Home Blog Page 113

अजितदादा यांच्या निधनामुळे महापौर निवडीनंतर भाजपकडून कोणताही जल्लोष होणार नाही – गणेश बिडकर

महापौर निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव!

पुणे: पुणे महानगरपालिकेतील महापौर व उपमहापौर पदाची निवड येत्या ९ फेब्रुवारी रोजी होणार आहे. महापालिकेत भारतीय जनता पार्टीकडे ११९ नगरसेवकांचे स्पष्ट संख्याबळ असल्याने ही निवड प्रक्रिया केवळ औपचारिक स्वरूपाची असली, तरी राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या निधनामुळे या निवडीनंतर कोणताही आनंदोत्सव साजरा न करण्याचा निर्णय भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने घेतला आहे, अशी माहिती गटनेते गणेश बिडकर यांनी दिली आहे.

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली असून, या दुःखद प्रसंगी पक्षातील सर्व नगरसेवक व कार्यकर्त्यांमधून महापौर व उपमहापौर निवडीनंतर गुलाल, फुले, फटाके अथवा कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता अत्यंत साध्या पद्धतीने निवड प्रक्रिया पार पाडली जाणार आहे.

निवडीनंतर केवळ एका ओळीचा अभिनंदन प्रस्ताव मांडण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच पहिल्याच मुख्य सभेत स्व. अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकप्रस्ताव मांडण्यात येणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेसाठी सर्वपक्षीयांनी सहकार्य करावे, असे आवाहन गणेश बिडकर यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना गणेश बिडकर म्हणाले, “माझ्यासह पुणे महापालिकेतील अनेक नगरसेवकांनी स्वर्गीय अजितदादांसोबत प्रत्यक्ष काम केले आहे. पुणे शहराच्या विकासासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. महापालिकेच्या पहिल्याच मुख्यसभेत त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली अर्पण करण्याचा निर्णय भारतीय जनता पार्टीने घेतला आहे. राजकारणापेक्षा माणुसकी, संवेदनशीलता आणि लोकशाही मूल्ये अधिक महत्त्वाची आहेत.”

महाशिवरात्री निमित्त सोमेश्वरवाडी येथील श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता अभियानाचे आयोजन : नगरसेवक सनी निम्हण

पुणे : महाशिवरात्रीच्या पवित्र पर्वाच्या पार्श्वभूमीवर श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही लाखो भाविक दर्शनासाठी येण्याची अपेक्षा आहे. या भाविकांना स्वच्छ, सुरक्षित व भक्तीमय वातावरण उपलब्ध व्हावे या उद्देशाने श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर परिसरात विशेष स्वच्छता व साफसफाई अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हे स्वच्छता अभियान रविवार, दि. ०८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.०० वाजता श्रीक्षेत्र सोमेश्वर मंदिर, पुणे येथे पार पडणार आहे. या उपक्रमाचे आयोजन श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आले आहे.

या उपक्रमाबाबत माहिती देताना श्री. सनी विनायक निम्हण (विश्वस्त, श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान ट्रस्ट तसेच नगरसेवक, पुणे महानगरपालिका) यांनी सांगितले की, महाशिवरात्री निमित्त मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत असते. भाविकांना स्वच्छ व पवित्र वातावरणात दर्शन घेता यावे, तसेच आरोग्यदायी आणि सुरक्षित परिसर उपलब्ध व्हावा, हा या स्वच्छता अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

या अभियानात नागरिकांनी, शिवभक्तांनी तसेच स्वयंसेवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. सामूहिक सहभागातून मंदिर परिसर अधिक स्वच्छ, सुंदर आणि भक्तिमय करण्याचा संकल्प या उपक्रमातून साकार होणार आहे.

स्वच्छ ऊर्जा वापराला चालना देण्यासाठी ऍक्सिस बँकेची एमएसएमईसाठी रूफटॉप सोलर फायनान्स योजना

0

मुंबई, 5 फेब्रुवारी, 2026: भारतातील खासगी क्षेत्रातील अग्रगण्य बँकांपैकी एक असलेल्या ॲक्सिस बँकेनेसूक्ष्मलघु आणि मध्यम उद्योगांना (MSMEs) सौर ऊर्जेकडे वळण्यासाठी आणि आत्मनिर्भरतेद्वारे ऊर्जेचा खर्च कमी करण्यासाठी ‘रूफटॉप सोलर फायनान्स या विशेष वित्तपुरवठा पर्यायाची घोषणा केली आहे.

या कार्यक्रमांतर्गत, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (MSMEs) 10 लाख ते 2 कोटी रुपयांपर्यंतचे तारण-मुक्त कर्ज 4 ते 7 वर्षांच्या लवचिक परतफेडीच्या कालावधीसह मिळवू शकतात. या रचनेमुळे MSMEs ना त्यांच्या ताळेबंदावर किंवा खेळत्या भांडवलाच्या चक्रावर कोणताही दबाव न टाकता छतावरील सौर प्रणालींमध्ये गुंतवणूक करण्यास अनुमती देते. MSMEs ना स्वतःच्या मालकीच्या छतावरील सौर प्रणाली स्थापित करण्यास सक्षम करून, ही योजना त्यांना ऑपरेशनल खर्च कमी करण्यास, ऊर्जेच्या खर्चावर अधिक नियंत्रण मिळवण्यास आणि भारताच्या स्वच्छ ऊर्जा संक्रमणात योगदान देत असताना दीर्घकालीन आर्थिक लवचिकता निर्माण करण्यास मदत करते.

ॲक्सिस बँकेच्या विस्तृत शाखा नेटवर्कद्वारे ही सुविधा देशभरात उपलब्ध आहे. दर्जेदार अंमलबजावणी आणि विश्वासार्हता सुनिश्चित करण्यासाठी, बँकेने अग्रगण्य मूळ उपकरण उत्पादकांशी (OEMs) भागीदारी केली आहे. ॲक्सिस बँकेने एका तंत्रज्ञान भागीदारासोबतही सहकार्य केले आहे, जेणेकरून सौरऊर्जा स्वीकारण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत एमएसएमईंना, यंत्रणेचा खर्च, अपेक्षित बचत आणि अंमलबजावणीच्या वेळापत्रकासह, अधिक पारदर्शकता प्रदान करता येईल.

