Home Blog Page 115

TCS BaNCS™ तैनात-जनता सहकारी बँकेमध्ये ग्राहकांना मिळणार नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे सुधारित आणि जलद डिजिटलसेवा

0

बँकेच्या सर्व सेवा एकत्रित करणारी एक नवीनआधुनिक प्रणाली प्रदान करण्यासाठी टीसीएस तिच्या प्रगत आणि पुरस्कार विजेत्या बँकिंग सॉफ्टवेअरचा वापर करेलयामुळे बँकेला नवीन सेवा जलद सुरू करता येतीलग्राहकांना चांगली सुविधा मिळेल आणि तिचे संपूर्ण बँकिंग ऑपरेशन्स डिजिटल करता येतील.

पुणेमुंबईजनता सहकारी बँक पुणे (JSBL) ने तिच्या आधीच्या बँकिंग प्रणालीचे आधुनिकीकरण करण्यासाठी, कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी TCS BaNCS™ या जागतिक बँकिंग प्लॅटफॉर्मची निवड केली आहे. आयटी सेवा, सल्लागार आणि व्यवसाय उपाययोजना पुरवणारी, जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (BSE: 532540, NSE: TCS), जनता सहकारी बँकेच्या ग्राहकांसाठी एक सुधारित बँकिंग अनुभव निर्माण करेल. TCS BaNCS चे आधुनिक डिजिटल चॅनेल ग्राहकांना बँकेच्या वेबसाइट, मोबाइल अॅप आणि ऑफलाइन शाखांमध्ये अखंड सेवा प्रदान करतील.

TCS BaNCS ग्लोबल बँकिंग प्लॅटफॉर्मद्वारे समर्थित, जनता सहकारी बँक पुणे तिच्या बँकिंग प्रणालीमध्ये संपूर्ण परिवर्तन घडवून आणत आहे. यामध्ये कोअर बँकिंग, पेमेंट्स, ट्रेड फायनान्स आणि AML/KYC अनुपालनाचे आधुनिकीकरण यांचा समावेश असेल. बँकेचा उद्देश तिच्या वाढीला गती देणे, सर्व चॅनेलवर (मोबाइल, वेब आणि शाखा) उत्कृष्ट ग्राहक अनुभव प्रदान करणे आणि बाजारपेठेतील उपस्थिती मजबूत करणे आहे. या परिवर्तनामुळे बँकेची कार्यक्षमता वाढेल, कर्जाची गुणवत्ता सुधारेल आणि जोखीमांवर चांगले नियंत्रण येईल. शिवाय, या तंत्रज्ञानामुळे बँकेला सायबर सुरक्षा आणि डिजिटल बँकिंग मार्गदर्शक तत्त्वे यासारख्या रिझर्व्ह बँकेच्या नवीन नियमांचे पालन करण्यास सक्षम केले जाईल.

जनता सहकारी बँक पुणेची स्थापना १८ ऑक्टोबर १९४९ रोजी झाली. पुण्यातील सहकारी संस्थांना पाठिंबा देण्यासाठी आणि समाजोपयोगी कल्याणकारी उपक्रम म्हणून सुरू झालेली ही बँक आता भारतातील सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक प्रमुख बँक आहे. आपल्या देशव्यापी नेटवर्कद्वारे, बँक व्यक्ती आणि लहान व्यवसायांना बचत खाती, कर्जे आणि आधुनिक डिजिटल सेवा देते. उत्कृष्ट ग्राहक सेवा प्रदान करण्यासाठी, बँक स्वतःचे डिजिटलीकरण करण्यासाठी आणि नवीन वैशिष्ट्ये सादर करण्यासाठी सक्रियपणे काम करण्यात आघाडीवर आहे.

जनता सहकारी बँक पुणेचे सीईओ श्री जगदीश पीकश्यप म्हणाले: जनता सहकारी बँकेतआमच्या ग्राहकांच्या आर्थिक गरजा समजून घेणे आणि त्यांना उत्कृष्ट बँकिंग अनुभव प्रदान करणे हे राहिले आहेआमच्या डिजिटल प्रणालींचे आधुनिकीकरण करण्यासाठी आम्ही TCS BaNCS सोबत भागीदारी करून एक मोठे पाऊल पुढे टाकले आहेया परिवर्तनामुळे आम्हाला आमच्या ग्राहकांना जलद आणि सोप्या डिजिटल सेवा प्रदान करता येतीलग्राहकांची सुविधा हे आमच्या प्रत्येक कामाचे प्राधान्य राहावे हे आमचे उद्दिष्ट आहे.”

टीसीएसच्या फायनान्शियल सोल्युशन्स विभागाचे ग्लोबल हेड श्रीवेंकटेश्वरन श्रीनिवासन म्हणाले: “जनता सहकारी बँकेसोबत भागीदारी करताना आम्हाला आनंद होत आहेआम्ही भारतातील शहरी सहकारी बँकिंग क्षेत्राला आधुनिक आणि सुरक्षित बँकिंग तंत्रज्ञान प्रदान करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहोतआम्ही या बँकेसाठी एक आधुनिक प्रणाली सादर करत आहोत जी केवळ या क्षेत्राच्या अद्वितीय गरजा पूर्ण करत नाही तर जागतिक पातळीवरील सर्वोत्तम बँकिंग पद्धतींचा देखील समावेश करतेयामुळे ग्राहकांचा अनुभव वाढेलनियामक अनुपालन सोपे होईल आणि बँकेला नवीन उत्पादने लाँच करण्यास आणि बाजारपेठेतील तिची स्थिती मजबूत करण्यास सक्षम केले जाईल.”

टीसीएसच्या सहयोगाने विकसित केलेल्या या नवीन प्रणालीमुळे  ग्राहकांना डिजिटल खाती उघडणे आणि स्वतःच्या बँकिंगचे (स्वयं-सेवा) व्यवस्थापन करणे खूप सोपे होईल. यामुळे बँकेचे कामकाज अधिक अचूक आणि जलद होईल आणि ग्राहकांना विविध आधुनिक सेवांचा फायदा होईल. स्केलेबल एपीआय-आधारित तंत्रज्ञान बँकेला बाजारपेठेतील बदलांशी त्वरित जुळवून घेण्यास सक्षम करेल, ग्राहकांना नेहमीच सर्वात आधुनिक आणि प्रगत बँकिंग वैशिष्ट्यांचा लाभ मिळेल याची खात्री करेल.

याव्यतिरिक्त, बँक तिची ट्रेड फायनान्स ऑपरेशन्स पूर्णपणे डिजिटलाइज करण्यात सक्षम बनेल. यामुळे पैशाचे व्यवहार त्वरित होतील, जोखीम ओळखणे सोपे होईल आणि सरकारी नियमांचे चांगले पालन आणि देखरेख सुनिश्चित होईल.

TCS BaNCS ग्लोबल बँकिंग प्लॅटफॉर्म बँका त्यांच्या गरजांनुसार त्यांच्या स्वतःच्या सर्व्हरवर किंवा क्लाउडमध्ये तैनात करू शकतात. हा प्लॅटफॉर्म बँकांना त्यांच्या ग्राहकांच्या भविष्यातील गरजा ओळखणारी आणि त्यांच्या पसंतीच्या डिव्हाइसवर उपलब्ध करून देणारी प्रगत वैशिष्ट्ये प्रदान करण्यास मदत करतो. त्याचे “भविष्यासाठी सज्ज” तंत्रज्ञान सहकारी बँकांच्या डिजिटल परिवर्तनाला आणखी गती देईल, ज्यामुळे बँका त्यांच्या सेवांचा विस्तार करण्यात आणि तंत्रज्ञानाच्या विस्तृत जगाशी जोडण्यात सक्षम बनतील.

जवळजवळ ६० वर्षांपासून, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने भारतातील तांत्रिक क्रांतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कंपनीने अनेक प्रमुख राष्ट्र-निर्माण उपक्रमांचे नेतृत्व केले आहे, डिजिटल पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत आणि सरकारी सेवांचे आधुनिकीकरण केले आहे, लाखो लोकांचे जीवन सुधारले आहे. भारत आणि जगभरातील बँका आणि वित्तीय संस्था टीसीएसच्या सेवांवर अवलंबून आहेत. एक विश्वासार्ह भागीदार म्हणून, टीसीएस अनेक सरकारी मंत्रालयांसोबत जवळून काम करते. बँकिंग सेवांद्वारे लाखो भारतीयांना सेवा देते आणि ग्रामीण आणि वंचित भागातील लोकांना सरकारी कार्यक्रमांद्वारे आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यात मदत करते. भारतातील प्रमुख स्टॉक एक्सचेंजचे डिजिटलायझेशन करण्यापासून ते पासपोर्ट सेवा, आरोग्य विमा आणि संरक्षण कर्मचाऱ्यांसाठी पेन्शन प्रणाली सुधारण्यापर्यंत, टीसीएस देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत उत्कृष्ट सार्वजनिक सेवा प्रदान करत आहे.

बेन कॅपिटल समर्थित धूत ट्रान्समिशनतर्फे आयपीओसाठी सेबीकडे गोपनीय पद्धतीने अर्ज दाखल

0

ऑटो घटक उत्पादक धूत ट्रान्समिशन यांनी संभाव्य प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) च्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत, गोपनीय प्री-फायलिंग मार्गाद्वारे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) कडे ड्राफ्ट कागदपत्रे सादर केली आहेत अशी माहिती कंपनीने जारी केलेल्या सार्वजनिक फायलिंग जाहिरातीतून देण्यात आली आहे.

दोन दशकांहून अधिक काळापूर्वी प्रवर्तक राहुल धूत यांनी स्थापन केलेली ही कंपनी ऑटोमोटिव्ह आणि ग्राहकोपयोगी टिकाऊ वस्तू क्षेत्रातील मूळ उपकरण उत्पादकांसाठीची (Original Equipment Manufacturers – OEMs) प्रमुख पुरवठादार आहे. कंपनी वायरिंग हार्नेस, ऑटोमोटिव्ह स्विचेस, इलेक्ट्रॉनिक सेन्सर्स आणि कंट्रोलर्स, कनेक्टर्स आणि टर्मिनल्स, ऑटोमोटिव्ह केबल्स, पॉवर कॉर्ड्स आणि बॅटरी पॅक्सचे उत्पादन करते. तिची उत्पादने दुचाकी, तीनचाकी, प्रवासी व व्यावसायिक वाहने, ऑफ-रोड वाहने, अर्थ मूव्हर्स, कृषी उपकरणे, वैद्यकीय उपकरणे आणि घरगुती उपकरणे अशा विविध वापरांसाठी वापरली जातात.

गेल्या काही वर्षांमध्ये कंपनीने जागतिक स्तरावर आपला ठसा उमटविला असून कंपनीचे ग्राहक आठ देशांमध्ये आणि तीन खंडांमध्ये पसरलेले आहेत. आंतरराष्ट्रीय विस्ताराचा भाग म्हणून, धूत ट्रान्समिशनने 2012 मध्ये यूकेमध्ये अभियांत्रिकी आणि विपणन कार्यालय स्थापन केले. 2017 मध्ये स्लोव्हाकियामध्ये उत्पादन सुविधा केंद्रासह स्कॉटलंडमधील TFC केबल्सचे अधिग्रहण करण्यात आले. त्यानंतर 2018 मध्ये यूकेमधील पार्किन्सन हार्नेस आणि 2019 मध्ये सॅन इलेक्ट्रोमेक या कंपन्यांचे अधिग्रहण करण्यात आले.

धूत ट्रान्समिशन एकात्मिक उत्पादन आणि तंत्रज्ञान प्लॅटफॉर्मवर कार्यरत असून कंपनीची सर्व उत्पादन सुविधा केंद्रे आणि कार्यालये SAP S/4HANA प्रणालीद्वारे जोडलेली आहेत. कंपनीत 12,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत आणि ISO 9001, IATF 16949, ISO 14001 आणि ISO 45001 यांसह अनेक जागतिक दर्जाची गुणवत्ता आणि सुरक्षितता प्रमाणपत्रे कंपनीकडे आहेत.

क्रिसिल रेटिंग्स मे 2025 च्या रेटिंग अहवालानुसार कंपनीने ऑटोमोटिव्ह वायर हार्नेस आणि केबल्स विभागात मजबूत बाजारपेठीय स्थान निर्माण केले आहे. हे स्थान प्रवर्तकांच्या दोन दशकांहून अधिक अनुभवावर तसेच उत्पादन विकास आणि क्षमता विस्तारातील सातत्यपूर्ण गुंतवणुकीवर आधारित आहे. अहवालात नमूद करण्यात आले आहे की धूत ट्रान्समिशन ही या विभागातील सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक असून, ती सर्व प्रमुख ऑटोमोटिव्ह OEMs ना पुरवठा करते. बजाज ऑटो, टीव्हीएस मोटर कंपनी, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया आणि रॉयल एनफिल्ड हे तिचे प्रमुख ग्राहक आहेत

कंपनीचे एकत्रित उत्पन्न आर्थिक वर्ष 22 मधील 1,550 कोटी रु. वरून आर्थिक वर्ष 24 मध्ये 2,653 कोटी रु. पर्यंत वाढले असून उत्पादन आणि भौगोलिक विस्तारामुळे झालेल्या सातत्यपूर्ण वाढीचे हे द्योतक आहे. कंपनीच्या एकूण उत्पन्नापैकी 15–20% हिस्सा सातत्याने परदेशी व्यवहारांमधून येतो. त्यातून भौगोलिक वैविध्यपूर्णता यांसह व्यवसायाच्या जोखीम प्रोफाइललाही पाठबळ मिळते.

अहवालात सुयोग्य अशा खेळत्या भांडवल व्यवस्थापनाचाही उल्लेख करण्यात आला असून, 31 मार्च  2024 रोजी एकूण चालू मालमत्ता सुमारे 104 दिवसांची होती. यामध्ये 56 दिवसांचे रिसीव्हेबल्स आणि 39 दिवसांचा साठा यांचा समावेश आहे. साठा प्रामुख्याने ऑर्डर-आधारित असून, पतधोरण मध्यम स्वरूपाचे आहे. त्यायोगे मध्यम कालावधीत प्रभावी रोख प्रवाह व्यवस्थापनास मदत होते.

आर्थिक आघाडीवर, कंपनीचा जोखीम प्रोफाइल आश्वस्त करणारा असून 31 मार्च 2024 रोजी निव्वळ संपत्ती 598 कोटी रु. वर पोहोचली आहे. ती मागील वर्षी 387 कोटी रु. होती. यात  0.59 पट वाढ आहे. आर्थिक वर्ष 24 मध्ये डेब्ट संरक्षण मेट्रीक्स अधिक मजबूत झाले असून व्याज कव्हरेज 9.3 पट पर्यंत वाढले आहे.

इक्विटी कंपनी बेन कॅपिटल कडे कंपनीतील 49% हिस्सा आहे. बेन कॅपिटलच्या गुंतवणुकीसोबतच, धूत होल्डिंग प्रायव्हेट लिमिटेड यांसह प्रवर्तकांच्या मालकीचे घटक धूत ट्रान्समिशनमध्ये सामावून घेण्यात आले आहेत.

ऑटो घटक क्षेत्रातून भांडवली बाजारात सक्रिय सहभाग दिसून येत असताना धूत ट्रान्समिशनचे फायलिंग होत आहे. गेल्या तीन वर्षांत ASK ऑटोमोटिव्ह आणि मदरसन सुमी वायरिंग इंडिया यांसारख्या कंपन्या शेअर बाजारात लिस्ट झाल्या आहेत. तर इतर अनेक ऑटो पूरक आणि EV-संबंधित घटक उत्पादक विविध टप्प्यांवर नियामक फायलिंग प्रक्रियेत आहेत. यामागे स्थानिकीकरण, विद्युतीकरण आणि निर्यात-आधारित वाढीच्या संकल्पनांबाबत गुंतवणूकदारांची सततची रुची दिसून येते.

धूत ट्रान्समिशनचा आयपीओ उत्पादन-केंद्रित सूचीबद्ध कंपन्यांच्या वाढत्या यादीत भर घालणार असून, भारताच्या विस्तारत चाललेल्या ऑटोमोटिव्ह पुरवठा साखळी आणि जागतिक सोर्सिंग संधींचा लाभ घेण्याकडे गुंतवणूकदारांचा कल अधिक बळकट करेल.

बेकायदा बांधकामे,बोगस नोकरभरती – खोपडेंचे नगरसेवक पद रद्द करा: वसंत मोरेंची कोर्टात धाव

‘गोरक्ष स्मृती व्हिला’ या नावाने उभारलेल्या इमारतींमध्ये १४१ फ्लॅटचे बेकायदा बांधकाम खोपडेंनी केले.

ग्रामपंचायत काळात बोगस नोकरभरतीत नातेवाईकांची वर्णी

पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ३८ ई (बालाजीनगर-आंबेगाव कात्रज) मधून निवडून आलेले भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात अनधिकृत बांधकामांबाबत खोटी माहिती दिली असून त्यांनी शेकडो सदनिकांची बेकायदा बांधकामे आणि बोगस पद्धतीने नोकरभरती केल्याचा आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे राज्य संघटक, पुणे महापालिका निवडणूक समन्वयक व माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी केला आहे. अशी बेकायदा बांधकामे केल्याने कायदेशीर रित्या खोपडे यांना निवडणूक लढविता येत नाही ते अपात्र होतात , त्यांची निवड रद्द करून त्यांना अपात्र ठरवावे, या मागणीसाठी पुणे न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करण्यात आली असल्याचे मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी अ‍ॅड. सुरेश पलांडे आणि अ‍ॅड. धैर्यशील पलांडे उपस्थित होते.

मोरे यांनी सांगितले की, निवडणूक प्रक्रियेदरम्यान व्यंकोजी खोपडे यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात “अनधिकृत बांधकाम नाही” असा दावा करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात सर्व्हे नंबर ८, गुजर निंबाळकरवाडी येथे हिल टॉप-हिल स्लोप, १८ मीटर डीपी रस्ता आणि शेती न-विकास क्षेत्र (नॉन-डेव्हलपमेंट झोन) असल्याचे गॅझेट प्रसिद्ध झाले आहे. असे असतानाही या सर्व्हे नंबरवर मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकामे करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

खोपडे डेव्हलपर्स या फर्मच्या माध्यमातून ‘गोरक्ष स्मृती व्हिला’ या नावाने उभारलेल्या इमारतींमध्ये १४१ अनधिकृत फ्लॅट बांधण्यात आले असून त्यांची दस्त नोंदणीही झाल्याचे मोरे यांनी सांगितले. तसेच त्यांचे वडील मारुती खोपडे यांच्या नावाने सुमारे ४० फ्लॅट असल्याचा दावा करत एकूण १८१ अनधिकृत फ्लॅटचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला. या फर्ममध्ये व्यंकोजी खोपडे यांच्यासह जगन्नाथ केरबा खोपडे, कानिफनाथ जगन्नाथ खोपडे व रामदास काशिनाथ खोपडे यांचा समावेश असून प्रत्येक करारनाम्यावर चौघांच्यावतीने व्यंकोजी खोपडे यांच्या सह्या असल्याचेही मोरे यांनी सांगितले.

पीएमआरडीएकडून कोणतीही विकास परवानगी दिलेली नसतानाही ही बांधकामे करण्यात आली, अशी माहिती पीएमआरडीएकडून मिळाल्याचा दावा मोरे यांनी केला. ग्रामपंचायत अस्तित्वात असताना बेकायदा पद्धतीने परवानग्या देण्यात आल्या, तसेच महापालिकेत समाविष्ट होण्याच्या आधी बॅकडेटेड नोंदी करून बांधकामांना परवानगी दिल्याचा आरोपही त्यांनी केला. पुढे महापालिकेत गावे आल्यानंतर प्रभाग क्रमांक ३ मधून ४३३५ फ्लॅटची नोंद महापालिकेत करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला.

दरम्यान, अनधिकृत उत्खनन प्रकरणी १ लाख २५ हजार रुपयांचा सरकारी दंड आजही खोपडे यांच्या नावावर दाखवत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ग्रामपंचायत काळात बोगस नोकरभरतीत नातेवाईकांची वर्णी लावण्यात आली असून याबाबत चौकशी सुरू असल्याचेही मोरे यांनी सांगितले. या प्रकरणाशी संबंधित एक जनहित याचिका दाखल करण्यात आली असून त्याची सुनावणी १२ फेब्रुवारी रोजी होणार आहे. तसेच निवडणुकीसंदर्भातील घडलेल्या घटनांची माहिती असलेला पेन ड्राईव्ह न्यायालयात सादर करणार असल्याचे मोरे यांनी सांगितले.

याप्रकरणी अ‍ॅड. सुरेश पलांडे यांनी सांगितले की, निषिद्ध क्षेत्रात झालेल्या शेकडो अनधिकृत बांधकामांमध्ये थेट सहभाग असूनही प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख न करणे हा कायद्याचा भंग आहे. अ‍ॅड. धैर्यशील पलांडे यांनी, बेकायदा बांधकामात सहभागी असलेल्या व्यक्तीला लोकप्रतिनिधी म्हणून राहण्याचा अधिकार नसल्याचे नमूद केले.

सरपंच काळात भाजप नगरसेवक व्यंकोजी खोपडे यांनी अनधिकृत बांधकामे केली. दस्तावर स्वतः खोपडे यांची सही आहे. निवडणुकीत खोपडे यांचा अर्ज बाद करण्यासाठी निवडणुक निर्णय अधिकार्‍यांना भेटलो. त्यांनी अर्ज बाद करण्याचे अधिकार नसल्याचे सांगितले. त्यामुळे आम्ही न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचे नगरसेवक पद रद्द होऊन पुन्हा नव्याने निवडणूक व्हावी. त्यामुळे पुन्हा निवडणूक होऊन चांगल्या माणसानं काम करण्याची संधी मिळावी. न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास असून आम्हाला न्याय मिळेल.
– वसंत मोरे, राज्य संघटक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)

शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढला …

मुंबई- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाचा खर्च 15 हजार कोटींनी वाढून तब्बल 1 लाख हजार कोटींवर पोहोचला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल केला आहे. या बदलामुळे हा खर्च वाढल्याचा दावा केला जात आहे.शेतकऱ्यांच्या विरोधामुळे हा महामार्ग आता 350 गावांऐवजी आता 395 गावांतून जाणार आहे. त्यामुळे या महामार्गासाठी 8 हजार 500 हेक्टर जमिनीचे भूसंपादन करावे लागणार आहे. आधीच्या आराखड्यानुसार 802 किमीचा असलेला हा महामार्ग आता 856 किमीचा होणार आहे. प्रकल्पाच्या भूसंपादनाचा सर्व खर्च राज्य सरकार उचलणार आहे. यासाठी सरकार कर्ज घेणार आहे. आतापर्यंत 196 गावांमधील भूसंपादनाची मोजणी पूर्ण झाली आहे.

शक्तिपीठ महामार्गाद्वारे राज्यातील साडेतीन शक्तिपीठांना जोडण्यात येणार आहे. पण कोल्हापूरसह राज्यातील विविध जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. गतवर्षीच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने या प्रकल्पाच्या आराखड्यात काही बदल करण्याचे मान्य केले होते. त्यानुसार, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) भूसंपादनाला विरोध करणाऱ्या कागल व हातकणंगले तालुक्याचा एक मोठा भाग या महामार्गातून वगळला. याशिवाय नांदेड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व धाराशिव जिल्ह्यातही काही बदल करण्यात आले.

प्रकल्पाच्या आरखड्यात सातारा जिल्हाही नव्याने जोडण्यात आला. यामुळे हा महामार्ग आता 12 ऐवजी 13 जिल्ह्यांतून जाणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेसाठी पाठवण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग या प्रस्तावाची तपासणी करत आहेत. हा महामार्ग समृद्धी महामार्गासारखाच प्रवेश नियंत्रित शीघ्र संचार महामार्गात येतो. त्यामुळे या महामार्गावरून वेगवान प्रवास शक्य असल्यामुळे वेळेची अधिकाधिक बचत होण्यास मदत होणार आहे.

शक्तिपीठ महामार्ग करवीर, भुदरगड, आजरा, चंदगड मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुक्याला जोडला जाईल. नव्या आराखड्यानुसार, हा महामार्ग वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांतील जाणार आहे. महामार्गाच्या नव्या आखणीत सातारा जिल्ह्यातील माण, खटाव या तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

भाजप राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारची धडक

पुणे-पुण्यात भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पूनावाला यांच्या आईला कारने धडक दिल्याची गंभीर घटना घडली आहे. हा अपघात नसून जाणूनबुजून केलेला हल्ला असल्याचा आरोप शहजाद पूनावाला यांनी केला असून, संबंधित कार चालकाविरोधात तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.या घटनेचा CCTV व्हिडिओ तहसीन पूनावाला यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक पांढरी कार थेट त्यांच्या आईला धडक देताना आणि त्यानंतर चालक घटनास्थळावरून पळ काढला .

शहजाद पूनावाला यांनी सोशल मीडियावर लिहिले की, काही तासांपूर्वी एका घृणास्पद व्यक्तीने जाणूनबुजून माझ्या आईच्या अंगावर कार घातली. त्या गंभीर जखमी झाल्या असून लवकरच शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. कार चालक पळून गेला. कृपया माझ्या आईसाठी प्रार्थना करा.या प्रकरणात त्यांनी पुणे पोलिसांसह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग करत, आरोपीला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पूनावाला यांच्या आई ड्रायव्हर आणि सहाय्यकासोबत बाहेर गेल्या होत्या. गॅस भरण्यासाठी त्या एका ठिकाणी थांबल्या असताना, एका कारने त्यांना जोरदार धडक दिली आणि चालक फरार झाला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या CCTV फुटेजवरून हा प्रकार अपघात नसून मुद्दाम केलेला हल्ला असल्याचा कुटुंबीयांचा दावा आहे.

