मुंबई – एकीकडे आता कोरोना गेला ,किमान समान कार्यक्रमांची अंमलबजावणी वेगाने करा अशी मागणी मुख्यमंत्र्याकडे केलेले कॉंग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी राष्ट्रवादीने काय ठराव करावा तो त्यांचा विषय आहे पण देशात भाजपाला कॉंग्रेस हाच पर्याय आहे आणि केंद्रात यूपीएचे नेतृत्व कॉंग्रेस पक्षच करेल असे आज येथे स्पष्ट केले आहे.
नाना पटोले आज पुण्यात दौर्यावर आले असताना कॉंग्रेस भवन येथे त्यांनी डिजिटल सभासद नोंदणीचा आढावा घेतला .यावेळी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष रमेश बागवे , माजी आमदार मोहन जोशी , कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल, अरविंद शिंदे तसेच अभय छाजेड , अविनाश बागवे ,कमल व्यवहारे , अमित बागुल , लता राजगुरू , रमेश अय्यर आदी मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले,’ राज्यात कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेनेने एकत्रित येत महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार चालवण्याचे ठरले होते. करोना संकटामुळे त्याची अंमलबजावणी करण्यात अडथळा आला होता.परंतु आता परिस्थिती पूर्वपदावर येत असल्याने किमान समान कार्यक्रम राबवावा, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.यासंदर्भात नाना पटोले यांनी उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठविले आहे. या पत्रात म्हटले आहे की, जातीयवादी शक्तींना सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी आणि समाजातील सर्व घटकांचा सर्वांगिण विकास साधण्याच्या हेतूने तीन पक्ष एकत्र आले. अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या सुचनेनुसार किमान समान कार्यक्रमाच्या आधारे हे सरकार चालेल, असे ठरलेले आहे.राज्यातील सर्व समाज घटकांना न्याय देण्याची कॉंग्रेसची भूमिका राहिलेली आहे. सोनिया गांधी यांनी दलित, ओबीसी, आणि अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणासाठीच्या योजनांवर सरकारने काम करावे यासाठी मुख्यमंत्र्यांना याआधीही पत्र पाठवले होते.करोनामुळे राज्य सरकारपुढे अडचणी होत्या पण या कठीण प्रसंगीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मविआ सरकारने चांगले काम केले आहे. आता सर्व व्यवहार सुरुळीत सुरु असून अर्थव्यवस्थाही रुळावर आलेली आहे. आता ओबीसी , सीएमपी व दलित, अल्पसंख्याक समाजाच्या कल्याणकारी योजनांची अंमलबाजवाणी करण्याची कार्यवाही लवकरात लवकर करावी, असे नमूद केले आहे.
महाविकास आघाडी सरकार स्थिर आहे, सरकारला कोणताही धोका नाही. नाराजीच्या काही बातम्या येत आहेत त्यात काही तथ्य नाही आघाडी सरकारमध्ये असे प्रकार होत असतात त्यात नवे काही नाही. शिवसेना व भाजपाचे सरकार असतानाही सर्व काही आलबेल होते का? हे सरकार तीन पक्षाचे आहे, काही मुद्द्यांवर आमदारांनी किंवा नेत्यानी वरिष्ठ नेत्याची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली असेल तर त्यात काही गैर नाही. भाजपाकडून आमदार नाराज असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत.