पुणे-सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात अभिनेत्री कंगना रनोट सातत्याने वादग्रस्त वक्तव्य करताना दिसत आहेत. नुकतेच तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मिरशी केली आहे. यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठली आहे. मराठी कलाकारांसोबतच बॉलिवूड सेलेब्रिटींनीही तिच्यावर निशाणा साधला आहे. तसेच राजकीय नेत्यांकडूनही तिच्यावर टीका केली जात आहेत. आता यावर कंगनाने भाष्य केले आहे. मुंबईला येतेय, कुणाच्या बापात दम असेल तर रोखूनच दाखावा असं म्हणत कंगनाने टीका करणाऱ्यांना चॅलेंज दिलं आहे.
कंगनाने ट्विट करत लिहिले की, ‘बरेच लोक मला परत मुंबईला न येण्याची धमकी देत आहेत म्हणून मी आता येत्या आठवड्यात 9 सप्टेंबरला मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला आहे, जेव्हा मी मुंबई विमानतळावर उतरेल तेव्हा टाइम पोस्ट करेल. कुणाच्या बापात दम असेल तर रोखूनच दाखवा’
सुशांत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या मुद्द्यावरून चित्रपट अभिनेत्री कंगना रनोट आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यात वादाची ठिणगी पडली. मुंबई पोलिसांची भीती वाटते, या कंगनाच्या वक्तव्यावर राऊत यांनी कंगनाला मुंबईत येऊ नये अशी आमची नम्र विनंती आहे. हा प्रकार म्हणजे मुंबई पोलिसांचा अपमानच आहे, असे म्हटले होते. यानंतर कंगनाने मुंबईची परिस्थिती ही पाकव्याप्त काश्मीरसारखी झाल्याचे वक्तव्य केले होते. यानंतर एकच वादंग उठले. तिच्यावर मराठी कलाकारांसह राजकीय नेत्यांनीही टीका करण्यास सुरुवात केली. यानंतर आता तिने सर्वांना तिच्या भाषेत उत्तर दिले आहे.
काय म्हणाली होती कंगना ?
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आपल्याला मुंबईत न येण्याची धमकी दिली असून मुंबई पाकव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे अशी टीका कंगनाने ट्विटरवरुन केली होती. तिने ट्विट करत लिहिले होते की, ‘ आधी झळकलेले आझादीचे फलक आणि आता मिळत असलेल्या उघड धमक्या यामुळे मुंबई पाकिस्तानव्याप्त काश्मीरसारखी का वाटू लागली आहे?’,