील दरी कमी करण्यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न आहेत. उद्योपतींकडून सीएसआरच्या माध्यमातून ५ टक्के भाग घेऊन त्याला शिक्षणात परिवर्तनकरणे व त्यातून हुशार विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण विकासातून नोकरी अथवा उद्योगधंदयासाठी तयार केले जाते.”
सानिका निर्मळ यांनी सूत्रसंचालन केले.

मुंबईत राष्ट्रवादी शरद पवार गटाचा महायुतीला पाठिंबा, 11 फेब्रुवारीला नव्या महापौरांची निवडणूक

मुंबई- महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. 7 फेब्रुवारी रोजी महापौरपदासाठी अर्ज स्वीकारले जाणार असून, 11 फेब्रुवारीला नव्या महापौराची अधिकृत घोषणा होणार आहे. मात्र, या निवडणुकीपूर्वीच एक महत्त्वाची राजकीय घडामोड घडली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आणि ठाकरे गटाच्या शिवसेनेसह निवडणूक लढवलेल्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने महायुतीला पाठिंबा दिला आहे.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे एकमेव नगरसेवक अजित रावराणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे महापौर निवडणुकीच्या गणितात महायुतीची ताकद आणखी वाढली आहे.

देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई महानगरपालिकेत तब्बल 25 वर्षांनंतर ठाकरे गटाची सत्ता उलथवून भाजप-नेतृत्वाखालील युती सत्तेत आली आहे. या निवडणुकीत भाजपने 89 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान पटकावला आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला 65 जागा मिळाल्या असून, शिंदे गटाच्या शिवसेनेने 29 जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसला 24, मनसेला 6, एमआयएमला 8, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ला 3, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ला 1 तर समाजवादी पक्षाला 2 जागा मिळाल्या आहेत.

महापौर आणि उपमहापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला आहे. 11 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानाआधी सर्वच पक्षांनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतच थांबण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत मतदानाआधी शहर सोडू नये, असे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, 9 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आंगणेवाडी जत्रेमुळे कोकण पट्ट्यातील काही नगरसेवक बाहेरगावी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही बाब लक्षात घेता सर्वच पक्षांकडून अतिरिक्त खबरदारी घेतली जात आहे. स्पष्ट बहुमत नसतानाही शिवसेना (ठाकरे गट) ने आपल्या नगरसेवकांना 15 फेब्रुवारीपर्यंत मुंबई सोडू नका, असे आदेश दिले आहेत.

भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांनीही आपल्या नगरसेवकांना सूचना दिल्या आहेत. 8 फेब्रुवारी रोजी रविवार असल्याने काही नगरसेवक बाहेर जाण्याची शक्यता असली तरी, 10 फेब्रुवारीपर्यंत अनिवार्यपणे मुंबईत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. महापौर निवडणूक तोंडावर असताना संख्याबळ टिकवण्यासाठी सर्वच पक्ष सतर्क झाले असून, येत्या काही दिवसांत मुंबईतील राजकीय घडामोडींना आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड. काळुराम भुजबळ; उपाध्यक्ष पदी ॲड. कांताराम नप्ते, ॲड. प्रतापराव मोरे

पुणे : वकिलांची शिखर संघटना असलेल्या पुणे बार असोसिएशनच्या (पीबीए) अध्यक्षपदासाठी झालेल्या तिरंगी व चुरशीच्या लढतीत ॲड. काळुराम भुजबळ यांनी विजय मिळविला. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार ॲड.विशाल शिवले यांचा ५९७ मतांनी पराभव केला. ॲड. भुजबळ यांना तीन हजार ८०७ मते मिळाली. बुधवारी (ता. ४) मतदार झाल्यानंतर गुरुवारी (ता.५) दुपारी एकपर्यंत मतमोजणीचा कार्यक्रम पार पडल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आला.

यंदाच्या निवडणुकीत अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला, अशी भावना मतदार वकील व्यक्त करत आहे. उपाध्यक्ष पदाच्या दोन जागांसाठी झालेल्या तिरंगी लढतीत ॲड. कांताराम नप्ते हे ३ हजार ६१९ मते तर ॲड. प्रतापराव मोरे हे 2 हजार ७०६ मते घेऊन विजयी झाले. महिला राखीव गटातून ॲड. प्रितीसिंह परदेशी यांनी ३ हजार ४७ मते मिळवीत विजय मिळवला.

