पुणे-करोनाचा सर्वाधिक फटका बसलेल्या शहरांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई आणि पुणे या दोन मुख्य शहरांचा आणि जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्याचे अर्थचक्र फिरवणाऱ्या या दोन महत्वाच्या शहरांमध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून आलेले. पुण्यामधील रुग्णसंख्या तर मुंबईपेक्षाही जास्त असल्याचं चित्र मध्यंतरी निर्माण झालं होतं. याच पार्श्वभूमीवर पुण्यातीलच सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्ये तयार होणाऱ्या कोव्हिशिल्ड लसी आधी पुण्यात द्याव्यात अशी मागणी करण्यात आली. मात्र त्यावर काही ठोस निर्णय झाला नाही. तरी यासंदर्भातील एक मोठा खुलासा आता सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांनी केला आहे
. पुण्यामध्ये सर्वाधिक करोना रुग्ण असल्याचं अहवालामधून दिसून आल्यानंतर आम्ही पुण्याला सर्वाधिक लसींचा पुरवठा करण्याबद्दल विचारणार केली होती. मात्र केंद्रातील मोदी सरकारने त्यावर काहीच उत्तर दिलं नसल्याचं सायरस पूनावाला म्हणाले आहेत.
राज्यामध्ये अनलॉकदरम्यान पुण्यामधील निर्बंध शिथिल न करण्यात आल्याने मागील आठवड्यामध्ये मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता. त्यानंतर पुण्यामध्येही निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. मात्र पुण्यातील रुग्णसंख्येचा विचार करुन आधी सूट देण्यात आली नसल्याचं दिलासा दिला नसल्याचं सांगण्यात आलेलं. यावरुनचा वाद शांत होत असतानाच आता सायरस पूनावाला यांनी मोदी सरकारनेच पुण्याला प्राधान्य क्रमाने लसींचा पुरवठा करण्यासंदर्भात काहीच उत्तर न दिल्याचं म्हटलं आहे.
राज्य सरकारने करोना लॉकडाउनचे निर्बंध शिथिल केलेले असतानाच पूनावाला यांनीही आता पुन्हा पुन्हा लॉकडाउन नको अशी भूमिका मांडली आहे. पुण्यामध्ये एका कार्यक्रमामध्ये बोलताना पूनावाला यांनी लॉकडाउन हा जास्त नागरिकांचा मृत्यू होत असेल अशा संकाटाच्या कालावधीमध्येच लावावा असं मत व्यक्त केलं आहे. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पारितोषिक यंदा कोविशिल्ड ही करोनाची लस बनवणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे अध्यक्ष सायरस पूनावाला यांना प्रदान करण्यात आला आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. दीपक टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार पूनावाला यांना प्रदान करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये पूनावाला बोलत होते.
पूर्वी कोणत्याही परवानग्या मिळविताना नोकरशाहचा खूप जाच व्हायचा आता कमी झाला असून याचं श्रेय मोदी सरकारला आहे, असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे. सिरमचा आजवरचा प्रवास खूप परिश्रमाचा आणि वेदनादायी राहिला आहे. मात्र आता परिस्थिती बदलली आहे. करोनावरील लस बनवण्यासाठी आम्हाला सर्व प्रकारच्या परवानग्या तात्काळ मिळल्या. त्याचप्रमाणे सरकारकडून प्रोत्साहन देखील मिळाले आहे. कोविशिल्ड ही जगातील सर्वात स्वस्त लस आहे. अतिशय माफक दरात आम्ही ही लस देत आहोत, असंही यावेळी पूनावाला यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही अनेक लशी एका चहाच्या कपाच्या इतक्या नाममात्र किमतीत दिल्या आहेत, असंही पूनावाला यांनी म्हटलंय.
