बाळासाहेबांच्या जवळ जीवाला जीव देणारे शिवसैनिक होते … त्यांना कशाचीही अपेक्षा नव्हती,बाळासाहेबांचा शब्द प्रमाण होता,त्यांच्या शब्दावर अनेकांनी जीव ओवाळून टाकले, कित्येकांची संसारे उध्वस्त झाली आणि शिवसेना मुंबईसह महाराष्ट्र भर गावो गावी गल्लोगल्ली भगव्या झेंड्याच्या रूपाने झळकू लागली ,तेव्हा गुंडांची सेना म्हणवून हि शिवसेना ज्यांनी संपविण्याचा किंवा तिला विरोध करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला, दुर्दैवाने त्यातील काहीजणांना नव्हे तर अनेकांना नंतर सेनेत घेतले गेले,त्यांना नगरसेवक, आमदार, खासदार ,मंत्री अशी पदे मिळाली, आणि जुन्या जाणत्या ,जिवा भावाच्या शिवसैनिकांना त्यांनी आणि परिस्थितीने हळू हळू बाजूला करण्याचे काम सुरु झाले ….आता तर चक्क बाळासाहेबांनी राज ठाकरेंना नाकारून वारसदार म्हणून नेमलेल्या उद्धव ठाकरेंना देखील बाजूला करण्याचे धाडसी प्रयत्न सुरु झाले आहेत . वाघासारख्या जगलेल्या शिवसेनेत शिवसेना प्रमुखांच्या शब्दाला धार होती मान सन्मान होता , ‘ठाकरे ‘ नावाचा करिष्मा मुंबईत होता.. आता हाच करिष्मा सेना ५६ वर्षांची झाल्यावर मावळतीच्या मार्गावर जाईल काय ? या मार्गावर आहे काय ? याचे उत्तर काळच देणार आहे. कारण काळ जबरदस्त असतो तो भल्याभल्यांची भाषा बंद करतो ….
- –ठाण्यातील सेनेचे ६७ पैकी ६६ नगरसेवक एकनाथ शिंदेंसोबत; विरोधात आहे एकमेव महिला नगरसेवक
मुंबई – शिवसेनेच्या ४० आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारत भाजपाच्या सोबतीने सरकार स्थापन केलेल्या आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या एकनाथ शिंदे यांची काल शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाण्यातील नगरसेवकांनी भेट घेत त्यांना पाठिंबा जाहीर केला. ठाण्यातील एकूण ६७ पैकी ६६ नगरसेवकांनी एकनाथ शिंदेसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांनी दिली आहे. बुधवारी शिंदेंना समर्थन देणाऱ्या नगरसेवकांमध्ये केवळ एक नगरसेविका स्वच्छेने आल्या नव्हत्या त्यांचं नाव आहे नंदिनी विचारे. उद्धव ठाकरेंच्या गटाला समर्थन करणाऱ्या खासदार राजन विचारे यांच्या त्या पत्नी आहे. कालच्या या भेटीदरम्यान नंदिनी विचारे अनुपस्थितीत होत्या. नंदिनी विचारे यांचा अपवाद वगळता उर्वरित ६६ नगरसेवक हे एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, अशी माहिती नरेश म्हस्के यांनी दिली
ठाण्यातील ६४ शिवसेना नगरसेवकांनी काल (बुधवार, ६ जून २०२२) रात्री उशिरा नंदनवन या शिंदे यांच्या मुंबईतील बंगल्यावर त्यांची भेट घेतली. ठाणे महापालिकेत शिवसेनेचे सद्य स्थितीत ६७ नगरसेवक आहेत. टेंभी नाक्याचे शिवसेना नगरसेवक सुधीर कोकाटे हे अमरनाथ यात्रेसाठी गेल्याने ते नव्हते, तर घोडबंदर येथील पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक नरेश मणेरा यांची बायपास शस्त्रक्रिया झाल्याने तेही यावेळी उपस्थित नव्हते. उर्वरित ६४ नगरसेवक यावेळी हजर होते. तर एक नगरसेवक या सर्व नगरसेवकांसोबत नव्हता. शिंदेसोबत न जाण्याचा निर्णय घेणारी ठाण्यातील एकमेव नगरसेवक ही महिला असून त्यामागे एक खास कारण आहे.कालच शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्याचे खासदार राजन विचारे यांना लोकसभेत शिवसेनेचे नवे मुख्य प्रतोद म्हणून नियुक्त करण्यात आलंय. यवतमाळ-वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्याऐवजी विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभेतील शिवसेनेच्या मुख्य प्रतोद बदलाची माहिती राज्यसभेतील शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र पाठवून दिलेली आहे.
ही गळती सुरु असतानाच आता ठाण्यानंतर नवी मुंबईतील (Navi Mumbai) जवळपास ३० ते ३२ नगरसेवक शिंदे गटात सामील होणार असल्याचे म्हटले जात आहे.नवी मुंबई महानगरपालिकेतील ३० ते ३२ नगरसेवक एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. हे सर्व नगरसेवक आगामी काळात शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. यामध्ये काही ज्येष्ठ नगरसेवकांचाही समावेश आहे. नवी मुंबईत शिवसेनेचे एकूण ५० नगरसेवक आहेत. त्यामुळे ठाण्यापाठोपाठ नवी मुंबईमध्येही उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
१८ पैकी १२ ते १३ खासदार शिंदे गटात सामील होतील ?
आता शिवसेनेतील काही खासदारही शिंदे यांच्या संपर्कात असल्याचे म्हटले जात आहे. एकूण १८ पैकी १२ ते १३ खासदार शिंदे गटात सामील होतील असे भाकित वर्तविले जात आहे. तसा दावा भाजपा तसेच शिंदे गटाकडून केला जातोय. त्यामुळे सध्या शिवसेनेला आमदार तसेच नगरसेवकांच्या बंडाच्या रुपात धक्के बसत आहेत. आगमी काळात खासदारांनीदेखील शिंदे गटात दाखल होण्याचा निर्णय घेतल्यास, उद्धव ठाकरे नेमकं काय करणार? हे पाहणे उत्सुतकतेचे ठरणार आहे.