सचिव पदाच्या दोन जागांसाठी ॲड. सम्राट जांभूळकर आणि ॲड. अभिजित पोळ हे विजयी झाले. त्यांना अनुक्रमे ४ हजार २७२ आणि ३ हजार ३४४ मते मिळाली. महिला राखीव गटातून ॲड. पूजा पवार यांनी ३ हजार ८७६ मते मिळवीत विजय संपादन केला. खजिनदारपदासाठी झालेल्या लढतीत ॲड. अंजली बांदल यांनी वर्चस्व राखत ५ हजार २७४ मते मिळविली. ऑडिटर पदासाठी झालेल्या लढतीत ॲड. शिवराज निंबाळकर यांना ५ हजार २९० मते मिळाली. तर महिला गटातून ॲड. नेहा जांभळे यांनी ४ हजार ४ मते मिळवली.

कार्यकारिणी सदस्यपद बिनविरोध

कार्यकारिणी सदस्यपदी सर्वसाधारण गटातून मयूर मराठे, विकास जाधव, उमेश मांजरे, प्रीतेश दळवी, योगेश जैन, अनिल हुडे, अमोल वडगणे, उदय शेलार प्रज्वल गुंजाळ आणि आकाश भिलारे यांची निवड झाली आहे. तर, महिला राखीव गटातून संध्या रायबोले, शीतल देशमुख, गुंजन भोसले, स्मिता वाघमारे आणि प्रियांका घाडगे यांची यापूर्वीच सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

शहराचं बदलणार रूप … शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न.

पुणे- वाढता शहरच्या वाढत्या समस्यांना फक्त तोंड द्यायचे नाही तर आगामी सुविधांसाठी सुसज्ज अस्म शहर बनवायचे आणि एकूणच शहरचे रुपडे बदलायचे अशा उद्दिष्ट्याने आज महापालिकेत शहर परिवर्तन कक्षाची बैठक संपन्न झाली .समन्वयातून विकासाकडे वाटचाल करत असताना पुणे शहरामध्ये सुरू असलेल्या तसेच आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध शहरी उपक्रमांचा वाढता व्याप आणि नागरी सेवा व पर्यावरण व्यवस्थापनातील गुंतागुंत लक्षात घेता, शहरासाठी अत्यंत महत्त्वाची व आवश्यक अशी संस्थात्मक व्यवस्था असावी यासाठी शहर परिवर्तन कक्षाच्या वतीने आज दि. ५/०२/२०२६ रोजी बैठक पुणे महानगरपालिका , स्थायी समिती सभागृह, नवीन इमारत येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त तथा व्यवस्थापकीय संचालक पुणे मेट्रो श्रावण हर्डीकर, जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (इस्टेट)पृथ्वीराज बी पी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (जनरल) श्रीमती पवनीत कौर,अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लि., मुख्य अभियंता पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, मुख्य अभियंता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, संचालक पुणे मेट्रो रेल प्रकल्प, अधिक्षक अभियंता जलसंपदा विभाग, प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय, अतिरिक्त आयुक्त वाहतूक पोलीस, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, उपवनसंरक्षक वन विभाग, व्यवस्थापक दूरसंचार सेवा प्रदाते, व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ इ. तसेच विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सदर बैठकीमध्ये शहराच्या विकासासंदर्भात महत्त्वपूर्ण विचारविनिमय करण्यात आला.
शहर स्तरावर शहर परिवर्तन कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.यात सर्व विभागाचे नोडल अधिकारी असतील.
यावेळी भूसंपादन बाबत,जिल्हा स्तरावर भूसंपादनासंबंधी बरेच प्रस्ताव प्रलंबित असून त्यावर त्वरित व योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले.
प्रलंबित प्रकरणांची प्राथमिकता निश्चित करून एक महिन्याच्या आत सर्व प्रकरणे निरस्त/निपटवण्याची जबाबदारी संबंधित विभागांना देण्यात आलेली आहे.
बंद असलेल्या कालव्यांचा वापर सायकल ट्रँकसाठी करण्यास जलसंपदा विभागाशी समन्वय साधून कार्यवाही करावी.
प्रत्येक विभागासाठी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचे आदेश देण्यात आले.जे संबंधित प्रकरणांच्या वेळेवर निकडी नुसार नियोजन व अंमलबजावणी सुनिश्चित करतील.
शहराच्या शाश्वत व समतोल विकास साधण्यासाठी सर्व विभागांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. पायाभूत व नागरी सुविधा साध्य करताना पर्यावरणीय बाबींचा विचार करणे आवश्यक राहील. असे प्रतिपादन करण्यात आले.
मोजणी प्रक्रियेसंबंधी सखोल चर्चा करून प्रत्येक विभागाने वेळेत व अचूक कार्यवाही करण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.
शहरातील फ्लेक्स होर्डिंग काढण्यासंबंधी समन्वय साधून त्वरित व नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
आगामी काळात काही महत्वाचे धोरणात्मक व विकासात्मक निर्णय घेण्यात येणार असल्याने संबंधित विभागांनी प्रस्ताव तयार ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पुढील एक वर्षात हाती घेतल्या जाणाऱ्या प्रकल्पांचे सर्व कामकाज व प्रस्ताव संबंधित विभागांनी वेळेत कळवावे, जेणेकरून विभागांमध्ये समन्वय राखला जाईल व कुठल्याही कामासाठी किंवा प्रकल्पासाठी, संबंधित विभागाच्या नियोजन व मंजुरीशिवाय कोणतीही परवानगी किंवा अनुमती दिली जाणार नाही जेणेकरून प्रकल्पांचे नियोजन व अंमलबजावणी सुरळीतरीत्या होईल.
शहरातील फुटपाथ वर तसेच हवेत असलेल्या अस्ताव्यस्त विद्युत व दूरध्वनी केबलमुळे होणारा अडथळा त्वरित दूर करण्याच्या सूचना करण्यात आल्या .
बेवारस वाहने रस्त्यात अडथळा निर्माण करीत असल्यामुळे, संबंधित विभागांनी त्वरित कार्यवाही करून ती वाहने रस्त्याहून हटवावी व नियमांनुसार योग्य ती कारवाई सुनिश्चित करावी.
सर्व संबंधित विभागांनी वरील सूचनांचे पालन करावे व त्यावर नियमित अहवाल शहर परिवर्तन कक्षाकडे सादर करणे अनिवार्य असेल.
शहर परिवर्तन कक्षाची बैठक प्रत्येक महिन्यातून एकदा घेण्यात येईल. असे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी जाहीर केले.