महात्मा गांधी यांची ७८ व्‍या पुण्यतिथी दिनानिमित्त काँग्रेसच्या वतीने श्रध्दांजली अर्पण.

पुणे-स्व. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७८ व्‍या पुण्यतिथी निमित्त त्यांना पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. महात्माजींच्या प्रतिमेस व पुतळ्यास पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे पुष्पहार अर्पण केला आणि उपस्थित सर्वांनी भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली.

यावेळी बोलताना अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘महात्मा गांधीजींच्या १९४२ च्या इंग्रज ‘चले जाव’ या घोषनाने सर्व देश पेटून उठला. १९४२ च्या आंदोलनात युवक, विद्यार्थी, तरूण या शिवाय या आंदोलनाचे वैशिष्ट म्हणजे देशभरातील महिला मोठ्या संख्येने या ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी झाल्या. अनेक काँग्रेसजणांबरोबर महिलानांही तुरूंगवास सहन करावा लागला. पुण्यामध्ये बरीच वर्षे आगाखान पॅलेस मध्ये महात्माजी व कस्तुरबा यांचे वास्तव्‍य होते. आगाखान पॅलेसमध्ये असताना गांधीजींचा सातत्याने पत्र व्‍यवहार चालू असे. ‘चले जाव’ चळवळी नंतर इंग्रजानो भारत सोडा, स्वातंत्र्य द्या असा पत्रव्‍यवहार चालू ठेवला. इंग्रजांना जनता स्वस्थ बसू देईना आंदोलन सतत चालू होते. अखेर १९४७ ला इंग्रजांनी देशाला स्वातंत्र्य दिले. परंतु पाकिस्थान वेगळा देश केला. त्यानंतर नौखाली येथे मोठी दंगल झाली तेथे स्वत: गांधीजी गेले व शांतता प्रस्थापित करण्याचे कार्य केले. अशा या महान मानवतावादी नेत्यास मी शतश: प्रणाम. करतो.’’
यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या समवेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस खजिनदार ॲड. अभय छाजेड, माजी आमदार दिप्ती चवधरी, प्रवक्ते गोपाळ तिवारी, अजित दरेकर, प्राची दुधाने, द. स. पोळेकर, नवनिर्वाचित नगरसेवक रामचंद्र उर्फ चंदूशेठ कदम, प्रशांत जगताप, रफिक शेख, अविनाश साळवी, सायरा शेख, अश्विनी लांडगे, विशाल मलके, रामचंद्र कदम, दिपाली डोख, सुमय्या नदाफ, वैशाली भालेराव, साहिल केदारी, तसलिम शेख, आसिया शेख, काशिफ सय्यद आदींसह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर.

पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते व विविध विषयातील तज्ज्ञ मार्गदर्शन करणार.

मुंबई, दि. ५ फेब्रुवारी २०२६

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमाचा पहिला टप्पा २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूण येथे पार पडणार असून या तीन दिवसीय निवासी शिबिरात कोकण विभागातील उमेदवार सहभागी होणार आहेत.

या शिबिराला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह पक्षाचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते व संबंधित विषयातील तज्ज्ञ उमेदवारांना मार्गदर्शन करणार आहेत.

काँग्रेस पक्षाच्या प्रशिक्षण विभागाचे अध्यक्ष आशुतोष शिर्के व त्यांच्या सहकाऱ्यांकडून या शिबिरात सखोल प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये लहान शहरे व निमशहरी भागातील नागरी समस्या, नागरिकांना भेडसावणाऱ्या अडचणी, त्यावरील उपाययोजना, विकासकामांची गुणवत्ता, तसेच नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी प्रशासनाकडे प्रभावी पाठपुरावा कसा करावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांमधील काँग्रेसचे प्रतिनिधी अधिक सक्षम, संवेदनशील आणि विकासाभिमुख व्हावेत, या उद्देशाने हे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले असून पुढील टप्प्यांमध्ये इतर विभागांतील उमेदवारांसाठीही अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन ॲड. गणेश पाटील यांनी दिली आहे.

महावितरणला हरित ऊर्जा शिखर परिषदेत मानाचा पुरस्कार

मुंबई, दि. ५ फेब्रुवारी २०२६: केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांशी सुसंगत राहून महावितरणकडून हरित ऊर्जेला प्राधान्य देण्यात येत आहे. स्वस्त व शाश्वत वीजपुरवठ्यासाठी महावितरणने अपारंपरिक ऊर्जेला प्राधान्य देत वीज खरेदीच्या दीर्घकालीन करारांमध्ये तब्बल ६५ टक्के अपारंपरिक ऊर्जेचा समावेश केला आहे. यासह इतर कामगिरीची दखल घेऊन १४ व्या हरित ऊर्जा शिखर परिषदेत महावितरणला हरित ऊर्जा व ऊर्जा कार्यक्षमता उत्कृष्टता पुरस्काराने गौरविण्यात आले.

नवी दिल्ली येथे बुधवारी (दि. ४) इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने आयोजित या शिखर परिषदेचे अध्यक्ष व केंद्रीय ऊर्जा सचिव (सेवानिवृत्त) श्री. अनिल राजदान यांच्याहस्ते महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. धनंजय औंढेकर तसेच श्री. मोहन मुजूमदार व श्री. शुभम चोरमले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. 

राज्याच्या वीज क्षेत्रासाठी अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार सन २०३० पर्यंत तब्बल ३८ हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह ४५ हजार मेगावॅट विजेची आणखी भर पडणार आहे. त्यामुळे नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होईल. तसेच सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ७ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये वीज खरेदीमध्ये ८२ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याने सर्व वर्गवारीचे वीज दर कमी होत जाणार आहे.

या नियोजनाला अनुसरून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी ऊर्जा परिवर्तनाला मोठा वेग दिला आहे. महावितरणने प्राधान्य दरांवर सर्व ऊर्जा स्त्रोतांमध्ये आतापर्यंत ७२ हजार ९१८ मेगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे दीर्घकालीन करार (पीपीए) केले आहेत. यामध्ये ४७ हजार ३४७ मेगावॅट (६५ ट्क्के) अपारंपरिक ऊर्जेचा समावेश आहे.

