Home Blog Page 114

निर्लज्जासारखे टोल वसुली करता..एक्स्प्रेस वे: 24 तासांनंतरही वाहतूक कोंडी कायम,लोकांचा संताप..

एक टँकर पलटी झाला आणि २४ तास मुंबई – पुणे एक्सप्रेस वे ठप्प झाला. ९२ किमीचा हाईवे टोल ३२०/- आणि एका टँकर गॅस लीकनंतर २४ तास बंद.

मुंबई : जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील खोपोली टोल नाक्याजवळ प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. केमिकल वाहून नेणाऱ्या टँकरचा अपघात झाल्यामुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गेल्या 24 तासांपासून वाहतूक ठप्प झाली आहे. अशाही स्थितीत प्रवाशांकडून टोल वसुलीकेली जात असल्याने लोकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यावर टोल वसुली न करण्याच्या सूचना देऊ असं सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना सांगतिले आहे .

मंगळवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ एक केमिकल वाहून नेणारा टँकर पलटी झाला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक, जुना मुंबई- पुणे हायवे जॅम झाला. या गोष्टीला जवळपास 24 तास झाले असले तरी तो टँकर बाजूला काढण्यामध्ये प्रशासनाला अपयश आल्याचं दिसतंय.

या हायवेवर टँकर पलटी झाला असतानाही या ठिकाणी आरआरबीचे कोणतेही अधिकारी किंवा प्रशासनाचे कोणतेही अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे जुन्या महामार्गावरुन मोठ्या संख्येनं प्रवासी निघाल्याने खोपोलीजवळ वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. महत्त्वाचं म्हणजे या महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याची सूचना प्रशासनाने दिली नाही. त्यामुळेच अनेक प्रवाशांवर या ठिकाणी गेल्या 24 तासांपासून ट्रॅफिकमध्ये अडकण्याची नामुष्की आल्याचं दिसून आलं. यामुळेच प्रवाशांनी त्यांचा संताप व्यक्त केला.
एकीकडे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं दिसून आलं. अशाही परिस्थितीत या महामार्गावर टोल वसुली केली जात असल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. यावर सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांना प्रश्न विचारले गेलेत .

इंद्रनील नाईक म्हणाले की, “तूर्तास हा मार्ग मोकळा करण्यासाठी प्राथमिकता आहे. ही घटना आज घडली आहे ती चुकीची असून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढणार आहे. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्यावरही भर देणार आहोत. याबाबत पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणं झालं आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर झालेल्या वाहतूक कोंडीनंतर त्या ठिकाणी टोल वसुली न करण्याच्या सूचना आम्ही देऊ.”

या वाहतूक कोंडीचा सर्वाधिक फटका पहाटेच्या सुमारास प्रवास करणाऱ्यांना बसल्याचं दिसून आलं. तसेच या वाहतूक कोंडीत काही कॅन्सरग्रस्त रुग्ण आणि इतर गंभीर आजारी रुग्ण अडकल्याची माहिती आहे. तासनतास ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रवाशांना प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याचीदेखील सोय करण्यात आलेली नाही. मात्र टोलनाक्यांवर टोलवसूली मात्र न चूकता सुरूच आहे. निर्ढावलेले टोल कर्मचारी वाहतूक कोंडीची माहिती देत नसल्याने, संतापात आणखीनच भर पडली.

चीन प्रश्नी भूमिका स्पष्ट करा, माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे पुस्तक तात्काळ प्रसिद्ध करा

केंद्रातील मोदी सरकारविरोधात मुंबई युवक काँग्रेसचे आंदोलन.

मुंबई, दि. ४ फेब्रुवारी..

चीन प्रश्नी मोदी सरकारचा गलथानपणा आणि लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना बोलू न दिल्याच्या निषेधार्ह मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेस कार्यालय, राजीव गांधी भवन परिसरात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी “नरेंद्र सरेंडर हो गया” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. केंद्रातील मोदी सरकार विरोधात संतप्त भावना व्यक्त करत युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारकडून तात्काळ उत्तरांची मागणी केली.

देशाच्या सुरक्षेशी संबंधित प्रश्नांवर मोदी सरकार मौन बाळगत असून सत्य दडपले जात आहे. गलवान प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी काय लपवत आहे. असा प्रश्न उपस्थित करून चीन प्रश्नावर मोदी सरकारने देशाला स्पष्ट उत्तर द्यावे तसेच माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांचे पुस्तक तात्काळ प्रसिद्ध करण्यात यावे अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्षा झीनत शबरीन यांनी केली आहे.

२०२० मधील चीन संघर्षासंदर्भात माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी केलेल्या गंभीर खुलासांवर संसदेत बोलण्यापासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना रोखण्यात आल्याने देशात तीव्र संताप व्यक्त होत आहे. लष्कराच्या स्पष्ट सूचनांनंतरही मोदी सरकारने वेळीच निर्णय न घेतल्यामुळे आपल्या शूर जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले. या जवानांच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देणार नाही, असा इशारा देत युवक काँग्रेसचा संघर्ष सुरूच राहील, असेही झीनत शबरीन यांनी म्हटले आहे.

अजितदादा पवार यांचे संगमवाडी येथे भव्य स्मारक उभारण्याची मागणी

माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि राहुल डंबाळे यांचे मुख्यमंत्री फडणवीस व महापालिका आयुक्तांना निवेदन

पुणे : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा ज्येष्ठ नेते कै. अजितदादा पवार यांच्या अपघाती निधनाने संपूर्ण महाराष्ट्रात शोककळा पसरली आहे. राज्याच्या उभारणीत तसेच पुणे शहराच्या विकासात त्यांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाच्या स्मरणार्थ पुणे शहरात त्यांचे भव्य स्मारक उभारावे, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस व  पुणे महानगरपालिकेचे आयुक्त नवल किशोर राम  यांच्याकडे निवेदनाद्वारे  केली आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, कै. अजितदादा पवार यांचे पुणे शहराशी अत्यंत जिव्हाळ्याचे नाते होते. पुणे शहराच्या उभारणीत त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण राहिलेली असल्याने नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन त्यांचे यथोचित स्मारक उभारणे आवश्यक आहे.

संगमवाडी येथे पुणे महानगरपालिकेच्या नदी सुधार प्रकल्पांतर्गत नव्याने उभारण्यात आलेल्या संगमघाटावर कै. अजितदादा पवार यांचा पूर्णाकृती भव्य पुतळा उभारावा तसेच त्यांच्या कार्याचा वारसा जपणारी शिल्पसृष्टी निर्माण करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी चालू अर्थसंकल्पात किमान दहा कोटी रुपयांची प्राथमिक तरतूद करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या ठिकाणी उभारण्यात येणारे स्मारक हे पुणे शहरातील नागरिकांसाठी कै. अजितदादा पवार यांच्या आठवणी कायम ठेवणारे महत्त्वपूर्ण केंद्र ठरेल, असा विश्वास डॉ. सिद्धार्थ धेंडे आणि राहुल डंबाळे यांनी व्यक्त केला आहे

​पुण्यात ‘हेरिटेज यात्रा २०२६’चा दिमाखदार प्रारंभ; भारतीय संस्कृती जतन करणे काळाची गरज – आदिनाथ मंगेशकर

​पुणे: भारतीय संस्कृतीचा वारसा जतन करण्याच्या उद्देशाने पुणे महानगरपालिका आणि एमआयटी एडीटी (MIT ADT) विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘हेरिटेज यात्रा २०२६’ या महोत्सवाचे आज, ४ फेब्रुवारी रोजी उत्साहात उद्घाटन झाले. सिंहगड रस्ता येथील पु. ल. देशपांडे कलाग्राम येथे ७ फेब्रुवारीपर्यंत हा उपक्रम सुरू राहणार आहे.

