पुणे – अनेक आबालवृद्ध नागरिक तळजाई, हनुमान आणि वेताळ टेकड्यांवरील झाडे आणि पशुपक्षी यांचे जतन करतात, निगा राखतात त्यांच्या प्रयत्नांना राज्य सरकारच्या पर्यटन आणि वन खात्याने पाठबळ देणे आवश्यक आहे अशी मागणी आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज (शुक्रवार) केली.
जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. या बैठकीतील चर्चेत भाग घेऊन आमदार शिरोळे यांनी काही सूचना केल्या. यात टेकड्यांवर पहाटेच्या वेळी अनेक नागरिक फिरण्यासाठी, व्यायामासाठी जातात तेव्हा पर्यावरण राखण्याचे काम करतात. अनेक स्वयंसेवी संस्थाही त्यात भाग घेतात. राज्य सरकारच्या वनखात्याने पाचगांव पर्वती वनविहार प्रकल्प यशस्वी केला आहे. याच धर्तीवर चतु:श्रृंगी ते सिंबायोसिस महाविद्यालय आणि फर्ग्युसन महाविद्यालय येथील वेताळ व हनुमान टेकड्यांवर वनविहार प्रकल्प राबवावेत असे आमदार शिरोळे यांनी बैठकीत बोलताना सांगितले.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सदस्यांना पुणे जिल्हा नियोजन समितीमध्ये सदस्य म्हणून तातडीने घेतले जावे आणि यासंबंधी दिनांक दोन डिसेंबर २०१३ रोजी घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी करावी, याबाबत आमदार शिरोळे यांनी बैठकीत आग्रह धरला.