ऊर्जा परिवर्तनामध्ये प्रामुख्याने सौर ऊर्जा क्षेत्रात महावितरणने मोठी आघाडी घेतली आहे. शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी आतापर्यंत ३५२० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केले आहेत. त्यातून ९ लाखांवर शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. तर देशात सर्वाधिक ८ लाखांवर सौर कृषिपंप कार्यान्वित झाले आहे. यासह प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आतापर्यंत राज्यात ४ लाख ४३ हजारांवर घरगुती ग्राहकांकडे १७३३ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहे व त्यांचे मासिक वीजबिल देखील शून्यवत झाले आहे.

विजय पांढरे म्हणाले- भाजपच्या घोटाळ्यावर बोलल्यानंतर अजितदादांचा विमान अपघात, कोर्टावरचाही विश्वास उडाला

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न असतानाच, सिंचन घोटाळा पुराव्यानिशी बाहेर काढणारे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरे यांनी या प्रकरणावर आपली अत्यंत रोखठोक आणि खळबळजनक प्रतिक्रिया दिली आहे. “अजित पवारांचा अपघात दुर्दैवी आहे, मात्र सरकारी चौकशी यंत्रणांवर माझा विश्वास राहिलेला नाही,” अशा शब्दांत पांढरे यांनी प्रशासकीय आणि न्यायालयीन व्यवस्थेवर तोफ डागली आहे.

विजय पांढरे यांनी अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य केले. ते म्हणाले, “अजित पवारांबाबत जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. घटनेवर अनेकांनी शंकाही उपस्थित केल्या व शंका येईल अशा काही घटनाही घडलेल्या आहेत. अजित पवारांनी निधनापूर्वी भाजपच्या १०० कोटींच्या घोटाळ्याची फाइल माझ्याकडे आहे, असे विधान केले होते. त्यानंतर लगेच हा अपघात झाला, त्यामुळे अनेकांना घातपाताची शंका येते. मात्र, वैयक्तिकरीत्या मला यात घातपात वाटत नाही. तरीही, DGCA (नागरी विमान वाहतूक महासंचालनालय) या अपघाताचा जो अहवाल देईल, तो सरकार आपल्या मर्जीनुसार तयार करून घेईल, अशी मला भीती आहे. सत्य लपवून ठेवले जातात असा माझा अनुभव आहे,” असा दावाही त्यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना केला.

सिंचन घोटाळ्याबाबत भाष्य करताना विजय पांढरे यांनी न्यायव्यवस्थेवरही गंभीर आरोप केले. ” मी अजित पवारांवर आरोप केले ते व्यक्तिशः किंवा द्वेषातून केले नाही. राज्यातील जनतेचा पैसा हा अनाठाही खर्च होत होता म्हणून यंत्रणेवर केले होते. अजित पवार गेल्यानंतर आता या घोटाळ्यातील इतर आरोपींचे काय होणार? यात सांगायचे झाले तर मुळात आमचा न्यायालयावरील विश्वास उडाला आहे.” असे विजय पांढरे म्हणाले.

राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर टीका करताना विजय पांढरे यांनी थेट ‘लाडकी बहीण’ योजनेवर निशाणा साधला. “काँग्रेसच्या काळातील सिंचन प्रकल्प हे सरकार पूर्ण करू शकत नाही, कारण त्या प्रकल्पांचा पैसा लाडकी बहीण सारख्या योजनांकडे वळवण्यात आला आहे. राज्याची आर्थिक दिवाळखोरी पाहता सर्वोच्च न्यायालयाने अशा योजनांवर बंदी आणली पाहिजे,” असे विजय पांढरे म्हणालेत. “वैनगंगा-नळगंगा हा आतापर्यंतचा सर्वात बोगस प्रकल्प आहे. ४० वर्षांपासून २०० प्रकल्प अपूर्ण असताना नवीन प्रकल्पांच्या घोषणा करणे हा सरकारचा मूर्खपणा आहे,” अशी टीकाही विजय पांढरे यांनी केली.

विजय पांढरे यांनी केवळ सिंचन विभागावर न थांबता आता आपला मोर्चा रस्ते विकास विभागाकडे वळवला आहे. “मी आता राज्यातील सर्व महामार्गांच्या खर्चाचे अंदाजपत्रक मागवून त्यांचे ‘पोस्टमार्टम’ करणार आहे. महामार्गांच्या कामातही मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असून जनतेचा पैसा ओरबाडला जात आहे,” असा इशारा त्यांनी दिला आहे.

मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी ‘मताधिकार’ मोबाईल अॅपचा वापर करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

पुणे, दि. ५ : जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठीकरिता मतदार यादीतील मतदाराचे नाव तसेच मतदान केंद्र शोधण्याकरिता ‘मताधिकार’ मोबाईल अॅप उपलब्ध करून देण्यात आले आहे; अधिकाधिक मतदारांनी या अॅपचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांकरिता ७ फेब्रुवारी २०२६ रोजी मतदान होणार आहे. याकरिता मतदाराचे नाव व मतदान केंद्र शोधण्याकरिता ‘मताधिकार’ मोबाईल अॅप ‘गुगल प्ले स्टोअर’ वरुन डाऊनलोड करता येईल. या अॅपमध्ये मतदाराचे नाव शोधण्यासाठी दोन पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. त्यानुसार मतदाराचे संपूर्ण नाव किंवा मतदार ओळखपत्राचा (EPIC) क्रमांक नमूद करून मतदार यादीतील नाव शोधता येते. अॅपच्या माध्यमातून आपले मतदान केंद्रही शोधता येणार आहे.

याशिवाय मतदार यादीतील नाव शोधण्यासाठी https://mahasecvoterlist.in/ हे संकेतस्थळदेखील उपलब्ध करुन देण्यात आले आहे, त्यातील Search Name in Voter List वर क्लिक करून मोबाईल अॅपप्रमाणेच ‘नाव’ किंवा ‘मतदार ओळखपत्रा’चा (EPIC) क्रमांक नमूद करुन नाव शोधता येईल, अशी माहिती श्री. डुडी यांनी दिली आहे.