​या सोहळ्याचे उद्घाटन प्रसिद्ध संगीततज्ज्ञ श्री. आदिनाथजी मंगेशकर यांच्या हस्ते झाले. यावेळी फिल्म्स डिव्हिजनचे माजी महासंचालक श्री. मुकेश शर्मा, पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. राजेश कामठे, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश एस., कार्यकारी संचालक श्रीमती ज्योती ढाकणे, प्र-कुलगुरू डॉ. नचिकेत ठाकूर आणि महोत्सवाच्या निमंत्रक डॉ. अश्विनी पेठे उपस्थित होते.

​उद्घाटनप्रसंगी बोलताना श्री. आदिनाथ मंगेशकर म्हणाले की, “पुणे महानगरपालिका आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे. पारंपारिक हस्तकलेपासून ते ऑगमेंटेड रिअॅलिटी (AR) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानापर्यंतचा प्रवास या महोत्सवात अनुभवता येतो. आपण एका समृद्ध भारतीय संस्कृतीचे भाग आहोत, ही भाग्याची गोष्ट असून तिचे पुनरुज्जीवन करणे आवश्यक आहे.” त्यांनी तरुण पिढीला ज्ञानाची भूक जोपासण्याचे आवाहन केले.

एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजेश एस. यांनी भविष्यातील आव्हानांना सामोरे जाताना आपला वारसा आणि संस्कृती यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज व्यक्त केली. ते म्हणाले की, आपण आपल्या वैदिक संस्कृतीच्या मुळांकडे पुन्हा वळणे आणि तरुण पिढीमध्ये जिज्ञासू वृत्ती विकसित करणे ही काळाची गरज आहे. भविष्याकडे झेप घेताना आपल्या संस्कृतीचा पाया भक्कम असणे अत्यंत आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

​पुणे महानगरपालिकेच्या सांस्कृतिक विभागाचे प्रशासकीय अधिकारी श्री. राजेश कामठे यांनी एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या या पुढाकाराचे आणि पुणे महानगरपालिकेसोबतच्या या सहकार्याचे विशेष कौतुक केले. ‘हेरिटेज यात्रा’ हा उपक्रम आगामी काळात अधिक व्यापक आणि भव्य होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांना पुणे महानगरपालिका आणि येथील कलाग्राम केंद्र नेहमीच पूर्ण पाठबळ देईल, अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या कार्यकारी संचालक श्रीमती ज्योती ढाकणे यांनी कला ही भारतीयांची जीवनपद्धती असल्याचे सांगत, जागतिकीकरणाच्या युगातही परंपरा न विसरण्याचे आवाहन केले. तसेच, विद्यार्थ्यांनी कला क्षेत्राकडे करिअर म्हणून पाहावे आणि आपल्या कौशल्याचा उपयोग देशाच्या प्रगतीसाठी करावा, असेही त्यांनी नमूद केले.

​उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पारंपारिक विटांची भिंत तयार करणे, आभासी ऐतिहासिक सफर (Immersive Heritage), मातीकाम (Pottery), नाट्य कार्यशाळा, गोंड पेंटिंग, श्लोक पठण, वारली चित्रकला आणि सामुदायिक विणकाम यांसारख्या उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.

​या महोत्सवाचे आकर्षण असलेल्या ‘हेरिटेज प्लेलँड’ मध्ये विद्यार्थ्यांनी आज खेळांच्या माध्यमातून इतिहासाची सफर केली. शैक्षणिक तज्ज्ञांनी तयार केलेल्या या खेळांमध्ये विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग घेतला. यामध्ये प्रामुख्याने ‘महामिस्टरी’ (Mahamystery), ‘डार्ट अँड डिस्कव्हर’ (Dart and Discover), ‘अराउंड इंडिया’ (Around India) आणि ‘मिस्टरी बॉक्स पझल’ (Mystery box puzzle) यांसारख्या खेळांनी विद्यार्थ्यांची मने जिंकली. विशेषतः ‘महाराष्ट्रासाठी स्वतःच्या चलनाची रचना करणे’ (Creating currency design for Maharashtra) या उपक्रमात विद्यार्थ्यांनी आपली सर्जनशीलता दाखवत महाराष्ट्राच्या अस्मितेचे दर्शन घडवणारी चलने रेखाटली.

​महोत्सवाचा भाग म्हणून ६ आणि ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:०० वाजता शनिवारवाड्यापासून ‘हेरिटेज वॉक’ आयोजित करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या विनामूल्य उपक्रमात पुणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.

केळेवाडी येथील शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये सानिका हिची धमाकेदार कामगिरी…

पुणे-केळेवाडी , पौड फाटा, येथे राहणाऱ्या कु. सानिका भंडारी हिने दिनांक 27 ते 29 जानेवारी दरम्यान बारामती येथे पार पडलेल्या 69 व्या शालेय राष्ट्रीय कराटे स्पर्धेत संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावले. या कामगिरीबद्दल माजी उपमहापौर दीपक मानकर यांनी कु. सानिका हिचा सत्कार केला आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कु. सानिका ही खेळाडू चॅम्पियन कराटे क्लब, वसुधा फाउंडेशन हॉल, केळेवाडी येथे प्रशिक्षण घेते. यासाठी तिला मुख्य प्रशिक्षक शुभम बने आणि सहाय्यक प्रशिक्षक प्रसाद वाघमारे, साक्षी तांदळेकर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. प्रभागाचे नगरसेवक हर्षवर्धन दीपक मानकर यांनी कु. सानिकाला स्पर्धेच्या तयारी पासून ते स्पर्धेत खेळण्यापर्यंत योग्य मार्गदर्शन केले तसेच वेळोवेळी सहकार्य केले, असे प्रशिक्षक शुभम बने यांनी सांगितले.

पुण्यातून मुंबईला जाणाऱ्या सर्व एसटी बस रद्द…; मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर मोठी वाहतूक कोंडी

पुणे-पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून या घटनेचा परिणाम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस सेवांवर झाला आहे. परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण १३९ बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. यामध्ये ७३ ई-शिवनेरी व ६६ इतर बस फेऱ्यांचा समावेश आहे.
तसेच, या एक्सप्रेस वेवर महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाची एकूण १६३ वाहने वाहतूक कोंडीत अडकली होती. यामध्ये सातारा विभागातील ४६, सोलापूर विभागातील ३६, पुणे विभागातील २०, सांगली विभागातील १८, कोल्हापूर विभागातील १३, पालघर विभागातील १२, ठाणे विभागातील ११ आणि मुंबई विभागातील ७ वाहनांचा समावेश आहे.

