अभियंता दिवसानिमित्त व्यक्त केल्या भावना
पुणे :- माहिती तंत्रज्ञानापासून ते शेतीपर्यंत आणि मोटारीपासून ते निवाऱ्यापर्यंत प्रत्येक क्षेत्राच्या प्रगती अभियंत्यांवर अवलंबून असते. म्हणूनच देशाच्या प्रगतीमध्ये अभियंत्यांचा मोठा वाटा आहे असे मत अमित गोयल यांनी मांडले.
अभियांत्रिकी क्षेत्राचे जनक भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिनानिमित्त अभियंता दिवस साजरा करण्यात आला. गोयल गंगा डेव्हलपर्सच्या बावधन मधील गंगा लेजंड साईट वर अभियंत्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जी. ए. भिलारे कन्सल्टंट प्रा.लि चे संचालक जी. ए. भिलारे , हेमंत निंबाळकर आणि गोयल गंगा डेव्हलपर्सचे संचालक अमित गोयल उपस्थित होते.
यावेळी बोलताना अमित गोयल म्हणाले, अन्न, वस्त्र व निवारा या मानवाच्या मुलभूत गरजा आहेत. शेतकरी जरी अन्न पिकवत असले तरी शेतीच्या मशागतीसाठी लागणारी उपकरणे तयार करण्याचे काम अभियंता करतो. तसेच शेतीसाठी लागणारे पाणी साठवून ठेवण्यासाठी अभियंता जलाशयावर धरण बांधण्याचे देखील काम करतो. घर बांधणीपासून पायाभूत सुविधा तयार करण्यापर्यंतची कामे अभियंता करत असतो. त्याच प्रमाणे आपल्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या अनेक वस्तू तयार करून आपल आयुष्य सुखकर करण्याचे काम ही अभियंता करत असतो.
याचबरोबर निंबाळकर यांनी उंच इमारतींच्या संकल्पना,साइटवर काम करताना अपघात कसे टाळता येतील, येथील सुरक्षिततेसंदर्भात सावधानता कशी बाळगावी तसेच स्ट्रक्चरल डिझाइनची प्रक्रिया आणि डिझाइनमध्ये वापरल्या जाणाऱ्या सॉफ्टवेअर्सविषयी देखील चर्चा केली. त्यानंतर इतर अनेक अभियंत्यांच्या शंकांचे निरसन करत त्यांना मार्गदर्शनही केले.