मुंबई/पुणे- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर 32 तासांनंतर वाहतूक सुरळीत

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर सुमारे 31 तासांनंतर गुरुवारी सकाळी वाहतूक कोंडी सुटली. येथे 3 फेब्रुवारीपासून दीड लाख वाहनांमध्ये लोक अडकले होते. गाड्यांच्या 25 किमी लांब रांगा लागल्या होत्या. कोंडीत अडकलेल्या लोकांना अन्न, पाणी आणि शौचालयाच्या सुविधांच्या कमतरतेमुळे खूप अडचणींचा सामना करावा लागला.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील खंडाळा घाट सेक्शनमध्ये 3 फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता अडोशी बोगद्याजवळ एक गॅस टँकर उलटला होता. टँकरमधून प्रोपायलीन वायूची गळती होत होती. त्यानंतर, सुरक्षा कारणांमुळे एक्सप्रेसवेचे अनेक भाग बंद करावे लागले होते.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) नुसार, टँकरमधील प्रोपायलीन वायू दुसऱ्या टँकरमध्ये हस्तांतरित करण्यात आला. त्यानंतर खराब झालेला टँकर रस्त्यावरून बाजूला करण्यात आला. तेव्हा हळूहळू वाहतूक कोंडी कमी होऊ लागली.
गॅस गळतीनंतर परिस्थिती हाताळण्यासाठी NDRF, SDRF आणि भारत पेट्रोलियम (BPCL) चे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले होते. पुणे ते मुंबई जाणारी लेन पूर्णपणे बंद करण्यात आली होती आणि वाहतूक जुन्या मुंबई-पुणे महामार्गाकडे वळवण्यात आली होती.

परिस्थिती काही प्रमाणात हाताळण्यासाठी पुणे लेनमधून मुंबईच्या दिशेने 15-20 मिनिटांच्या ब्लॉकमध्ये गाड्या जात होत्या. मात्र, बुधवारी संध्याकाळपर्यंत गॅस गळती सुरू राहिल्याने वाहतूक कोंडी वाढतच गेली. बुधवारी संध्याकाळपर्यंत वाहनांच्या रांगा सुमारे 20 किलोमीटरपर्यंत पसरल्या होत्या.

वाहतूक कोंडी सुटण्यापूर्वी MSRDC ने सांगितले होते की, प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मुंबईकडे जाणारा मार्ग बंद ठेवण्यात आला होता, ज्यामुळे दोन्ही दिशांना वाहतुकीवर परिणाम झाला. या दरम्यान, एक्सप्रेसवेवरील टोल वसुली देखील बुधवार सकाळपासून निलंबित करण्यात आली होती.

वाहतूक कोंडीचा परिणाम बस सेवांवरही झाला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) 165 बस वेगवेगळ्या ठिकाणी अडकल्या होत्या. बुधवारी 139 बस सेवा रद्द कराव्या लागल्या, ज्यात 73 ई-शिवनेरी आणि 66 सामान्य बसचा समावेश होता.

परिवहन विभागाच्या माहितीनुसार, 163 बस एक्सप्रेसवेवर अडकल्या होत्या. यात साताऱ्याच्या 46, सोलापूरच्या 36, पुण्याच्या 20, सांगलीच्या 18, कोल्हापूरच्या 13, पालघरच्या 12, ठाण्याच्या 11 आणि मुंबई विभागाच्या 7 बसचा समावेश होता.
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या संचालन आणि देखभालीसाठी जबाबदार असलेल्या MSRDC आणि IRB MPEPL च्या टीम्सनी एफएम रेडिओ, सोशल मीडिया आणि इतर माध्यमांद्वारे प्रवाशांना सतत अद्ययावत माहिती दिली. लोकांना आवाहन करण्यात आले की, अत्यंत आवश्यक नसल्यास प्रवास टाळावा आणि पर्यायी मार्गांचा वापर करावा.

अडकलेल्या प्रवाशांच्या मदतीसाठी IRB MPEPL आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी शक्य तिथे पाणी आणि बिस्किटे वाटली. एका MSRTC चालकाने सांगितले की, त्यांची बस अडोशी बोगद्याजवळ सुमारे 9 तास अडकली होती आणि अखेरीस बुधवारी पहाटे 3 वाजता पनवेलला पोहोचू शकली.

प्रवाशांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली. काही वापरकर्त्यांनी द्रुतगती मार्गाला ‘पार्किंग लॉट’ म्हटले. महिला, वृद्ध आणि मुलांना शौचालये आणि पाण्याची कमतरता यामुळे सर्वाधिक त्रास सहन करावा लागला.

अधिकाऱ्यांच्या मते, परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर बस सेवा टप्प्याटप्प्याने पुन्हा सुरू केल्या जातील. द्रुतगती मार्ग नियंत्रण कक्षाने गुरुवारी सकाळपर्यंत वाहतुकीत दिलासा मिळण्याची आशा व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणुकीसाठी साहित्य संवर्धन आघाडीचे विशेष सॉफ्टवेअर विकसित

