पुणे: अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या राज्यस्तरावरील क्रीडा स्पर्धेमध्ये पुणे विभागाने १३ सुवर्णपदकांसह एकूण २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले.
नियोजन विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांच्या हस्ते अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्यावतीने शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे-बालेवाडी येथे ३ व ४ डिसेंबर रोजी आयोजित स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे विभागाचे अपर आयुक्त महसूल डॉ. अनिल रामोड, अर्थ व सांख्यिकी संचालनालयाचे संचालक डॉ. विजय आहेर, नियोजन विभागाचे उपायुक्त संजय कोलगणे आदी उपस्थित होते.
मुंबई, नागपूर, पुणे, कोकण, औरंगाबाद, अमरावती, नाशिक विभागातील २७५ पुरूष खेळाडू आणि १४७ महिला अशा एकूण ४२२ खेळाडूंनी स्पर्धेत सहभाग घेतला. स्पर्धेत विविध क्रीडा व सांस्कृतिक प्रकारात ३९ सुवर्ण, ३९ रौप्य आणि २३ कास्य पदके वितरीत करण्यात आली.
पुणे विभागाने १३ सुवर्ण, ८ रौप्य आणि ५ कास्य पदकासह एकूण २६ पदके मिळवून सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. कोकण विभागाने १० सुवर्ण, १३ रौप्य आणि 3 कास्य पदकासह एकूण २६ पदके मिळवून दुसरे स्थान तर नागपूर विभागाने ५ सुवर्ण, ४ रौप्य आणि २ कास्य पदकासह एकूण ११ पदके मिळवून सर्वसाधारण तिसरे स्थान मिळवले.
स्पर्धेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संदेशाद्वारे शुभेच्छा दिल्या. यावेळी भिमराव आसवले यांनी खेळाडूंना शपथ दिली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते क्रीडा ज्योत प्रज्वलित करण्यात आली.
सकारात्मक कामगिरीसाठी चांगले आरोग्य आवश्यक-राजगोपाल देवरा
उद्घानप्रसंगी बोलतांना प्रधान सचिव श्री. देवरा म्हणाले, अर्थ व सांख्यिकी विभागाच्यावतीने राज्यातील माहिती एकत्रित करुन वस्तुनिष्ठ माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी विश्लेषणात्मक स्वरुपात मांडणी करण्यात येते. स्पर्धेच्या युगात आपले काम गुणवत्तापूर्वक करण्यसाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत होते. आरोग्य चांगले असले तर कार्यालयीन कामकाजात सकारात्मक परिणाम दिसू लागतात. त्यामुळे सर्वांनी आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची तपासणी करण्याकरीता शासनाने ५ हजार रुपये देण्याची योजना आणलेली आहे. त्यांचा लाभ सर्व पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावा. आगामी स्पर्धेत विभागातील शंभर टक्के अधिकारी व कर्मचारी सहभागी होण्यासाठी प्रयत्न करावे, असेही ते म्हणाले. अर्थ व सांख्यिकी संचालनालयातील अधिकारी व कर्मचाऱ्याला येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्यात येतील असेही श्री.देवरा यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत अतिशय क्लिष्ट स्परुपाचे आकडेमोडीची कामे करण्यात येतात. त्यामुळे अशा कामाचा ताण कमी करण्यासाठी क्रीडा स्पर्धा उपयुक्त ठरतात. स्पर्धेमुळे खेळाडूवृत्ती, सांघिक भावना विकसित होण्यास मदत होऊन चांगल्या विचाराची, उपक्रमाची देवाणघेवाण होते. कर्मचाऱ्यांना आपल्या कार्यालयीन तसेच वैयक्तिक जीवनात खेळाचा निश्चित उपयोग होईल, असे त्यांनी सांगितले.
संचालक श्री. आहेर म्हणाले, अर्थ व सांख्यिकी संचालनालयामार्फत राज्याच्या स्थापनेपासून आर्थिक पाहणीचे पुस्तक दरवर्षी होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात माडंण्यात येते. त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती राज्यासह देशाला कळते. महाराष्ट्राच्या प्रत्येक विकासाच्या अंगामध्ये संचालनालयाचा सहभाग आहे. स्पर्धेत कार्यरत कर्मचाऱ्यापैंकी बहुतांशी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.