पुणे- काल महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून जनतेला संबोधित केले. यावेळी त्यांनी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले या दोन्ही महान व्यक्तिमत्वांनी जे मिशन सुरू केलं होतं, ते अद्यापही पूर्ण झालेलं नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. मात्र ते मिशन आगामी काळात आपण पूर्ण करू, अशी हमी त्यांनी दिली. महात्मा फुले यांनी दाखवलेली दिशा पूर्ण करण्याचा आपण संकल्प करू, हिच त्यांना खरी आदरांजली ठरेल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
महात्मा फुले हे सदैव शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि महिलांना शिक्षण देण्यासाठी झटले. मात्र स्वातंत्र्यानंतरही या दोन्ही विषयांबाबत आजही चांगली स्थिती नाही. त्यामुळे हे दोन्ही मिशन पूर्ण करण्याचा संकल्प भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी करावा, असे त्यांनी आवाहन केले. शेतकरी सुखी झाल्याशिवाय देश सुखी होणार नाही, हे महात्मा फुले यांचे धोरण होते आणि हेच धोरण कायम ठेवून आम्ही कार्य करू, असे चंद्रकांत पाटील यांनी नमूद केले.
यावेळी आमदार मुक्तताई टिळक, माधुरी ताई मिसाळ, ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे शहर संघटन सरचिटणीस राजेश पांडे, पुणे प्रभारी गणेश बिडकर, भाजपा पुणे शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.