तहसीन पूनावाला यांनी सांगितले की, आई ज्येष्ठ नागरिक आहे. गॅस भरताना ती बाजूला उभी होती, तेव्हा कारने तिला धडक दिली. हे सर्व मुद्दाम केल्यासारखे वाटते. त्यांनी आईचा एक्स-रे रिपोर्टही शेअर केला असून, त्यामध्ये हाड मोडल्याचे स्पष्ट झाले आहे. आईवर मोठी शस्त्रक्रिया करावी लागणार असून आयुष्यभरासाठी रॉड टाकावी लागेल. त्यांनी पोलिस सहआयुक्त आणि उपायुक्तांशी संपर्क साधला असून, हा प्रकार पूर्वनियोजित हल्ला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.

पुणे–मुंबई एक्सप्रेसवेवर तब्बल 15 तास वाहतूक ठप्प:1 गॅस टँकर पलटी

मुंबई–पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर आडोशी बोगद्याजवळ प्रोपोलिन गॅस वाहतूक करणारा टँकर पलटी झाल्याने अभूतपूर्व वाहतूक कोंडी निर्माण झाली. या अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक साधारण आठ तास पूर्णपणे ठप्प राहिली. मध्यरात्रीपर्यंत परिस्थिती धोकादायक असल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव महामार्ग दोन्ही बाजूंनी बंद ठेवण्यात आला होता. गॅस गळती सुरू असल्याने प्रशासनाने कोणतीही जोखीम न घेता वाहतूक थांबवण्याचा निर्णय घेतला. परिणामी हजारो वाहनचालक महामार्गावरच अडकून पडले.या कोंडीमुळे अनेक प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. काही वाहनचालक पहाटे चार वाजल्यापासून तर काही जण रात्री तीन किंवा पाच वाजल्यापासून या ठिकाणी अडकले आहेत.या दरम्यान काही कॅन्सरग्रस्त रुग्णही वाहतुकीत अडकले असल्याची माहिती मिळाली आहे. पाणी, अन्न आणि शौचालयांच्या सुविधांचा अभाव असल्याने प्रवाशांचे हाल झाले. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण यांना मोठा त्रास सहन करावा लागला. आपत्कालीन परिस्थितीत मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याची भावना वाहनचालकांमध्ये तीव्रतेने व्यक्त होत आहे दीर्घ प्रतीक्षेमुळे अनेकांची नियोजित फ्लाइट चुकल्याची माहिती समोर आली आहे. प्रवासाच्या नियोजनावर या घटनेचा मोठा परिणाम झाला असून लोकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. महामार्गावर इतक्या दीर्घकाळ अडकून पडल्याने प्रवाशांचा संयम सुटू लागल्याचे दिसून आले.

मध्यरात्रीनंतर धोका काही प्रमाणात कमी झाल्यानंतर अपघातग्रस्त टँकर तिसऱ्या लेनवर हलवण्यात आला. त्यानंतर मुंबईच्या दिशेने केवळ एका लेनवरून वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, वाहतुकीचा वेग अत्यंत मंद असल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा कायम आहेत. सुमारे 15 तासांपासून या परिसरात भीषण परिस्थिती निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले. टँकरमधून होणारी गॅस गळती अद्याप पूर्णपणे थांबलेली नसल्याने खबरदारी म्हणून हालचालींवर बंधने ठेवण्यात आली आहेत.
घटनेनंतर वाहनचालकांनी प्रशासनावर प्रश्न उपस्थित केले आहेत. टोल वसूल केला जातो, पण आपत्कालीन प्रसंगी महामार्ग इतका वेळ बंद का राहतो? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. तातडीने प्रभावी उपाययोजना करून महामार्ग पूर्णपणे मोकळा करावा, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. एकाच लेनवर सुरू असलेली वाहतूक अपुरी असल्याने कोंडी कमी होण्यास वेळ लागत आहे.

स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामींचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आशिर्वाद

पुणे-

नांदणीचे जगद्गुरू म्हटले जाणारे स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना आज आशीर्वाद दिले.सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिराच्या वतीने श्रीमत जिनेंद्र भगवान पंचकल्याण प्रतिष्ठा महोत्सव २०२६ आयोजित करण्यात आला आहे. या मंगलमय सोहळ्यास उपस्थित राहून राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जैन मुनींचे आशीर्वाद घेतले.

यावेळी महास्वामी यांनी आशीर्वाद देताना सांगितले की, आपल्या मंत्रिमंडळाच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने जैन समाजाप्रती श्रद्धा, भक्ती, समर्पण वृद्धिंगत होत राहो आणि समाजाचे आपल्याकडून सुटावेत. तसेच जैन समाजाची श्रद्धा, भक्ती, प्रेम वाढत राहो! अशी मंगलमय भावना व्यक्त करतो.पंचकल्याणक प्रतिष्ठा महोत्सव हा जैन समाजाचा अतिशय महत्त्वाचा आहे. या सोहळ्यात सहभागी होऊन मनाला अपार समाधान मिळाले, अशी भावना ना. पाटील यांनी यावेळी व्यक्त केली.यावेळी जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, भाजप नेते शेखर इनामदार आणि पृथ्वीराज पवार उपस्थित होते.

रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबारापूर्वी पुण्याच्या Golden King ला मागितली होती 5 कोटीची खंडणी

शेट्टी गोळीबार ;सर्व आरोपी पुण्याचे रहिवासी, कुणी विद्यार्थी, तर कुणी डिलिव्हरी बॉय

मुंबई- चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घरावर 5 राऊंड गोळीबार झाला. या घटनेची जबाबदारी लॉरेन्स गँगचा गुंड शुभम लोणकर याने घेतली. तोच शुभम, जो सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या प्रकरणातही वाँटेड आहे. रोहित शेट्टी यांच्या घरावर गोळीबार होण्याच्या 5 दिवसांपूर्वी पुण्याचा Golden Kings of India म्हणून सोशल मिडियावर फेमस असलेला चित्रपट फायनान्सर सनी नाना वाघचौरे यांच्याकडे 5 कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. ही धमकीदेखील शुभम लोणकर याने लॉरेन्स बिश्नोई गँगच्या नावाने दिली होती.तीन किलो सोन्याची चेन घालणाऱ्या सनीचे फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल आहेत. हा केवळ योगायोग होता की पूर्वनियोजित कट? रोहित शेट्टी यांच्या घरावर झालेल्या गोळीबाराच्या निमित्ताने लॉरेन्स गँगच्या निशाण्यावर बॉलिवूडचे मोठे स्टार्स तर नाहीत ना? असे प्रश्न निर्माण होत आहेत.

मुंबई क्राइम ब्रांच आणि इतर एजन्सीज आता या दृष्टिकोनातून प्रकरणाचा तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी आधी रोहित शेट्टी प्रकरणात शुभम लोणकरचे नाव कोर्टाच्या कागदपत्रांमध्ये ठेवले नव्हते, पण नंतर ते जोडले. मात्र, ज्या लॉरेन्सच्या नावाने गोळीबार झाला आणि धमकावण्यात आले, त्याचे नाव पोलिसांनी यात समाविष्ट केलेले नाही.
‘5 दिवसांत 5 कोटी मिळाले नाहीत तर बाबा सिद्दीकीसारखी अवस्था होईल’
एफआयआरनुसार, शुभमने पुण्यातील व्यावसायिक आणि फायनान्सर सनी नाना वाघचौरे यांना धमकावण्यासाठी 25 जानेवारीच्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय नंबरवरून दोनदा व्हॉट्सॲप कॉल केला, पण फोन उचलला नाही. त्यानंतर काही वेळाने त्याने मेसेज केला, ज्यात लिहिले होते- Shubham Lonkar, Cl me (शुभम लोणकर, मला कॉल कर).सनीने कॉलबॅक केला तेव्हा उत्तर मिळालं- ‘शुभम लोणकर बोलतोय, जर नाव माहीत नसेल, तर गुगलवर सर्च कर, कळेल. जेव्हा कॉल करेन, उचल.’ यानंतर फोन कट झाला.

दुसऱ्या दिवशी २६ जानेवारीच्या संध्याकाळी दुसऱ्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आला. हा कॉलही सनीने उचलला नाही. थोड्या वेळाने मेसेज आला, ज्यात लिहिलं होतं- ‘५ कोटी रुपये देण्यासाठी तयार व्हा. ५ दिवसांत पैसे मिळाले नाहीत तर बाबा सिद्दिकीसारखी अवस्था होईल.’

सनीने आपले वकील आतिश लांडगे यांना याची माहिती दिली. यानंतर त्यांनी पिंपरी चिंचवड पोलिसांत या प्रकरणाची तक्रार केली. पोलिसांना प्राथमिक तपासात कळले की कॉल आणि मेसेज VPN म्हणजेच व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्कद्वारे केले गेले होते. कॉल करणारा शुभम लोणकरच होता की आणखी कोणी, याचाही पोलीस शोध घेत आहेत.