केंद्र सरकारच्या लस निर्यातबंदीच्या धोरणावर डॉ. पूनावाला यांनी बेधडक टीका केली. ते म्हणाले, ‘माझा मुलगा म्हणाला होता की, यावर बोलू नका, पण मी बोलणार. केंद्र सरकारने लस निर्यातीवर घातलेली बंदी योग्य नाही. मोदी सरकारने हा निर्णय घेऊन अतिशय वाईट केले. निर्यातबंदी उठवली पाहिजे. कारण अन्य देशांतील नागरिकांनादेखील लसीची गरज आहे. सीरम इन्स्टिटय़ूट आजवर जगातील 170 देशांना लस पुरवत आली आहे. पण निर्यात बंदीमुळे आता गरज असताना आम्ही त्यांना लस पुरवू शकत नाही असे पुनावाला यांनी सांगितले.
तिसरा डोस गरजेचा
कोविड प्रतिबंधक लसीचे केवळ दोन डोस पुरेसे होतीलच असे नाही. दोन डोस घेतल्यानंतरही सहा महिन्यांनंतर व्यक्तीच्या शरीरातल्या अँटीबॉडीज कमी होतात. त्यामुळे दोन डोसनंतर तिसरा बूस्टर डोस गरजेचा आहे. असे डॉ. पूनावाला यांनी सांगितले.लशीच्या दोन मात्रा घेतल्यानंतर सहा महिन्यांनी शरीरात तयार झालेल्या प्रतिपिंडांचे प्रमाण कमी होत असल्याबाबत ‘लॅन्सेट’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालाबाबत डॉ. पूनावाला म्हणाले, लशीच्या दोन्ही मात्रा घेतल्यानंतर शरीरातील प्रतिपिंडे कमी होत असून लशीच्या दोन मात्रांनंतर सहा महिन्यांनी तिसरी मात्रा (बुस्टर डोस) घ्यायला हवी. मी स्वत: आणि सीरममधील सात हजार कर्मचाऱ्यांनाही तिसरी मात्रा दिली आहे. तिसऱ्या मात्रेनंतर काय परिणाम होतो याचा अभ्यास करायला हवा, असेही त्यांनी नमूद के ले.
…तरी सीरम इन्स्टिट्यूट बांधली
मुलांसाठीची लस आणि शाळा सुरू करण्याबाबत डॉ. पूनावाला म्हणाले, की मुलांसाठीच्या नोव्होव्हॅक्स लशीच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. त्या संदर्भातील प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मुलांसाठी लस उपलब्ध होईल. कोविशिल्ड लस १२ वर्षांखालील मुलांना देता येणार नाही. ते धोकादायक ठरेल. मुलांना वर्ष-दोन वर्षं घरी राहून अभ्यास करता येईल. मी कॉलेजमध्ये असताना वर्गात जात नव्हतो, पवारसाहेब वगैरे मला हसायचे. तरीही मी सीरम इन्स्टिट्यूट बांधली….
तिसरी लाट मोठी नसेल…
’करोनाचा आजार कमी होईपर्यंत लशीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्यांना पुन्हा लस घ्यावी लागू शकते.तिसरी लाट येण्याची शक्यता असली, तरी काही लोकांना समूह प्रतिकारशक्तीमुळे संरक्षण मिळेल, लस घेतलेल्यांना लशीमुळे संरक्षण मिळेल.पण तिसरी लाट तितकी मोठी नसेल असे मला वाटते. माझा धंदा कमी झाला तर मी खूश आहे, असे त्यांनी सांगितले.
पुण्याला जास्त लस द्यायची होती, पण…
पुण्यामध्ये करोनाचा संसर्ग जास्त असल्याचे आकडेवारीतून दिसून आल्याने, सीरम इन्स्टिट्यूट पुण्यातच असल्याने पुण्याला जास्त लस पुरवण्याबाबत मोदी सरकारला पत्र दिले होते. मात्र त्याबाबत त्यांनी उत्तरच दिले नाही ,आम्ही बोललो तर ते आम्ही आमचं पाहू म्हणाले , असे डॉ. पूनावाला यांनी सांगितले.