प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, परिस्थितीचा आढावा घेऊन पर्यायी व्यवस्था उभारण्यात आल्या आहेत. वाहतूक सुरळीत होताच बस सेवा टप्प्याटप्प्याने पूर्ववत करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाने कळविले आहे.

हाय स्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे मुंबई-पुणे प्रवास केवळ 48 मिनिटांत होणार

दिल्ली-वाराणसी प्रवास 3 तास 50 मिनिटांत, वाराणसी-सिलीगुडी 2 तास 55 मिनिटांत, चेन्नई-बेंगळुरू 1 तास 13 मिनिटांत…

नवी दिल्ली-केंद्रीय अर्थसंकल्पांतर्गत देशभरातील रेल्वे विकासाला मोठी चालना मिळाली असून, राज्यांना विक्रमी निधीचे वाटप करण्यात आले आहे. दळणवळणीय जोडणीला बळकटी देणे, प्रवासी सुरक्षेची व्याप्ती वाढवणे, पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण आणि मालवाहतूक जाळ्याचा विस्तार करणे हे या निधीचे मुख्य उद्दिष्ट आहे. या सातत्यपूर्ण गुंतवणुकीतून सरकारची सर्वांगीण विकासाप्रती असलेली वचनबद्धता दिसून येते. त्यासोबतच यातून रेल्वेला आर्थिक वृद्धी आणि व्यावसायिक वाहतूक कार्यक्षमतेचा प्रमुख कारक म्हणून स्थानही दिले गेले आहे.

​केंद्रीय अर्थसंकल्प 2026-27 मध्ये, रेल्वे मंत्रालयाने, रेल्वे गुंतवणुक ही प्रादेशिक एकात्मता, प्रवाशांची सोय आणि राज्यांमधील आर्थिक संधींचा कणा असल्याची बाब ठामपणे मांडली आहे. यात हाय स्पीड दळणवळणीय जोडणी, बहुपर्यायी वाहतूक विषयक गतीशीलता,विद्युतीकरण आणि सुरक्षित व्यावसायिक वाहतूक व्यवस्था यांसारख्या बाबींना प्राधान्य दिले गेले आहे.

​उत्तर प्रदेशसारख्या प्रमुख राज्यांमध्ये दिल्ली-वाराणसी आणि वाराणसी-सिलीगुडी दरम्यानच्या नवीन बुलेट ट्रेन कॉरिडॉरमुळे मोठे परिवर्तन घडून येणार आहे. प्रमुख आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्रांमधील प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी करणे, पर्यटनाला चालना देणे आणि या मार्गावरील द्वितीयक श्रेणीतील शहरांना मुख्य प्रवाहाशी जोडणे हे या प्रकल्पांचे उद्दिष्ट आहे.

दक्षिण भारतात, राज्यानुसार केले जाणारे रेल्वे सुविधेचे वितरण प्रामुख्याने उच्च परिणामकारतेच्या प्रवासी दळणवळणीय जोडणी शी संबंधित आहे. याअंतर्गत प्रामुख्याने हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई आणि लगतच्या नागरी केंद्रांना जोडणाऱ्या हाय स्पीड रेल्वेच्या डायमंड कॉरिडॉरच्या अनुषंगाने त्याची आखणी केली गेली आहे.

महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या निधीचा मोठा वाटा हा क्षमता वृद्धी घडवून आणणाऱ्या प्रकल्पांसाठीचा असणार आहे. याअंतर्गत विशेषतः मुंबई-पुणे हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर, गर्दी असलेल्या मुख्य मार्गांचा विस्तार, प्रमुख स्थानकांचे आधुनिकीकरण आणि पुनर्विकास, तसेच राज्याची वेगाने वाढणारी प्रवासी आणि मालवाहतुकीची मागणी पूर्ण करण्यासाठी उपनगरीय आणि आंतरशहरीय रेल्वे सेवांचे बळकटीकरण यावर भर दिला गेला आहे.

पश्चिम आणि मध्य भारतात, आगामी मुंबई-पुणे हाय-स्पीड कॉरिडोरमुळे प्रवासाचा वेळ सुमारे 48 मिनिटांपर्यंत कमी होईल. परिणामी, दोन प्रमुख शहरी केंद्रे प्रभावीपणे एकमेकांशी जोडली जातील. पुणे ते हैदराबाद सुमारे 1 तास 55 मिनिटांची कनेक्टीव्हिटी, आणि दक्षिणेकडील केंद्रांना जोडणारे दुवे, या संपूर्ण प्रदेशासाठी वेगवान कणा तयार करेल, प्रवासी आणि प्रादेशिक अर्थव्यवस्थांना त्याचा सारखाच लाभ मिळेल. हा अर्थसंकल्प हिमालयीन आणि उत्तरेकडील प्रदेशात आर्थिक समावेशन, पर्यटन आणि सर्व प्रकारच्या हवामानात वाहतुकीला चालना देणारा ठरेल. जटिल बोगदे असलेल्या उत्तराखंडच्या ऋषिकेश-कर्णप्रयाग मार्गामुळे, दुर्गम भागाचे दळणवळण सुधारेल, प्रवासाचा वेळ कमी होईल आणि यात्रेकरू आणि पर्यटकांचा ओघ वाढेल,  त्याचबरोबर विद्युतीकरण आणि सुरक्षिततेबाबतच्या सुधारणांमध्ये व्यापक गुंतवणूक होईल.

झारखंड, बिहार, ओदिशा आणि महाराष्ट्रातून जाणाऱ्या दनकुनी (पश्चिम बंगाल) ते सुरत (गुजरात) दरम्यानच्या पूर्व-पश्चिम समर्पित मालवाहतूक कॉरिडॉरद्वारे मालवाहतूक कार्यक्षमता वाढवली जात आहे. या कॉरिडॉरमुळे मालाची जलद आणि अधिक विश्वासार्ह वाहतूक होईल, प्रवासी मार्गांवरील गर्दी कमी होईल, लॉजिस्टिक्स खर्च कमी होईल आणि या प्रमुख आर्थिक राज्यांमध्ये औद्योगिक आणि व्यापार वाढीला चालना मिळेल.

प्रवाशांसाठी, या उपक्रमांचा अर्थ, प्रवासाचा कमी वेळ, सुरक्षित आणि अधिक आरामदायी गाड्या, आधुनिक स्थानके, कमी गर्दी आणि शेवटच्या टोकापर्यंत सुधारित कनेक्टिव्हिटी, हा आहे. त्याच वेळी, भारतीय रेल्वेच्या 3,000 दशलक्ष टन मालवाहतुकीच्या दीर्घकालीन उद्दिष्टाला, समर्पित मालवाहतूक कॉरिडॉर, आधुनिक लोकोमोटिव्ह्ज, अद्ययावत रूळ आणि प्रगत सिग्नलिंगद्वारे पाठबळ दिले जाईल. यामुळे प्रवासी सेवांमध्ये व्यत्यय न आणता मालाची जलद गतीने वाहतूक करता येईल. राज्यांमधील जास्त भांडवली गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मिती होईल, प्रादेशिक विकासाला चालना मिळेल आणि स्थानिक अर्थव्यवस्था मजबूत होईल. केंद्र आणि राज्य सरकारांमधील मजबूत समन्वयाने विकसित भारताचे स्वप्न साकार होऊ शकते. धोरण घोषणेनंतर, आता या स्वप्नाला प्रत्यक्षात आणण्यासाठी सविस्तर नियोजन आणि अंमलबजावणी सुरू होईल.

रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीचा राज्यनिहाय तपशील  

महाराष्ट्र: महाराष्ट्रात रेल्वेसाठी वार्षिक सरासरी बजेट 2009-14 मधील 1,171 कोटी रुपयांवरून 20 पटीने वाढून 2026-27 मध्ये 23,926 कोटी रुपये झाले. यामुळे महाराष्ट्रातील रेल्वे पायाभूत सुविधांमध्ये ऐतिहासिक परिवर्तन घडेल. या अभूतपूर्व गुंतवणुकीमुळे सध्या सुरु असलेल्या एकूण 1,70,058 कोटी रुपयांच्या प्रकल्पांना पाठबळ मिळाले आहे.

गोवा: रेल्वेच्या 4,344 कोटी रुपये खर्चाच्या चालू प्रकल्पांना सहाय्य करण्यासाठी 2026–27 च्या अर्थसंकल्पात 515 कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे गोव्याच्या रेल्वे पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळाली आहे.


डॉ.नंदकिशोर कपोते यांच्या कथक नृत्य कार्यक्रमास बँकाॅक येथे मोठा प्रतिसाद


पुणे : सुप्रसिद्ध कथक नर्तक डॉ.नंदकिशोर कपोते आणि त्यांच्या शिष्या यांचा कथक नृत्याचा कार्यक्रम बँकाॅक येथे सादर झाला. रंगतदार झालेल्या या कार्यक्रमाला परदेशी प्रेक्षकांचा प्रचंड संख्येने प्रतिसाद मिळाला.

बँकाॅक मधील एंबेसी ऑफ इंडिया येथील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र येथे दिनांक २९ जानेवारी रोजी झालेल्या या कार्यक्रमात डॉ.नंदकिशोर कपोते यांच्या समवेत निकिता मोघे, भावना सामंत, पद्मिनी सोनावणे, समृद्धी कुलकर्णी, प्रेरणा भिंगारे, अनुष्का सामंत, अपूर्वा नीला, हर्षदा केदार या कलाकारांनाही कथक नृत्यातील विविध प्रकार सादर केले. गणेश वंदना, पं.बिरजूमहाराजांचे भजन, तोडे, परण, ठुमरी, तराना, राम भजन, होरी आदी कथक नृत्य प्रकारांचे सादरीकरण केले. कार्यक्रमास एंबेसी ऑफ इंडियाचे संचालक डाॅ. चैतन्य प्रकाश योगी, सेक्रेटरी संतोष सिंग, सांस्कृतिक संचालक संतोष कुमार, विश्व हिंदू परिषद, थायलंड च्या अध्यक्षा वैशाली उरूमकर हे मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमासाठी भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (आई.सी.सी.आर ) बँकाॅक यांचे महत्त्वाचे सहकार्य होते.

२०३० पर्यंत पुण्यात ४० हून अधिक हॉटेल्स आणि १२०० हून अधिक कीजसह ऑलिव्हची पुढील मेट्रो पॉवरहाऊस योजना

पुणे – एम्बसी ग्रुपचा तंत्रज्ञानाधारित हॉस्पिटॅलिटी ब्रँड ऑलिव्ह बाय एम्बसीने ऑलिव्ह हॉटेल बाणेर (४८ कीज) आणि ऑलिव्ह हॉटेल वाकड (३० कीज) या दोन महत्त्वाच्या मालमत्तांचे सादरीकरण करत आज पुण्यात अधिकृत प्रवेशाची घोषणा केली. पुण्यातील प्रमुख व्यवसाय-जीवनशैली विषयक मायक्रो-मार्केट्समध्ये महत्वाच्या ठिकाणी स्थित असलेली ही हॉटेल्स शहरातील वेगाने वाढणाऱ्या आयटी कॉरिडॉर्स, कॉर्पोरेट हब्स आणि विस्तारत असलेल्या निवासी क्षेत्रांना लक्षात घेऊन उभारण्यात आली आहेत.


या दोन्ही मालमत्तांचे उद्घाटन हा भारतातील प्रमुख महानगरांमध्ये ऑलिव्हच्या आक्रमक विस्तार धोरणातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. हिंजवडी हे भारतातील सर्वात मोठे आयटी हब, झपाट्याने विकसित होणारी पायाभूत सुविधा आणि वाढती व्यावसायिक प्रवासाची मागणी यांमुळे पुणे हे तंत्रज्ञान-सक्षम, कार्यक्षम हॉस्पिटॅलिटीसाठी उच्च क्षमतेची बाजारपेठ म्हणून उदयास आले आहे.

“पुणे हे नाविन्यपूर्णता आणि उद्योगाचे केंद्र असून येथील व्यावसायिकांच्या वेगाशी जुळणाऱ्या स्मार्ट निवास व्यवस्थेची मागणी सातत्याने वाढत आहे,” असे ऑलिव्ह बाय एम्बसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक काहरामान यिगित यांनी सांगितले. “ऑलिव्ह हॉटेल बाणेर आणि वाकड ही आमच्या खास एआय-आधारित मॉडेलवर चालणारी हॉटेल्स असून आयटी पार्क्स, कॉर्पोरेट कार्यालये आणि लाइफस्टाइल डेस्टिनेशन्सना अखंड, विनाअडथळा आणि सोपा, सुलभ प्रवेश देतात. या शुभारंभामुळे आमचे पुणे महानगरातले स्थान अधिक भक्कम होत असून पुण्याच्या पुढील वाढीच्या टप्प्यासाठी आम्ही सज्ज होत आहोत.”

ऑलिव्ह हॉटेल बाणेर हे प्रस्थापित बाणेर परिसरात स्थित असून कॉर्पोरेट सुलभता आणि सक्षम सामाजिक पायाभूत सुविधांचा संगम येथे साधण्यात आला आहे. ऑलिव्ह हॉटेल वाकड हे हिंजवडी प्रवाशांसाठी आणि दीर्घकालीन वास्तव्यासाठी उच्च मागणी असलेल्या वाकड भागात अतिशय योग्य ठिकाणी उभारले असून, वेस्टगेट बिझनेस पार्क आणि मुंबई–पुणे एक्सप्रेसवे येथे त्वरित जाता येऊ शकते. हे हॉटेल विशेषकरून आयटी सल्लागार, प्रोजेक्ट टीम्स आणि दीर्घकालीन व्यावसायिक वास्तव्यासाठी परिपूर्ण आहे.

पश्चिम भारतातील ऑलिव्हच्या वाढीचे केंद्र म्हणून पुणे महत्त्वाची भूमिका बजावत असून, २०३० पर्यंत हिंजवडी, पिंपरी चिंचवड, हडपसर, कल्याणी नगर, एमजी रोड, विमान नगर आणि कोरेगाव पार्क यांसारख्या वेगाने विकसित होणाऱ्या कॉरिडॉर्समध्ये ४० हून अधिक  हॉटेल्स आणि १२०० हून अधिक कीज उभारण्याचे उद्दिष्ट आहे. राष्ट्रीय पातळीवर, ऑलिव्ह २०२६ मध्ये १०० हून अधिक नवीन ठिकाणी विस्तार करण्याचे लक्ष्य ठेवत असून बंगळुरू, म्हैसूर, चिकमंगळूर, विजयवाडा आणि आता पुणे या नेटवर्कवर आधारित ही वाढ साध्य केली जाणार आहे. अलीकडील काळात सादर करण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये ओपन हॉटेल्स (जगातील पहिले रिमोट एआय ऑपरेटर) तसेच १५० स्पार्क हॉटेल्ससाठी हिल्टनसोबतची भागीदारी यांचा समावेश आहे.