पुणे —
महाराष्ट्र साहित्य परिषद निवडणूक जाहीर झाली असून साहित्य संवर्धन आघाडीच्या वतीने नुकताच जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आजीव सभासदांची माहिती अद्ययावत व पारदर्शक करण्यासाठी साहित्य संवर्धन आघाडीने sahityasa.com ही विशेष वेबसाइट विकसित केली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सुमारे १६ हजार आजीव सभासद असून मागील ११ वर्षांपासून त्यांची यादी अद्ययावत करण्यात आलेली नव्हती, अशी माहिती आघाडीचे उमेदवार प्रसाद मिरासदार आणि सुनील महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
साहित्य संवर्धन आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी कुणाल ओंबसे उपस्थित होते. मिरासदार यांनी सांगितले की, राज्यभरात आमचे उमेदवार प्रचार दौरे करत असून निवडणूक जिंकल्यानंतर विविध साहित्यिक उपक्रम राबवले जातील. sahityasa.com या वेबसाइटवर साहित्य संवर्धन आघाडीचे स्वतंत्र पेज असून त्यामध्ये रेकॉर्ड कॉलमद्वारे पिनकोड, नाव किंवा मोबाईल क्रमांक टाकून आजीव सभासदांना आपला मतदार क्रमांक, पत्ता आणि इतर माहिती तात्काळ पाहता येणार आहे.
प्रथमच सोप्या आणि मराठी भाषेत असे सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले असून आडनावानुसार मतदार यादी तयार करण्यात आली आहे. त्यामध्ये मतदार यादी क्रमांक तसेच पत्त्याची तपासणीही करता येणार आहे. अनेक सभासदांना आजीव सदस्य कोण आहेत याचीही माहिती नसते, मात्र या वेबसाइटमुळे ती माहिती आता सहज उपलब्ध होणार आहे. तसेच निवडणुकीत उभ्या असलेल्या सर्व उमेदवारांची सविस्तर माहितीही याठिकाणी पाहता येईल.
सुनील महाजन यांनी सांगितले की, आम्ही निवडून आल्यावर काय करणार आहोत हे स्पष्टपणे मांडत आहोत. विरोधकांनी आतापर्यंत पदे भूषवून काय केले, यावर टीका करण्यात आम्ही वेळ घालवणार नाही. आजीव सभासद आणि साहित्य परिषद यांचा संपर्क तुटलेला असून तो पुन्हा मजबूत करणे आवश्यक आहे. आम्ही अवघ्या दहा दिवसांत ही वेबसाइट आणि ॲप तयार केले, मात्र मागील ११ वर्षांत सध्याच्या पदाधिकाऱ्यांना ते करता आले नाही. अनेक साहित्यिकांचे पत्ते बदलले, काहींचे निधन झाले, तरीही यादी अद्ययावत करण्यात आलेली नाही. ही यादी नीटनेटकी आणि अद्ययावत करण्याचे काम साहित्य संवर्धन आघाडी करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

10 ग्रॅम सोने 3 हजार रुपयांनी स्वस्त,पावणे दोन लाखावर पोहोचलेले सोने आज दीड लाखावर

नुकतेच काही दिवसा अगोदर पावणे दिन लाखावर पोहोचलेले सोने आज दीड लाखावर आले आहे.

सोन्या-चांदीच्या बाजारात सलग दोन दिवसांच्या तेजीनंतर आज 5 फेब्रुवारी रोजी घसरण झाली आहे. वायदा बाजारात (MCX) चांदीच्या दरात सुमारे 28 हजार रुपये (11%) घट झाली आहे. 1 किलो चांदीचा भाव 2.52 लाख रुपयांवर पोहोचला आहे.सोन्याचे दरही सुमारे 3 हजार रुपये (2%) कमी झाले आहेत. 10 ग्रॅम सोने 1.53 लाख रुपयांवर आहे. यापूर्वी 29 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान चांदीची किंमत 1.60 लाख रुपयांनी कमी झाली होती. तर सोन्याच्या किमतीत 26 हजार रुपयांची घट झाली होती. सराफा बाजाराचे दर दुपारी 12 वाजता जाहीर केले जातील.

MCX आणि सराफा बाजारात दर वेगवेगळे का?

MCX : मल्टी कमोडिटी एक्सचेंज हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे जिथे सोने-चांदीची ट्रेडिंग होते. शेअर बाजाराप्रमाणे दर सेकंदाला बोली लागते, ज्यामुळे दर सतत वर-खाली होतात.

सराफा: हे असे ठिकाण आहे जिथे तुम्ही प्रत्यक्ष सोने-चांदी खरेदी करता. प्रत्यक्ष सोने आणण्याचा, नेण्याचा आणि साठवण्याचा खर्च यात समाविष्ट असतो.

सोने-चांदीच्या दरात घसरणीची 2 कारणे

प्रॉफिट बुकिंग: सोने-चांदीच्या किमती अलीकडच्या काळात विक्रमी पातळीवर पोहोचल्या होत्या, त्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर प्रॉफिट बुक केले.

प्रत्यक्ष मागणीत घट: सर्वकालीन उच्चांकानंतर प्रत्यक्ष मागणी कमी झाली, त्याचबरोबर औद्योगिक वापराबाबतच्या चिंताही वाढल्या.

मार्जिन वाढल्याने सोने-चांदीच्या किमतींवर दबाव

सेबी नोंदणीकृत कमोडिटी तज्ज्ञ अनुज गुप्ता यांनी सांगितले की, शिकागो मर्केंटाइल एक्सचेंज (CME) ने तांब्यानंतर आता सोने आणि चांदीवरही मार्जिन मनी वाढवली आहे.

सोन्यावरील मार्जिन 6% वरून 8% पर्यंत वाढवले ​​आहे. तर चांदीवरील मार्जिन 11% वरून 15% पर्यंत वाढवण्यात आले आहे. मार्जिन वाढल्याने किमतींवर दबाव कायम राहण्याची शक्यता आहे.

कमोडिटी मार्केटमध्ये जेव्हा एखादा मोठा व्यवहार करतो, तेव्हा त्याला पूर्ण पैसे लगेच द्यावे लागत नाहीत. त्याला एकूण किमतीचा एक छोटासा भाग सुरक्षा म्हणून जमा करावा लागतो, ज्याला ‘मार्जिन’ म्हणतात. मार्जिन वाढण्याचा अर्थ असा आहे की आता ट्रेडर्सना जास्त पैसे गुंतवावे लागतील.

अनेक ट्रेडर्स असे असतात ज्यांनी आधीच खरेदी केली आहे. मार्जिन वाढताच एक्सचेंज त्यांच्याकडून अतिरिक्त पैसे मागते. जर त्यांच्याकडे लगेच पैसे नसतील, तर त्यांना आपले सोने किंवा चांदी विकावी लागते. जेव्हा अनेक लोक एकाच वेळी विकतात, तेव्हा दर घसरू लागतात.