रोहित शेट्टी 31 डिसेंबरच्या रात्री सुमारे 10 वाजता जुहू येथील त्यांच्या शेट्टी टॉवर या घरी पोहोचले. सुमारे 12:45 वाजता ते कुटुंबासोबत 7व्या मजल्यावर होते. तेव्हा पहिल्यांदा गोळीबार झाला. घराबाहेर दोन खाजगी अंगरक्षक आणि दोन पोलीस कर्मचारी तैनात होते. आधी वाटलं की फटाक्यांचा आवाज आहे, पण पुन्हा आवाज आल्यावर सीसीटीव्ही तपासले असता, गोळीबाराची माहिती मिळाली.काळ्या जॅकेट आणि पांढऱ्या पॅन्ट घातलेला एक तरुण गेटबाहेर उभा दिसला. त्याच्या हातात पिस्तूल होती. गोळीबारादरम्यान जिमच्या काचेवरही एक गोळी लागली. घटनेनंतर तो तरुण आपल्या साथीदारासोबत स्कूटरवरून गेला. शेट्टी कुटुंबाकडून मिळालेल्या माहितीनंतर जुहू पोलीस घटनास्थळी पोहोचले. तपासात पोलिसांना घटनास्थळावरून काडतुसांचे ५ रिकामे खोके मिळाले आहेत.दरम्यान, आरोपी स्कूटरवरून ट्युलिप स्टार हॉटेल जंक्शनवर पोहोचले. तिथे पोलिसांची नाकाबंदी होती, त्यामुळे आरोपींनी यू-टर्न घेऊन जुहू चर्चच्या दिशेने प्रस्थान केले. दोघांनी तिथेच स्कूटर सोडून दिली आणि ऑटोने पळून गेले. पोलिसांनी जुहू चर्चमधून बेवारस स्कूटर जप्त केली आहे.स्कूटरची तपासणी केली असता मालकाचा पत्ता लागला. त्यांनी चौकशीत सांगितले की, काही दिवसांपूर्वीच स्कूटर (MH12FN2205) आदित्य गायकवाडला ३० हजार रुपयांना विकली होती. पोलिसांनी आतापर्यंत एकूण ४ आरोपींना अटक केली आहे. मात्र, शेट्टी टॉवरवर गोळीबार करणारा शूटर अजूनही फरार आहे.
मुंबई पोलिसांनी सर्वप्रथम आरोपी आदित्य ज्ञानेश्वर गायकवाडला पकडले. मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, चारही आरोपींच्या बँक व्यवहारांच्या नोंदीतून अनेक पुरावे मिळाले आहेत, ज्यामुळे ते चौघे एकमेकांशी जोडलेले असल्याचे समोर आले. यांनीच स्कूटर आणि शस्त्रांची व्यवस्था केली होती.पोलिसांनुसार, चारही आरोपी पुण्याचे रहिवासी आहेत. यापैकी आदित्यने 30 हजार रुपयांना स्कूटर विकत घेऊन शूटरला दिली होती. आदित्य ऑनलाइन वस्तूंची डिलिव्हरी करतो. त्याच्या चौकशीतून पोलीस स्वप्नील, समर्थ शिवशरण पोमानी आणि सिद्धार्थ दीपक येनपुरे यांच्यापर्यंत पोहोचले. या चारही आरोपींपैकी स्वप्नील बंदू बेरोजगार आहे. या घटनेला अंजाम देण्यासाठी तोच थेट शुभम लोणकरच्या संपर्कात होता. तर उर्वरित दोन आरोपी समर्थ शिवशरण पोमानी आणि सिद्धार्थ येनपुरे यांनी टोळीत सामील होण्यासाठी स्कूटर आणि शस्त्रे खरेदी करण्यास मदत केली होती.अशा बातम्या आहेत .

शुभमला फौजी व्हायचे होते, आता मुंबईत वर्चस्व निर्माण करण्याची इच्छा असावी,32 वर्षांचा शुभम लोणकर महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहिवासी आहे. आधी तो भावासोबत पुण्यात डेअरी चालवत होता. तो आपल्या शरीरयष्टीमुळे सैन्यात भरती होऊ इच्छित होता. 2018-19 मध्ये त्याने राजस्थानमधील जैसलमेर येथे आर्मी भरतीची परीक्षाही दिली होती, पण तो नापास झाला.यानंतर शुभम, लॉरेन्स गँगच्या नेटवर्कशी सोशल मीडियाच्या माध्यमातून जोडला गेला. मग थेट त्याचे अनमोल बिश्नोईशी बोलणे सुरू झाले. शुभमचे नाव पहिल्यांदा बाबा सिद्दिकी खून प्रकरणात आले. त्यानेच फेसबुक पोस्टद्वारे हत्येची जबाबदारी घेतली होती. तो या हत्याकांडात वॉन्टेडही आहे. शुभम नेपाळमार्गे परदेशात पळून गेला असावा अशी शक्यता आहे. आता अनमोल बिश्नोईच्या अटकेनंतर आणि गोल्डी बराडच्या गँगपासून वेगळे झाल्यानंतर शुभमच लॉरेन्स गँगची महत्त्वाचा दुवा बनला आहे.मागील दोन घटनांमध्ये शुभम लोणकरसोबत आरजू बिश्नोईचे नावही येत आहे. काही महिन्यांपूर्वीच गायक बी प्राकला धमकी देण्याच्या प्रकरणात पहिल्यांदा आरजू बिश्नोईचे नाव समोर आले होते. आता रोहित शेट्टीच्या घरावर झालेल्या गोळीबारानंतर सोशल मीडिया पोस्टवर शुभम लोणकरसोबत आरजू बिश्नोईचे नाव आले आहे.असेही म्हटले जाते की, कदाचित शुभमनेच आपले नाव आरजू बिश्नोई असेही ठेवले असण्याची शक्यता जास्त आहे. लॉरेन्सनंतर कुख्यात नाव अनमोल बिश्नोईचे होते, पण आता तो पोलिसांच्या देखेरखीखाली आहे.

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना विमा कवच:राज्यसभेत माहिती

नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी 2026

आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (AB-PMJAY) ही योजना भारताच्या तळागाळातील लोकसंख्येच्या 40% कुटुंबांना दरवर्षी दुय्यम श्रेणीच्या आणि तृतीय श्रेणीच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी प्रति कुटुंब 5 लाख रुपयांचे आरोग्य रक्षण विमा कवच  प्रदान करते. ऑक्टोबर 2024 मध्ये, आयुष्मान वय वंदना कार्डद्वारे या योजनेचा विस्तार झाला आणि 4.5 कोटी कुटुंबांमधील कोणत्याही सामाजिक-आर्थिक स्थितीतल्या  70 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना, विमा कवच प्रदान करण्यात आले.

दिनांक 31.12.2025 पर्यंत, सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये 96.73 लाखांहून अधिक आयुष्मान वय वंदना कार्ड तयार करण्यात आली आहेत.

दिनांक 31.12.2025 पर्यंत, आयुष्मान वय वंदना कार्ड लाभार्थ्यांपैकी एकूण 10.33 लाख लाभार्थ्यांची  रुग्णालय  भर्ती स्वीकृत   करण्यात आली आहे, ज्यासाठी 2,154.37 कोटी रुपये खर्च आला. अंमलबजावणी करणाऱ्या राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील 3.93 लाख रुग्णालय  भर्ती, ज्यासाठी 820.42 कोटी रुपये खर्च आला, तो महिला लाभार्थ्यांसाठी आहे आणि 6.40 लाख भर्ती, ज्याचा खर्च  1333.94 कोटी रुपये आहे, तो पुरुष लाभार्थ्यांसाठी झाला आहे 

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री  प्रतापराव जाधव यांनी आज राज्यसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

पुणे शहराची भविष्यातील गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करण्यात येणार

  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुरंदर विमानतळ विकास कामांचा आढावा

मुंबई, दि. ३: वेगाने होत असलेल्या पायाभूत सुविधांच्या विकासामुळे पुणे शहर व परिसर गुंतवणुकीचे आकर्षण बनले आहे. त्यामुळे पुणे शहर व परिसरात औद्योगिकरण वाढत आहे. नागरीकरणाचा वेगही गतिमान आहे, अशा परिस्थितीत भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदर विमानतळाची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

विमानतळासाठी भूसंपादन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून कालमर्यादेत पूर्ण करून विमानतळ विकासाचा मोठा टप्पा पार करावा,असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी पुरंदर विमानतळ विकासकामांचा आढावा घेताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेची विशिष्ट पद्धत ठरविण्यात यावी. भूसंपादनाकरिता महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कार्यवाही पूर्ण करावी. विमानतळ विकासामध्ये सिडको, नगरविकास विभाग यंत्रणांनी आपली जबाबदारी निश्चित करून भूमिका यशस्वीपणे पार पाडावी. विमानतळ निर्माण झाल्यानंतर हा परिसर ‘ डेव्हलपमेंट झोन’ म्हणून पुढे येणार आहे. त्या अनुषंगाने सिडकोने परिसरात आत्ताच जमीन उपलब्धतेची खात्री करून घ्यावी.

