महापालिकेतील कोणत्या पदाधिकाऱ्यांमुळे भाजपमध्ये आहे अस्वस्थता ?
स्थानिक नेतृत्वाला डावलल्याचाही फटका महापलिका निवडणुकीत बसणार ?
पुणे- भाजपचे राज्याचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असताना आता २०२२ ला होऊ पाहणाऱ्या महापालिका निवडणुकीच्या तयारीला जरी भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूड चे आमदार चंद्रकांतदादा यांनी प्रारंभ केला असला तरी १०० चे बळ गाठ्लेल्या भाजपला आता हाच आकडा राखता येईल काय ? याबाबत मोठी आशंका पक्षातच व्यक्त होताना दिसते आहे.भाजपचे सर्वत्र जोशमय वातावरण असताना पुण्यात भाजपाला बसणाऱ्या मोठ्या फटक्याची जाणीव अजून पक्षनेतृत्वाला झाली कि नाही ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. आणि या सर्वांना कारणीभूत ठरतो आहे तो म्हणजे महापालिकेचा आणि विशेषतः महापालिकेतील एका पदाधिकाऱ्यांचा एककल्ली,लॉबीचा कारभार …. स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी अशा नाराज नगरसेवकांना आपल्या कामातून सावरून धरलेले असले तरी कारभार चालविण्यासाठी श्रीनाथ भिमाले यांच्या सारख्या नेत्याचीच महापालिका कारभारात उणीव भासते आहे आणि एकूणच पुण्याच्या कारभारात बापट -काकडे-शिरोळे यांना टाळता येणार नाही अन्यथा भाजपचे पानिपत निश्चित आहे अशी चिंता खुद्द भाजपच्याच गोटातून व्यक्त होत आहे .
२०२२ च्या मार्च पूर्वी महापालिका निवडणुका होतील असे मानले जाते आहे . म्हणजे आता केवळ २०२१ एवढेच वर्ष महापालिकेबाबत सर्वच पक्षांच्या हाथी उरले आहे. कोथरूड ला मेधा कुलकर्णी यांच्या ऐवजी चंद्रकांत दादा यांना आमदारकी मिळाली , स्थायी समिती अध्यक्ष पदानंतर महापौर पद कोथरूडला मिळाले . या दोन गोष्टी आणि महापालिकेच्या कारभारावरील गेल्या दीड वर्षात भाजपचा सुटत गेलेला अंकुश या बाबी महत्वपूर्ण मानल्या जात आहेत . महापालिकेत भाजपच्या १०० नगरसेवकांची सत्ता असतानाही आगामी निवडणुकीनंतर पुन्हा भाजप बाजी मारेलच यावर खुद्द भाजपच्याच नगरसेवकांचा, आणि नव्या जुन्या कार्यकर्त्यांचा विश्वास उरलेला दिसत नाही . महापालिकेत एककल्ली कारभार होतो . आणि पक्ष नाही तर केवळ स्वकेंद्रित कारभाराला महत्व देऊन मनमानी कारभार केला जातो आहे असा आरोप खाजगीत होतो आहे . श्रीनाथ भिमाले यांचे सभागृहनेते पद गेल्यानंतर या पदावर बसलेले धीरज घाटे आक्रमक नगरसेवक म्हणून परिचित होते पण पद मिळाल्यानंतर मात्र त्यांच्या राजकारणाच्या सारीपाटावर त्यांची विना आक्रमक अशी धैर्यशील पण वेगळी बाजू स्पष्ट होत गेली . मोठ्या हिकमतीने स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सगळ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न चालू ठेवलेला सातत्याने दिसत आला असला तरी ते एकटे पडत असल्याने एकूण नगरसेवकांची ,कार्यकर्त्यांची कारभारातील नाराजी मात्र दिवसेंदिवस वाढतानाच दिसते आहे. एकीकडे पालिका स्तरावरील भाजपच्या राजकारणातील हि अस्वस्थता आणि दुसरीकडे शहर पातळीवरील नेतृत्व नेमके कुणाकडे ? ते बापट आणि चंद्रकांतदादा यांच्यात विभागले गेल्यामुळे आणि काकडे यांचा प्रत्यक्ष सहभाग जवळजवळ अत्यंत कमी झाल्यामुळे पराकोटीला पोहोचली आहे. आणि १०० पैकी आता नेमके पुढच्या निवडणुकीत किती निवडून येतील यावर होणाऱ्या पक्षपातळीवरील खाजगी चर्चांमधून गणिते बांधली जाऊ लागली आहेत . अगदी ५० च्या पुढे सरकायला कोणी तयार होताना दिसेनासे झाले आहे .बिहार मधून बाजी मारून आलेल्या देवेंद्र फडणवीसांकडे त्यांचे लक्ष लागून आहे .आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने ते महापालिका स्तरावर कोणते बदल करतील आणि शहर पातळीवरील नेतृत्वाबाबत नेमकी कोणती भूमिका घेतील याकडे त्यांचे लक्ष लागून आहे. पुढच्या निवडणुका जिंकायच्या असतील तर महापालिका स्तरावर जोरदार मुसंडी मारणाऱ्या कारभारासाठी पदाधीकारीबदल आवश्यक मानला जातोय आणि शहर पातळीवर निव्वळ चंद्रकांतदादांकडे नेतृत्व देऊन भागणार नाही तर त्यांना प्रदेश फळीत कायम ठेऊन स्थानिकपातळीवर बापट -काकडे-शिरोळे अशा विविध मान्यवरांचा पूर्ण सहभागच कामी येईल असा विश्वास भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटतो आहे . पण शिस्तप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पक्षात अशी चर्चा त्यांना उघड करता येत नाही .मात्र पुढील सत्ताकारणासाठीचे राजकारण देवेंद्र यांच्याच हातात असल्याचे ते सांगत आहेत .
