महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळ अधिवेशनात संस्थाचालकांशी साधला संवाद
पुणे – महाराष्ट्र शासन हे विद्यार्थ्यांच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. त्याला वेळोवेळी संस्थाचालकांनी सहकार्य केले आहे. यापुढेही शिक्षण यंत्रणा अधिक पारदर्शक करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, त्यामध्ये सर्व संस्थाचालकांचा सकारात्मक सहभाग आवश्यक आहे, असे प्रतिपादन शालेय, उच्च, तंत्रशिक्षण व सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी आज केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाच्या 24 व्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे उद्घाटन शिक्षणमंत्री तावडे यांच्या हस्ते आज आळंदी येथे झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय दळणवळण मंत्री तथा महाराष्ट्र राज्य शिक्षणसंस्था महामंडळाचे अध्यक्ष विजय नवल पाटील होते. यावेळी कार्यकारिणी सदस्य अजित वडगावकर, अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष गणपतराव बालवडकर, कार्याध्यक्ष सुरेश वडगावकर, माजी आमदार ॲड. विजय गव्हाणे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षणमंत्री तावडे म्हणाले, कोणतीही संस्था चालवणे हे सोपे काम नसते. एखादी संस्था उभी केल्यानंतर ती शासकीय नियमांप्रमाणे चालवणे आवश्यक असते. हे सर्व काम सोपे व्हावे यासाठी शासनाने ऑनलाईन कार्यपद्धती अवलंबली आहे. यामुळे ही संपूर्ण यंत्रणा पारदर्शक होण्यास मदत होणार आहे.
विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी आवश्यक प्रयत्न शासनाकडून करण्यात येत आहेत. शिक्षण म्हणून विचार करत असताना सर्वच विषयांचा एकत्रितपणे विचार करणे आवश्यक असते. शिक्षक, शिक्षणसंस्था व पदाधिकारी आणि शासन हा एकच परिवार आहे. आपण एकत्र आल्यास अधिकाधिक गुणी विद्यार्थी महाराष्ट्रात घडतील, असा विश्वास श्री. तावडे यांनी व्यक्त केला.
श्री. तावडे पुढे म्हणाले, आतापर्यंतच्या कार्यकाळात आपण केवळ उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार न करता अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या अडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानुसार त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांचे समुपदेशन करून त्यांचा कोणत्या विषयात रस आहे, त्यांच्याकडे कोणते कौशल्य आहे, या बाबीचा अभ्यास करणे आता महत्त्वाचे बनले आहे. त्यानुसार जिल्हा परिषद शाळांमध्ये अॅक्टिव्हिटी बेस लर्निंग तसेच स्पोकन इंग्लिश या बाबींवर भर दिला आहे. शासनाच्या धोरणामुळे चांगल्या शिक्षणसंस्था मजबूत होणार आहेत. त्यामुळे संस्थाचालकांनी शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन श्री. तावडे यांनी केले.
यानंतर शिक्षणमंत्री तावडे यांनी उपस्थितांमध्ये जाऊन प्रश्नोत्तरांच्या स्वरुपात संवाद साधला. तसेच त्यांचे शंकानिरसन केले. शिक्षणसंस्था महामंडळ अधिवेशन आळंदी येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात दोन दिवस चालणार असून त्याचा समारोप रविवारी (दि. 23) होणार आहे.
तत्पूर्वी, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर यांचे प्रतिमापूजन आणि दीपप्रज्वजलनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. गौरव महाराष्ट्राचा महाविजेता युवा गायक कौस्तुभ गायकवाड यांनी यावेळी ईशस्तवन केले. तसेच दिव्यांग विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. यानंतर विजय गव्हाणे, गणपतराव बालवडकर, अजित वडगावकर व विजय नवल पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. आभार कार्यकारिणी सदस्य अशोक मुरकुटे यांनी मानले. कार्यक्रमास महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक तसेच सामान्य नागरिक उपस्थित होते.