राज्यातील विमानतळाचा विकास करण्याची जबाबदारी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे आहे. कंपनीची क्षमता वृद्धी करून राज्यातील निर्माणाधीन असलेली सर्व विमानतळे विकासाकरिता कंपनीकडे देण्यात यावीत. पुरंदर विमानतळाच्या उर्वरित भूसंपादनाची अधिसूचना ‘ एमआयडीसी’ने काढावी तसेच निधीची उपलब्धतेबाबत विशिष्ट पद्धत ठरवण्यात यावी. विमानतळ विकासासाठी निधी उपलब्धतेचा प्रस्ताव पुढील मंत्रिमंडळ बैठकीत आणावा, असे निर्देशही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.

सद्यस्थितीत प्रस्तावित क्षेत्रापैकी १२१६ हेक्टर आर जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण करावी. या संयुक्त मोजणीचा, हरकतींचा अहवाल शासनास सादर करण्यात यावा, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, प्रधान सचिव (उद्योग) पी. अन्बळगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू आदी उपस्थित होते. दूरदृश्य संवाद प्रणाली द्वारे पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी बैठकीत सहभाग घेतला.

या गावात भूसंपादनाची प्रक्रिय

पुणे जिल्ह्यातील वनपुरी, कुंभार वळण, उदाची वाडी, एखतपूर, मुंजवडी, खानवडी व पारगाव या सात गावात पुरंदर विमानतळासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. या गावांमध्ये भूसंपादनासाठी गाव निहाय उपजिल्हाधिकारी व उपविभागीय अधिकारी दर्जाचे भूसंपादन अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत.
0000

‘ओव्या आजीच्या’, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ पुस्तकांचे प्रकाशन

पुणे : सुलभा रारावीकर लिखित ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ आणि कै. कमलाबाई रारावीकर लिखित ‘ओव्या आजीच्या’ या पुस्तकांचे प्रकाशन ‘नरेडको माही’च्या राष्ट्रीय अध्यक्षा स्मिता पाटील आणि बालरंगभूमी चळवळीचे प्रणेते, लेखक-दिग्दर्शक प्रकाश पारखी यांच्या हस्ते झाले.

वारजे येथील ओव्हलनेस्ट सोसायटीच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. रघुनाथ रारावीकर, लेखिका-दिग्दर्शिका विनिता पिंपळखरे, संयोजक प्रज्ञा रारावीकर-ठाकूर मंचावर होते. ठाकूर यांच्या संकेतस्थळाचे यावेळी उद्‌घाटन या वेळी करण्यात आले.

लेखनाविषयी बोलताना सुलभा रारावीकर म्हणाल्या, शिक्षिका म्हणून कार्यरत असताना शिक्षकांनी लिहिलेले नाटक स्नेहसंमेलनात सादर व्हावे अशा अपेक्षेमुळे विद्यार्थ्यांसाठी विविध विषयांवर साध्या, सोप्या, सरळ भाषेत लिखाण करत गेले. ज्यातून महापुरुषांच्या कथा नाट्य रूपात साकारल्या.

स्वागतपर प्रास्ताविकात प्रज्ञा ठाकूर म्हणाल्या, ओव्या हा साहित्यप्रकार काळाच्या ओघात मागे पडल्याचे जाणवले. आजीने रचलेल्या आणि संकलित केलेल्या ओव्यांच्या पुस्तिकेच्या माध्यमातून हा पुढे आणण्याचा प्रयत्न आहे. तसेच आई शिक्षिका व साहित्याची उत्तम जाणकार असल्यामुळे आणि पाठ्यपुस्तकांव्यतिरिक्त शिक्षण देण्याच्या इच्छेतून तिने लिहिलेल्या नाटिकांचे पुस्तकही या निमित्ताने प्रकाशित करण्यात आले आहे.

आपली संस्कृती लुप्त होत असताना मराठी भाषेतील साहित्य-संस्कृतीचा ठेवा ‘ओव्या आजीच्या’ या पुस्तकाच्या माध्यमातून जपला जात असून पुढील पिढीकडे प्रवाहीत होत आहे. समाजात सकारात्मकता निर्माण होण्यासाठी आणि मराठी भाषेची थोरवी टिकून रोहण्यासाठी अशा साहित्यकृतींची उपयुक्तता मोठ्या प्रमाणात आहे, असे मत स्मिता पाटील यांनी व्यक्त केले.

जाण असणाऱ्या शिक्षिकेचे अभ्यासपूर्ण लिखाण नाटिकांच्या माध्यमातून समोर आले आहे तसेच सहज गुणगुणता येईल, अशा शब्दांमध्ये रचलेल्या ओव्या मराठी संस्कृतीची ओळख दर्शवित आहेत, असे मत विनिता पिंपळखरे यांनी व्यक्त केले.

प्रकाश पारखी म्हणाले, ‘शालेय रंगभूमीसाठी नाटिका’ या पुस्तकाच्या माध्यमातून शिक्षकांनी केलेल्या शालेय स्तरावरील नाट्य चळवळीच्या कार्याची माहिती समाजापर्यंत पोहोचेल. शालेय विद्यार्थ्यांसाठी नाटिकांचे पुस्तक लिहिणे गरजेचे आहे. सर्वसामान्य पालक फक्त अभ्यास आणि गुणांमागे धावत आहेत; परंतु मुलांचा सर्वांगिण विकास होण्यासाठी अभ्यासविषयक नाटिकांमार्फत मुलांपर्यंत ज्ञान पोहोचल्यास विषयाचे आकलन होणे सोपे जाते.

मान्यवरांचे स्वागत अंबादास ठाकूर, प्रज्ञा ठाकूर, मृणालिनी गवांदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुचित्रा ठकार यांनी तर आभार प्रज्ञा ठाकूर यांनी मानले.

संगीतातून ईश्वर दर्शन-पद्म विभूषण उस्ताद अमजद अली खान यांचे विचार


एमआयटी डब्ल्यूपीयूतर्फे  प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा, खासदार ज्योथिमणी सेन्नमलाई, अभिनेता पद्मश्री डॉ. मोहन आगाशे आणि सुप्रसिद्ध सरोजवादक पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना ‘भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान

पुणे, दि. ३ फेब्रुवारी: ” संगीतातून ईश्वर दर्शन घडते. मी केवळ संगीतातून लोकांशी संवाद साधतो. सुरांना समजून घेणे गरजेचे आहे तसेच गुरूंच्या चरणी समर्पण झाल्यास ज्ञान प्राप्तीचा मार्ग उघडला जातो. स्वर हेच ईश्वर आहे. असे मानून संगीताची सेवा केली.” अशी भावना पद्म विभूषण सरोजवादक उस्ताद अमजद अली खान यांनी व्यक्त केली.
एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी व एमआयटी स्कूल ऑफ गव्हर्नमेंटतर्फे भारत ,पुणे यांच्या तर्फे आयोजित करण्यात आलेल्या भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार २०२६ प्रदान समारंभ संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड होते.
यावेळी जगविख्यात शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे कार्याध्यक्ष व भारत अस्मिता राष्ट्रीय पुरस्कार समितिचे निमंत्रक राहुल विश्वनाथ कराड, हभप तुळशीराम दा कराड, एमआयटी डब्ल्यूपीयूचे  कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस आणि सीएओ डॉ. प्रसाद खांडेकर उपस्थित होते.
यावेळी आंत्रप्रेन्यूअरशीपसाठी विशेष कार्य केल्याबद्दल प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा यांना ‘भारत अस्मिता आचार्य श्रेष्ठ पुरस्कार’ तामिळनाडू येथील तरुण खासदार ज्योथिमणी सेन्नीमलाई, यांना ‘भारत अस्मिता जन प्रतिनिधी श्रेष्ठ पुरस्कार’ चित्रपट अभिनेता पद्मश्री डॉ. मोहन आगाशे आणि भारतीय शास्त्रीय संगीत जगभर पसरविल्याबद्दल पद्मविभूषण उस्ताद अमजद अली खान यांना ‘भारत अस्मिता जन जागरण श्रेष्ठ पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येकी अडीच लाख रूपये, सन्मानपत्र व स्मृती चिन्ह हे पुरस्काराचे स्वरूप होते.
डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले,” विकसित भारत २०४७ असा सकंल्प मांडत आहोत. इतके वर्ष प्रतिक्षा कशासाठी करायची. लवकरात लवकर विकास साधला पाहिजे. समाजासाठी कार्य करणार्‍या सर्व पुरस्कारार्थींचा सर्वांनी आदर्श घेऊन सामाजिक कार्य करावे. भारत अस्मिता पुरस्कार विजेते खर्‍या अर्थाने युवकांचे प्रतीक आहेत.”
विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, “आजच्या काळात मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धती आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी सतत मोठ्यांकडून शिकत जावे. मन हे चंचल आहे संत ज्ञानेश्वर महाराजांनी दाखविलेल्या मार्गावर चालून विनाशकारी दिशेने चाललेल्या जगाला थांबवू शकतो. जगातील सर्वात मोठ्या डोममधून भारतीय तत्वज्ञान, परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन होते. अंतिम सत्य काय आहे, जीवन कसे जगावे आणि जगू नये याचे ज्ञान होणे गरजेचे आहे.”
डॉ. राहुल कराड म्हणाले, भारत अस्मिता पुरस्कार हा आपला राष्ट्र गौरव निर्माण करणारा आहे.
प्रा. डॉ. श्रीवर्धनी के. झा म्हणाल्या,” शांती आणि मूल्य महत्वाचे आहे. जिज्ञासेच्या जोरावर केलेल्या कार्याचा हा सन्मान आहे. आता माझ्यावर आणखी मानवकल्याणाची जबाबदारी वाढली आहे.”
खासदार ज्योथिमणी सेन्नीमलाई म्हणाल्या,” मूल्य माणसाला जगण्याचं बळ देतात. मला भारत जोडो अभियानातून देशाची बहुविविधता कळली. त्यातून केलेल्या सामाजिक कामाचा हा सन्मान आहे.”
अभिनेता पद्मश्री मोहन आगाशे म्हणाले, “अध्यात्म विज्ञानाशिवाय आणि विज्ञान अध्यात्माशिवाय अपूर्ण आहे.”
या प्रसंगी दुघर्टनेत निधन झालेले राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. गौतम बापट व आभार प्रदर्शन डॉ. आर.एम.चिटणीस यांनी केले.

भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल असे रशियाला वाटत नाही:ट्रंपवर विश्वास नाही

ट्रम्प यांचा दावा- भारत रशियन तेल खरेदी करणे थांबवेल

मॉस्को-रशियाने मंगळवारी सांगितले की, भारत सरकारकडून अद्याप कोणतेही अधिकृत निवेदन आलेले नाही, ज्यात असे म्हटले असेल की भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवणार आहे.रॉयटर्सच्या वृत्तानुसार, क्रेमलिनचे प्रवक्ते आणि रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांनी सांगितले की, रशिया भारताबाबत ट्रम्प यांच्या टिप्पणींचे विश्लेषण करत आहे.जेव्हा त्यांना थेट विचारण्यात आले की भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्याचा निर्णय घेतला आहे का, तेव्हा त्यांनी सांगितले की, या मुद्द्यावर दिल्लीकडून अद्याप कोणतेही निवेदन आलेले नाही.

पेस्कोव यांचे हे विधान अशा वेळी आले आहे, जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सोमवारी सांगितले होते की, भारताने अमेरिकेसोबत झालेल्या व्यापार कराराअंतर्गत रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सहमती दर्शवली आहे.\डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी घोषणा केली होती की, अमेरिका आणि भारत यांच्यात एक व्यापार करार झाला आहे. या अंतर्गत अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील शुल्क 50% वरून 18% पर्यंत कमी करण्यास सहमती दर्शवली आहे.

या बदल्यात ट्रम्प यांचा दावा आहे की, भारत रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवेल आणि व्यापाराशी संबंधित अडथळे देखील कमी करेल. भारताने त्यांच्या या घोषणेवर ना स्वीकार केला आहे ना ती फेटाळली आहे.

फेब्रुवारी 2022 मध्ये रशियाने युक्रेनवर लष्करी हल्ला केला होता. यानंतर दोन्ही देशांमध्ये युद्ध सुरू झाले, जे अजूनही सुरू आहे. या युद्धामुळे अमेरिका आणि युरोपीय देशांनी रशियावर कठोर आर्थिक निर्बंध लादले, विशेषतः त्याच्या तेल आणि वायू क्षेत्रावर.या निर्बंधांमुळे रशियाला आपले कच्चे तेल स्वस्त दरात विकण्यासाठी नवीन खरेदीदार शोधावे लागले. याच काळात भारताने रशियाकडून सवलतीच्या दरात तेल खरेदी करण्यास सुरुवात केली.

आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारत आणि रशियामधील द्विपक्षीय व्यापार वाढून 68.7 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला. परंतु यात मोठा वाटा कच्च्या तेलाचा होता. भारताने एकट्याने 52.73 अब्ज डॉलरचे कच्चे तेल रशियाकडून खरेदी केले होते.

आता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणत आहेत की, भारताने रशियाकडून तेल आयात थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. जर भारताने खरोखरच रशियन तेलाची आयात पूर्णपणे बंद केली, तर भारत-रशियाचा एकूण द्विपक्षीय व्यापार 20 अब्ज डॉलरपेक्षाही खाली येऊ शकतो.भारताचे पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी गेल्या महिन्यात सांगितले होते की, रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीत पुढेही घट होण्याची शक्यता आहे. पुरी यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते की, रशियाकडून तेल खरेदीत झालेल्या घटीचे कारण कोणत्याही राजकीय किंवा परदेशी दबावामुळे नाही, तर बाजारातील परिस्थितीचा परिणाम आहे.

त्यांनी सांगितले होते की, भारत आता तेल पुरवठ्यासाठी कोणत्याही एका देशावर अवलंबून राहू इच्छित नाही आणि याच कारणामुळे वेगवेगळ्या देशांकडून तेल खरेदी करून पुरवठ्याच्या स्रोतांमध्ये विविधता आणली जात आहे. त्यांनी सांगितले होते की, रशियाकडून तेलाचा पुरवठा कमी होऊन सुमारे 13 लाख बॅरल प्रतिदिन राहिला आहे, तर गेल्या वर्षी तो सरासरी 18 लाख बॅरल प्रतिदिन होता.

जरी पुरी यांनी रशियन तेल आयातीत कपात करण्याबाबत कोणत्याही अमेरिकन दबावाचा उल्लेख केला नाही, परंतु ट्रम्प उघडपणे दावा करत आहेत की त्यांनी भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून रोखले आहे.

अमेरिका रशियन तेलाची विक्री थांबवून पुतिन यांच्यावर दबाव वाढवू इच्छित आहे.

अमेरिका, पुतिन यांच्यावर दबाव वाढवण्यासाठी भारतासह अनेक देशांना रशियाकडून तेल खरेदी थांबवण्यास सांगत आहे. भारताने हा दबाव चुकीचा आणि अयोग्य असल्याचे म्हटले आहे आणि सांगितले आहे की, त्याचे ऊर्जा धोरण देशाच्या हितानुसार ठरवले जाते.

गेल्या आठवड्यात दावोसमध्येही बेसेंटने फॉक्स न्यूजला सांगितले होते की, ट्रम्प यांनी 25% शुल्क लावल्यानंतर भारताने तेलाची खरेदी खूप कमी केली होती आणि आता ती जवळजवळ बंद केली आहे.

काही ताज्या अहवालांमध्ये म्हटले आहे की, भारताच्या काही खासगी कंपन्यांनी रशियाकडून तेलाची आयात कमी केली आहे, परंतु भारत सरकारचे म्हणणे आहे की, रशियाकडून तेलाची खरेदी सुरू आहे.

भारत रशियन तेल खरेदीच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला.

डिसेंबर 2025 मध्ये भारत रशियाकडून तेल खरेदी करण्यात तिसऱ्या क्रमांकावर आला. तुर्कस्तान दुसरा सर्वात मोठा खरेदीदार बनला. तुर्कस्तानने 2.6 अब्ज युरोचे तेल खरेदी केले.

भारताने डिसेंबरमध्ये रशियाकडून 2.3 अब्ज युरो म्हणजेच सुमारे 23,000 कोटी रुपयांचे तेल खरेदी केले. नोव्हेंबरमध्ये भारताने 3.3 अब्ज युरो म्हणजेच सुमारे 34,700 कोटी रुपयांचे तेल खरेदी केले होते.

चीन अजूनही सर्वात मोठा खरेदीदार आहे, त्याने डिसेंबरमध्ये रशियाकडून 6 अब्ज युरो म्हणजेच सुमारे 63,100 कोटी रुपयांचे तेल खरेदी केले.

भारताची खरेदी कमी होण्याचे सर्वात मोठे कारण रिलायन्स इंडस्ट्रीज होती. रिलायन्सच्या जामनगर रिफायनरीने रशियाकडून तेल खरेदी जवळपास निम्मी केली.

आधी रिलायन्स संपूर्ण पुरवठा रशियाची कंपनी रोसनेफ्टकडून घेत असे. पण अमेरिकेच्या निर्बंधांच्या भीतीमुळे आता कंपन्या रशियाकडून कमी तेल खरेदी करत आहेत.

रिलायन्स व्यतिरिक्त, सरकारी तेल कंपन्यांनीही डिसेंबरमध्ये रशियाकडून तेल खरेदी सुमारे 15% कमी केली.

रशियाने सवलत देणे कमी केले.