आठवणींना पुस्तक रूपाने शब्दबद्ध करण्याचा आनंद मोठा- डॉ. मुकेश शर्मा.

पुणे-आपण शेकडो लोकांना भेटत असतो. त्यांचे निरीक्षण करीत त्यांच्या आठवणी शब्दात उतरवणे ही सुंदर कला आहे. त्यातून तयार झालेले साहित्य मनाला आनंद देते. प्रत्येकानेच जीवनातील आठवणींना लिखाणातून उजाळा देत सदैव कृतज्ञता व्यक्त करावी. ‘मला भावलेली माणसे’ हे पुस्तक एखाद्याला आठवणीत ठेवण्यास आणि कृतज्ञ राहण्यास प्रेरित करते. तसेच साहित्यातील सहप्रवासी बनल्याचा देखील आनंद देते. मानवी अनुभवांना मूर्त रूप देणे हे एक महत्त्वाचे काम आहे. असे उद्गार मुंबई दूरदर्शनचे माजी महासंचालक व एम.आय.टी. च्या जर्नालीझम व फिल्म विभागाचे डायरेक्टर डॉ. मुकेश शर्मा यांनी आज काढले. ’मला भावलेली माणसे’ या सौ. तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी यांनी लिहलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. दयानंद घोटकर होते. नवनिर्वाचित नगरसेविका सौ. ज्योस्त्ना जगन्नाथ कुलकर्णी व जगन्नाथ कुलकर्णी या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. दयानंद घोटकर यांनी तन्मयी यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे कौतुक केले: “तन्मयी उत्तम गाते, तबला वाजवते, कीर्तन करते आणि आता लिहिते सुद्धा. हे सर्व गुण एकाच ठिकाणी असणे दुर्मिळ आहे” असे सांगून ते म्हणाले की, जे बोलले जाते ते हवेत विरून जाते, पण जे छापले जाते ते अक्षर (अक्षय) राहते. त्यामुळे लिहीत रहा” असे त्यांनी सांगितले.

वेदशास्त्रोत्तेजक सभागृह पुणे येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रारंभी स्वामी समर्थ प्रतिमा पूजन आणि त्यानंतर ‘निघालो घेऊन’ दत्ताची पालखी गाण्याचे गायन तन्मयी यांनी केले. पुस्तक प्रकाशन व ई-बुक आवृत्ती प्रकाशन झाल्यानंतर प्रकाशक तनया-इशा प्रकाशनचे प्रवीण.प्र.वाळिंबे. यांनी प्रास्ताविक केले. नचिकेत मेहेंदळे व अनिकेत कुलकर्णी  यांनी पाहुण्यांचे पुणेरी पगडी घालून स्वागत केले. याप्रसंगी नवनिर्वाचित नगरसेविका सौ. ज्योस्त्ना जगन्नाथ कुलकर्णी व श्री. जगन्नाथ कुलकर्णी यांनीही मनोगते व्यक्त केली. ह भ प. कीर्तन विशारद सौ. निवेदिता खळदकर – मेहेंदळे यांनी सूत्रसंचालन केले. हुजूरपागा प्रशाला,पुणेच्या मुख्याध्यापिका सौ. नम्रता मेहेंदळे यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास साहित्यप्रेमींची मोठी गर्दी होती.

‘मला भावलेली माणसे’ या पुस्तकात लेखिका सौ. तन्मयी मेहेंदळे कुलकर्णी यांनी त्यांना भेटलेल्या पं. विश्व मोहन भट्ट, डॉ सतीश आळेकर, अर्चना कान्हेरे, उल्हास दादा पवार, बेगम परवीन सुलताना, डॉ विश्वास मेहेंदळे, डॉ कुमार सप्तर्षी, डॉ रेवा नातू, डॉ मोहनकुमार दरेकर, कै. मुक्ता टिळक, विदुषी कौशिकी चक्रवर्ती, पं. विजय घाटे, नॅशनल क्रश, गिरीजा ओक – गोडबोले,अभिनेते दिग्दर्शक प्रवीण विठ्ठल तरडे, पं. अतुलकुमार उपाध्ये, उस्ताद उस्मान खान, ज्येष्ठ उद्योजक कृष्णकुमार गोयल, तालयोगी पं. सुरेश तळवलकर गुरुजी, पं. उल्हास कशाळकर, अभिनेत्री,रोहिणी हट्टंगडी यांची भावपूर्ण अशी हृदय व्यक्तिचित्रे आर्टिफिशियल इन्टॅलिजन्सच्या डिझायनींग चा वापर करून लिहिली आहेत. मराठी भाषेतील हे एआय डिझायनिंगचा वापर करून तयार केलेले ललित व्यक्तीचीत्रण लेखांचे पुस्तक आहे.

10 ते 13 फेब्रुवारी 2026 दरम्यान पत्रकार भवन येथे ‘पासपोर्ट मोबाईल व्हॅन’ या उपक्रमाचे आयोजन

0

पुणे-

पुणे येथील प्रादेशिक पारपत्र कार्यालयाच्या वतीने (आरपीओ) मंगळवार, दिनांक 10 ते शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2026 या कालावधीत पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे – 411030 येथे मोबाईल व्हॅनद्वारे पारपत्र सेवा प्रदान केली  जाणार आहे.\

पारपत्रासाठी लवकर तारीख उपलब्ध करून देण्यासाठी आणि नागरिकांसाठी शेवटच्या टप्प्यातील पारपत्र सेवा सुधारण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून हा उपक्रम हाती घेण्यात येत आहे.

आवश्यक कागदपत्रे: ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी प्रौढ आणि अल्पवयीन अर्जदारांनी कृपया पुढे दिलेली कागदपत्रांची  यादी काळजीपूर्वक वाचावी. 

[अर्जदाराच्या माहितीची सत्यता तपासण्यासाठी, पासपोर्ट कायदा 1967 च्या कलम 5 आणि पासपोर्ट नियम 1980 च्या नियम 5 मध्ये असे नमूद केले आहे, की पासपोर्ट प्राधिकरण अशी सर्व चौकशी करू शकते आणि अर्जाच्या योग्य विल्हेवाटीसाठी पासपोर्ट प्राधिकरणाला आवश्यक वाटेल अशी अतिरिक्त माहिती, कागदपत्रे सादर करण्यास अर्जदाराला सांगू शकते.] 

मोबाईल व्हॅन सेवेच्या  वेळेसाठी नोंद कशी करावी:

  1. पासपोर्ट इंडिया वेबसाइट (https://www.passportindia.gov.in) ला भेट द्या आणि सर्वसाधारण सेवा योजनेअंतर्गत अर्ज सादर करा.
  2. ऑनलाइन पद्धतीने शुल्कभरणा केल्यानंतर, ‘शेड्यूल अपॉइंटमेंट पेज’ यावर जा, ‘मोबाइल व्हॅन’ हे स्थान निवडा आणि वेळ निश्चित  करा. 