नेते वीस कॉंग्रेस कासावीस
बॅॅरिस्टर गाडगीळ त्यानंतर सुरेश कलमाडी यांच्याकडे नेतृत्वाची धुरा असताना महापालिका स्तरावर सत्तेत आघाडीवर राहिलेल्या कॉंग्रेस पक्षाची अवस्था मोठी कठीण आहे १० च्या आत नगरसेवक संख्या असलेल्या या पक्षात ; जनमानसात मोठा समूह जवळ बाळगून असलेले आहेत प्रत्यक्षात ३ नेते आहेत . आणि दिसतात मात्र नेते वीस कॉंग्रेस कासावीस अशी अवस्था या पक्षाची झालेली दिसते आहे. शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे आणि त्यांचे पुत्र नगरसेवक अविनाश बागवे हे सक्रीय असलेले आणि कार्यकर्त्यांचा मोठा संचय असलेले नेते आहेत . अशाच प्रकारे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल आणि अरविंद शिंदे हे देखील कॉंग्रेसचे नेते आहेत . आता यांची तिघांची तोंडे तीन दिशेला असल्याचे वारंवार स्पष्ट झाले आहे .या शिवाय निष्ठावंत म्हणून मोहन जोशी हि आहेत . पण प्रत्यक्षात हेच एवढेच नेते नाहीत तर येथे चक्क २० नेते असल्याचे दिसते .(२० म्हणजे असंख्य नेते ) पण असे अन्य स्वयंघोषित नेते एखादा कार्यकर्ता कधी बरोबर घेऊन वावरताहेत, आपले जनसंपर्क कार्यालय उभारून जनतेची कामे करताहेत ,काही उपक्रम राबवत आहेत, किंवा आंदोलने करत आहेत असे कधी दिसत नाही. म्हणजेच काहींचे पुण्यात संपर्क नाहीतच तरीही ते नेते आहेत कारण थेट दिल्लीत ,मुंबईत नेत्यांच्या आगे ,मागे फिरून असे एकेकटे नेते बनलेले आहेत. अनेकांची भाजपच्या, राष्ट्रवादीच्या गोटात कायमची उठबस आणि नेते मात्र कॉंग्रेसचे अशी स्थिती आहे.राज्यातील नेते पुणे महापालिकेवर कॉंग्रेसचा झेंडा फडकविण्यासाठी खूप काही करतील असे वाटत नाही , अर्थात महापालिका निवडणुकीत अशा कॉंग्रेसची अवस्था अर्थातच शरद पवार आणि अजित पवार यांच्या धोरणांवरच अवलंबून असेल असे मानले जाते आहे.
राष्ट्रवादी ची धुरा अजितदादांच्या हाथी
पुण्यात राष्ट्रवादीची ताकद मोठी आहे . पण दुर्दैव हे आहे कि , या पक्षाला स्थानिक नेतृत्व कोणाकडे द्यावे हे देखील सुचेनासे झाले आहे. माजी महापौर ,उपमहापौर,स्थायी समिती अध्यक्ष असलेल्या नेत्यांसह अनेक नगरसेवक देखील आपली स्वयंभू अशी राजकीय आणि सामाजिक ताकद जवळ बाळगून आहेत . असे असताना या पक्षाला सध्या महापालिका स्तरावर आणि शहर पातळीवर म्हणावे तसे यश मिळताना दिसत नाही.गेल्या विधानसभेत २ आमदार निवडून येऊनही त्यांचा पक्षाला, कार्यकर्त्यांना , वा जनतेला फारसा उपयोग आजवर झालेला दिसत नाही असे राष्ट्रवादीतच बोलले जातेय . बुद्धिमत्ता , संपत्ती, कार्यकर्त्यांचा संच अशा जमेच्या बाजू असलेले असंख्य रथी महारथी ज्या पक्षात आहेत त्या पक्षाची जनमानसातील ‘ही ‘अवस्था सध्या तरी कठीण आहे. या पक्षातही नेतृत्व ज्याच्या हाथी द्यावे त्याच्या हाथी दिले जात नसल्याने जनमानसात , जनमानसाचे प्रश्न उचलण्यात लावता येईल तेवढी ताकद लावली जात नाही असे चित्र आहे. पण महापालिका निवडणुकीत हा पक्ष सरस ठरेल असा अनेकांना विश्वास वाटतो आहे. याचे मुख्य कारण म्हणजे राज्यात आलेली महाविकास आघाडीची सत्ता .आणि अजित पवारांकडे असलेले उपमुख्यमंत्री पद .
अजित पवार, आणि सुप्रिया सुळे यांच्या स्पष्ट धोरणावर हा पक्ष महापालिका निवडणुकीत मुसंडी मारू शकेल असे चित्र आहे. मात्र त्यासाठी आता अखेरच्या वर्षात या पक्षाला निवड नियुक्त्यां बाबत आतापर्यंत झालेल्या कमकुवत बाबी टाळून विविध पातळीवरील विविध नेतृत्वाची बळकट आणि सक्षम स्थाने निवडावी लागणार आहेत. अर्थात उपमुख्यमंत्री यांना राज्याच्या राजकारणातून सवड मिळेल तेव्हाच हे होणार आहे.