वाहतूक नियंत्रणासाठी अधिक पोलिसांची गरज-भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांची मागणी
पुणे, दि. 19 – शहरात कोसळून पडलेली वाहतूक समस्या आणि पाण्याने वाहणारे रस्ते याबाबत राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसने आजवर अनधिकृत बांधकामांनी शहराचा करून ठेवलेला बट्ट्याबोळ, आणि वर्षभरात प्रशासक म्हणून अपयशी ठरलेले महापालिका आयुक्त विक्रम कुमार कारणीभूत असल्याचा आरोप आज पुन्हा एकदा भाजाप्चे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केला आहे. शहरातील वाहतुकीची कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी वाहतूक पोलिसांची अतिरिक्त कुमक तातडीने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्याची माहिती भाजपचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली.
मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शहर भाजपच्या शिष्टमंडळाने आज पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेऊन वाहतूक कोंडी सोडविण्याच्या उद्देशाने चर्चा केली. सरचिटणीस दत्ता खाडे, संदीप लोणकर, प्रसिद्धी प्रमुख हेमंत लेले, पुष्कर तुळजापुरकर, अरविंद गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुळीक म्हणाले, “शहरातील सर्व चौकांचे स्वतंत्र संस्थेमार्फत सर्वेक्षण करावे. ज्या चौकांमध्ये वाहतुकीची कोंडी होते, त्याची कारणे शोधावीत आणि त्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी केली होती. त्याला आयुक्तांनी तत्वतः मान्यता दिली. तसेच प्रत्येक चौकात गरजेनुसार एक-दोन अशा 400 वॉर्डनच्या नियुक्त्या लवकरच करण्यात येणार आहेत.”
शहरातील वाहतूक समस्येवर उपाययोजना करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीत वाहतूक पोलिस विभाग, पुणे महापालिका, मेट्रो, सार्वजनिक रस्ते विभाग, राज्य परिवहन मंडळ, पुणे महानगर परिवहन महामंडळ, स्मार्ट सिटी अशा सर्व महत्त्वाच्या विभागांची एकत्रित उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाणार आहे. त्यासाठी एक-दोन दिवसांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद साधणार असल्याचे मुळीक यांनी सांगितले.