दहिसर स्टेशनला एकदाची फास्ट ट्रेन पकडली आणि विंडो सीटचे दर्शन झाले! भीती आणि आनंद असे चेहऱ्यावर संमिश्र भाव होते, अर्थात त्याला कारणही तसंच होतं म्हणा. ७ महिन्यांपूर्वी करोनामुळे ट्रेन बंद झाल्या होत्या. त्यानंतर सुरू झाल्या त्या फक्त अत्यावश्यक सेवा आणि सरकारी कर्मचारी यांच्यासाठी. सर्वसामान्यांसाठी कधी सुरू होणार या प्रतीक्षेत असतानाच पेपरात बातमी झळकली की सर्व महिलांसाठी आता लोकल मर्यादित वेळेत सुरू. त्याच क्षणापासून कधी एकदा ट्रेनने प्रवास होतोय म्हणून अधीर झाले होते. तो योग नुकताच आला आणि तब्बल ७ महिन्यांनी हा पहिला लोकलचा प्रवास केला. मुंबईकरांचं ट्रेनशी जिव्हाळ्याचं नातं आहे, लाईफलाईनच ती. अशा या नात्यापासून ७ महिने दूर राहायचं म्हणजे मुंबईकरांची काय अवस्था झाली असणार. त्याला मीही काही अपवाद नव्हते. दादरला काही कामानिमित्त ट्रेनने जायचं ठरल्यावर घरातून सूचनांचा पाऊस पडला – सकाळी ११ ते ३ वेळ आहे, तर अगदीच ११ची ट्रेन नको पकडायला…थोडं उशिरा गेलीस तर गर्दी कमी मिळेल. दहिसरहून नको, बोरिवली वरून ट्रेन पकड म्हणजे गर्दी कमी असेल. तिकीट मात्र दहिसरलाच काढ कारण कदाचित बोरिवलीला तिकिटासाठी रांग असेल. हँड सॅनिटायझर घेऊन जा, अजून एक मास्क पण घेऊन जा…अशा एक ना अनेक सूचना ऐकतच सकाळी स्टेशन गाठलं. तिकीट काढताना परत एकदा वेळ कन्फर्म करून घेतली. चर्चगेट ट्रेन कुठल्या प्लॅटफॉर्मवर येईल तेही तिकीट खिडकीवर विचारले, कारण इंडिकेटर बंद होता. बुकिंग क्लार्कने पठडीतले उत्तर दिले – इंडिकेटर आहे ना तो चेक करा. मी इंडिकेटर बंद आहे सांगितले तरी त्याने त्राग्याने पुन्हा तेच उत्तर दिले. त्याच्याशी वाद घालण्यात काही अर्थ नाही, म्हणून चुटपुटत प्लॅटफॉर्मच्या दिशेने कूच केले. सध्या सुरक्षित वावराच्या दृष्टीने स्टेशनवर एकच एंट्रन्स आहे तर बाकी सगळे मार्ग पत्रे लावून बंद केलेत. पुढच्या सब-वेने गेले तर तो बंद. मग एकाला विचारले की प्लॅटफॉर्म २ वर कसे जायचे. त्याने सांगितलं की बाहेरुन ब्रिजने जा. तेथे गेले तर कळलं की हा ब्रिज फक्त पूर्व-पश्चिम जाण्यासाठी आहे पण प्लॅटफॉर्मवर उतरण्यासाठी बंद आहे. फक्त पुढचा एकच सब-वे आपल्याला प्लॅटफॉर्मकडे घेऊन जातो. हाय देवा..! आता परत दुसरा सब-वे. एकदाचा हा सर्व द्राविडी प्राणायाम करून प्लॅटफॉर्मवर पोहोचले. १२.२७ ची ट्रेन यायला अजून २-३ मिनिटे अवकाश होता. प्लॅटफॉर्मवर लेडीज डब्यात चढण्यासाठी मोजून ३-४ महिलाच होत्या. हे बघून हायसे वाटले आणि ट्रेनमध्ये चढल्यावर जाणवले की खरंच गर्दी नाहीये. एकेका सीटवर एकच महिला होती. गर्दी नाही आणि विंडो सीटही मिळाली म्हणून आनंद झाला असला तरी ट्रेनचा प्रवास म्हणून थोडी धाकधूक होती. माझ्या समोरच विंडो सीटला एक महिला होती. बसल्या बसल्या आधी हाताला सॅनिटाईझ करून झटकन नजर आजूबाजूला फिरवली. अजून सोशल डिस्टन्सिंग पाळायला हवे म्हणून मी विंडो सोडून थर्ड सीटला येऊन बसले. डब्यात कुणीही कुणाशी बोलत