बालकुमार दिवाळी अंक २०२२ चे प्रकाशन
पुणेः आजच्या काळात आपली मूळ संस्कृती झपाट्याने बदलत आहे. भाजी भाकरीच्या संस्कृतीपासून ती वडापाववर आली आणि आता ती पिझ्झा संस्कृती झाली आहे. हे बदल थांबवायचे असतील तर बालकुमार साहित्यावाचून पर्याय नाही. मुलांमध्ये लहानवयातच आपली मूळ संस्कृती रुजवायला हवी, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ.न.म.जोशी यांनी व्यक्त केले.
अमरेंद्र-भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणेच्यावतीने बालकुमार दिवाळी अंकांचे प्रकाशन शुक्रवार पेठेतील संस्थेच्या सभागृहात करण्यात आले. यावेळी बालसाहित्यिका डॉ. संगीता बर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षा सुनीताराजे पवार, संस्थेच्या विश्वस्त डॉ. मंदा खांडगे, कोषाध्यक्ष डॉ. दिलीप गरुड, लेखक बबन पोतदार, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुद्धे, सीमा चव्हाण, कविता मेहंदळे, मुकुंद तेलीचरी, निर्मला सारडा उपस्थित होते.
सुनीता पवार म्हणाल्या, साहित्य संस्था या हॉस्पिटलचे काम करीत आहेत. मुलांना लेखन, वाचनाची गोडी लावा आणि त्यातून त्यांना जे भावले आहे ते व्यक्त करायला शिकवा. त्यांना शब्दांचे सामर्थ्य कळू द्या. जशी बाग फुलवावी लागते तेव्हा ती सुंदर दिसते, तसे मुलांवर संस्कार करावे लागतात. पुढच्या पिढीवर चांगले संस्कार करण्यासाठी आपल्याला सज्ज होण्याची गरज आहे, असे ही त्यांनी सांगितले.
डॉ. दिलीप गरुड, डॉ. मंदा खांडगे, बबन पोतदार यांनी मनोगत व्यक्त केले. नवेश पाटील यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संगीत बर्वे यांनी प्रास्ताविक केले. भरत सुरसे यांनी आभार मानले.