मुंबई, दि. 22 : ज्येष्ठ अभिनेत्री आशालताताई वाबगावकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त केले असून रंगभूमीची प्रदीर्घ काळ सेवा करणाऱ्या चतुरस्त्र अभिनेत्रीला आज आपण मुकलो आहोत, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आशालताताई या शास्त्रीय संगीताचं ज्ञान, जाण असलेल्या चतुरस्त्र अभिनेत्री होत्या. कोकणी, मराठी, हिन्दीसह त्यांनी शंभरहून अधिक नाटक, चित्रपट, मालिकांमध्ये अभिनय केला. त्यांच्या नाटक व चित्रपटांनी लोकप्रियतेचा इतिहास घडवला आहे. जीवनाच्या अखेरपर्यंत त्यांनी रंगभूमीची, कलाक्षेत्राची सेवा केली. त्यांचं निधन धक्कादायक, मनाला चटका लावणारं आहे. नाटक, चित्रपट, मालिकांमधून काम करणाऱ्या सर्व कलावंत बंधू-भगिनींनी, यापुढच्या काळात अधिक सावध राहून, स्वत:ची, कुटुंबाची, सहकाऱ्यांची, समाजाची काळजी घ्यावी, सुरक्षित राहावं, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.