Home Blog Page 113

भाजपा महायुती सरकारची शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण’; शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, शेतमालाला हमीभाव द्या: हर्षवर्धन सपकाळ

फडणवीस सरकारकडून महाराष्ट्रधर्म व संविधानांच्या मुल्यांची पायमल्ली; गोलवलकरांचे ‘बंच ऑफ थॉट’ लादण्याचा डाव.

प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या नेतृत्वाखालील सुरतगाव ते तुळजापूर ‘शेतकरी संघर्ष न्याय यात्रेला’ दांडगा प्रतिसाद.

मुंबई/तुळजापूर, दि, ३० मार्च

शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाने त्रस्त असून शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, आत्महत्या वाढल्या आहेत, त्यातच मोदी सरकारने अमेरिकेसमोर सरेंडर होत व्यापार करार केल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, या करारामुळे भारतातील शेती व शेतकरी उद्ध्वस्थ होणार आहे. भाजपा सरकार शेतकरी विरोधी असून फडणवीस सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण, जेवल्याशिवाय खरे नाही’, फडणवीस खोटारडे आहेत, जेव्हा कर्जमाफी मिळेल तेव्हाच खरे, असे म्हणत शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा करा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाने धाराशिवच्या तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव ते तुळजापूर शेतकरी संघर्ष न्याय यात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, यात्रेचे समन्वयक प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस जितेंद्र देहाडे, प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस आदित्य अशोकराव पाटील, दादासाहेब मुंडे, अमर खानापुरे, धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा काँग्रेसचे संघटक राजेंद्र शेरखाने, प्रदेश काँग्रेसचे सचिव पांडुरंग कुंभार, प्रशांत पाटील, अग्नीवेश शिंदे, उमेश राजे निंबाळकर, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष विलास शाळू बीड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राहुल सोनावणे, लातूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अॅड. किरण जाधव, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजेश पावडे यांच्यासह प्रदेश पदाधिकारी कार्यकर्ते, महिला व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस नेते, पदाधिकारी यांच्यासह महिला व शेतकरी मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते. सकाळी सुरु झालेल्या या यात्रेचा समारोप तुळजापूर येथील शारदा मंगल कार्यालयात सभेने झाला. LPG गॅस संकटाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी LPG गॅस ठेवलेले ट्रॅक्टर लोकांचे लक्ष वेधून घेत होते. दुपारच्या सत्रात तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून यात्रेची सुरुवात झाली व त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या हस्ते कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीची महाआरती करण्यात आली.

यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपा सरकारचा खरपूस समाचार घेतला, ते पुढे म्हणाले की, देशात व महाराष्ट्रात भाजपा सरकारचा अनागोंदी कारभार सुरु आहे. शेतकरी, कष्टकरी, महिला, तरुणांचे प्रश्न गंभीर आहेत, महागाई, बेरोजगारी वाढली आहे, LPG सिलेंडर व पेट्रोल,डिझेल मिळत नाही पण सरकार त्याकडे लक्ष देत नाही. देशात हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न सुरु असून संविधानाची पायमल्ली करून गोलवळकरांच्या ‘बंट ऑफ थॉट’ला अभिप्रेत भारत निर्माण करण्याचे षडयंत्र सुरु आहे तर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रधर्माची पायमल्ली करत आहेत. या महाराष्ट्रधर्म बुडव्यांना आई तुळजाभवानी सुबुद्धी देवो व संविधानाला अभिप्रेत भारत घडू दे, असे साकडे घातल्याचेही हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

भोंदूबाबा अशोक खरात प्रकरण अशोभनीय व किळसवाणे..

नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी विचाराच्या राज्यात प्रतिगामी विचार फोफावत असल्याने खरात सारख्या भोंदूबाबांची संख्या वाढत आहे. अशोक खरात प्रकरणातून जे काही उघड होत आहे ते किळसवाणे असून महाराष्ट्रासाठी अशोभनीय आहे. या प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन प्रकरणावर पडदा टाकता येणार नाही, तर यामध्ये जे मंत्री, आमदार, खासदार, सरकारी अधिकारी यांचा सहभाग आहे त्या सर्वांवर अंधश्रद्धाविरोधी कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे व या प्रकरणातील मास्टरमाईंड कोण हे समोर आले पाहिजे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरात प्रकरणाचा छडा लावल्याच्या फुशारक्या मारू नयेत. ८-९ महिन्यांपासून त्यांच्याकडे याची माहिती होती, तर एवढा वेळ ते काय झोपा काढत होते काय? असा प्रश्न विचारून महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळाला पाहिजे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

पुणे, पिंपरी – चिंचवडमध्ये पाऊस; वातावरणात गारवा

पुणे-राज्यात आज पुणे व वाशिम जिल्ह्यासह अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सोमवारी दुपारी अचानक झालेल्या या पावसामुळे उन्हामुळे हैरान झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. पण त्याचवेळी शेतात उभ्या पिकांचे चांगलेच नुकसान झाले.
पुणे शहरात आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारी अचानक पुणे शहर विशेषतः बाणेर, बालेवाडी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यात बाणेर परिसरात मोठी गारपीट झाली. यामुळे रस्त्यांवर गारांचा खच पडल्याचे दिसून आले. सखल भागांत पाणी साचल्याचेही दिसून आले. विजांच्या कडकडाटासह सुरू झालेल्या या पावसामुळे शहरात दुपारच्यावेळीच अंधार झाल्याचे चित्र होते. जवळपास अर्धा तास ही स्थिती होती. या अचानक झालेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच त्रेधातिरपीट उडाली. त्यांनी मिळेल तिथे आसरा घेऊन स्वतःचा पावसापासून बचाव केला.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यात आजपासून 4 एप्रिलपर्यंत ढगाळी वातावरण व दुपारनंतर होणाऱ्या वादळी पावसाचे नवे सत्र सुरू होणार आहे. त्यात प्रामुख्याने खान्देश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, वादळी वारे, पाऊस व काही ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही काही प्रमाणात हवामानात बदल दिसून येऊ शकतो.