केंद्रीय  अर्थसंकल्प लोकाभिमुख, विकासाभिमुख व प्रगतीशीलअर्थसंकल्पातून आत्मनिर्भर भारताचा पाया – प्रकाश जावडेकर

पुणे-‘यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प हा लोकाभिमुख असून देशाला वेगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या ध्येयाकडे नेणारा आहे. हा अर्थसंकल्प आत्मनिर्भर भारताचा पाया असून यातून सर्व घटकांच्या विकासाला चालना मिळेल,’ असा ठाम विश्वास माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केला. भारत लवकरच जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने नेणारा हा अर्थसंकल्प असल्याचेही जावडेकर म्हणाले.भारतीय जनता पक्षातर्फे शहर कार्यालयात ‘केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस प्रियंका शेडगे-शिंदे, समीर रुपदे आदी उपस्थित होते.‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या सर्वसमावेशक अर्थसंकल्पाचे मी स्वागत करतो, असे सांगून जावडेकर म्हणाले,‘कर्तव्य भवनात तयार झालेला हा अर्थसंकल्प कर्तव्य भावनेतून तयार झाला आहे. या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ नाही. विद्यार्थी, नोकरदार, महिला, नवउद्यमी, शेतकरी, उद्योजक, गुंतवणूकदार अशा सर्वच घटकांचा विचार करून हा अर्थसंकल्प तयार केला आहे.’. ‘भांडवली खर्चात मोठी वाढ करत आगामी वर्षासाठी हा खर्च १२.२ लाख कोटी रुपये दर्शविण्यात आला आहे. त्याचा एकूणच अर्थव्यवस्थेला मोठा लाभ होईल. रस्ते, रेल्वे, हवाई व जलमार्ग अशा पायाभूत सुविधांचा विकास आणि दुसऱ्या व तिसऱ्या श्रेणीतील शहरांच्या विकासासाठी भरीव तरतूद स्वागतार्ह आहे. राजकोषीय (वित्तीय) तूट कमी राखणे ही अत्यंत आव्हानात्मक बाब आहे. परंतु, केंद्र सरकारने आर्थिक शिस्त पाळली. गतवर्षीच्या तुलनेत या तुटीमध्ये ०.१ टक्क्याने घट झाली. वित्तीय तूट कमी राखल्याने महागाई नियंत्रणात येते, अर्थव्यवस्था भक्कम होते.मागील १३० दिवसात मोदी सरकारने प्रशासकीय पातळीवर ३५० हून अधिक सुधारणा केल्या. त्या वेगाने प्रत्यक्षात याव्यात यासाठी अर्थसंकल्पात जन विश्वास २.० हे विधेयक प्रस्तावित करण्यात आले आहे. त्यामुळे अनावश्यक अटीशर्ती, नियमांमधून मुक्ती मिळून प्रशासनावरील विश्वास वाढण्यास मदत होईल. या अर्थसंकल्पातून कृषी उत्पादनक्षमता वाढेल, रोजगार निर्मिती आणि खरेदीची क्षमताही वाढेल,’याकडे जावडेकर यांनी लक्ष वेधले. “शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी अधिक किंमत मिळणारी पिके, पिकांचे वैविध्य, उच्च उत्पादनक्षम वाण आणि पूरक उपक्रमांवर भर देण्यात आला आहे. स्थानिक भाषांमध्ये कृषी सल्ला देण्यासाठीही भरीव तरतूद केली आहे. किसान सन्मान निधीमधून आजवर दहा कोटी शेतकऱ्यांना प्रत्येकी ४० हजार रुपये मदत मिळाली आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या लघू व मध्यम उद्योगांसाठी दहा हजार कोटींचा ‘एसएमई ग्रोथ फंड’ प्रस्तावित केला आहे. तर ‘नारी शक्ती’ला बळ देण्यासाठी बचत गटांना भरीव अर्थसाह्य केले जाणार आहे,’असे जावडेकर म्हणाले. ‘सेमीकंडक्टर मिशन २.० मुळे भारतात नवी क्रांती घडेल. बायोफार्मा शक्ती मधून पाच वर्षात दहा हजार कोटी रुपये दिले जाणार आहेत. इलेक्ट्रॉनिक उत्पादनासाठी ४० हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.  भारत ‘डेटा सेंटर’चे जागतिक केंद्र बनावे,यासाठी विशेष तरतूद करण्यात आली आहे. ‘ग्लोबल डेटा सेंटर’’मध्ये येणाऱ्या उद्योगांना करसवलत देण्यात आली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स मिशनही भविष्याच्या दिशेने टाकलेले दमदार पाऊल आहे. ‘ऑरेंज इकॉनॉमी’च्या माध्यमातून सर्जनशील आणि डिजिटल कौशल्यांना चालना मिळेल, असे जावडेकर म्हणाले. महाराष्ट्राला सर्वाधिक निधी‘जीएसटी’ लागू झाल्यानंतर कर विभाजनातून राज्यांना मोठा निधी मिळत आहे. महाराष्ट्राला कर हस्तांतरणातून ९८ हजार कोटी रुपये मिळणार आहेत. याहून अधिक निधीही राज्याला मिळणार आहे. रस्ते, कृषी, आर्थिक  क्लस्टर्स, आरोग्यसेवा, सिंचन, कृषी ग्रामीण विकास, कौशल्य विकास, पायाभूत सुविधा, रेल्वे, मुंबई व इतर ठिकाणचे मेट्रो प्रकल्प यातून महाराष्ट्राला अतिरिक्त १२ हजार ३५५ कोटी रुपये मिळणार आहेत. त्यामुळे एकूण अर्थसंकल्पातून महाराष्ट्र राज्याला एक लाख दहा हजार ६६१ कोटी रुपये मिळणार आहेत. महाराष्ट्राला इतकी मोठी रक्कम कधीही मिळाली नव्हती,’असे प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.

