पुणे – जगात कुठेही सहा पदरी, क्राँकीटचा एक्सप्रेस वे नाहीत, पुणे-मुंबई एक्सप्रेस वे वर सर्व्हिस लेन नाही, आवश्यक तेथे बायफ्रेन वायर व रीफ्लेक्टर नाहीत, बांधकामाचा ठिकाणी अपघात घडला तर बांधकाम व्यावसायिकाला जबाबदार धरतात, रूग्ण दगावला तर डॉक्टरांवर कारवाई होते, द्रुतगती मार्गावरील अपघातात १४ वर्षात १४०० बळी गेले आहेत. यासाठी जबाबदार कोण?असा प्रश्न कुलकर्णी यांनी पुन्हा पुन्हा उपस्थित केला आहे .
या महामार्गाचा सविस्तर अभ्यास करून त्याची श्वेतपत्रिका सरकारला सादर करणार आहे. असे मत डीएसके समुहाचे अध्यक्ष डी.एस.कुलकर्णी यांनी डीएसके उद्योगसमुहा तर्फे नीरजच्या स्मृती प्रित्यर्थ नीरज लाईफ लाईन फाउंडेशन आणि नीरज ड्रायव्हिंग स्कुलची स्थापना करण्यात आली, यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, खासदार अनिल शिरोळे, पीएमआरडीचे सीईओ महेश झगडे, नीरज लाईफ लाईन फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. शरद हार्डीकर, तन्मय पेंडसे, शिरीष कुलकर्णी, अमित कुलकर्णी, विवेक वेलणकर, श्याम भूर्के उपस्थित होते.
पुणे मुंबई द्रुतगती मार्ग बांधताना इंडीयन रोड काँग्रेसच्या कोणत्याही नियमांचे पालन करण्यात आले नाही आहे. सहा पदरी रस्त्याला द्रुतगती मार्ग म्हणायचं का ? माझ्या अपघातालाही चुकीचा रस्ताच कारणीभूत आहे. याला जबाबदार कोण ? र्निबुध्द पध्दतीने बांधलेल्या रस्त्याला जबाबदार कोण ? नीरजच्या बळीला जबाबदार कोण ? असे संतप्त सवालही यावेळी कुलकर्णी यांनी उपस्थित केले.
झगडे म्हणाले की, महामार्गातील अपघाताला मानवी चुका कारणीभूत आहे, आपल्या देशात कायदे चांगले आहेत. परंतु त्याची अंमलबजावणी होते की नाही हे पाहीले जात नाही. एक्सप्रेस वे बांधून झाल्यावर त्याचे सेफ्टी ऑडीट करायला पाहीजे. रस्ते सुधारण्यासाठी त्याच्या डिझाईन मध्ये बदल करणे आवश्यक आहे.
अनिल शिरोळे म्हणाले की, मोटर वाहन कायद्यात अनेक सुधारणा करण्यात आल्या असुन हा कायदा येत्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. नीरज लाईफ लाईन फाउंडेशनमध्ये मलाही सहभागी करून घ्यावे असे अनिल शिरोळे यांनी सांगितले. त्यानंतर डी.एस.कुलकर्णी यांनी शिरोळे यांची फाउंडेशनच्या कार्यकारी अध्यक्ष पदी निवड केल्याचे जाहीर केले.
यावेळी बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, कमीत कमी साधनांच्या आधारावर रस्त्यांचे काम करण्यात आले आहे. देशाची अर्थव्यवस्था पाहता इंडीयन रोड काँग्रेसच्या नियमांनुसार रस्ते बांधणे शक्य नाही. एक्सप्रेस वे वर अपघातांचे प्रमाण वाढत आहे, मात्र या एक्सप्रेस वे मुळेच पुणे देशातील वेगाने विकसित होणारे शहर बनले आहे. अपघातात कुणाचाही जीव जाणे योग्य नाही. यासाठी रस्त्यांच्या रचनेत सुधारणा तसेच बदल करणे गरजेचे आहे.