कोरोना संकटातही गलिच्छ राजकारण करणा-या केंद्रीय आरोग्य मंत्री व भाजपाने महाराष्ट्राची माफी मागावी !: नाना पटोले.

Date:

काँग्रेसचे ‘कोरोनामुक्त महाराष्ट्र’ अभियान; २४×७ हेल्पलाईन व जनजागृती मोहिम, रक्तदान शिबिरे.

मुंबई, दि. ८ एप्रिल २०२१
देशात सध्या कोरोनाने थैमान घातलेले असताना कालपर्यंत गायब असलेले देशाच्या इतिहासातील सर्वात अकार्यक्षम केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी अतीसक्रिय होत अत्यंत हीन पातळीवर जाऊन असंवेदनशील आणि अशोभनीय भाषेचा वापर करत महाराष्ट्रातील १३ कोटी मराठी माणसांचा अपमान केला आहे. डॉ. हर्षवर्धन यांनी आपल्या वक्तव्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
मुंबई येथे पत्रकार परिषदेत केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन व भाजपाचा समाचार घेताना नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना जनाची तर नाही मनाची थोडीफार शिल्लक असेल तर केंद्राचा कैवार घेऊन महाराष्ट्रावर खोटेनाटे आरोप करून आपली राजकीय पोळी भाजण्याचा नतद्रष्टपणा आणि महाराष्ट्रद्रोह करण्यापेक्षा झोपलेल्या केंद्र सरकारला जागे करून महाराष्ट्रासाठी आवश्यक कोरोना लस, रेमडेसीवीर इंजेक्शन आणि ऑक्सिजन व इतर अत्यावश्यक औषधांचा पुरेसा पुरवठा करण्यास सांगावे.
एका वर्षापूर्वी केंद्र सरकारने कोरोनाला राष्ट्रीय आपत्ती म्हणून जाहीर केले. आपत्ती निवारण कायदा २००५ नुसार आपत्ती जाहीर करणे याचा अर्थ त्या आपत्ती निवारणाची सर्वप्रकारची जबाबदारी आणि बांधिलकी स्वीकारणे आहे. त्यामुळे या आपत्तीची संपूर्ण जबाबदारी केंद्र सरकारची आहे पण दुर्देवाने केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन हे जबाबदारीपासून पळ काढत अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन असंवेदनशील आणि अश्लाघ्य पद्धतीने बेजबाबदारपणे आरोप करत आहेत.
कोरोनाच्या दुस-या लाटेचा अंदाज घेऊन केंद्र सरकार आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नियोजन करणे ही राष्ट्रीय आपदा व्यवस्थापन कायदा २००५ नुसार जबाबदारी होती परंतु तिचे पालन न करता देशातील नागरिकांच्या जीविताचा विचार न करता केंद्र सरकारने देशातील केवळ ८ कोटी नागरिकांना लस दिली असून पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्रासहित इतर देशांना मोठ्या प्रमाणात मोफत लस पाठवली आहे. लसीचा पुरवठा, लसींची उपलब्धता, रेमडेसीवर व ऑक्सीजनचा पुरवठा याबाबतीत वस्तुनिष्ठ निर्णय़ घेण्याऐवजी केंद्र सरकार आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे खोटे आरोप करून देशाची दिशाभूल करत आहे, असे पटोले म्हणाले.
 
