पंतप्रधानांना भेटल्यानंतर ठाकरे यांच्याकडून समर्थन
नवी दिल्ली : राज्याच्या गरजांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तासभर थेट स्वरूपात उत्तम चर्चा झाली. राज्याच्या हितासाठी सर्व ते सहकार्य करण्याचे वचन पंतप्रधानांनी दिले, असे सांगत सुधारीत नागरीकत्व कायदा (सीएए) कोणाच्याही विरोधात नाही, अशा शब्दात या कायद्याचे समर्थन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शुक्रवारी केले. राज्यात एनपीआर येऊ दे. त्यातील कलमांचा तपशील समजू दे त्यानंतर त्याबाबत निर्णय घेता येईल, असे एनपीआरचे समर्थन करत त्यांनी राज्यातील नागरिकांच्या कोणत्याही हक्कावर गदा येऊ देणार नाही, असे सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद याची माहिती दिली. ते म्हणाले, जीएसटीच्या निधीसाठी मी पत्र पाठवल्यानंतर पैसे येण्यास सुरवात झाली आहे. मात्र, ज्या वेगात ते येणे अपेक्षित आहे. त्या वेगात पैसे येत नाहीत. ते मिळावेत अशी मागणी पंतप्रधानांकडे केली. त्यावेळी पंतप्रधानांनी राज्याच्या हिताच्या योजनांना केंद्राकडून पाठींबा आणि सहकार्य देण्याचे आश्वासन दिले.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्र्यांची माहिती
वस्तू व सेवाकर (जीएसटी) परतावा महाराष्ट्राला जलदगतीने मिळावा. तसेच पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना केली.
मुख्यमंत्री पदाचा पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7, लोककल्याण मार्ग या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी खासदार संजय राऊत यांच्या 15, सफदरजंग लेन या निवासस्थानी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी पर्यावरण तथा राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत आणि खासदार हेमंत पाटील उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री.ठाकरे म्हणाले, जीएसटीचा राज्याच्या वाट्याचा परतावा मिळावा यासाठी प्रधानमंत्र्यांना याआधी पत्र लिहिले होते. त्यानंतर राज्याला हा परतावा मिळाला. मात्र, हा परतावा जलदगतीने मिळावा, अशी विनंती प्रधानमंत्र्यांना केली. याबाबत केंद्र पूर्ण सहकार्य करेल अशी ग्वाही प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली. तसेच, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना मिळावा यावरही चर्चा झाली. सध्या राज्यातील 10 जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री पीक विमा उतरविण्यासाठी कंपन्या आल्या नसल्यामुळे शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होत असल्याचे चित्रही प्रधानमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे त्यांनी सांगितले.
केंद्राकडून महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य मिळेल
विविध प्रगतशील कामे व योजनांसाठी केंद्राकडून महाराष्ट्राला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन प्रधानमंत्री मोदी यांनी दिल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रधानमंत्र्यांनी दूरध्वनीवरून मला शुभेच्छा दिल्या होत्या. आज मुख्यमंत्री म्हणून दिल्लीतील पहिल्या भेटीतच प्रधानमंत्र्यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत केंद्र आणि राज्य सरकार यांच्यामधील उत्तम समन्वयाबाबत प्रधानमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सीएए कायद्याचे ठामपणे समर्थन केले. त्यानंतर त्यांनी सीएएला असणारा विरोध कमी करण्यासाठी प्रयत्न करणार का? असा सवाल पत्रकारांनी केला. त्यावेळी ज्यांनी हे आंदोलन पेटवले त्यांनी ते मिटवण्यावचा प्रयत्न केला पाहिजे, असे ते म्हणाले. त्यावेळी आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेस नेते करत होते, असे काही पत्रकारांनी सांगताच ठाकरे यांनी सावध पवित्रा घेतला, दिल्लीत तुम्ही राहता. पेटवणारे कोण आहे, हे तुम्हाला माहित आहे असे ते म्हणाले. त्यानंतर मला सोनियांना भेटायला जायचे आहे, असे सांगत त्यांनी पत्रकार परिषद आटोपती घेतली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माझ्यात एनआरसी, सीएए आणि एनपीआर अशा साऱ्या विषयांवर चर्चा झाली. सीएएमध्ये घाबरून जाण्याचे कोणतेही कारण नाही. त्यात कोणाच्याही हिताच्या विरोधात हा कायदा नाही. शेजारील राष्ट्रांतील अल्पसंख्यांकांना नागरीकत्व देण्याची त्यात तरतूद आहे. त्यात हिंदुंचाही समावेश आहे. एनआरसी देशव्यापी होणार नाही. तो आसामपुरता मर्यादित विषय आहे. एनपीआर जनगणनेसारखी आहे. ती नेहमी होत असते. त्यात काही धोकादायक तरतुदी असतील, काही आक्षेपार्ह असेल तर त्यावेळी विरोध करू. पण त्याचे नेमके स्वरूप समोर येऊ द्या, असे ते म्हणाले.
राज्यात शेतकरी कर्जमुक्ती योजना राबवली जात आहे. याशिवाय आणखी दोन योजना राबवायच्या आहेत त्यासाठी जीएसटीमधील राज्याचा वाटा वेगाने मिळायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसबरोबर कोणत्याही मुद्यावर मतभेद नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेसशी कोणत्याही मुद्द्यावर मतभेद नसून आता सोनियांना भेटायला जात आहे, असे सांगत पत्रकार परिषद आटोपती घेतली.