पारपत्र मोबाईल सेवा केंद्राची तारीख आणि स्थान तपशील:

  1. कालावधी: मंगळवार, 10 ते शुक्रवार, 13 फेब्रुवारी 2026.
  2. स्थळ: पत्रकार भवन, नवी पेठ, पुणे, 411030
  3. वेळ: सकाळी 8:30 ते संध्याकाळी 6:00

(अर्जदारांनी ऑनलाइन अर्जाच्या पावतीवर नमूद केल्याप्रमाणे त्यांच्या नियोजित भेटीच्या वेळेच्या 15 मिनिटे आधी उपस्थित रहावे)

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड साकारणार क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

‘भिडेवाडा’ रुपेरी पडद्यावर

ऐतिहासिक वैभवाने नटलेल्या महाराष्ट्रातील वाड्यांमध्ये ‘भिडेवाडा’ हे नाव विशेष मानाने घेतले जाते. कारण ही वास्तू केवळ दगड–मातीची रचना नसून, ती आहे एका क्रांतीची साक्ष. महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी येथेच देशातील पहिली मुलींची शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला. त्यामुळे ‘भिडेवाडा’ ही केवळ वास्तू न राहता, स्त्री शिक्षणाच्या ऐतिहासिक संघर्षाची आणि परिवर्तनाची साक्षीदार ठरली आहे. हाच ऐतिहासिक ‘भिडेवाडा’ आता मराठी रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. या वास्तूच्या प्रेरणादायी वारशातून जन्मलेली एका तरुणीच्या जिद्दीचा, स्वप्नांचा आणि संघर्षाचा प्रवास ‘भिडेवाडा’ या चित्रपटातून प्रभावीपणे मांडण्यात येणार आहे. भूतकाळाच्या प्रेरणेतून वर्तमानाशी नाळ जोडणारी ही कथा समाजमनाला नवी दिशा देणारी ठरणार आहे.

शिवमुद्रा स्टुडिओज निर्मित आणि राघो फिल्म प्रस्तुत ‘भिडेवाडा’ या सामाजिक चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शिवानी राजेशिर्के आणि अजित शिरोळे यांनी केले असून, निर्मितीची जबाबदारी जयश्री शिरोळे आणि कावेरी जावळे यांनी सांभाळली आहे. तर सुप्रिया शिंदे, वैभव जोशी आणि राजू विटकर हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

या चित्रपटात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची भूमिका अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड तर महात्मा जोतिराव फुले यांची भूमिका धीरेश जोशी साकारली आहे. या दोघांसोबत या चित्रपटात  माधव अभ्यंकर, वैभव चव्हाण, ऋतुराज वानखेडे, नेहा सोनावणे, सम्राट शिरोळे, शरा गायकवाड,  प्रदीप कोथमीरे, आनंद पिंपळकर,  समद खान, प्रतिभा भगत, श्रीराम पेंडसे, निखिल निगडे, योगेश तनपुरे,  पंकज चव्हाण व अनिरुद्ध देशपांडे हे कलाकार आहेत.  कथा अजित शिरोळे यांची असून पटकथा अजित शिरोळे अक्षय कट्टी यांची आहे. संवाद अक्षय कट्टी यांनी लिहिले आहेत गीते ईश्वर अंधारे यांनी लिहिली असून  संगीत सागर शिंदे यांनी दिले आहे. संकलन राजेश बारबोले तर छायांकन योगेश कोळी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेश गोरे तर  ध्वनी अशोक झुरुंगे यांचे आहे. कार्यकारी निर्माते अमित माझीरे आहेत.

इतिहासाची साक्ष आणि वर्तमानाचा संघर्ष यांची सांगड घालणारा ‘भिडेवाडा’ हा चित्रपट सामाजिक जाणिवांना स्पर्श करणारा महत्त्वपूर्ण सिनेअनुभव ठरणार आहे.

‘आता वेळ झाली’ – आयुष्याच्या शेवटच्या निर्णयावरचा हळवा प्रवास ६ फेब्रुवारीपासून अल्ट्रा झकासवर OTT प्रीमियर

0

मुंबई, ४ फेब्रुवारी २०२६ : आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर माणूस नेमकं काय निवडतो? वेदना की सन्मान? नातेसंबंध की स्वतःचा निर्णय घेण्याचा हक्क? या सगळ्या प्रश्नांचा अतिशय संवेदनशील आणि हृदयाला भिडणारा वेध घेणारा मराठी चित्रपट ‘आता वेळ झाली’ येत्या ६ फेब्रुवारी रोजी अल्ट्रा झकास ओटीटीवर प्रीमियरसाठी तयार आहे.

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि रोहिणी हट्टंगडी यांच्या सशक्त अभिनयाने नटलेला हा चित्रपट अनंत महादेवन यांनी दिग्दर्शित व सह-लिखित केला आहे. चित्रपटाची निर्मिती दिनेश बन्सल, जी. के. अग्रवाल तसेच अनंत महादेवन यांनी केली असून, वास्तविक घटनांपासून प्रेरणा घेत हा चित्रपट इच्छामरणासारख्या अत्यंत नाजूक विषयाकडे करुणा, संयम आणि मानवी संवेदनशीलतेच्या दृष्टिकोनातून पाहतो.

‘आता वेळ झाली’ ही एका वृद्ध दाम्पत्याची कथा आहे. जिथे वाढतं वय, आजारपण, एकमेकांवरील प्रेम आणि आयुष्याचा शेवट सन्मानाने निवडण्याचा प्रश्न समोर येतो. कोणताही दिखावा न करता, सूक्ष्म आणि परिणामकारक मांडणीतून हा सिनेमा प्रेक्षकांना अंतर्मुख करतो आणि चर्चेचा विषय बनतो.

या चित्रपटात दिलीप प्रभावळकर यांचा संयमी आणि परिणामकारक अभिनय, तसेच रोहिणी हट्टंगडी यांच्यासोबतची भावनिक केमिस्ट्री, कथेला हृदयस्पर्शी बनवते. तसेच भरत दाभोळकर, सुरेश विश्वकर्मा, स्मिता तांबे, जयंत वाडकर आणि अभिनव पाटकर यांसारख्या अनुभवी कलाकारांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. ‘आता वेळ झाली’ या चित्रपटाला डॅलस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव, राजस्थान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव आणि जागरण चित्रपट महोत्सव अशा अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर प्रशंसा मिळाली आहे.

चित्रपटाच्या प्रीमियरबद्ल बोलताना, अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लि. चे सी.ई.ओ. श्री. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले, “मराठी चित्रपटसृष्टीने नेहमीच समाजाला विचार करायला लावणाऱ्या कथा मांडल्या आहेत. अशा अर्थपूर्ण चित्रपटांना अल्ट्रा झकास मराठी OTTवरून जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवताना आम्हाला खरंच अभिमान वाटतो.”

अल्ट्रा झकास मराठी OTT हे भारतातील सर्वात मोठे मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म असून, २०००हून अधिक मराठी चित्रपट, वेब सिरीज, नाटकं आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची समृद्ध लायब्ररी येथे उपलब्ध आहे. महाराष्ट्रासह जगभरातील मराठी प्रेक्षकांसाठी अस्सल मराठमोळ मनोरंजन पोहोचवण्याचा अल्ट्रा झकासचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो आणि कायम राहील.

