https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/1117085945310791/
मुंबई – राज्यात कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. यावेळी उद्धव यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करणाऱ्यांचे आभार मानले. महाराष्ट्राच्या एकीला कोणी गालबोट लावण्याचा प्रयत्न करणार असेल तर सहन केले जाणार नाही. जाणीवपूर्वक फेक व्हिडिओ पसरवण्याऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी दिला आहे.
मुख्यमंत्री म्हणाले की, मी संयमाची भाषा वापरत आहे, विनंती करतोय, हात जोडतोय, जात-धर्म कोणताही असो कोरोना वायरस एकच आहे, मात्र समाजात दुही निर्माण करण्याचा वायरस पसरवण्याचा कोणी प्रयत्न करत असेल, तर कोरोनापासून मी वाचवेन पण अशा वृत्तींना वाचवणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले – आपण ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी संपूर्ण जगाने केल्या. आता त्याच गोष्टी सिंगापूरही करत आहे. मी सिंगारपूरच्या पंतप्रधानांचं भाषण बघितलं. येत्या मंगळवारपासून त्यांनी सिंगापूरमध्ये लॉकडाऊन घोषत केलं आहे. याचा अर्थ काय तर देश, जातपात, धर्म कोणताही असो विषाणू एकच आहे. त्याचा दुष्परिणामही एकच आहे. त्याचा इलाज हा आता केवळ नाईलाज म्हणून घरात राहणे हा एकच आहे, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढील सूचनांपर्यंत महाराष्ट्रात कोणताही उत्सव, धार्मिक कार्यक्रम, क्रीडा सोहळे होणार नाहीत. गुढीपाडवा, पंढरपूर वारी, रामनवमी घरी साजरे झाले, अन्य धर्मीयांनीही तसेच करावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे केले आहे.
दुसऱ्या ठिकाणी अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांनी इतरत्र कुठेही जाऊ नये, महाराष्ट्र सरकार सर्वांची खबरदारी घेत आहे, असेही आश्वासन उद्धव ठाकरेंनी सर्वांना दिलाे.
उद्धव ठाकरेंनी आज जनतेशी संवाद साधताना सोलापूरच्या आराध्या नावाच्या चिमुकलीचे कौतुक केले. ते म्हणाले, आज संपूर्ण देशात लॉकडाऊन आहे. या काळात सर्वजण संयम दाखवत आहेत. त्यात या चिमुकलीतचं वेगळेपण म्हणजे आज तिचा वाढदिवस आहे. आराध्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तमाम महाराष्ट्राच्यावतीने तुला आशीर्वाद देतो. प्रत्येक जण काहीना काही मदत करत असताना हे वय हट्ट करण्याचं, लाड पुरवून घ्यायचं आहे. पण आराध्या आज तू वेगळा आदर्श जगामोर निर्माण केला आहे. आराध्याने मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी मदत दिली आहे. आराध्याने आगळंवेगळं ठेवली आहे. हीच आपल्या महराष्ट्राची वृत्ती आणि हीच महाराष्ट्राची ओळख तू ठेवली आहे.
आता मला खात्री आहे ही समज सात वर्षाच्या मुलीमध्ये आली असेल तर आज आपण हे युद्ध जिंकले असे समजा. हा संयम, जिद्द आणि शिस्त या पलिकडे कोणतेही आयुद आपल्याकडे नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
अभिनेता शाहरुख खानने क्वारंटाईनसाठी जागा दिली आहे, ताज हॉटेलमध्ये डॉक्टरांना राहण्या-खाण्याची सोय केली जात आहे, प्रत्येकजण सिंहाचा, खारीचा वाटा उचलत आहेत, असे सांगत उद्धव ठाकरेंनी सर्वांचे धन्यवाद मानले.
या एका युद्धामध्ये मला एका गोष्टीचं समाधान आहे की, सर्वजण जातपात, पक्ष सर्व एका बाजूला ठेऊन एकत्र आले आहेत. सर्व पक्षाचे नेते एकत्र आले आहेत. पंतप्रधान मोदी देखील चर्चा करत असतात, फोन करत असतात. आज सोनिया गांधी यांनीदेखील फोन केला. शरद पवारही सोबत आहेत. सर्व धर्माचे धर्मगुरुसुद्धा सोबत आहेत. काही मुल्ला-मौलवी माझ्या संपर्कात आहेत. त्यांनाही मी आवाहन केल्यानंतर त्यांनीही आवाहन केलं आहे. अनेक संस्था, व्यक्ती, दिग्गज, कलाकार,खेळाडू आपापल्या परिने प्रयत्न करत आहेत, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
अनेकजण विलगीकरण कक्षासाठी आपल्या जागा करुन देत आहेत. शाहरुख खान त्यांची जागा देणार असल्याचे म्हणाले. अनेक हॉटेल्सने खास करुन ताज आणि ट्रायडेन्ट यांनी डॉक्टर्सच्या राहण्याची सोय केली आहे. यापूर्वीच त्यांनी आपली हॉटेल्स विलगीकरण कक्षासाठी दिली आहेत. काही जणांनी आपले हॉस्पिटल्स दिले आहेत. काही संस्था स्वत: होऊन जेवणाचे वाटप करत आहेत. काहीजण पैसे देत आहेत. प्रत्येकजण आपापल्यापरिने मदत करत आहेत आणि स्वत:हून पुढे येत आहेत, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.