पुणे :- पाणीही निसर्गाची देणगी आणि प्रत्येक माणसाची गरज असल्यामुळे त्याची बचत करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढे येऊन त्याची बचत तसेच पुनर्वापर करून आपल्या येणाऱ्या पिढ्यांमध्ये ही भावना रुजवली पाहिजे. भविष्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी फौंडेशनकडून सोसायट्यांमध्ये पाणी वाचवण्यासंदर्भातील जागरूकता निर्माण करण्यासाठी हे सकारात्मक पाऊल उचलले आहे. आमच्या १०० सोसायट्यांमध्ये अशा प्रकारच्या जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे अशी भावना गोयल गंगा फौंडेशनच्या संचालिका गीता गोयल यांनी व्यक्त केली आहे. गोयल गंगा फाउंडेशनच्या अंतर्गत ‘जीजीएफ फॉर हर’ च्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
पर्यावरणतज्ञ शर्मिला ओसवाल, गोयल गंगा फाउंडेशनच्या संचालिका अमृता गोयल ,सलोनी गोयल आदी यावेळी उपस्थित होते.
गीता गोयल यांनी उपस्थितांशी संवाद साधत त्यांच्या शंकांचे निरसन देखील केले. त्या पुढे म्हणाल्या कोणत्याही कामामध्ये लोकसहभाग मिळाल्याशिवाय ते काम यशस्वी होत नाही. त्यामुळे जलसंवर्धन चळवळीला शाश्वत स्वरूप द्यायचे असेल, तर त्यामध्ये लोकसहभाग वाढणे आवश्यक आहे. फाउंडेशनतर्फे लोककल्याणकारी विषयांवर मार्गदर्शन, चर्चासत्रे, कार्यशाळा घेऊन जनजागृती करण्याचे काम केले जाते.
याविषयी अधिक माहिती देताना अमृता गोयल म्हणाल्या कि,भविष्यातील पाणी संकटातून मार्ग काढण्यासाठी उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक बनले आहे. पाणी संवर्धनासाठी सतर्क राहणे आवश्यक असून, नदी, ओढा, तलाव, विहीर अशा जलस्त्रोतांना प्रदूषणमुक्त व स्वच्छ, सुरक्षित ठेवणे आपले महत्वाचे कर्तव्य आहे. यासोबतच पाण्याच्या स्त्रोतांचे संरक्षण, पाण्याचे योग्य नियोजन , पाणी बचतीच्या लहान-लहान उपायांची अधिकाधिक लोकांना माहिती दिल्यास पाण्याची बचत सहज शक्य आहे.
” ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ सारख्या प्रकल्पांमुळे पावसाच्या पाण्याची साठवण करणे करून साठवलेले पाणी संरक्षित पाणी म्हणून पिकांना तसेच इतर अनेक गोष्टींसाठी वापरता येईल. वारंवार दुष्काळास बळी जाणा-या राज्यांमध्ये मोठया प्रमाणात सार्वजनिक रेनवॉटर हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी वापर करून पाणी साठवले जाते.येणाऱ्या काळाची गरज लक्षात घेता प्रत्येक सोसायटीने रेनवॉटर हार्वेस्टिंग टेक्नॉलॉजी वापर केला पाहिजे.” असे मत शर्मिला ओसवाल यांनी मांडले .
सलोनी गोयल कार्यक्रमाचा समारोप करताना म्हणाल्या कि, पृथ्वीचे वाढणारे तापमान, निसर्गाचे बदललेले ऋतूचक्र, पर्जन्याचे कमी होत जाणारे प्रमाण, वारंवार निर्माण होणारा दुष्काळ, तर दुसरीकडे वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण यासर्वांमुळे कुठेतरी समतोल राखण्याची आवश्यकता आहे,पाण्याच्या बचतीच्याबाबतील कोणतीही उपाययोजना ही कायमस्वरूपी कशी करता येईल, याचा विचार समाजाच्या मनामनात होणे अपेक्षित आहे.