सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचा राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धेने उत्साहात प्रारंभ
राज्यातील १४३ कला महाविद्यालये आणि १०५ शाळांतील १ लाख १० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे : आपल्या स्वप्नातील चित्र कॅनव्हासवर रंगविण्यात प्रत्येकालाच विलक्षण आनंद वाटतो. आजची पिढी हे देशाचे उद्याचे भविष्य आहे. जगामध्ये प्रगत देश म्हणून भारताला ओळख मिळवून देण्यात त्यांचा फार मोठा वाटा असणार आहे. त्यामुळे शालेय शिक्षणासोबतच कला, क्रीडा क्षेत्रातील प्राविण्य देखील गरजेचे आहे. सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाच्या माध्यमातून सातत्याने १४ वर्षे सशक्त भारत, सशक्त समाजाकरीता विविध समाजोपयोगी राबविले जाणारे उपक्रम हे देखील प्रगत राष्ट्राच्या दृष्टीने पुढचे पाऊल आहे, असे प्रतिपादन खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी केले.
कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व कस्तुरबा गांधी यांच्या १५० व्या जयंतीच्या निमित्ताने महाराष्ट्र हरिजन सेवक संघ, सि.धों.आबनावे कला महाविद्यालयातर्फे सारसबागेमध्ये राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या उद््घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी माजी आमदार उल्हास पवार, सप्ताहाचे मुख्य संयोजक माजी आमदार मोहन जोशी, डॉ.विकास आबनावे, पी.डी.आबनावे, प्रकाश आबनावे, राजेश आबनावे, प्रथमेश आबनावे, पुष्कर आबनावे, प्रशांत सुरसे, चेतन अगरवाल, आयुब पठाण, प्रशांत वेलणकर, भाऊ करपे, हणमंत पवार, शिलार रतनगिरी, भोला वांजळे आदी उपस्थित होते. स्पर्धेचे यंदा १४ वे वर्ष होते.
अॅड. वंदना चव्हाण म्हणाल्या, अनेक देशांमध्ये स्वच्छतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जसे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे आपले गाव, शहर, देश स्वच्छ ठेवण्याकरीता पुढे यायला हवे. स्वच्छतेची भावना मनात रुजली तरच हे काम शक्य आहे. चित्रांच्या माध्यमातून आपण लहानपणापासून स्वच्छतेचे महत्त्व रेखाटत असतो. मात्र, ते पुढे प्रत्यक्षात देखील आणायला हवे, असेही त्यांनी सांगितले. उल्हास पवार म्हणाले, चित्रकलेतून स्वच्छतेचा संदेश देण्यासोबत आंतरबाह्य असा प्रत्येक माणूस स्वच्छ व्हायला हवा, तरच समाज चांगला होईल. चित्रकला हे मनातील भावना कॅनव्हासवर उमटविण्याचे उत्तम साधन आहे. यामुळेच आपल्याला आत्मिक आनंद मिळतो.
मोहन जोशी म्हणाले, राज्यभरातून १ लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी चित्रकला स्पर्धेत सहभागी होण्याकरीता एकत्र येणे हा आगळावेगळा उपक्रम आहे. सामाजिक विषय मुलांना देऊन चित्रकलेच्या माध्यमातून सामाजिक जाणीवेचे संस्कार घडविण्याचे काम कलेच्या माध्यमातून केले जात आहे, असेही ते म्हणाले.
महात्मा गांधीजींचे स्वप्न स्वच्छता अभियान, मुलगी वाचवा मुलगी शिकवा, प.पू.गांधीजी आणि स्वातंत्र्य चळवळ, १५० वी महात्मा गांधीजी व कस्तुरबा गांधी जयंती यांसारख्या विषयावर आपल्या कल्पनाशक्तीतून नाविण्यपूर्ण चित्रे कॅनव्हासवर रेखाटत बालचित्रकारांनी सामाजिक संदेश दिला. बालचित्रकारांसोबतच उपस्थित मान्यवरांनी देखील चक्क विद्यार्थ्यांमध्ये बसून चित्र काढत त्यामध्ये रंग भरल्याचे दृश्य पाहून उपस्थितांना देखील प्रोत्साहन मिळाले. राज्यातील १४३ कला महाविद्यालये आणि पुण्यातील १०५ शाळांतील सुमारे १ लाख १० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत विविध विषयांवरील कल्पक चित्रे रेखाटली. सामान्य मुलांसोबत दिव्यांग मुले आणि पालक व ज्येष्ठ नागरिकांनीही मोठया संख्येने स्पर्धेत सहभाग घेतला.
चित्रकला स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ शनिवार, दिनांक ८ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता सहकारनगर येथील पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे होणार आहे. यावेळी माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी उपमहापौर आबा बागुल आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी सर्वोत्तम चित्रांचे प्रदर्शन देखील भरविण्यात येईल.