पुणे-पुणे नवरात्रौ महोत्सवा तर्फे दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘महर्षी’ पुरस्कार यंदा ज्येष्ठ साहित्यिक व संत साहित्याचे अभ्यासक गुरुवर्य डॉ. अशोक कामत यांना देण्यात येणार आहे. मंगळवार दिनांक १२ ऑक्टोबर २०२१ रोजी सांयकाळी ५ वाजता पत्रकार भवन (कमिन्स हाॅल) नवी पेठ, पुणे येथे हा कार्यक्रम होणार असून संत साहित्याचे गाढे अभ्यासक व पंजाबच्या गुमान येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाईल. यावेळी ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत माजी आमदार उल्हास पवार आणि बडोदा येथे झालेल्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. देवीची मूर्ती असणारे स्मृतीचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे. साहित्य, कला, संस्कृती, शिक्षण, सामाजिक, कृषी, उद्योग, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रात सातत्याने योगदान देणाऱ्या व्यक्तीस ‘महर्षी’ पुरस्काराने दरवर्षी महोत्सवात गौरवले जाते. करोना परिस्थितीतील नियम पाळून हा कार्यक्रम संपन्न होईल असे पुणे नवरात्रौ महोत्सवाचे संस्थापक आयोजक व पुणे म. न. पा. कॉंग्रेस पक्ष गटनेते आबा बागुल यांनी सांगितले.
गुरुवर्य डॉ. अशोक कामत हे ज्येष्ठ साहित्यिक, संत साहित्याचे अभ्यासक आणि शिक्षणतज्ञ असून मराठी आणि हिंदीमध्ये त्यांनी विपुल ग्रंथ लेखन व संपादन केले आहे. संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत एकनाथ, संत कबीर यांचासह अनेक संत साहित्याचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. त्यांच्या गुरुकुल मध्ये १२००० हून अधिक दुर्मिळ ग्रंथ असून देशातील सर्व प्रमुख हिंदी व मराठी दैनिके व नियत कालिकांमध्ये त्यांचे २०० हून अधिक प्रबंध प्रकाशित झाले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाच्या अनेक सामित्यांमध्ये सदस्य म्हणून त्यांनी भरीव योगदान दिले. महाराष्ट्रच्या हिंदी पाठ्यपुस्तक समितीच्या माध्यमातून 8० हून अधिक पाठ्यपुस्तकांच्या संपादनात त्यांचा सह्भात होता. या शिवाय उत्कृष्ट ग्रंथ उत्तेजन समिती, महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र साहित्य पत्रिका संपादक मंडळ, भारतीय संस्कृतीकोश, भारतीय श्रीरामकोश , मराठी बालकुमार साहित्य संमेलन, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ परीक्षा समिती, आळंदी येथील भारतीय विद्याभवन हरिकथा कीर्तन महाविद्यालय, नामदेव समाजोन्नती परिषद, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा इत्यादी संस्थांमध्ये त्यांनी सातत्याने योगदान दिले.
आकाशवाणी आणि दूरदर्शनवर संत साहित्याचे त्यांचे अनेक कार्यक्रम प्रसारित झाले. त्यांच्या गुरुकुलमध्ये संतसाहित्य, संशोधन, संकलन, संपादन, समाजप्रबोधन कार्य सुरु असून मध्यकालीन सुमारे ५० श्रेष्ठ मराठी ग्रंथांचे त्यांनी प्रकाशन केले आहे. तसेच दरवर्षी संतसाहित्याला वाहिलेली मराठी दैनंदिनी ते प्रकाशित करतात. त्यांचे लेखन, संशोधन आणि संपादित ग्रंथांना अनेक पुरस्कारने गौरवले गेले आहे.
या कार्यक्रमाचा समन्वय सुनिल महाजन, नंदकुमार बानगुडे, घनश्याम सावंत, अमित बागुल, रमेश भंडारी, नंदकुमार कोंढाळकर व राजेंद्र बागुल करीत आहे.