नवी दिल्ली, 6 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज परदेशातील भारतीय दूतावासाच्या प्रमुखांशी तसेच व्यापार आणि वाणिज्य क्षेत्राशी संबंधित मान्यवरांशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. अशाप्रकारचा हा पहिलाच उपक्रम होता. केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री देखील या संवादसत्रात सहभागी झाले होते.
तसेच, वीस विभागांचे सचिव, राज्य सरकारांचे अधिकारी, निर्यात प्रोत्साहन परिषद आणि चेंबर ऑफ कॉमर्सचे सदस्यही यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना पंतप्रधान म्हणाले, की पूर्वी भारताचा, जागतिक अर्थव्यवस्थेत सर्वात मोठा वाटा असण्यामागचे कारण म्हणजे, भारताचा भक्कम व्यापार आणि निर्यात हे होते. त्यामुळेच, आपल्याला, जागतिक अर्थव्यवस्थेत आपला जुना वाटा परत मिळवायचा असेल, तर आपली निर्यात वाढवायला हवी, मजबूत करायला हवी, यावर त्यांनी भर दिला.
कोविडनंतरच्या जागतिक व्यवस्थेत, जागतिक पुरवठा साखळीमुळे बदललेली परिस्थिती आणि निर्माण झालेल्या संधींचा लाभ घेण्यासाठी व्यापार आणि निर्यात क्षेत्रातील लोकांनी, पूर्ण प्रयत्न करावेत, असे आग्रही आवाहन पंतप्रधानांनी केले. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार,, व्याप्ती आणि क्षमता, तसेच आपला उत्पादन आणि सेवा उद्योगाचा पाया लक्षात घेता, भारतात निर्यातीसाठी अद्याप प्रचंड वाव असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
निर्यात वाढवण्यासाठी आवश्यक असलेल्या चार प्रमुख घटकांचा त्यांनी उल्लेख केला. देशातील उत्पादनात कित्येक पटींनी वाढ झाली आहे आणि ही उत्पादने गुणवत्तेच्या दृष्टीने स्पर्धात्मक असायला हवीत, दुसरे,
वाहतूक, लॉजिस्टिक समस्या संपवायला हव्यात आणि त्यासाठी केंद्र, राज्ये आणि खाजगी क्षेत्रांनी एकत्र आणि सातत्याने काम करण्याची गरज आहे, तिसरे, सरकारने निर्यातदारांच्या खांद्याला खांदा लावून वाटचाल करायला हवी आणि चौथे, भारतीय उत्पादनांसाठी जागतिक बाजारपेठेत जागा निर्माण करायला हवी. हे चार घटक एकत्रितपणे पूर्ण केल्यास, भारत, जगासाठी भारतात उत्पादने तयार करण्याचे काम अधिक उत्तम पद्धतीने करू शकेल,असे पंतप्रधान म्हणाले.
उत्पादनाशी निगडीत प्रोत्साहन योजनेमुळे मोबाईल फोन निर्मिती क्षेत्र बळकट होण्यासाठी कशी मदत झाली आहे ते पंतप्रधानांनी विशद केले. मोबाईल फोन क्षेत्र, त्याचा प्रभाव आपल्यालाही जाणवत आहे. 7 वर्षापूर्वी आपण सुमारे 8 अब्ज डॉलर्स इतक्या मूल्याचे मोबाईल फोन आयात करत होतो. आता ही आयात 2 अब्ज डॉलर्स पर्यंत खाली आली आहे. 7 वर्षापूर्वी भारत 0.3 अब्ज डॉलर्सचे मोबाईल फोन निर्यात करत असे. आता ही निर्यात 3 अब्ज डॉलर्स पेक्षा जास्त झाली आहे. केंद्र आणि राज्य सरकारेही देशात लॉजिस्टिकचा खर्च आणि वेळ कमी करण्यावर लक्ष केंद्रित करत आहेत. बहु मुखी कनेकटीव्हिटी निर्माण करण्यासाठी प्रत्येक स्तरावर वेगाने काम सुरु आहे.
आपल्या निर्यातदारांना प्रोत्साहन देण्यासाठी 88000 कोटी रुपये विमा कवच या रूपाने देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. त्याचप्रमाणे आपल्या निर्यात प्रोत्साहन सुसूत्र करत आपली
निर्यात डब्ल्यू टी ओ अनुरूप होऊन चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. व्यवसाय करताना स्थैर्याच्या महत्वावर पंतप्रधानांनी भर दिला. पूर्वलक्षी करातून सुटका करण्यासंदर्भातला निर्णय आपली कटीबद्धता, धोरणातले सातत्य दर्शवत असून भारत केवळ नव्या संधींसाठी आपली द्वारे खुली करत आहे इतकेच नव्हे तर निर्णयक्षम भारत सरकारकडे आपली आश्वासने पूर्ण करण्याची इच्छाशक्तीही आहे असा स्पष्ट संदेश सर्व गुंतवणुकदाराना देत असल्याचे ते म्हणाले.
कोणत्याही देशात भारताचे प्रतिनिधित्व करणारे राजदूत, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातले अधिकारी यांनी त्या देशाच्या आवश्यकता उत्तम रीतीने जाणून घ्याव्यात असे पंतप्रधान म्हणाले. इथल्या वाणिज्य उद्योगा साठी सेतू म्हणून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.