शिक्षण प्रसारक मंडळी मुलींची शिशुशाळा तर्फे कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींचा सन्मान
पुणे : इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकले तरच आपली प्रगती होते, असा गैरसमज आज अनेक पालकांमध्ये निर्माण झाला आहे. परंतु आपल्या प्रगतीशी आपण कोणत्या भाषेमध्ये शिकतो याचा काहीही संबंध नसतो. मराठी भाषेमध्ये शिकूनही जागतिक स्तरावरील यश मिळवता येते. मातृभाषेतील शिक्षण हे खऱ्या अर्थाने मुलांच्या पंखांमध्ये बळ देते .त्यामुळे आपल्या मुलांची मराठी भाषेशी असलेली नाळ तुटू देऊ नका, असे आवाहन जेष्ठ लेखिका डॉ. नीलिमा गुंडी यांनी केले.
शिक्षण प्रसारक मंडळी मुलींची शिशु शाळा तर्फे शाळेच्या कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींचा सन्मान लोकमान्यनगरमधील शाळेच्या प्रांगणात करण्यात आला. शिक्षण प्रसारक मंडळीचे ऍड. मिहीर प्रभुदेसाई, श्रीरंग कुलकर्णी, शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री एडगांवकर, प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा आद्दम आदी यावेळी उपस्थित होते. नेहा जोशी, मृण्मयी जोशी, सानिका खळदकर या कर्तृत्ववान माजी विद्यार्थिनींचा यावेळी सन्मान करण्यात आला .नृत्य, नाट्य आणि संगीत विषयक विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी सादर केले.
डॉ. नीलिमा गुंडी म्हणाल्या, आपल्या देशाला नोबेल पारितोषिक मिळत नाही, अशी आपण खंत व्यक्त करतो. परंतु आपण आपल्या भाषेपासून जर दूर जात राहिलो तर आपल्याला नोबेल कसे मिळणार? लहान मुलांना मराठी भाषेची असणारी गोडी आपण कायम ठेवली पाहिजे. त्यांच्या भाषेमध्ये होणाऱ्या चुका या मोजपट्टीमध्ये न मांडता मुलांना आपल्या मातृभाषेचा आनंद आणि अभिमान वाटला पाहिजे, अशा प्रकारे मातृभाषेतून त्यांना शिक्षण दिले पाहिजे.
जयश्री एडगांवकर म्हणाल्या, इंग्रजी माध्यमांकडे पालकांचा कल दिवसेंदिवस वाढत आहे. परंतु मराठी भाषेमध्ये शिकले तरीही पुढील शिक्षण घेण्यासाठी आणि कोणत्याही क्षेत्रांमध्ये कर्तृत्व मिळवण्यासाठी अडचणी येत नाही, हे आपल्या विद्यार्थिनींनी मराठी माध्यमांमध्ये शिकून दाखवून दिले आहे. मराठी भाषेचा न्यूनगंड पालकांनी दूर केला पाहिजे आणि त्यांनी आपल्या मुलांना मराठी भाषेची गोडी लावली पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.