…पुणे शहरासह उपनगरांत आज दुपारी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. कडक उन्हाने हैराण झालेल्या शहरवासियांना काहीसा दिलासा मिळाला, मात्र अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. औंध,बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, सिंहगड रस्ता, नगर रस्ता, वडगाव शेरी, विमान नगर, चंदन नगर, कल्याणी नगर या भागात मुसळधार पाऊस झाला.

बाणेर येथे गारांचा जोरदार पाऊस सुरू आहे. तर लोहगाव परिसरात विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. तर मुंढवा, केशवनगर कोरेगाव पार्क खराडीतही पाऊस झाला. वाघोली, फुरसुंगीतही मुसळधार पाऊस झाला.

पुण्यातील काही भागात रस्त्यांवर पाणी साचलं आहे. बी टी कवडे रस्त्यावर जागोजागी पाणी साचले असून वाहनचालकांना वाहने चालवताना त्रास सहन करावा लागत आहे. तर विमाननगर गंगापूरम चौकात पाणी साचल्याने वाहतूक थांबली आहे. विमानतळ रस्त्यावर यामुळे वाहतूक कोंडी झाली आहे .घोरपडी गावात ही मोठ्या प्रणावर पाणी साचलं असून वाहनचालक साचलेल्या पाण्यातून गाड्या चालवत आहेत.

कधी-कुठे पावसाची शक्यता?

30 मार्चच्या तुलनेत 31 मार्च रोजी एकंदरीत वादळी पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. पण या भागांमध्ये काही प्रमाणात अस्थिर हवामान व वादळी पाऊस पडू शकतो. त्यानंतर 1 ते 4 एप्रिलपर्यंत वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे या कालावधीत मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाडा व विदर्भातील अनेक ठिकाणी ढगाळी वातावरण, दुपारनंतरचा वादळी पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना पुढील काही दिवस हवामानाच्या स्थितीनुसार शेतीची कामे नियोजित करावीत, सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू असल्याने काढणी केलेली पिके सुरक्षित साठवून ठेवावीत किंवा झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी, तसेच वादळी वारे, पाऊस व संभाव्य गारपीटीपासून पिकांचे नुकसान टाळण्यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन केले आहे. मेघगर्जना व विजेच्या कडकडाटाच्या वेळी नागरिकांनी व शेतकऱ्यांनी स्वतःची तसेच पाळीव जनावरांची सुरक्षितता सुनिश्चित करावी. अशा वेळी झाडाखाली, टिनशेडखाली, तसेच विद्युत ट्रान्सफॉर्मर, वीजेचे खांब व विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहणे टाळावे, असेही आवाहन या प्रकरणी करण्यात येत आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे बुधवार – गुरूवारी राज्यातील काही भागांत तापमानाचा पारा 39 अंशावर पोहोचला होता. परभणी जिल्हा राज्यातील सर्वाधिक उष्ण जिल्हा ठरला असून बुधवारी येथे 39.2 अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यानंतर सोलापूरमध्ये 39 अंश सेल्सिअस, तर जळगावमध्ये 38.5 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. मराठवाड्यातील काही भागांत पारा 37 अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. या आठवड्यात होणाऱ्या पावसामुळे हा पारा उतरण्याची शक्यता असली तरी शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे.

पुणे प्रार्थना समाजाच्या चैत्रोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात

हरी मंदिर प्रवेशाला ११७ वर्षे पूर्ण
पुणे : पुणे प्रार्थना समाजाच्या हरी मंदिर प्रवेशाला यंदा ११७ वर्षे पूर्ण होत असून, त्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या चैत्रोत्सवाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. ८ एप्रिल १९०९ (चैत्र वद्य षष्ठी) हा हरी मंदिर प्रवेश दिन म्हणून साजरा केला जातो. या परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पुणे प्रार्थना समाजाच्या विश्वस्त व सहचिटणीस नमिता मुजुमदार यांनी दिली.

चैत्रोत्सवानिमित्त शनिवार, ४ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता अर्थविश्लेषक अभय टिळक यांचे व्याख्यान होणार आहे. त्यानंतर रविवार, ५ एप्रिल रोजी ब्राह्मो परंपरेतील सहाव्या पिढीतील रेखा शहानी यांची ईश्वरोपासना आयोजित करण्यात आली आहे. बुधवार, ८ एप्रिल रोजी विचारवंत भास्कर मुजुमदार यांची ऑनलाइन ईश्वरोपासना होणार आहे.

 शनिवार, ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजता डॉ. दिलीप जोग व डॉ. सुषमा जोग यांची संगीतोपासना रंगणार असून, रविवार, १२ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता त्यांची ईश्वरोपासना होणार आहे.

चैत्रोत्सवातील सर्व कार्यक्रमांना नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.

तांत्रिक बिघाडामुळे लिफ्ट कोसळून तरुणाचा करुण अंत; सोसायटीच्या चेअरमनसह 11 जणांवर गुन्हा दाखल


पुणे:येथील एका गृहनिर्माण संस्थेमध्ये लिफ्टचा रोप (दोरी) तुटून झालेल्या भीषण अपघातात एका 25 ते 30 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. याप्रकरणी लिफ्टच्या देखभालीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवत, तळेगाव दाभाडे पोलिसांनी सोसायटीचे
चेअरमन आणि इतर 11 कमिटी सदस्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.मयत दिनेश सुरंगे हे आपल्या कामासाठी लिफ्टने खाली जात असताना ही दुर्घटना घडली. लिफ्ट सहाव्या आणि सातव्या मजल्याच्या दरम्यान अचानक तांत्रिक बिघाडामुळे अडकली. दिनेश यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच, अचानक लिफ्टचा मुख्य रोप (लोखंडी दोरी) तुटला. यामुळे लिफ्ट सातव्या मजल्यावरून प्रचंड वेगाने थेट तळमजल्यावर कोसळली.