कर्नाटक पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्रालयाने पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी रोड शोचे आयोजन

पुणे, 5 फेब्रुवारी 2026

केंद्र सरकारच्या पर्यटन मंत्रालयाने, त्यांचे प्रादेशिक कार्यालय, इंडियाटुरिझम, मुंबई द्वारे आणि  कर्नाटक टुरिझम सोसायटीच्या सहकार्याने, पर्यटन भागीदारी मजबूत करण्यासाठी आणि आंतरराज्यीय देशांतर्गत पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पुण्यात देशांतर्गत पर्यटन बी 2 बी  रोड शोचे आयोजन केले.

या रोड शोचा उद्देश पुणे आणि आसपासच्या प्रदेशातील प्रवासी व्यापारी समुदायाशी संबंध वृद्धिंगत करणे आणि कर्नाटकमधील वैविध्यपूर्ण पर्यटन संधी अधोरेखित करणे हा होता. यामध्ये वारसा आणि संस्कृती, इको-टुरिझम,निरामयता, वन्यजीव आणि साहसी पर्यटन यांचा समावेश होता, ज्यातून एक बहुआयामी पर्यटन स्थळ म्हणून राज्याचे दर्शन घडवण्यात आले.

पुणे रोड शोमध्ये कर्नाटकातील एकूण 34 पर्यटन कंपन्या  सहभागी झाल्या. त्यांनी पुणे क्षेत्रातील ट्रॅव्हल एजंट, टूर ऑपरेटर आणि इतर प्रमुख पर्यटन हितधारकांना पर्यटन स्थळे आणि अनुभवांची विस्तृत माहिती सादर केली.

पुणे रोड शोला पर्यटन क्षेत्रातील संबंधित  तसेच माध्यम प्रतिनिधींकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. यातून पुण्याच्या पर्यटन क्षेत्रात   पसंतीचे पर्यटन स्थळ म्हणून कर्नाटकप्रति वाढती उत्सुकता आणि मागणी दिसून येते.

या कार्यक्रमात परस्परसंवादी B2B बैठका आणि नेटवर्किंग पार पडली , ज्यामुळे अर्थपूर्ण व्यावसायिक संवाद, नवीन सहलींचा शोध आणि कर्नाटक पर्यटन क्षेत्रातील हितधारक आणि पुण्याच्या पर्यटन क्षेत्रातील सेवा प्रदाते  यांच्यात दीर्घकालीन सहकार्य विकसित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध झाले.

