पुणे – पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवार देण्याची घोषणा माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केली होती; परंतु यासंदर्भात राहुल गांधी आणि शरद पवार अंतिम निर्णय घेतील, असे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यामुळे स्थानिक कार्यकर्ते व पदाधिकारी यांना विचारात घेऊन निवडून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, असे स्पष्टीकरण कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले. चव्हाण म्हणाले, “”कोणत्याही निवडणुकीत जिंकणारा उमेदवार असावा असे प्रत्येक पक्षाचे मत असते. मतदारसंघातील राजकीय परिस्थिती पाहून त्यानुसार स्थानिक नेत्यांनी चर्चा करून मत व्यक्त केले असेल; परंतु उमेदवारीच्या निर्णयावर अद्याप निर्णय झालेला नाही. पक्षांतर्गत चर्चा करून योग्य त्या वेळी निर्णय घेतला जाईल. सध्या राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षाच्या आघाडीसंदर्भात उच्चस्तरावरून कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. स्थानिक पातळीवरील परिस्थिती विचारात घेऊन स्थानिक नेत्यांना कार्यकर्त्यांशी चर्चा करून हा निर्णय घेतला जाईल; परंतु उमेदवार देताना जिंकणारा उमेदवार देण्यावर भर असेल,” असे संगितले
पुणे लोकसभा -कॉंग्रेसचा कि राष्ट्रवादीचा उमेदवार याचा निर्णय राहुल गांधी आणि शरद पवार च घेतील – अशोक चव्हाण
राष्ट्रवादी काँग्रेसकडून सरकार विरोधात राज्यभरात काढण्यात आलेल्या हल्लाबोल यात्रेनंतर आता, आघाडीमधील मुख्यपक्ष असणाऱ्या काँग्रेसकडून जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. 31 ऑगस्टपासून कोल्हापूरमधून जनसंघर्ष यात्रेला सुरुवात होणार असल्याची देखील माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिली आहे.
मोदी सरकारच्या चार वर्षाच्या कार्यकाळात देशभरात केवळ घोषणांंचा पाऊस पडला आहे. मात्र, एकही आश्वासन पूर्ण करण्यात आलेले नाही, त्यामुळे जनतेचा विश्वासघात झाला असल्याचा आरोप यावेळी अशोक चव्हाण यांनी केला.
भाजपच्या सत्ताकाळात लोकशाही धोक्यात आली आहे. त्यामुळे लोकांपर्यंत जाऊन आजची वस्तुस्थिती सांगणे गरजेचे आहे. त्यामुळे काँग्रेसकडून जनसंघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले असल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.