पुणे : बीडीपी, मेट्रो, शिवसृष्टी, न्यायालयाचे खंडपीठ यासह पुण्यातील महत्वाचे विषय मार्गी लावण्यासाठी अकरा सप्टेबर रोजी मंत्रालयात खास बैठक बोलवण्यात आली आहे. अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
पुण्यातील विकासकामांना गती मिळावी आणि प्रलंबित कामे लवकर मार्गी लागावी यासाठी पालकमंत्री बापट यांनी १७ जुलै रोजी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अशी बैठक आयोजित करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी याबाबत तत्काळ बैठक घेण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या निर्देशावरून बापट यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्र्यांचे सचिव प्रवीण परदेशी यांच्या उपस्थितीत ही बैठक ११ सप्टेंबर रोजी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
पुण्यातील मेट्रो प्रकल्प व चांदणी चौक येथील उड्डाणपूल हे दोन्ही प्रकल्प मार्गी दृष्टीने जमीन संपादित करून बीडीपी बाबत निर्णय घेणे, चांदणी चौक येथील उड्डाणपुलाबाबत चर्चा करणे. पुणे शहरामध्ये एकूण ४० टक्के झोपड्या आहेत या झोपड्या निर्मूलनाच्या कामांमध्ये गती आणणे, मेट्रोसाठी बालेवाडी येथील शासकीय जागा तत्काळ हस्तांतरित करण्याबाबत निर्णय घेणे, पुणे येथे उच्च न्यायालयाचे खंडपीठ सुरु करणे,पिंपरी चिंचवड येथे नव्याने सुरु करण्यात आलेल्या पोलीस आयुक्तालायातील कर्मचारी व अधिकारी यांच्या कमतरतेबाबत आढावा घेणे,पुरंदर येथील विमानतळासाठी भूसंपादनाबाबत चर्चा करणे, भामा आसखेड पुनर्वसनाबाबत निर्णय घेणेबाबत चर्चा करण्यासाठी बापट यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते. तसेच शहरातील विविध विकास कामाच्या उद्घाटन व भूमिपूजन कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वेळ घेण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त,झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अधीक्षक अभियंता, तसेच संबंधित विभागांचे अधिकारी या बैठ्कीमध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होणार आहेत. अशी माहिती या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.