निवडणूक काळात PMPML ने १०० रिक्त जागांवर २०० ज्यू.क्लार्कची केली भरती:चौकशी समितीवरच कॉंग्रेसचे आक्षेप

पुणे- निवडणूक काळात PMPML ने बेकायदा भारती आणि प्रमोशन प्रक्रिया राबविल्याच्या तक्रारीवरून सध्याचे PMPML अध्यक्ष आणि व्यवस्थाकीय संचालक पृथ्वीराज बी पी यांनी नेमलेल्या चौकशी समितीवर आणि तत्कालीन PMPML अध्यक्षांवर कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी आक्षेप घेतले आहेत.त्यांनी म्हटले आहे कि,’ निवडणूक काळात झालेला एवढा मोठ्ठा गैरव्यवहार हा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याशिवाय व त्यांना अंधारात ठेऊन एवढी मोठी भरती प्रक्रिया होऊ शकत नाही. चौकशी समिती व पी एम पी एम एल चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक असलेले वरिष्ठ अधिकारी यांचीच भूमिका आक्षेपार्ह असल्याचे आमची खात्री आहे. पी एम पी एम एल गठीत केलेली चौकशी समिती व अध्यक्ष यांच्या ऐवजी हि चौकशी त्रयस्थ संस्थेच्या वतीने अथवा निवृत्त न्यायाधीशांच्या वतीने करण्यात यायला हवी

आचारसहिंता भंग करून पी.एम. पी. एम. एल. या संस्थेने केलेली ज्युनियर क्लार्क प्रमोशन / पद भरती बाबत आम्ही दिनांक २७/१२/२०२५ रोजी निवडणूक आयोग व आयुक्त मनपा याना आक्षेप पत्र सादर केलेले आहे.
पी एम. पी. एम. एल. दि. ०५/०२/२०२५ चे कार्यालयीन आदेश क्रमांक ३२३८ द्वारे राबवलेली चौकशी समिती आक्षेपार्ह असल्याचे पत्रही आजच आम्ही दिलेले आहे.

तक्रारीत नमूद सेवक भरती हि सन २०१३ आस्थापन आराखडा (CIRT) मधील अटी व नियम डावलून केलेली आहे. पदनिहाय ८ ते १० लाख रुपये घेऊन शैक्षणिक पात्रता, सेवा जेष्ठता, अनुभव वयोमर्यादा व निकषित पात्रता नसताना प्रमोशन दिली गेली असल्याचा तक्रारी आम्हास प्राप्त झालेल्या आहेत. रिक्त जागांवर 100 जागांसाठी खात्याअंतर्गत जाहिरात दिली असताना प्रत्यक्षात आर्थिक गैरव्यवहार करून 200 जूनियर क्लर्क ची ऑर्डर काढल्याची वस्तुस्थिती आहे.
या प्रकरणी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी पी.एम. पी. एम. एल. च्या संचालक पदी असलेल्या अॅलिस पोरे व अन्य दोन सदस्यांच्या नेमणुकी करून चौकशी समिती गठीत केली आहे. गठीत केलेली चौकशी समिती व पी एम पी एम एल चे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक असलेले वरिष्ठ अधिकारी यांचीच भूमिका आक्षेपार्ह असल्याचे आमची खात्री आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याशिवाय व त्यांना अंधारात ठेऊन एवढी मोठी भरती प्रक्रिया होऊ शकत नाही. भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने झालेला मोठा गैरव्यवहार याची पी.एम.पी.एम.एल. चेच अधिकारी करण्याचे चौकशी मनपा आयुक्तांची कार्यवाही तीव्र आक्षेपार्ह आहे. पी एम पी एम एल गठीत केलेली चौकशी समिती व अध्यक्ष यांच्या ऐवजी सदर क्लार्क व प्रमोशन भरती प्रकरण हे त्रयस्थ संस्थेच्या वतीने अथवा निवृत्त न्यायाधीशांच्या वतीने करण्यात यावे.सदर भरती प्रकरणी जबाबदारी निश्चित असलेल्या व स्वाक्षरी अधिकार असलेल्या अधिकाऱ्यांचे आर्थिक अधिकार चौकशी पूर्ण होईपर्यंत स्थगित ठेवण्यात यावे.
याबाबत आयुक्तांनी ठोस कारवाई न केल्यास काँग्रेस पक्षाच्या वतीने आयुक्तांच्या दालनाबाहेर लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल.असा इशारा अरविंद शिंदे यांनी महापालिका आयुक्त यांना दिलेल्या लेखी पत्रातून दिला आहे.