या भीषण अपघातात दिनेश सुरंगे यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे परिसरात आणि गृहनिर्माण संस्थेत मोठी खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मयत दिनेश यांच्या भावाने याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोसायटीच्या कमिटीने लिफ्टच्या नियमित सर्व्हिसिंग आणि देखभालीकडे दुर्लक्ष केल्यामुळेच माझ्या भावाचा जीव गेला, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिसांनी सोसायटीचे चेअरमन आणि इतर 11 सदस्यांवर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

रशिया कोणत्याच देशाला देणार नाही पेट्रोल

0

नवी दिल्ली:युद्धामुळे जगातील सर्वात मोठा तेल उत्पादक देश असलेल्या रशियाने मोठा निर्णय घेतला आहे. जागतिक बाजारात रशियाच्या या निर्णयाने खळबळ उडालीय. रशिया सरकारने अधिकृत घोषणा केलीय की एक एप्रिलपासून गॅसोलिन (पेट्रोल) निर्यातीवर पूर्णपणे बंदी घातली जाणार आहे
मध्य पुर्वेत सुरू असलेल्या यु्दधामुळे अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढला आहे. युद्दामुळे कच्च्या तेलाच्या किंमती भडकल्या आहेत. आता यातच रशियाने घेतलेल्या निर्णयाचा फटका रशियावर अवलंबून असलेल्या देशांना बसणार आहे. यात तुर्की, चीन, ब्राझील, आफ्रिका आणि सिंगापूर या देशांचा समावेश आहे.

देशांतर्गत बाजारातील इंधनाच्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी रशियाने हा निर्णय घेतलाय. रशियात पेट्रोलची मागणी वाढली असून सरकारने देशातील नागरीक आणि उद्योगांना पुरेसं इंधन योग्य दरात मिळावं यासाठी निर्यात बंदी घातलीय. इराण अमेरिका युद्धामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. परिणामी रशियाने आपल्या ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य दिलं आहे. रशियन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार निर्यातबंदीमुळे देशातील रिफायनरीमधील साठा सुरक्षित राहील आणि महागाई नियंत्रणात ठेवता येईल.

रशियाकडून थेट पेट्रोलची आयात करणाऱ्या देशांसाठी हा निर्णय धक्कादायक आहे चीन, तुर्की, ब्राझील, सिंगापूर या देशांवर निर्यात बंदीचा मोठा परिणाम होणार आहे. याशिवाय आफ्रिकेतील अनेक देश स्वस्तातल्या रशियन तेलावर अवलंबून आहेत. आता रशियाच्या निर्यातबंदीच्या निर्णयामुळे या देशांना इतर पर्यायांचा शोध घ्यावा लागेल. इतर पर्याय या देशांसाठी महागडे ठरणारे आहेत. याचा परिणाम संबंधित देशांमध्ये महागाईवर होऊ शकतो. पेट्रोलच्या किंमतीत वाढही होऊ शकते.

मध्य पुर्वेत सुरू असलेल्या संघर्षामुळे लाल समुद्रातून होणारा व्यापार धोक्यात आला आहे. रशियाने निर्यात बंदी केल्यामुळे हा धोका आणखी वाढला आहे. जर ही बंदी जास्त काळ राहिली तर जगभरातील शेअरबाजार आणि वाहतूक खर्च यावर नकारात्मक परिणाम होईल.

भारत एकूण कच्च्या तेलापैकी बहुतांश कच्चं तेल रशियाकडून स्वस्तात खरेदी करते. मात्र रशियाने पेट्रोलवर बंदी घातली आहे. कच्च्या तेलावर नाही. त्यामुळे भारताला आवश्यक असलेलं कच्चं तेल मिळण्यात अडचण येणार नाही. कच्चे तेल खरेदी करून भारतात त्याचं रिफायनिंग होऊ शकते. रशियाच्या या निर्णयाचा थेट भारतावर परिणाम होणार नाही. मात्र कच्च्या तेलाच्या किंमती आणखी वाढल्यास भारतातही पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ अशा अद्‌भुत सादरीकरणाला रसिकांची भरभरून दाद

पुणे : ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ या रागप्रभा संगीतोत्सवात ‘मारवा’, ‘केदार’, ‘बिहाग’, ‘जोग बहार’, ‘मालकंस’, ‘जोग’ आदी सायंकालीन व रात्रौकालीन रागांचा आनंद रसिकांना सकाळच्या प्रहरात अनुभवायला मिळाला. कालप्रहराचे बंधन न स्वीकारता झालेले सादरीकरण रसिकांनी सहजतेने स्वीकारत त्यांचा आनंद घेत उपक्रमाला भरभरून दाद दिली.

डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशन आयोजित ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ रागप्रभा या संगीतोत्सव व परिसंवादाचे आयोजन रविवारी (दि. २९) बालगंधर्व रंगमंदिरात करण्यात आले होते. सकाळी ९ ते दुपारी २ या वेळात पद्श्री पंडित व्यंकटेशकुमार, पद्मश्री पंडित रोणु मजुमदार, पंडित आनंद भाटे तसेच पद्मभूषण पंडित साजन मिश्रा व स्वरांश मिश्रा यांचे सादरीकरण झाले.

संगीतोत्सवाचे उद्‌घाटन पंडित अरुण कशाळकर, पद्मश्री पंडित व्यंकटेशकुमार यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. या प्रसंगी डॉ. प्रभा अत्रे फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. अशोक वळसंगकर, विश्वस्त डॉ. रघुवीर कुलकर्णी, ॲड. अनिरुद्ध वळसंगकर, कार्यक्रम निर्देशक प्रसाद भडसावळे मंचावर होते.

बदलांमुळे नवीन विचारांना स्थैर्य : पंडित अरुण कशाळकर…

उद्‌घाटनपर मनोगत व्यक्त करताना पंडित अरुण कशाळकर म्हणाले, सांगीतिक क्षेत्रात परंपरा कितीही घट्ट असल्यातरी कालानुरूप त्यात बदल होत असतात. हे बदल होणे म्हणजेच कला जीवंत असण्याचे लक्षण होय. बदलांची प्रक्रिया सातत्याने घडत असते आणि या बदलांमुळे नवीन विचारांना स्थैर्य मिळते. बदलाची ही प्रक्रिया सातत्याने सुरू राहणे आवश्यक असून त्या करिता विचारांचे अदानप्रदान होणे गरजेचे आहे. कलाकार या बदलातून कलेला एक दिशा देण्याचे कार्य करीत असतात. हे रुजलेले बदल परंपरा रूपाने पुढे येत जातात.