राजेश बनकर यांच्याकडे आता रस्त्यांचे नेटवर्क: सुसज्ज रस्ते व सुयोग्य पदपथासाठी आता मार्गदर्शक तत्वे, शहर परिवर्तन समिती

पुणे- महापालिका हद्दीतील रस्ते , पदपथ यांचे संपूर्ण नेटवर्क आता राजेश बनकर यांच्या अधिपत्याखाली असणार आहे आणि आता पुणेकरांना सुसज्ज रस्ते व सुयोग्य पदपथ उपलब्ध व्हावीत या साठी आता मार्गदर्शक तत्वे आखण्यात येत आहे आणि ‘‘ शहर परिवर्तन समिती ’’देखील स्थापित करण्याच्या हालचाली सुरु जाल्या आहेत.

अतिरिक्त महापालिका आयुक्त ( वि ) यांनी काल पथ विभागाकडील अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक घेतली. सदर आढावा बैठकीत शहरात सुसरू असलेल्या खड्डेमुक्त अभियान, चेंबर्स समपातळीत करणे व पदपथांची देखभाल दुरूस्ती या अंतर्गत सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.यात काय ठरले ते वाचा …..
• नागरिकांना सुसज्ज रस्ते व सुयोग्य पदपथ उपलब्ध व्हावेत यासाठी मार्गदर्शक तत्वे ( एस.पी.ओ. ) तयार करण्यात आली असून त्यानुसारच रस्ते व पदपथ यांची उभारणी करण्यात यावी.
• शैक्षणिक संस्था, हॉस्पीटल , रेल्वे, मेट्रो स्टेशन्स यासारख्या सार्वजनिक व जास्त गर्दीच्या ठिकाणी प्राधान्याने पदपथ उपलब्ध करून देणे तसेच पदपथ दुरूस्तीची कामे हाती घेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
• शहरातील जास्तीत जास्त चेंबर्स पुढील तीन महिन्यात समपातळीत आणणेसाठी अतिरिक्त टीम करून गुणवत्तापूर्वक काम करून घ्यावे. किमान ५० चेंबर्स रोज पूर्ण करण्याचे उदिदष्ट ठेवावे.
• आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेसाठी ज्या दर्जाच्या रस्त्यांची उभारणी करण्यात आलेली आहे त्याच दर्जाच्या रस्त्यांची उभारणी यापुढील काळात करण्यात यावी.त्यासाठी पू.ग.प. , अटी, शर्ती सुधारीत कराव्या.
• पथ विभागाकडील अभियंता यांचेसाठी दर तीन महिन्यांनी रस्ते क्षेत्रातील तज्ञ व्यक्ती, आय.आय.टी. सारख्या संस्था यांचेकडून रस्ते बांधणी क्षेत्रातील नवनवीन संकल्पना, तांत्रिक कौशल्य माहिती होणेसाठी प्रशिक्षण आयोजत करण्यात यावे.
• सेवावाहिन्यांसाठी विविध कंपन्याकडून वारंवार खोदाई करण्यात येते व त्यामुळे रस्ते खराब होतात या अनुषंगाने पुढील काळात केलेल्या खोदाईची पुर्नबांधणी मुख्य पथ विभागामार्फत एस.पी.ओ. नुसार करण्यात यावी. त्यासाठी अंदाजपत्रकीय तरतूदीबाबत प्रस्ताव सादर करावा.
• ‘‘ शहर परिवर्तन समिती ’’ स्थापन करण्याचे नियोजन असून या समितीमार्फत विविध प्रकल्प गतीने पूर्ण करण्यासाठी शहरातील विविध विभागांची समन्वय बैठक आयोजित करण्यात येणार असून कामात सुसूत्रता येवून कामे जलद गतीने होणेस मदत होणार आहे.त्यासाठी मनपा कडील विविध प्रलंबित विषयांची तपशीलवार माहिती बैठकीत सादर करावी.
• बैठकीचे शेवटी पथ विभागाकडे मुख्य अभियंता पदावर रूजू झालेले श्री. राजेश बनकर यांचे अभिनंदन करण्यात येवून गुणवत्तापूर्वक कामे करण्यासाठी त्यांचा अनुभव उपयोगी होईल त्यादृष्टीने कामकाज टीम म्हणून करावे.
• सदर बैठकीस अतिरिक्त महापालिका आयुक्त ( वि ) श्री. ओमप्रकाश दिवटे, मुख्य अभियंता (पथ )- श्री. राजेश बनकर ,अधिक्षक अभियंता ( पथ ) – श्री. आशित जाधव, अजित बांबळे, अभिजीत आंबेकर तसेच पथ विभागाकडील कार्यकारी अभियंता, उप अभियंता व कनिष्ठ अभियंता उपस्थित होते.

लष्करप्रमुख नरवणे म्हणाले, कैलास पर्वतावर चिनी रणगाडे आलेत अन मोदीसरकारचा कोणताच प्रतिसाद नाही, लष्करप्रमुख असहाय्य

नवी दिल्ली- गेल्या दोन दिवसांपासून लोकसभेत माजी लष्करप्रमुख एमएम नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकावरून गोंधळ सुरू आहे. यामुळे सभागृहाचे कामकाज अनेक वेळा तहकूब करण्यात आले आहे. राहुल गांधी यांना लोकसभेत या पुस्तकातील काही उतारे वाचायचे आहेत, परंतु सभापती ओम बिर्ला यांनी परवानगी दिलेली नाही. आज (4 फेब्रुवारी) संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहात भाषण करतील तेव्हा ते त्यांना नरवणे यांचे पुस्तक देईन. राहुल गांधी म्हणाले की, हे नरवणे यांचे पुस्तक आहे. त्यांनी त्यात सर्व तपशील लिहिले आहेत. मला सांगण्यात आले आहे की मी हे पुस्तक उद्धृत करू शकत नाही, परंतु ते पूर्ण लिहिले आहे. राहुल गांधी म्हणाले की, त्यात मुख्य ओळ आहे आणि पंतप्रधानांनी म्हटले आहे की ‘तुम्हाला जे योग्य वाटेल ते करा.’

पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, जेव्हा लष्करप्रमुख जनरल नरवणे यांनी राजनाथ सिंह यांना फोन करून विचारले की, “कैलास कड्यावर चिनी रणगाडे आले आहेत.” सुरुवातीला राजनाथ सिंह यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी पुढे सांगितले की त्यांनी जयशंकर, राजनाथ सिंह आणि अगदी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनाही विचारले, पण त्यांना कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
राजनाथ सिंह म्हणाले, मी वरिष्ठांना विचारेन
राहुल गांधी म्हणाले की त्यांनी नंतर राजनाथ सिंह यांना फोन केला. राजनाथ सिंह म्हणाले, “मी वरिष्ठांना विचारेन आणि वरिष्ठांनी असे म्हटले होते की जर चिनी सैन्य आमच्या सीमेत घुसले तर आम्ही त्यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय गोळीबार करणार नाही.” नरवणे आणि लष्कराला त्यावेळी गोळीबार करायचा होता, परंतु नरेंद्र मोदींनी त्यांना योग्य वाटेल ते करण्याचा संदेश दिला.

राहुल गांधींनी आरोप केला की नरेंद्र मोदींना त्यांची जबाबदारी समजली नाही. त्यांनी लष्कराला योग्य वाटेल ते करण्यास सांगितले. “ते माझ्या नियंत्रणाबाहेर आहे.” त्यांनी पुढे म्हटले की नरवणे यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की त्यावेळी ते पूर्णपणे एकटे आणि असहाय्य होते. राहुल गांधींनी अखेर पुन्हा सांगितले की पंतप्रधान सभागृहात परतल्यावर ते स्वतः त्यांना पुस्तक सादर करतील.

दरम्यान, प्रियंका गांधींनी पुढे सांगितले की त्यांनी पुस्तक प्रकाशित होऊ दिले नाही. “माझ्या माहितीनुसार, या पुस्तकात पंतप्रधान, मुख्यमंत्री, संरक्षण मंत्री आणि आपल्या सर्वोच्च नेतृत्वाच्या संकटकाळातील प्रतिक्रिया उलगडणारी सामग्री आहे. ते त्यांचे आणि त्यांच्या सरकारचे चारित्र्य स्पष्टपणे प्रतिबिंबित करते, ज्यामध्ये देशावर हल्ला होतो आणि चिनी सैनिक आपल्या सीमेजवळ येत असताना ते कसे प्रतिक्रिया देतात हे देखील समाविष्ट आहे.” त्यांनी पुढे म्हटले की राहुल गांधी एका प्रकाशित स्त्रोताकडून उद्धृत करत आहेत. त्यांनी कालच ते प्रमाणित केले, मग ते असे म्हणण्यात काय अडचण आहे?

राहुल गांधींना लोकसभेत बोलू न देणे मोदी सरकारची हुकूमशाही, चीन सीमेवर काय झाले हे जनतेला समजले पाहिजे: हर्षवर्धन सपकाळ

राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, बिश्नोई गँग, कोयता गँग सारख्या प्रवृत्तींना सरकारकडून खतपाणी.

मुंबई, दि. ४ फेब्रुवारी २०२६

चीनच्या सीमेवरील कारवायांबद्दल विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत अत्यंत महत्वाचे व गंभीर प्रश्न मांडण्याचा प्रयत्न केला परंतु मोदी सरकार मात्र त्यांना बोलू देत नाही. भारत सरकार चीन प्रश्नी काहीतरी सत्य लपवत आहे म्हणून विरोधी पक्ष नेत्यालाही संसदेत बोलू दिले जात नाही हे अत्यंत निषेधार्ह असून मोदी सरकार संसदेच्या सर्व संकेत, परंपरा व नियम पायदळी तुडवत हुकूमशाहीपद्धतीने वागत असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, देशाचे माजी लष्करप्रमुख जनरल मनोज मुकुंद नरवणे यांनी त्यांच्या फोर स्टाफ ॲाफ डेस्टिनी या पुस्तकात ‘डंके की चोट पर’ चीन प्रकरणावर लिहिले असून मोदी सरकारने जाबबादारी झटकल्याचे उघड आहे, हाच मुद्दा राहुल गांधी लोकसभेत मांडत होते. चीन प्रश्नावर संसदेत चर्चा व्हायला पाहिजे व चीन सीमेवर काय झाले, हे जाणून घेण्याचा अधिकार भारत मातेच्या सर्व सुपुत्रांना आहे, पण सरकार मात्र विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलूच देत नाही. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनीही चीनने भारताच्या हद्दीत प्रवेश केल्याचा मुद्दा मांडला असता मोदी सरकारने त्यांना जेलमध्ये टाकले आहे, असेही सपकाळ म्हणाले..

अजित पवार विमान अपघातावर संशय..
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातावर अनेक स्तरातून शंका उपस्थित केल्या जात आहेत. यावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, अजित पवार यांचे शेवटचे संभाषण व्हायरल झाले आहे पण ब्लॅकबॉक्स मधील संभाषण अद्याप जाहीर झालेले नाही व चौकशीही होत नाही, हा विलंब अनाकलनीय आहे, त्यामुळे संशय बळावत चालला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतलेली नाही. शपथविधीला जेवढी घाई केली तेवढी अपघाताच्या चौकशीसाठी करण्यात आली नाही.
अजित पवार यांच्यासारख्या शिस्तप्रिय लोकनेत्याच्या बाबतीत असा अपघात व्हावा हे पटत नाही. जोपर्यंत या अपघाताचा कार्यकारणभाव स्पष्ट होत नाही तोपर्यंत असे प्रश्न उपस्थित होतच राहणार. या अपघाताने अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत आणि सरकार हे प्रकरण ज्यापद्धतीने हाताळत आहे त्यावर शंका आणखी वाढत आहेत. अंत्यसंस्काराच्या दुसऱ्या दिवशी फडणवीस यांनी एक पत्र तातडीने केंद्रीय मंत्र्याला पाठवले व त्याचे उत्तरही आले आणि तेथेच हे प्रकरण थांबल्याने पाणी कुठेतरी मुरतेय असे सपकाळ म्हणाले.

एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, राज्याला पुर्णवेळ गृहमंत्री नसल्याने कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. कोयता गँग, वाळू माफिया, ड्रग्ज माफिया, आका, खोके आणि बिश्नोई गँग हे त्याचेच परिणाम आहेत. सरकारच अशा प्रवृत्तींना खतपाणी घालत आहे, असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.