निवडणुकीच्या काळात १९८ कंडक्टरना क्लार्कचे प्रमोशन,१३ निलंबित कर्मचारी कामावर रुजू चौकशीचे आदेश

सर्व नियुक्त्या आणि बढत्यांना स्थगिती द्या केसकर

पुणे- पी एम पी एम एल अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी निवडणुकीच्या काळात बेकायदा बढत्या आणि इतर बाबी केल्याच्या तक्रारीवरून सध्याचे PMPML चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पृथ्वीराज बी पी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत या चौकशी साठी त्यांनी सहव्यवस्थापकीय संचालक अॅलिस पोरे यंच्या अध्यक्षतेखाली तरी सदस्यीय समिती नेमली आहे. महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विजय थोरात आणि PMPML चे मुख्य अंतर्गत लेखापरीक्षक सुरेश खेडकर यांचा या समितीत समावेश आहे. याबाबत माजी विरोधी पक्षनेते उज्वल केसकर सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी चौकशी तर कराच पण तत्पूर्वी या साऱ्या नियुक्त्या आणि बढत्या तातडीने स्थगित करा अशी मागणी केली आहे
त्यांनी असेही म्हटले आहे कि,’पी एम पी एम एल ही कंपनी असून संचलनातील तुटीसाठी पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पीएमआरडीए यांच्याकडून निधी दिला जातो.पी एम पी एम एल यांच्या मालकीच्या ६९० बसेस असून त्यापैकी ४५० ते ४७५ बसेस या रस्त्यावर धावत आहेत.

खालील बाबींकडे उज्वल केसकर सुहास कुलकर्णी आणि प्रशांत बधे यांनी लक्ष वेधले आहे.
१) सरासरी २०० बसेस या बंद अवस्थेमध्ये असतात.
याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
२) १३ निलंबित कर्मचाऱ्यांना कुठलीही कार्यपद्धती न अवलंबता मागील व्यवस्थापकीय संचालकाने कामावर रुजू केले होते.
३) नवीन २६ स्टॅन्ड मॅनेजर म्हणून नियुक्ती केली त्यांचा बेसिक पगार ३५ हजार रुपये आहे.
४) १९८ कंडक्टर आणि इतर श्रेणीतील कर्मचाऱ्यांना क्लार्कचे प्रमोशन दिले गेले आहे.
५) एका कर्मचाऱ्याला पहिल्यांदा क्लासेचे प्रमोशन दिले आणि नंतर त्यांना जनसंपर्क अधिकारी हे प्रमोशन दिले गेले. त्याचा बेसिक पगार S-13 ३५४०० इतका केला गेला क्लार्क म्हणून नियुक्ती १०६ नंबर वर ३० जानेवारी २०२६ रोजी दिली आणि त्याच दिवशी लगेच जनसंपर्क अधिकारी या पदावर पदोन्नतीने निवड केली असे दोन्ही आदेश आहेत.
६) ज्यांना क्लार्क म्हणून बढती दिली त्यामध्ये कायम कंडक्टर, कायम क्लिनर, शिपाई, झाडूवाला, ड्रायव्हर या हुद्द्यावरील सेवकांना क्लार्क केले.
६) सीनियर फोरमन या पदावर पदोन्नती ८ अधिकाऱ्यांना दिली जे क्लिनर म्हणून काम करत होते त्यांचा बेसिक पे हा १९७०० होता पदोन्नती नंतर तो ३२००० झाला म्हणजे बेसिक मध्ये १२ हजार ९०० रुपये वाढवले.
७) जनसंपर्क अधिकारी हे कंडक्टर होते त्यांचा बेसिक पे २६४०० होता तो त्याच दिवशी ३५४०० केला.
८) कामगार कल्याण अधिकारी या पदावर क्लार्क पदावरील व्यक्तीची नेमणूक केली त्यांचे शिक्षण लॉची डिग्री याची कशाची तपासणी झाली का नाही हे कळण्यास मार्ग नाही, बेसिक मध्ये ७००० रुपयाची वाढ झाली.
९) डेप्युटी चीफ मॅनेजर या संवर्गाच्या रिक्त जागेवर कर्मचाऱ्यांची पदोन्नतीने निवड करण्यात आली आहे अशा एकंदरीत जागा ५ आहेत ते डेपो मेंटेनन्स इंजिनिअर म्हणून कार्यरत आहेत त्यांचा बेसिक पे हा ५६ हजार ९०० असून पदोन्नती पदोन्नती नंतर त्यांचा बेसिक पे १,३२,३०० इतका झाला आहे.
१०) कॉम्प्युटर प्रोग्रामर या जागेवर कंडक्टर प्रवर्गातील अधिकाऱ्याची नेमणूक केलेली आहे.
आणि या सर्व ऑर्डर काढल्या तेव्हा निवडणूक आचारसंहिता होती.
CNG बसेस हा विषय सविस्तरपणे आपणाकडे देतो आज फक्त जी संस्था इतर संस्थांच्या आर्थिक मदतीवर चालू आहे त्या संस्थेमध्ये जो गोंधळ झालेला आहे त्यावरच लक्ष केंद्रित केले आहे.
पुणेकर खिशामध्ये पैसे घेऊन बस ची वाट बघतात आणि पी एम पी एम एल स्वतःच्या संस्थेची कशी वाट लावतात याचं हे मूर्तीमंत उदाहरण आहे.
पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम, पीएमआरडीए चे आयुक्त डॉक्टर योगेश म्हसे यांचे वृत्तपत्रातील quotes बघितले आहे त्यांना या सगळ्या प्रकाराची अजिबात माहिती नाही असे वाटते.पृथ्वीराज बिपी यांच्याकडे PMPML चा अतिरिक्त कार्यभार आहे त्यांनी याबाबतची सर्व कागदपत्रे मागवून या सर्व प्रकाराला तातडीने स्थगिती द्यावी अशी आमची मागणी आहे.