पंडित व्यंकटेशकुमार म्हणाले, ‘राग प्रहराच्या संकल्पनेपासून मुक्त’ ही अभिवन संकल्पना राबविणारे पुणे हे पहिले शहर आहे, याचे कौतुक वाटते.

संगीतोत्सवाची सुरुवात पंडित व्यंकटेशकुमार यांच्या गायनाने झाली. त्यांनी सायंकालीन राग म्हणून प्रचलित असलेला राग मारवा सादर करून त्यानंतर राग केदारची झलक दर्शविली. सायंकाळी व्याकुळ करणाऱ्या स्वरांची जादू रसिकांना सकाळच्या प्रहरातही मोहित करून गेली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला), शिवराज पाटील, नागराज नागेश (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली.

या नंतर पंडित रोणु मजुमदार यांचे बासरीवादन रंगले. त्यांनी रात्रीच्या पहिल्या प्रहरात सादर होणारा राग बिहाग अतिशय तरलतेने साकारला. कुठलाही राग कुठल्याही वेळी प्रभाव पाडू शकतो या प्रभाताईंच्या विचाराला समर्पक असे हे सादरीकरण रंगले. यानंतर त्यांनी मैहर घराण्याचे वैशिष्ट्य दर्शवत राग जोगबहार या जोड रागाची झलक ऐकविली. त्यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध झाले. पंडित रामदास पळसुले (तबला), कल्पेश माचला (बासरी सहवादन) यांनी रंगतदार साथ केली.

पंडित आनंद भाटे यांनी रात्रीच्या दुसऱ्या प्रहरात गायला जाणारा राग मालकंस ऐकवून रसिकांना संमोहित केले. त्यानंतर राग बसंत मल्हारमधील सुमधुर रचना सादर केली. त्यांना सुयोग कुंडलकर (संवादिनी), भरत कामत (तबला), स्वप्नील गायकवाड, ललित देशपांडे (तानपुरा) यांनी साथ केली.

सकाळच्या सत्राची सांगता बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध गायक पंडित साजन मिश्रा व त्यांचे सुपुत्र स्वरांश मिश्रा यांच्या गायनाने झाली. त्यांनी जोग रागाचे मनमोहक दर्शन घडवत रसिकांना अनोखा आनंद दिला. प्रभा अत्रे या फक्त गायिकाच नव्हे तर एक महान चिंतक होत्या, असे सांगून रागप्रहराच्या पलिकडे जाऊन केलेले सादरीकरण हे त्यांच्या संकल्पनेला अनुरूप असल्याचे पंडित साजन मिश्रा म्हणाले. चारूकेशी रागातील गुरूंचे महात्म्य सांगणाऱ्या बंदिशीने त्यांनी मैफलीची सांगता केली. स्वरांश मिश्रा यांच्या सादरीकरणालाही रसिकांनी भरभरून दाद दिली. राहुल गोळे (संवादिनी), सौरभ गुळवणी (तबला), निषाद व्यास, अथर्व वैरागकर (तानपुरा, सहगायन) यांनी साथ केली.

उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत FLNAT परीक्षा राज्यभर यशस्वीपणे संपन्न

0

पुणे, दि. २९ – केंद्र शासन पुरस्कृत “उल्लास-नव भारत साक्षरता कार्यक्रम” अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी (FLNAT) रविवार, दि. २९ मार्च २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये यशस्वीपणे पार पडली.

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सन २०२२-२३ ते २०२६-२७ या कालावधीत असाक्षरांना साक्षर करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. सन २०२५-२६ या वर्षात उल्लास अॅपवर नोंदणी झालेल्या असाक्षरांसाठी ही परीक्षा राज्यातील सर्व युडायस प्राप्त शाळांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू, गुजराती, कन्नड, तेलगू, तामिळ व बंगाली या नऊ माध्यमांतून घेण्यात आली.

या परीक्षेत निकषानुसार उत्तीर्ण होणाऱ्या नवसाक्षरांना केंद्र शासनाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत प्रमाणपत्र व गुणपत्रक प्रदान करण्यात येणार आहे. या चाचणीमुळे आर्थिक, कायदेविषयक, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य जागरूकता, बालसंगोपन, शिक्षण व कुटुंब कल्याण यांसारखी जीवनावश्यक कौशल्ये विकसित होण्यास मदत होणार असून त्यांच्या जीवनमान उंचावण्यास हातभार लागणार आहे.

यापूर्वी दि. २१ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या परीक्षेत सुमारे ५ लाख असाक्षरांनी सहभाग नोंदविला होता. तर यंदा दि. २९ मार्च २०२६ रोजी सुमारे १.२३ लाख असाक्षर व्यक्तींनी नोंदणी केली असून त्यापैकी अंदाजे १ लाख परीक्षार्थींनी प्रत्यक्ष परीक्षा दिली.

या परीक्षेसाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे व राज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुभेच्छा दिल्या. तसेच प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनीही परीक्षेसाठी शुभेच्छा देत असाक्षरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते.

राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ‘जिल्हा परीक्षा निरीक्षक’ म्हणून शिक्षण संचालनालयातील संचालक, सहसंचालक व उपसंचालक यांनी भेटी देऊन परीक्षेचे निरीक्षण केले. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राचार्य (डायट), गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख यांनीही परीक्षा केंद्रांना भेटी देऊन कामकाजाची पाहणी केली.

केंद्र शासनाच्या शिक्षण मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी देखील विविध परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. राज्यातील माध्यम प्रतिनिधींनी या उपक्रमाला व्यापक प्रसिद्धी दिली. तसेच शिक्षक संघटना, मुख्याध्यापक व शिक्षक यांनी सुयोग्य नियोजन करून परीक्षा यशस्वीपणे पार पाडली.

या सर्व संबंधितांचे शिक्षण संचालक (योजना) तथा सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य, पुणे श्री. कृष्णकुमार पाटील यांनी अभिनंदन व आभार मानले आहेत.