कोरोनामुक्त महाराष्ट्रासाठी काँग्रेसची २४X७ हेल्पलाईन.
महाविकास आघाडीचे सरकार कोरोनाच्या अभूतपूर्व संकटाचा सामना मोठ्या धैर्याने व नियोजनबद्धरित्या करत आहे व काँग्रेस पक्ष राज्यावर आलेल्या या संकटाच्या काळात मदतीसाठी सक्रीय झाला आहे. काँग्रेस राज्यात कोरोनामुक्त महाराष्ट्र अभियान राबवत असून लवकरच सर्व जिल्हा काँग्रेस कमिट्यांच्या कार्यालयात २४X७ हेल्पलाईन सुरु करण्यात येणार आहेत. याचे मुख्य कार्यालय मुंबईतील पक्ष कार्यालयात असेल. या हेल्पलाईच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना सर्वप्रकारची मदत मिळवून देण्यासाठी मदत केली जाणार आहे.
रुग्णांना बेड्स उपलब्ध करुन देण्यासाठी मदत, रेमडेसीवर इंजेक्शनसह इतर वैद्यकीय सेवेसाठी मदत मिळवून देण्याचे काम या हेल्पलाईनच्या माध्यमातून केले जाणार आहे. कोरोनामुक्त बुथ, कोरोनामुक्त वार्ड, कोरोनामुक्त तालुका, कोरोनामुक्त जिल्हा व कोरोनामुक्त महाराष्ट्र करण्यासाठी काँग्रेस कार्यकर्ते प्रयत्न करतील. राज्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून १४ एप्रिलपासून राज्यभर रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. 
या अभियानात प्रदेश काँग्रेसचे सहा कार्याध्यक्ष त्या त्या विभागात जाऊन या कोविड परिस्थितीचा आढावा घेतील. कार्याध्यक्ष शिवाजीराव मोघे हे मराठवाडा विभाग, चंद्रकांत हंडोरे हे नागपूर विभाग, आरिफ नसीम खान हे कोकण विभाग, बसवराज पाटील हे पश्चिम महाराष्ट्र विभाग, आ. प्रणिती शिंदे या उत्तर महाराष्ट्र विभाग तर आ. कुणाल पाटील हे अमरावती विभागाची जबाबदारी सांभाळतील . जेथे गरज आहे तेथे मदत देण्याचा प्रयत्न करतील. याकामात पालकमंत्री, काँग्रेसचे संपर्क मंत्री हेसुद्धा सहभागी असतील. या मोहिमेत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आणि  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची घेतली जाणार आहे, असेही नाना पटोले म्हणाले.
मदत व पुनर्वसन मंत्री वडेट्टीवार यावेळी म्हणाले की, केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्राचा घोर अपमान केला आहे. केंद्र सरकारची जबाबदारी असताना महाराष्ट्राला लसींचा कमी पुरवठा करून राज्याच्या अडचणी वाढवल्या आहेत. राष्ट्रीय आपत्ती ओढवलेली असताना केंद्र सरकारने या वर्षी काहीही मदत केलेली नाही. केंद्र सरकार महाराष्ट्रावर अन्याय करत आहे. केंद्र सरकारने दिलेले व्हेंटिलिटरही उपयोगाचे नाहीत.
वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख म्हणाले की, कोरोना लसींचा पुरवठा करण्यात केंद्र सरकारचे नियोजन नाही. लोकसंख्येच्या प्रमाणात लसींचा पुरवठा गरजेचा असताना त्याप्रमाणात पुरवठा केला जात नाही. सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात असताना  त्याप्रमाणात लस उपलब्ध होऊ शकत नाहीत हे केंद्र सरकारचे अपयश आहे, असे काँग्रेस अमित देशमुख म्हणाले.
काँग्रेसच्या कोरोनामुक्त महाराष्ट्र जनजागृती अभियान व हेल्पलाईन संदर्भात सकाळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीत मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, आ. कुणाल पाटील हे उपस्थित होते. या नंतर झालेल्या पत्रकार परिषदेला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, कार्याध्यक्ष नसीम खान, चंद्रकांत हंडोरे, आ. कुणाल पाटील, आ. वजाहत मिर्झा, आ. अभिजित वंजारी, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, डॉ. राजू वाघमारे, डॉ, संजय लाखे पाटील, देवानंद पवार आदी उपस्थित होते.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

शंभरावे साहित्य संमेलन पुण्यातच

पुणे बाल पुस्तक जत्रेचे व्यासपीठावर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री...

साधू वासवानी पुलासाठी जलवाहिनी स्थलांतरात बदल; अतिरिक्त कामासाठी २ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: कोरेगाव पार्क येथील साधू वासवानी पूल उभारणीच्या कामात...

घनकचरा व्यवस्थापनासाठी बीआरसी वाहन खरेदीचा ८.२१ कोटींचा प्रस्तावाला मान्यता

पुणे: शहरातील घनकचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी पुणे महापालिकेकडून...