वकील वर्गाच्या कल्याणकारी उपक्रमासाठी कमिटी काम करेल – ॲड. सचिन पानी

वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार

पिंपरी (दि. ५ फेब्रुवारी २०२६)- वकिलांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी तसेच त्यांच्यासाठी कल्याणकारी उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन पिंपरी चिंचवड” ही वकील संघटना स्थापन केली आहे. असे या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ॲड. सचिन पानी यांनी सांगितले.
तसेच ही संघटना सर्वच वकिलांसाठी कार्य करेल अशी ग्वाही ॲड. पानी यांनी यावेळी दिली.
पिंपरी, मोरवाडी कोर्ट येथे “अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ॲडव्होकेट बार असोसिएशन पिंपरी चिंचवड” या वकील संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व सत्कार समारंभ पिंपरी मोरवाडी कोर्ट येथील बार रूम कक्षात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. अरूण खरात, प्रमुख मार्गदर्शक ॲड. राकेश अकोले, बी. के. कांबळे, प्रकाश निनाळे, रमेश गालफाडे, केशव घोगरे, प्रमिला गाडे आदी वकील उपस्थित होते.
यावेळी ॲड. संगीता कुशालकर यांना महिला सहसचिव, सहसचिव ॲड. संजय माने, सहायक सहसचिव पदी ॲड. सुनील डोंगरे, प्रसिद्धी प्रमुखपदी निवड केल्याचे ॲड. तेजस सरतापे यांना विशेष नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
तसेच उपाध्यक्ष ॲड. सुनील माने, सचिव ॲड. तेजस चवरे, महिला सचिव ॲड. आरती अकोले, सहसचिव ॲड. प्रशांत बचुटे, महिला सहसचिव ॲड. स्नेहा कांबळे, हिशोबनीस ॲड. ऋषिकेश शिनगारे, खजिनदार ॲड. अशोक बडेकर, सदस्य ॲड. नागनाथ सूर्यवंशी, मनोहर सोनवणे, संघर्ष सूर्यवंशी, अविनाश कांबळे, सागर पोवार, महेश जानकर, ओंकार नाणेकर, पल्लवी कुराडे, चांगुणा काकडे आदी कार्यकारिणीतील वकील पदाधिकारी व सदस्यांना प्रमुख अतिथींच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी ॲड. समीर चव्हाण यांनी नवीन वकील संघटना स्थापन करण्याचा उद्देश सांगितला. बार आणि बेंच मधील संबंध चांगल्या प्रकारे प्रस्थापित करण्याची जबाबदारी आपण सर्वांची आहे. असेही त्यांनी सांगितले..
ॲड. अरुण खरात यांनी या नवीन कार्यकारिणीस पाठिंबा व्यक्त केला. त्याचबरोबर ॲड. पी. एस. कांबळे, ॲड. सुनील कडूसकर यांनी कार्यकारिणीस शुभेच्छा दिल्या.
सूत्रसंचालन ॲड. तेजस चवरे व ॲड. प्रशांत बचुटे यांनी केले.