अमेरिकेत ट्रम्पविरोधात 80 लाख लोकांचा मोर्चा:3,300 ठिकाणी निदर्शने, इराण युद्ध आणि महागाईवरून पदावरून हटवण्याची मागणी

अमेरिकेत शनिवारी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या विरोधात झालेल्या ‘नो किंग्स रॅली’मध्ये 80 लाख लोकांनी भाग घेतला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संपूर्ण अमेरिकेतील सर्व 50 राज्यांमध्ये 3,300 पेक्षा जास्त ठिकाणी हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

आयोजकांनी सांगितले की, ऑक्टोबरमध्ये झालेल्या मागील नो किंग्स आंदोलनाच्या तुलनेत यावेळी सुमारे 10 लाख अधिक लोक सहभागी झाले आणि जवळपास 600 हून अधिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

आंदोलन करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे की, ते ट्रम्प सरकारच्या अनेक धोरणांवर नाराज आहेत. त्यांचा राग विशेषतः इराणसोबत वाढलेला तणाव, कठोर इमिग्रेशन कारवाई आणि वाढत्या महागाईबद्दल आहे. अनेक ठिकाणी लोकांनी ट्रम्प आणि उपराष्ट्रपती जेडी वेंस यांच्या विरोधात पोस्टर्स दाखवले आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.

व्हाईट हाऊसने या आंदोलनांना ‘थेरपी सेशन’ असे संबोधत म्हटले की, सामान्य लोकांना याचा फारसा फरक पडत नाही. तर ट्रम्प यांचे म्हणणे आहे की, त्यांचे निर्णय देशाला मजबूत करण्यासाठी आहेत. त्यांनी असेही म्हटले की, ते ‘राजा’ नाहीत आणि त्यांच्यावर लावण्यात आलेले आरोप चुकीचे आहेत.फक्त अमेरिकेतच नाही, तर जगाच्या इतर भागांमध्येही ट्रम्प यांच्याविरोधात नाराजी दिसून आली आहे. पॅरिस, लंडन आणि लिस्बनसारख्या शहरांमध्येही लोकांनी रस्त्यावर उतरून ट्रम्प यांच्याविरोधात निदर्शने केली आणि त्यांना पदावरून हटवण्याची मागणी केली.

धायरी येथील बेनकरनगर रस्त्यावर अवजड वाहनांमुळे पाणी, मैलापाणी चेंबर, वाहिन्यांंचा चुराडा

वाहतूक बंद न केल्यास रास्ता रोको आंदोलन

पुणे:
धायरी येथील बेनकरनगर मधील सर्व्ह क्रमांक पाच मध्ये रस्त्याचे काम सुरू असल्याने वाहतूक पर्यायी रस्त्याला वळविण्यात आली आहे. ‌ या अरुंद रस्त्यावर दगड खडी क्रेशंड अशी वाहतूक करणाऱ्या अवजड डंपर, ट्रकमुळे जलवाहिन्या, मैलापाणी वाहिन्या आणि चेंबरची चुराडा झाला आहे. रस्त्यावर मैलापाणी वाहत आहे.त्यामुळे हजारो नागरिकांना गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.
अवजड वाहनांमुळे वाहतूक कोंडी, अपघातही वाढले आहे. वाहतूक विभाग, पालिका
प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना कोणी वाली उरला नाही.
पाणी पुरवठा, मैलापाणी चेंबरचा चुराडा करणाऱ्या,
वाहतूक कोंडी, अपघातास जबाबदार असलेल्या सर्व प्रकारच्या ट्रक, डंपर आदी अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी अन्यथा तीव्र जन आंदोलन करण्याचा निर्धार संतप्त नागरिकांनी केला आहे.
या बाबत आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर यांनी पालिका प्रशासनाला निवेदन दिले आहे.
आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर म्हणाले, बेनकर येथिल मुख्य रस्त्याचे काम अतिशय मंदगतीने सुरू आहे त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून पर्यायी रस्त्याने वाहतूक सुरू आहे. अत्यंत अरुंद व दाट लोकवस्त्या , सोसायट्या मोठे जाळे या ठिकाणी आहे. वाहतूक वळविण्यात आली असली तरी अवजड वाहनांमुळे रस्त्यावरील मैलापाणी , जलवाहिन्यांची चेंबर तुटून धो धो पाणी वाहत आहे. मैलापाणी घरात शिरत आहे.‌सोसायट्या, घराच्या दारात मैलापाणी, सांडपाण्याची तळी साठली. दुर्गंधीमुळे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे तातडीने अवजड वाहनांना पर्यायी रस्त्याने ये जा करण्यास बंदी घालण्यात यावी.
स्थानिक रहिवाशांसह विद्यार्थी , महिला, जेष्ठ नागरिक आदींना पर्यायी रस्त्याने चालणेही धोकादायक झाले आहे. डंपर ट्रकच्या धडकेत माणसे, मुले जखमी होत आहेत. त्यामुळे मोठ्या दुर्घटनांची टांगती तलवार उभी आहे. दुकानदार, छोटे व्यावसायिक आदींना दुकाने उघडपणे धोकादायक झाले आहे.‌ डंपर ट्रक थेट दुकानात शिरत आहे. या पर्यायी अरुंद रस्त्यावर अवजड वाहनांमुळे रिक्षा , दुचाकी, मीनी स्कूल बस आदी वाहने अडकुन पडत आहेत. समोरासमोर वाहनांना ये जा करत येत नाही या गंभीर समस्येकडे आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष धनंजय बेनकर व रहिवाशांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.