नव्हतं. अगदीच शुकशुकाट होता. प्रत्येकीच्या मनात भीती दडून बसली होती. बरं, मास्कमधून सुद्धा समोर बसलेल्या महिलेचा चेहरा दिसतो आहे का, ती आपल्या ओळखीची आहे का, हे शोधण्याचा प्रत्येकीचा आटोकाट प्रयत्न चालू होता! आधीच ट्रेन रिकामी, चर्चगेट फास्ट ट्रेन म्हणजे प्रवाशांची एकसारखी चढउतार नाही, त्यात फेरीवालेही नाही; त्यामुळे कधी नव्हे ती भयाण शांतता होती. फास्ट ट्रेन नेहमीपेक्षा जरा जास्तच स्पीडने जात होती. अशा स्पीडची प्रवासी आणि ट्रेन या दोहोंना सवय नाही, कारण नेहमी असा स्पीड नसतो ना. अंधेरी स्टेशनला त्यातल्यात्यात दोन फेरीवाल्या बायका डब्यात चढल्या आणि मग ‘काय बरं हिने विकायला आणलं असेल’ असा मनोमन संवाद सुरू झाला. प्लास्टिकच्या पोतडीतून तिने ड्रेसपीस आणि साड्या काढल्यावर बायकांची हळूच चुळबुळ सुरू झाली. साड्या आणि ड्रेसपीस दाखविण्यासाठी ती सीटजवळ आल्यावर मी तिला ओळखले, अरे ही तर डॉली आहे. आणि मग मास्क थोडा बाजूला करून मी तिला स्माईल दिले! त्या बरोबर तिनेही मला ओळखले आणि स्माईल दिले व ‘कशा आहात’ म्हणून विचारणा केली. चला…कोणीतरी ओळखीचे भेटले याचा आनंद झाला आणि चेहऱ्यावरची भीती काही अंशी कमी झाली. दादरला अगदी आरामात, कुठेही धक्काबुक्की न होता उतरायला मिळाले. एक वेळचा प्रवास सुरक्षित अंतर राखून पार पडला. आता संध्याकाळी बघू या काय परिस्थिती असेल, असं म्हणत मी माझ्या कामाला लागले.
संध्याकाळी ७ नंतर ट्रेनने प्रवास करायची परवानगी असल्याने ७.३० ची विरार फास्ट पकडायचे ठरवले; कारण स्लो ट्रेनने जायचे म्हटले तर प्रत्येक स्टेशनात महिला प्रवाशांची चढउतार म्हणजे रिस्क जास्त. त्यापेक्षा फास्ट ट्रेन बरी ना. संध्याकाळी प्लॅटफॉर्मवर आणि ट्रेनमध्ये तुरळक गर्दी होती. काही ठिकाणी एका सीटवर २ जणी तर कुठे मैत्रिणींचा ग्रुप असेल तर ३ जणी बसल्या होत्या. मी मात्र सीटवर न बसता डोअरजवळ उभे राहाण्याचा निर्णय घेतला. कारण नेहमीसारखी तिकडे गर्दी नव्हती. मस्त छान हवाही होती. दिवसभर सतत मास्कच्या वापरामुळे गुदमरायला झाले होते; त्यामुळे छान हवा खात उभे राहू, या विचाराने मी बसले नाही. संध्याकाळी किलबिलाट होता ट्रेनमध्ये – थोडंफार न्यू नॉर्मल सारखं. मास्क ऍडजस्ट करून गप्पा मारणे चालू होते. बांद्रा, अंधेरी, बोरिवली सगळ्या स्टेशनला चढउतार करणाऱ्या महिला प्रवाशांची संख्याही कमी होती. (एरवी विरार ट्रेन म्हटलं की मुंगीलाही शिरायला जागा नसते. त्यात बायकांचे लोंढेच्या लोंढे कसे काय आत शिरतात हे त्या बायका आणि परमेश्वरच जाणो.) दहिसरला मला अगदी आरामात उतरायला मिळालं. उतरल्याक्षणी इंडिकेटरकडे आणि घड्याळाकडे लक्ष गेलं. ट्रेन चक्क इंडिकेटरच्या वेळेप्रमाणे आणि घड्याळाच्या काट्याबरहुकूम नेमक्या ४० मिनिटांत दहिसरला टच झाली होती! हुश्श…म्हणत दीर्घ श्वास सोडला. एकदाचा आजचा ट्रेनचा प्रवास नीट आणि सुरक्षित पार पडला या विचारात घरी कधी गाठले ते कळलंच नाही.
–पूर्णिमा नार्वेकर, दहिसर ,मुंबई