पुणे : “आयुर्वेदामध्ये समाजाला निरोगी बनविण्याची ताकद आहे. सर्व प्रकारच्या विकारांवर उपचार आणि प्रतिबंध करणे आयुर्वेदामुळे शक्य होते. संशोधनाची जोड देऊन नाविन्यता आणल्यास आयुर्वेद अधिक प्रगल्भ होईल. आयुर्वेदिक संशोधनासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्या सर्वांनी एकत्र येऊन वाटचाल करायला हवी,” असे प्रतिपादन ‘बीव्हीजी ग्रुप’चे संस्थापक अध्यक्ष हणमंतराव गायकवाड यांनी केले.
आरोग्यवर्धिनी चिकित्सालय आणि कायायुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आयुर्वेदिक कॉस्मेटोलॉजी आणि ट्रायकोलॉजी’वर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्राच्या समारोपावेळी ‘केशायुर्वेद’चे संस्थापक आयुर्वेदाचार्य वैद्य हरीश पाटणकर संकल्पित ‘कायायुर्वेद’ या त्वचाविकारांविषयी सर्व काही असलेल्या उपचार पद्धतीचे अनावरण करण्यात आले. नवी पेठेतील पत्रकार भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला अभिनेते विजय पटवर्धन, केरळ येथील आयुर्वेदिक केश व त्वचाविकार तज्ज्ञ डॉ. गोपाकुमार, दुबई येथील सौंदर्यशास्त्र तज्ज्ञ डॉ. व्ही. एल. शाम, ‘बीव्हीजी लाइफ सायन्स’चे संशोधक डॉ.पवनकुमार उपस्थित होते.
वैद्य हरीश पाटणकर यांनी सौंदर्यशास्त्र, केशविकार व उपचार याविषयी मार्गदर्शन केले.ते म्हणाले, “आयुर्वेद, आधुनिकता आणि आधुनिक यंत्रांचा मेळ घालून आयुर्वेदाचा शास्रोक्त वापर केला, तर ती आयुर्वेदाची खरी सेवा करता येईल. सौंदर्य हा आपल्या प्रत्येकाशी निगडित विषय असून, कायायुर्वेदामुळे सौंदर्य आणि त्वचाविकारांवर चांगल्या पद्धतीने उपचार शक्य होतील.”
विजय पटवर्धन यांनी उपक्रम मनापासून आवडल्याचे नमूद केले. यावेळी आयुर्वेदात उल्लेखनीय काम करणाऱ्यांचा ‘कायायुर्वेद’कडून सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विवेक आंबरे यांनी केले. वैद्य स्नेहल पाटणकर यांनी आभार मानले.