पीएमपी वाहकाकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग:सहकारनगर पोलिसांनी आरोपीला केली अटक

पुणे-पीएमपी बसमध्ये अल्पवयीन प्रवासी युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका वाहकाला सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरिफ जलील शेख (वय ३५, रा. चौधरीनगर, विश्रांतवाडी) असे अटक करण्यात आलेल्या वाहकाचे नाव आहे. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.पीडित युवतीच्या आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी शेखविरुद्ध विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण (पोक्सो) अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित युवती कात्रज आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होती. आरोपी शेख हा त्याच बसमध्ये वाहक म्हणून कार्यरत होता. प्रवासादरम्यान त्याने युवतीला त्याचा मोबाइल क्रमांक देण्याचा प्रयत्न केला.युवतीने त्याचा प्रयत्न हाणून पाडत नकार दिल्यानंतर, आरोपी शेखने तिला स्पर्श करून विनयभंग केला. या प्रकारानंतर युवतीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून इतर प्रवाशांनी बस थांबवली आणि वाहक शेखला पकडले.
प्रवाशांनी युवतीकडे विचारणा केली असता, वाहक शेखने तिचा विनयभंग केल्याचे समोर आले. त्यानंतर प्रवाशांनी शेखला पोलिसांच्या ताब्यात दिले. सहायक पोलिस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या आणखी एका घटनेत, एका ज्येष्ठ नागरिकाविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका दहा वर्षांच्या मुलीशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप त्याच्यावर आहे.या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने सिंहगड रस्ता पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी ६६ वर्षीय ज्येष्ठ नागरिक असून, तो हिंगणे खुर्द परिसरातील एका सोसायटीत राहतो. त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तक्रारदार महिलेच्या मुलीला आरोपीने वाईट पद्धतीने स्पर्श केला होता. मुलीने ही बाब आपल्या आईला सांगितल्यानंतर, आईने तात्काळ पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिस उपनिरीक्षक माधुरी काजळे या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पुणे विमानतळ देशात अव्वल,सेवा गुणवत्तेत प्रथम क्रमांक

पुणे: देशातील सर्व विमानतळांवर प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सेवांची गुणवत्ता आणि त्यांच्या समाधानाबाबत झालेल्या सर्वेक्षणात पुणे विमानतळाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्यात पुणे विमानतळ देशात सर्वोत्तम ठरले आहे. सातत्यपूर्ण सेवा सुधारणा, प्रवाशांना गुणवत्तापूर्ण सुविधा आणि कार्यक्षम व्यवस्थापनामुळे पुणे विमानतळाने हा बहुमान मिळविला आहे.

भारतीय विमानतळ प्राधिकरणाने जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, पुणे विमानतळाने सेवा गुणवत्तेत उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या स्पर्धेत गोवा विमानतळाला द्वितीय, तर इंदूर विमानतळाने तृतीय क्रमांक मिळविला आहे. त्यामुळे पुणे विमानतळाच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा रोवला गेला आहे.

देशातील सर्व विमानतळांवर ‘एसीआय-एसीक्यू सर्व्हे २०२५’ (एअरपोर्ट क्वालिटी सर्व्हे) करण्यात आला. हे सर्वेक्षण पूर्णपणे प्रवाशांच्या अनुभवावर आधारित होते. यामध्ये विमानतळावरील स्वच्छता, सुरक्षा व्यवस्था, प्रवेश प्रक्रिया (चेक-इन), कर्मचारी वर्गाची वर्तणूक, उपलब्ध सोयी-सुविधा आणि समाधान अशा विविध निकषांचा विचार करण्यात आला. या सर्व आघाड्यांवर पुणे विमानतळाने बाजी मारली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या ३१ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, ३१ मार्च २०२६ रोजी या पुरस्कारांचे वितरण करण्यात येईल. या वेळी पुणे विमानतळाच्या अधिकाऱ्यांना विशेष सन्मानित केले जाणार आहे.

या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘पुणे विमानतळाने देशात प्रथम क्रमांक मिळवणे ही अभिमानाची बाब आहे. प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे हे यश आहे. आगामी काळातही पुणे विमानतळ प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा देण्यासाठी कटिबद्ध राहील.’

पुणे विमानतळावर वाढलेल्या स्मगलिंग चा पर्दाफाश:सीमाशुल्क विभागाने २७ कोटीचा गांजा पकडला,

थायलंडहून संत्र्यांच्या पिशव्यांमध्ये आला 76.58 किलो गांजा
पुणे-पुणे सीमाशुल्क विभाग यांनी मोठी कारवाई करत सुमारे 26.80 कोटी रुपये किमतीचा 76.58 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. ही कारवाई पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एअर कार्गो विभागात करण्यात आली.थायलंडहून आलेली आयात वस्तू मध्ये ‘मँडरीन संत्र्याच्या पिशव्या’ म्हणून घोषित करण्यात आली होती. हा माल पांढऱ्या थर्मोकोलच्या खोक्यांमध्ये पॅकिंग करण्यात आला होता. स्कॅनिंगदरम्यान प्रतिमा संशयास्पद वाटल्याने अधिकाऱ्यांनी एक खोका उघडून तपासणी केली.

तपासणीदरम्यान सीलबंद टिनचे डबे आढळले. त्यामध्ये मिठासारखी पांढरी दाणेदार पावडर दिसून आली. पुढील तपासात त्या पावडरमध्ये लपवलेले व्हॅक्यूम सील प्लास्टिक पॅक सापडले, ज्यामध्ये हायड्रोपोनिक गांजा ठेवण्यात आला होता.

यानंतर संपूर्ण खोकी तपासण्यात आली आणि एकूण 76.58 किलो गांजा जप्त करण्यात आला. या मालाची किंमत भारतीय अवैध बाजारात सुमारे 23.80 कोटी रुपये असल्याचे स्पष्ट झाले.सीमाशुल्क विभागाने तत्काळ शोधमोहीम सुरू केली असून आतापर्यंत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

हायड्रोपोनिक गांजा म्हणजे मातीशिवाय पाण्यात आणि विशेष पोषक द्रव्यांच्या सहाय्याने उगवलेला कॅनॅबिस होय. या आधुनिक शेती पद्धतीला हायड्रोपोनिक्स असे म्हटले जाते. या तंत्रामध्ये तापमान, प्रकाश, आर्द्रता आणि पोषक द्रव्यांचे प्रमाण नियंत्रित ठेवून वनस्पतींची वाढ केली जाते, त्यामुळे तयार होणारा गांजा अधिक दर्जेदार आणि प्रभावी मानला जातो.

