नवी दिल्ली-कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारने CBSE अर्थात केंद्रीय बोर्डाच्या 10 वी वर्गाच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. सरकारच्या या निर्णयामुळे 10 वीचे विद्यार्थी परीक्षा न देताच थेट पुढच्या वर्गात जाणार आहेत. तर CBSE 12 वीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. यासंदर्भात 1 जून रोजी पुनरविचार करून निर्णय घेतला जाणार आहे. परीक्षा घेणार असल्यास त्याच्या 15 दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना माहिती दिली जाणार आहे.
जे विद्यार्थी समाधानी नसतील त्यांना परीक्षा देता येईल
- CBSE बारावीच्या परीक्षा 4 मे ते 14 जून पर्यंत होणार होत्या. त्या टाळण्यात आल्या. यावर 1 जून रोजी पुनरविचार करून निर्णय घेतला जाईल. परीक्षा असल्यास 15 दिवसांपूर्वी कळवले जाईल.
- CBSE दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. या परीक्षा सुद्धा 4 मे पासून सुरू होणे अपेक्षित होते.
- आता CBSE दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न देताच थेच अकरावीला प्रवेश दिला जाणार आहे.
- जे विद्यार्थी आपल्या निकालावर समाधानी नसतील तर त्यांना परीक्षा देण्याची संधी दिली जाईल. या परीक्षा कोरोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यानंतर घेतल्या जातील.
मोदींच्या बैठकीत झाला निर्णय
पंतप्रधन नरेंद्र मोदी आणि शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांच्या बैठकीत बुधवारी दुपारी हा निर्णय घेण्यात आला. तत्पूर्वी अनेक राज्य सरकारांनी CBSE च्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यामध्ये पंजाब आणि दिल्ली सरकारचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांनी केली होती परीक्षा रद्द करण्याची मागणी
CBSE च्या दहावीच्या आणि बारावीच्या परीक्षा 4 मे रोजी घेतल्या जाणार होत्या. परंतु, ऑल इंडिया स्टूडेंट एसोसिएशनच्या वतीने या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी लावून धरण्यात आली. संघटनेचकडून शिक्षण विभागाला पत्र देखील पाठवण्यात आले होते. सोशल मीडियावर विद्यार्थ्यांनी #CancelBoardExam2021 हॅशटॅगसह कॅम्पेन सुद्धा चालवले. CBSE बोर्डाच्या एकूण 30 लाख विद्यार्थ्यांकडून ही परीक्षा दिली जाणार होती.
महाराष्ट्रात आधीच रद्द झाल्या परीक्षा
कोरोनामुळे महाराष्ट्र सरकारने सुद्धा परीक्षा रद्द करून थेट पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय आधीच घेतला आहे. कोरोनाने महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह अनेक राज्यांमध्ये परिस्थिती गंभीर आहे. अशात राज्य सरकारांकडून स्टेट बोर्डाच्या आणि इतर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे. काही राज्यांनी परीक्षा पुढे ढकलण्याचा देखील निर्णय घेतला.