पुणे : “कोरोनामुळे सोशल डिस्टन्सिंग गरजेचे असले तरी मनाची दारे उघडी असावीत. सामाजिक भेदाभेद दूर राहावेत. दिव्यांच्या या उत्सवात आपण सगळ्यांनी इतरांना आनंद देऊन भाऊबीज साजरी व्हावी. गरजू लोकांसाठी, सीमेवरील सैनिकांसाठी आपण करत असलेले कार्य माणुसकीचा बंध दृढ करणारे आहे,” असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ यांनी केले.
पुण्यातील वंचित विकास आणि महावीर फूड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने सीमेवरील शूर जवान व शहरातील गरजू नागरिकांना दिवाळीनिमित्त फराळ वाटप करण्यात आले. प्रसंगी वंचित विकासचे संस्थापक विलास चाफेकर, अध्यक्ष विजयकुमार मर्लेचा, महावीर फूड बँकेचे संस्थापक प्रा. अशोककुमार पगारिया, सैनिकाचे पालक बंडोपंत कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार उद्धव भडसाळकर, ‘वंचित’च्या संचालिका मीनाताई कुर्लेकर, सुनीता जोगळेकर, देवयानी गोंगले आदी उपस्थित होते.
श्रीमती प्रमिलाबाई नौपतलालजी सांकला चॅरिटेबल ट्रस्ट आणि सुकांता चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हे साहित्य देण्यात आले. गरजूंना दिलेल्या धान्यसंचात साखर, हरभरा डाळ, गूळ, तेल, साबण, पोहे, मीठ, रवा आदी वस्तूंचा समावेश आहे.
प्रा. अशोककुमार पगारिया म्हणाले, “समाजात गरजवंतांची संख्या मोठी आहे. पण पणतीसारखे बनून आपल्याला शक्य तितका गरिबीचा अंधकार दूर करण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे. सामाजिक जाणिवेतून आपण या पीडितांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवू शकतो, याचे समाधान वाटते.”