शिवाय अल्ट्रा झकास प्लॅटफॉर्म Android, iOS, टॅब, वेब, Android TV, Fire TV, Jio Store आणि Cloud TV वर सहज उपलब्ध आहे. त्यामुळे प्रेक्षकांना याचा आनंद कधीही, कुठेही घेता येईल.

फ्युएल शिक्षण संस्था समूह तर्फे वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट ६ फेब्रुवारी रोजी

0

पुणे, दि. ४ फेब्रुवारी: फ्युएल शिक्षण संस्था समूहातर्फे ‘वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट-२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे.  शुक्रवार, दि ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ .०० वाजता या समिटचे उद्घाटन फ्युएल कॅम्पस, भूगाव, पुणे येथे करण्यात येईल. 

या कार्यक्रमाच्या  उद्घाटन प्रसंगी केरळचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे मुख्य अतिथि म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे विशेष अतिथि म्हणून उपस्थित राहतील. अशी माहिती फ्युएल शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक व अध्यक्ष डॉ. केतन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी फ्युएल च्या सीओओ मयुरी देशपांडे व  विभाग प्रमुख डाॅ. प्राची अहिरराव उपस्थित होते. 

राष्ट्रीय स्तरावरील हा एक उच्च प्रभावी मंच असून, धोरणकर्ते, शासनाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योग व एचआर लिडर, सीएसआर प्रमुख, शिक्षणतज्ज्ञ आणि युवक प्रतिनिधि यांना एकत्र आणणारा हा महत्वपूर्ण उपक्रम आहे. या मध्ये केरळ चे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर हे ‘ मूल्याधिष्ठित नेतृत्व, सहकार्यात्मक प्रशासन आणि शिक्षण कौशल्य परिसंस्थेच्या बळकटीकरण’ या विषयावर विचार मांडतील. त्याचप्रमाणे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे ‘भविष्यासाठी सज्ज शिक्षण व्यवस्था, कौशल्य विकास आणि युवक सक्षमीकरणाबाबत राज्य सरकारची भूमिका’ अधोरेखित करणार आहेत.
कॉन्क्लेव्हमध्ये राऊंडटेबल चर्चेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये देशातील नामांकित एचआर व सीएसआर क्षेत्रातील वरिष्ठ व्यक्ती सहभागी होणार आहेत. या चर्चेमध्ये उद्योन्मुख भरती प्रवाह, कार्यबलाच्या अपेक्षा, नेतृत्व कौशल्ये, तसेच उद्योग शिक्षण संस्थांमधील समन्वय यावर सखोल संवाद होणार आहे. यामध्ये गीतांजली कथाळे चक्रवर्ती, श्रद्धा मेहता, नेहा मुखीजा, सतीश कोंजेटी, टीना आर, कृष्णा पांडा, गौरी मधुसूदनन,अश्विन कुमार, निधिन हल, प्रमोद पांडेय, अभिषेक रंजन, कल्याण जोडवे आणि खुर्रम नायाब सहभागी होणार आहेत.
त्याचप्रमाणे या मध्ये ‘फ्युचर स्किल्स’, ‘इंडस्ट्री ५.०’,‘मानवी केंद्रित शिक्षण’, ‘रोजगारक्षमता’, ‘नेतृत्व तयारी’ आणि ‘सीएसआर आधारित कौशल्य विकास’ या विषयांवर विशेष सत्रे आयोजित करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमात उद्घाटन सत्र, प्रमुख भाषणे, विषयक चर्चा तसेच उत्कृष्टतेचा सन्मान, शिक्षण, कौशल्य विकास, सीएसआर आणि युवक सक्षमीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी पुरस्कार दिला जाणार आहे. तसेच या प्रसंगी भारताच्या सोशल स्टॉक एक्सचेंज चौकटी अंतर्गत फ्युएल चा एक महत्वपूर्ण टप्पा अधिकृतपणे जाहीर केला जाणार आहे. या माध्यमातून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि सामाजिक प्रभावाचे मोजमाप अधिक सक्षम होईल. तसेच महिला, पहिल्या पिढीतील शिकणारे विद्यार्थी आणि वंचित युवकांसाठी शिक्षण व कौशल्य उपक्रम मोठ्या प्रमाणावर राबविण्याचा मार्ग मोकळा होईल.
” फ्युएल वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट २०२६ हे धोरण, उद्योग आणि शिक्षण क्षेत्राला एकत्र आणणारे व्यासपीठ आहे. सोशल स्टॉक एक्सचेंज अंतर्गतचा हा टप्पा पारदर्शकता, मोजता येणारे परिणाम आणि मोठ्या प्रमाणातील सामाजिक प्रभावासाठी आमची कटिबद्धता अधोरेखित करतो.” असे डॉ. देशपांडे यांनी नमूद केले.
फ्युएल वार्षिक कॉन्क्लेव्ह व फ्युचर स्किल्स समिट २०२६ हा उपक्रम शासन, उद्योग, शिक्षण संस्था आणि नागरी समाज यांच्यातील सहकार्य अधिक बळकट करुन कौशल्यसमृद्ध, समावेशक आणि भविष्यासाठी सज्ज भारत घडविण्याच्या सामायिक उद्दिष्टाला नवे बळ देईल.

फ्रॅक्टल अॅनालिटिक्स लिमिटेडची प्राथमिक समभाग विक्री 09 फेब्रुवारी 2026 पासून

0

·         फ्रॅक्टल अॅनालिटिक्स लिमिटेड (“कंपनी”)च्या प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 857  रुपये  ते प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) 900  रुपये पर्यंतचा किंमतपट्टा निश्चित.  

·         प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक शुक्रवार, 06 फेब्रुवारी2026 आहे.

·         बोली/ऑफर सोमवार 09 फेब्रुवारी2026 रोजी खुली होईल आणि बुधवार, 11 फेब्रुवारी2026 रोजी बंद होईल.

·         बोली किमान 16 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर 16 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल

·         रेड हेअरिंग प्रोस्पेक्टस (“RHP”) लिंक: https://fractal.ai/docs/Investor-Relations/Offer-Documents/Fractal-RHP.pdf

राष्ट्रीय, 04 फेब्रुवारी2026फ्रॅक्टल अॅनालिटिक्स लिमिटेड (“कंपनी”)ने प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी (“इक्विटी शेअर्स”) सोमवार 09 फेब्रुवारी2026 पासून प्राथमिक समभाग विक्री(“ऑफर”) खुली करण्याचा प्रस्ताव सादर केला आहे. प्रमुख गुंतवणूकदाराच्या बोलीचा दिनांक कार्यालयीन एक दिवस आधी म्हणजेच शुक्रवार, 06 फेब्रुवारी2026  आहे. बोली/ऑफर बुधवार, 11 फेब्रुवारी2026 रोजी बंद होईल.  

ऑफरसाठीचा किंमतपट्टा प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 857 रुपये  ते प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रति इक्विटी शेअरसाठी 900 रुपये पर्यंत निश्चित करण्यात आला आहे. बोली प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या किमान 16 इक्विटी शेअर्ससाठी आणि त्यानंतर प्रत्येकी 1 रुपये दर्शनी मूल्याच्या 16 इक्विटी शेअर्सच्या पटीत लावता येईल. 