युक्रेन युद्धानंतर रशियाने 20-25 डॉलर प्रति बॅरल स्वस्त क्रूड ऑइल विकण्यास सुरुवात केली. त्यावेळी आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 130 डॉलर प्रति बॅरल होती, त्यामुळे ही सवलत भारतासाठी परवडणारी होती.

मात्र, आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत 63 डॉलर प्रति बॅरल झाली आहे. रशियानेही आपली सवलत कमी करून 1.5 ते 2 डॉलर प्रति बॅरल केली आहे. इतक्या कमी सवलतीत भारताला पूर्वीसारखा फायदा मिळत नाहीये, शिवाय रशियातून तेल आणण्यासाठी शिपिंग आणि विमा खर्चही जास्त येतो.

याच कारणामुळे भारत आता पुन्हा सौदी, यूएई आणि अमेरिका यांसारख्या स्थिर आणि विश्वासार्ह पुरवठादारांकडून तेल खरेदी करत आहे, कारण आता किमतीत पूर्वीसारखा मोठा फरक राहिलेला नाही.

खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाचा लाभ जलदगतीने मिळण्याच्यादृष्टीने ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापर करण्यास मान्यता

क्रीडा संघटनांनी ब्लॉकचेन प्रणालीवर विहीत मुदतीत माहिती अपलोड करावी- जिल्हा क्रीडा अधिकारी

पुणे, दि. ३: गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवेतील ५ टक्के आरक्षणाचा लाभ पारदर्शक व जलद आणी त्रुटीमुक्त पद्धतीने मिळावा ब्लॉकचेन व कृत्रीम बुद्धीमत्ता अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्यास शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या ८ जानेवारी २०२६ रोजीच्या शासन निर्णयाने मान्यता देण्यात आली आहे.

ब्लॉकचेन व कृत्रीम बुद्धीमत्ता या प्रणालीचा लाभ तळागाळातील खेळाडूपर्यंत पोहोचण्यासाठी शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. यादृष्टीन पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी.

क्रीडा संघटनेने करावयची कार्यवाही: राज्य व राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या सर्व अधिकृत एकविध क्रीडा संघटनांनी अभिलेख जतनाकरिता स्पर्धा संपल्यानंतर ७ दिवसांच्या आत स्पर्धेचा अंतिम निकाल, सहभागी खेळाडूंची यादी आणी गुणपत्रिका विहित नमुन्यात “xlsx “ फाईल “क्रीडा ई प्रमाण” प्रणालीवर (https://sports.maharashtra.gov.in/) वर अपलोड करण्यासाठी संचालनालयास सादर करणे क्रीडा संघटनावर बंधनकारक आहे. ही माहिती संबधीत संघटनेच्या अधिकृत पदाधिकाऱ्यांने डीजीटल स्वाक्षरीने प्रमाणित करणे आवश्यक आहे. विहित मुदतीत माहिती ‘ब्लॉक चेन’वर अपलोड न करणाऱ्या संघटना स्मार्ट कॉन्टॅक्टद्वारे स्वंयचलीतरित्या डिफॉल्टर यादीत समाविष्ट करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत खेळाडूंचे नुकसान झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी आपल्या संघटनेची राहील.

खेळाडूच्या नोंदणी प्रक्रियेकरिता विशेष मोहीम: खेळाडूंनी आपल्या ‘क्रीडा ई प्रमाण’” प्रणालीवर (https://sports.maharashtra.gov.in/) आपल्या आधार संलग्न आयडीद्वारे लॉगीन करुन नोंदणी करणे अनिवार्य आहे. खेळाडूंनी सादर केलेली माहिती आणी संघटनेने ब्लॉकचेनवर अपलोड केलेला, हॅश यांची प्रणालीद्वारे स्वंयचलीत पडताळणी होणार आहे. त्यामुळे खेळाडूंना यापुढे पडताळणीसाठी प्रत्यक्ष विभागीय कार्यालयात येण्याची किंवा कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही.

अपिलीय तरतूद: तांत्रिक कारणास्तव एखाद्या खेळाडूचे प्रमाणपत्र नांमजूर झाल्यास तक्रार करण्याची व तक्रारी नंतरही खेळाडूस प्रमाणपत्र न मिळाल्यास ३० दिवसांच्या आत ऑनलाईनपद्धतीने अपील करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

शासन निर्णयान्वये जुनी कागदपत्रावर आधारीत पडताळणी प्रक्रिया बंद करुन पुर्णत: डिजीटल क्रीडा ई प्रमाणपत्र प्रणाली कार्यान्वित करण्यात आलेली आहे. खेळाडूंना ५ टक्के आरक्षणाच्या लाभ मिळण्याच्यादृष्टीने क्रीडा संघटनांनी ब्लॉकचेनवर विहीत मुदतीत माहिती अपलोड करावी, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे.

साहित्य संवर्धन आघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध

पुणे-
महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कारभार अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक करण्याच्या उद्देशाने ‘साहित्य संवर्धन आघाडी’ने आपल्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन केले. साहित्य चळवळीला व्यापक सामाजिक अधिष्ठान मिळावे, वाचनसंस्कृती बळकट व्हावी आणि नव्या पिढीला मराठीशी जोडण्याचे काम प्रभावीपणे व्हावे, यासाठी ठोस आणि कृतीशील कार्यक्रम राबवण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे.
जाहीरनाम्यानुसार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा संपूर्ण कारभार घटनात्मक चौकटीत, पारदर्शक पद्धतीने आणि सदस्याभिमुख पद्धतीने चालवला जाईल, असे आघाडीने स्पष्ट केले आहे. राज्यभर कार्यरत असलेल्या परिषदेच्या विविध जिल्हा शाखा अधिक सक्षम करण्यासाठी दरवर्षी ठराविक अर्थसाह्य देण्याचे धोरण राबवले जाईल. या निधीच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर साहित्यिक उपक्रम, वाचन चळवळ आणि सांस्कृतिक कार्यक्रम नियमितपणे आयोजित करण्यास प्रोत्साहन दिले जाणार आहे.
दरवर्षी एका जिल्ह्यात विभागीय साहित्य संमेलन आयोजित करून स्थानिक लेखकांना दर्जेदार लेखनासाठी प्रेरणा देणे आणि त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा जाहीरनाम्यातील महत्त्वाचा मुद्दा आहे. तसेच युवा लेखकांना योग्य दिशा मिळावी यासाठी लेखन कार्यशाळा, संवाद सत्रे आणि मार्गदर्शन शिबिरे शाखांच्या माध्यमातून राबवली जाणार आहेत.
परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या मराठी भाषेच्या परीक्षांना राज्य शासनाची मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. या परीक्षांना विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी शाळा व महाविद्यालयांशी समन्वय साधण्यात येणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वास्तूसाठी अधिक विस्तीर्ण जागा मिळविण्यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल, तसेच परिषदेच्या आर्थिक स्वावलंबनासाठी उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यावर भर देण्यात येणार आहे.
परिषदेच्या आजीव सदस्यांना ग्रंथप्रकाशन व अन्य उपक्रमांसाठी सभागृह अत्यल्प शुल्कात उपलब्ध करून देणे आणि ‘साहित्य पत्रिका’ पुन्हा एकदा मुद्रित स्वरूपात प्रत्येक आजीव सदस्यापर्यंत पोहोचवण्याचा निर्णयही जाहीरनाम्यात नमूद करण्यात आला आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर तो सार्थ ठरेल असे कृतीशील कार्यक्रम राबवले जातील, असेही स्पष्ट करण्यात आले.
‘पुणे पुस्तक महोत्सवा’ला मिळणाऱ्या वाढत्या प्रतिसादाचा उल्लेख करत यंदाच्या ‘१०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या’ निमित्ताने कार्यक्षेत्रात १०० पुस्तक महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन जाहीर करण्यात आले. तसेच ‘जिथे मराठी तेथे साहित्य परिषद’ या संकल्पनेतून जगभरातील मराठी माणसाला मराठीशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
साहित्य निर्मिती करताना लहान मुलांना केंद्रस्थानी ठेवणे, परप्रांतीयांमध्ये मराठीविषयी आस्था निर्माण करणे आणि लेखक, वाचक, प्रकाशक, वितरक व विक्रेते या सर्व घटकांसाठी सक्रिय भूमिका घेण्याचा निर्धार आघाडीने व्यक्त केला आहे.
या निवडणुकीत ‘साहित्य संवर्धन आघाडी’कडून अध्यक्षपदासाठी योगेश सोमण, प्रमुख कार्यवाहपदासाठी स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्षपदासाठी प्रदीप निफाडकर हे उमेदवार आहेत. इतर पदासाठी आघाडीचे अन्य सात उमेदवार निवडणूक लढवत असून, या सर्व उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी आजीव सदस्यांचा सक्रिय पाठिंबा अपेक्षित असल्याचे आवाहन आघाडीने केले आहे.