इराण युद्धावर पाकिस्तानची 3 देशांसोबत बैठक:सौदी-तुर्कस्तान आणि इजिप्तचे परराष्ट्र मंत्री इस्लामाबादला

इराणमधील युद्ध संपवण्यासाठी पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे सौदी अरेबिया, तुर्कस्तान आणि इजिप्तच्या परराष्ट्रमंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे. पाकिस्तान या बैठकीचे आयोजन करत आहे.इजिप्तचे परराष्ट्रमंत्री बद्र अब्देलत्ती यांनी पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री इशाक डार यांची भेट घेतली आहे. यासोबतच, इशाक डार तुर्कस्तानचे परराष्ट्रमंत्री हाकान फिदान आणि सौदीचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान यांच्यासोबत स्वतंत्र बैठका देखील घेतील. येथे ते पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांचीही भेट घेतील.पाकिस्तानने अमेरिका आणि इराण यांच्यात मध्यस्थीची भूमिका बजावण्याची ऑफर देखील दिली आहे. त्याने इराणला 15 कलमी अमेरिकन प्रस्तावही सादर केला आहे.

यात इराणचा अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करणे, क्षेपणास्त्र कार्यक्रम कमी करणे, प्रादेशिक प्रॉक्सी गटांना समर्थन थांबवणे आणि निर्बंधांमध्ये सवलत यांसारख्या मुद्द्यांचा समावेश आहे. इराण या प्रस्तावाचा आढावा घेत आहे.
दुसरीकडे, अमेरिकेने मध्य पूर्वेत आपली लष्करी उपस्थिती आणखी वाढवली आहे. अमेरिकेची युद्धनौका यूएसएस त्रिपोली सुमारे ३,५०० सैनिकांसह (मरीन आणि नौदल) या प्रदेशात पोहोचली आहे.

पाकिस्तानचे इराण आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यामुळे पाकिस्तानला परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीसाठी एक उत्तम ठिकाण मानले जात आहे. ही बैठक आधी तुर्कस्तानमध्ये होणार होती, पण नंतर ती पाकिस्तानमध्ये हलवण्यात आली.पाकिस्तान सध्या कोणत्याही एका बाजूने थेट सहभागी नाही, त्यामुळे त्याला तटस्थ ठिकाण मानले जात आहे. त्याचे इराण आणि सौदी अरेबिया या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत, त्यामुळे चर्चा सोपी आहे. तुर्कस्तान आणि इजिप्तसारख्या देशांशीही पाकिस्तानचे संबंध चांगले आहेत.

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीतील उद्योगांना पाईपद्वारे नैसर्गिक गॅस जोडणीसाठी मिशन मोडवर मोहीम –उद्योगमंत्री उदय सामंत

रिनिव्हेबल एनर्जी मोहिमेतून सोलार प्रकल्पांसाठी जागा उपलब्ध करून देणार

पुणे- जिल्ह्यातील उद्योगांना अखंडित आणि विश्वासार्ह ऊर्जा पुरवठा मिळावा यासाठी पाईपद्वारे नैसर्गिक गॅस (PNG) जोडणी शंभर टक्के पूर्ण करण्याच्या दृष्टीने “मागेल त्या उद्योगाला जोडणी” या तत्त्वावर मिशन मोडमध्ये विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली. यासाठी संबंधित विभागांनी परस्पर समन्वय साधून विशेष कॅम्पचे आयोजन करावे, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयोजित उद्योग आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार (दूरदृश्य प्रणालीद्वारे), जिल्हा पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत, अपर पोलीस आयुक्त रंजन शर्मा, पुणे महानगरपालिकेचे अपर आयुक्त ओमप्रकाश दिवटे, तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष भिसे, जिल्हा पुरवठा अधिकारी महेश सुधाळकर आणि विविध उद्योग संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

उद्योगमंत्री श्री.सामंत म्हणाले की, सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत उद्योगांची उत्पादन क्षमता अबाधित राखणे ही राज्याच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. नैसर्गिक गॅस हा उद्योगांसाठी स्वस्त, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक ऊर्जा स्रोत असल्याने कोणत्याही उद्योगाला केवळ गॅस जोडणीअभावी अडथळे निर्माण होऊ नयेत. त्यामुळे एमआयडीसी, गॅस वितरण कंपन्या आणि जिल्हा प्रशासन यांनी एकत्रितपणे नियोजन करून प्रत्येक पात्र उद्योगापर्यंत PNG जोडणी पोहोचवावी.

एलपीजी गॅस पुरवठ्याबाबत त्यांनी स्पष्ट केले की, घरगुती गॅसला प्राधान्य दिले जात असून व्यावसायिक गॅसचा पुरवठा केंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार केला जात आहे. कृत्रिम टंचाई निर्माण करून काळाबाजार करणाऱ्या एजन्सींवर जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येईल. अशा प्रकारचे प्रकार आढळल्यास नागरिकांनी तात्काळ ११२ या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले.

या मोहिमेंतर्गत जिल्हानिहाय व औद्योगिक वसाहतीनिहाय विशेष शिबिरे आयोजित करून अर्ज प्रक्रिया सुलभ करणे, तांत्रिक तपासणी जलद गतीने पूर्ण करणे आणि प्रलंबित प्रकरणे निकाली काढणे यावर भर दिला जाणार आहे. “इझ ऑफ डुइंग बिझनेस”च्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

रिनिव्हेबल ऊर्जा धोरणाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, उद्योगांना सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी एमआयडीसीमधील उपलब्ध जागा ३० वर्षांच्या दीर्घकालीन करारावर उपलब्ध करून दिली जाईल. त्यामुळे उद्योगांना वीज खर्चात बचत होऊन स्वयंपूर्ण ऊर्जाव्यवस्था उभारता येईल. इच्छुक उद्योगांनी पुढाकार घेतल्यास आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

उद्योगांसमोरील इतर अडचणींबाबत बोलताना त्यांनी जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग, महानगरपालिका आणि एमआयडीसी यांनी समन्वयाने काम करून उद्योगांसाठी सुरक्षित व अनुकूल वातावरण निर्माण करण्यावर भर दिला. लॉजिस्टिक, पायाभूत सुविधा आणि सुरक्षा यांचा समतोल राखणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, एमआयडीसी क्षेत्रातील अंतर्गत रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी सुमारे ३५० कोटी रुपयांची विकासकामे सुरू असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. हिंजवडी औद्योगिक परिसरात तात्पुरत्या मोबाईल टॉयलेटच्या ऐवजी कायमस्वरूपी स्वच्छतागृहांची उभारणी करण्यासाठी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून देण्यात आली असून उद्योग संघटनांनी पुढाकार घेऊन ही सुविधा उभारावी, असे आवाहन करण्यात आले. तसेच, पोलीस स्टेशनसाठी उपलब्ध करून दिलेल्या जागेवर उद्योग संघटनांनी बांधकाम करून सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे निर्देश देण्यात आले.