कंपनीच्या प्राथमिक समभाग विक्री ऑफरमध्ये 10,235 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सचे फ्रेश इश्यू (“Fresh Issue”) आणि कमाल 18,104 दशलक्ष रु. पर्यंतच्या इक्विटी शेअर्सची ऑफर फॉर सेल (Offer for Sale, Fresh Issue सोबत एकत्रितपणे “Offer”) समाविष्ट आहे.

ही ऑफर फॉर सेल विद्यमान भागधारकांद्वारे करण्यात येत असून, यामध्ये क्विनॅग बिडको लिमिटेड, टीपीजी फेट होल्डिंग्स पीटीई. लिमिटेड, सत्या कुमारी रेमाल, राव वेंकटेश्वर रेमाल आणि जीएलएम फॅमिली ट्रस्ट (एकत्रितपणे, “विक्री समभागधारक”) यांचा समावेश आहे. या ऑफरमध्ये पात्र कर्मचाऱ्यांच्या सदस्यतेसाठी 600 दशलक्ष रु. पर्यंत एकत्रित रकमेचा कर्मचारी आरक्षण भाग (एम्प्लॉयी रिझर्व्हेशन पोर्शन) समाविष्ट आहे.

ही ऑफर SCRR, च्या नियम 19(2)(b) आणि SEBI ICDR नियम 31 च्या अनुषंगाने केली जात आहे. ही ऑफर बुक बिल्डिंग प्रक्रियेच्या माध्यमातून केली जात असून, SEBI ICDR सुधारित  नियम 6(2) च्या नियमनात आहे. त्या अंतर्गत SEBI ICDR नियमांनुसार, ऑफरच्या किमान 75% भाग पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“QIBs” आणि तो हिस्सा “QIB Portion”) प्रमाणबद्ध वाटपासाठी उपलब्ध असेल. तथापि आपली कंपनी, BRLMs सोबत सल्लामसलत करून, SEBI ICDR नियमांनुसार विवेकाधीन आधारावर QIB Portion पैकी 60% पर्यंत हिस्सा प्रमुख गुंतवणूकदारांसाठी (“Anchor Investor Portion”) वाटप करू शकते. QIB श्रेणीतील जास्तीत जास्त 60% हिस्सा स्वविवेकाधिकाराच्या आधारे प्रमुख गुंतवणूकदारांना वाटप केला जाऊ शकतो (यास “अँकर गुंतवणूकदार हिस्सा” असे संबोधले जाईल). यापैकी 40% हिस्सा पुढीलप्रमाणे राखीव ठेवला जाईल: (i) 33.33% देशांतर्गत म्युच्युअल फंड्ससाठी आणि (ii) 6.67% जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्ससाठी, परंतु अट अशी की देशांतर्गत म्युच्युअल फंड्स, जीवन विमा कंपन्या आणि पेन्शन फंड्सकडून प्रमुख गुंतवणूकदारांना इक्विटी शेअर्स वाटप करण्यात येणाऱ्या किमतीइतक्या किंवा त्याहून जास्त किमतीवर वैध बोली प्राप्त झालेल्या असाव्यात. वरील कलम (ii) मध्ये नमूद केलेल्या राखीव श्रेणीमध्ये कमी सदस्यता (under-subscription) झाल्यास, तो हिस्सा देशांतर्गत म्युच्युअल फंड्सना वाटप केला जाऊ शकतो. जर प्रमुख गुंतवणूकदार भागामध्ये कमी सदस्यता किंवा वाटप न झाल्यास, उर्वरित इक्विटी शेअर्स (प्रमुख गुंतवणूकदार भाग वगळून) नेट QIB Portion मध्ये (“Net QIB Portion”) समाविष्ट केले जातील.

ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी 5 % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी (प्रमुख गुंतवणुकदार वगळून) उपलब्ध करून दिला जाईल. तथापि, जर म्युच्युअल फंडांकडून एकूण मागणी नेट QIB Portion च्या 5% पेक्षा कमी असेल, तर म्युच्युअल फंड भागात वाटपासाठी उपलब्ध असलेले उर्वरित इक्विटी शेअर्स उरलेल्या Net QIB Portion मध्ये समाविष्ट करून QIBs साठी प्रमाणात वाटप केले जाईल. जर नेट ऑफरच्या किमान 75% चे वाटप QIBs ला करता आले नाही, तर संपूर्ण अर्ज रक्कम तत्काळ परत केली जाईल. पुढे, नेट ऑफर पैकी 15% पेक्षा जास्त नसलेला हिस्सा बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी (“Non-Institutional Investors” किंवा “NIIs”) (म्हणजे “Non-Institutional Category”) उपलब्ध असेल. बिगर संस्थात्मक भागापैकी एक तृतीयांश भाग 200,000  रु. पेक्षा जास्त आणि 1,000,000 रु. पर्यंत अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल आणि दोन तृतीयांश भाग 1,000,000 रु.पेक्षा अधिक अर्ज आकार असलेल्या अर्जदारांसाठी राखीव असेल. अर्थात त्यासाठी अशा कोणत्याही उप-श्रेणीतील सबस्क्राईब नसलेला भाग बिगर-संस्थात्मक बोली लावणाऱ्या दुसऱ्या उप-श्रेणीतील अर्जदारांना सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार वाटप केला जाऊ शकतो. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल. सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार Retail Individual investors (“Retail Individual Investors” किंवा RIIs) (“Retail Category”)  10% पेक्षा अधिक भाग वाटपासाठी उपलब्ध राहणार नाही. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास हे लागू होईल.

प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या ASBA खात्यांचा तपशील आणि यूपीआय अर्जदारांसाठी यूपीआय आयडीसह जाहीर करून अर्जाची विहित रक्कम अॅप्लीकेशन सपोर्टेड बाय ब्लॉक अमाऊंट (“ASBA”) प्रक्रियेद्वारे करून ठेवणे बंधनकारक आहे. त्यानुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या सेल्फ सर्टिफाइड सिंडिकेट बँक्स एससीएसबीतर्फे किंवा यूपीआय यंत्रणे अंतर्गत स्पॉन्सर बँकेतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.

कंपनीचे हे इक्विटी शेअर्स बीएसई लिमिटेड (“BSE”) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड (“NSE” आणि BSE बरोबर एकत्रितपणे “Stock Exchanges”) वर सूचीबद्ध करण्याचे प्रस्तावित आहे. ऑफरच्या उद्दिष्टासाठी NSE हे निर्देशित स्टॉक एक्सचेंज राहील.

कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड, मॉर्गन स्टॅन्ले इंडिया कंपनी प्रायव्हेट लिमिटेड, अ‍ॅक्सिस कॅपिटल लिमिटेड आणि गोल्डमन सॅक्स (इंडिया) सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेड हे या ऑफरसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर्स (“BRLMs”) आहेत.

येथे वापरल्या गेलेल्या परंतु परिभाषित न केलेल्या सर्व कॅपिटलाइज्ड शब्दांचा अर्थ आरएचपी मध्ये नमूद केल्यासारखाच असेल.