पुणे : जनमानसात चांगली प्रतिमा, लोकांसाठी मनापासून झटणारा,भेदभाव न करणारा , जात-पात न पाळणारा, जुन्या आणि नव्यांचा मेळ आणि समाजातील सर्व घटकांना सामावून घेणाऱ्या कार्यकत्यालाच येत्या महापालिकांच्या निवडणुकीत उमेदवारी देण्याची पंचसूत्री राहिल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. महापालिकांच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी जनतेला आकर्षित करण्यासाठी देवदर्शन यात्रा, लोकोपयोगी विविध शिबिरे, या माध्यमातून लोकांच्यात राहण्याचा प्रयत्न सुरू आहे. पक्षाची उमेदवारी मिळविण्यासाठी काहीजणांचे ‘लॉबींग’ सुरू आहे. त्यासाठी हरतऱ्हेच्या गोष्टी केल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना त्यांच्या नेहमीच्या पद्धतीने काही गोष्टी स्पष्टपणे सांगितल्या.”पुण्यात वारजे परिसरात एका कार्यक्रमात बोलताना पवार यांनी शनिवारी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, ” निवडणुका कधी होतील हे निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र, उमेदवारी देताना नव्या-जुन्यांचा योग्य पद्धतीने समन्वय साधण्याचा माझ्याकडून प्रयत्न होणार आहे.वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना उमेदवारी मिळेल. जनमानसात प्रतिमा चांगली असलेला.खरोखर कोणत्याही प्रकारची जात- पात न पाळणारा, भेदभाव न करणारा जनमानसात चांगली प्रतिमा, लोकांसाठी मनापासून झटणारा, जात-पात न पाळणारा, जुन्या आणि नव्यांचा मेळ आणि सर्व समाजातील सर्व घटकांना सामावून घेत उमेदवारी दिली जाईल”
पवार म्हणाले, ” काही प्रभागात तीन-तीन उमेदवारांच्या ऐवजी इच्छुकांची संख्या अधिक असते. सारेच निवडून येण्याच्या क्षमतेचे असतात. मात्र, कुणाला तरी तिघांनाच उमेदवारी देणे शक्य असते. अशावेळी इतरांनी नाराज होऊ नये. आम्हा नेते मंडळींना समजून घ्या. इतर ठिकाणी त्यांना संधी देण्याचा प्रयत्न केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ,जिल्हा नियोजन समिती, पीएमआरडीएमध्ये वेगवेगळ्या लोकांना संधी दिली. अशाच प्रकारे नवीन लोकांना संधी देण्यात येईल.नवीन लोकांना वाटते आम्हाला संधी मिळाली पाहिजे. जुन्यांना वाटते ही शेवटची संधी मिळायला हवी. यातून योग्य मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करीत असतो. मात्र, त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.