बारामती एमआयडीसीच्या धर्तीवर हिंजवडी, पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक पट्ट्यांमध्ये जागतिक दर्जाचे कॉर्पोरेट गेस्ट हाऊस उभारण्याचा प्रस्तावही मांडण्यात आला. यामुळे उद्योग प्रतिनिधी, गुंतवणूकदार आणि तज्ज्ञांना दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच, ज्या ठिकाणी ट्रक टर्मिनलची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी एमआयडीसीकडून जागा उपलब्ध करून संबंधित उद्योग संघटनांकडून त्याचे व्यवस्थापन करण्याची संकल्पनाही पुढे आली.

युद्धजन्य परिस्थितीमुळे विशेषतः लघुउद्योगांवर आर्थिक ताण निर्माण झाल्याने वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी उद्योग संघटनांकडून करण्यात आली. या मागणीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.

उद्योगांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी प्रत्येक एमआयडीसी क्षेत्रात उद्योग प्रतिनिधी, जिल्हा प्रशासन आणि पोलीस यांच्यात समन्वय वाढविण्यासाठी व्हॉट्सअॅप गट स्थापन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी उद्योगमंत्र्यांच्या निर्देशानुसार लवकरच विशेष बैठक घेऊन या सर्व निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे सांगितले.

ऊर्जा परिवर्तनातून स्वस्त, शाश्वत विजेकडे वाटचाल; महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार

मुंबई, दि. २९ मार्च २०२६: मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ऊर्जा परिवर्तनाद्वारे विद्युत क्षेत्राला नवी दिशा मिळाली आहे. त्यातून स्वस्त व शाश्वत विजेकडे वाटचाल सुरु झाली आहे. या कामगिरीचा सन्मान म्हणून नवी दिल्ली येथे शनिवारी (दि. २८) स्कोच समूहाच्या वतीने महावितरणला राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले. कार्यकारी संचालक श्री. भुजंग खंदारे व कार्यकारी अभियंता श्री. रोहित जोगदंड यांनी हा पुरस्कार स्विकारला.

महाराष्ट्राची अर्थव्यवस्था एक ट्रिलिअन डॉलर्सची करण्यासाठी आगामी काळातील ऊर्जेची मागणी लक्षात घेता मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार अपर मुख्य सचिव (ऊर्जा) आभा शुक्ला यांनी रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅन तयार केला आहे. त्यानुसार सन २०३० पर्यंत तब्बल ३९ हजार ५०० हजार मेगावॅट हरित ऊर्जेसह ४५ हजार मेगावॅट विजेची आणखी भर पडणार आहे. त्यामुळे नवीकरणीय ऊर्जेची क्षमता १३ टक्क्यांवरून ५२ टक्के होईल. तसेच सुमारे ३ लाख ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून सुमारे ७ लाख रोजगार निर्माण होणार आहेत. पुढील पाच वर्षांमध्ये वीज खरेदीमध्ये ८२ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याने सर्व वर्गवारीचे वीज दर कमी होत जाणार आहे. यात सन २०२९-३० पर्यंत सर्व वर्गवारीतील वीज दर कमी करण्यास मा. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने नुकतीच मंजुरी दिली आहे.

रिसोर्स अॅडेक्वेसी प्लॅनला अनुसरून महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. लोकेश चंद्र यांनी ऊर्जा परिवर्तनाला मोठा वेग दिला आहे. महावितरणने प्राधान्य दरांवर सर्व ऊर्जा स्त्रोतांमध्ये आतापर्यंत ७२ हजार ९१८ मेगावॅट क्षमतेच्या वीज खरेदीचे दीर्घकालीन करार (पीपीए) केले आहेत. यामध्ये ४७ हजार ३४७ मेगावॅट (६५ ट्क्के) अपारंपरिक ऊर्जेचा समावेश आहे. महावितरणच्या वीज खरेदीमध्ये १० हजार कोटींच्या वार्षिक बचतीसोबतच क्रॉस सबसिडीमध्ये १३ हजार ५०० कोटींनी वार्षिक बोजा कमी होणार आहे. त्यामुळे प्रामुख्याने औद्योगिक व व्यावसायिक विजेचे दर स्वस्त होत जाणार आहेत.

ऊर्जा परिवर्तनामध्ये प्रामुख्याने सौर ऊर्जा क्षेत्रात महावितरणने मोठी आघाडी घेतली आहे. शेतकऱ्यांना प्रामुख्याने दिवसा व शाश्वत वीजपुरवठा करणे, वीज खरेदीचा व पर्यायाने अनुदानाचा बोजा कमी करणे, औद्योगिक व व्यावसायिक वीजदर कमी करणे यासाठी जगातील सर्वात मोठ्या १६ हजार मेगावॅट क्षमतेच्या विक्रेंद्रीत सौर ऊर्जा प्रकल्पांची ‘मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.०’ सुरु करण्यात आली. या योजनेतून ११ लाख ५६ हजार आणि मागेल त्याला सौर कृषिपंप योजनेतून ८ लाख ८० हजार अशा एकूण २० लाख ३६ हजार शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे. यासह प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत आतापर्यंत राज्यात ५ लाख २ हजारांवर घरगुती ग्राहकांकडे १९०४ मेगावॅट क्षमतेचे छतावरील सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित झाले आहे व त्यांचे मासिक वीजबिल देखील शून्यवत झाले आहे.