राज्य सरकारने पक्षपातीपणे कारवाई करणे योग्य नाही – केतकी चितळेची भूमिका निषेधार्ह परंतु पोलिसांच्या उपस्थितीत तिला नेत असताना मारहाण करणे, धक्काबुक्की करणे, शाई फेकणे हे काय ?
मुंबई, दि. १७ मे – कोणी काही गैर केले की कारवाई व्हायलाच पाहिजे. पण सरकार पुरस्कृत आणि पोलिसांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काहीही करा, अशा प्रकारचा संदेश सरकार देतेय. विरोधी पक्ष भाजपने काहीही केले तर त्याल आम्ही ठेचून काढू अशी भूमिका सरकारची दिसतेय. भाजपच्या आंदोलनावर लगेच कारवाई केली जाते. सरकारने अशा प्रकारे पक्षपातीपणे कारवाई करणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी व्यक्त केली.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी काल पुणे दौऱ्यावर असताना भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये झटापट झाली. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे महिला विभागाच्या अध्यक्ष वैशाली नागवडे यांना मारहाण झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. या संदर्भात भाजपच्या तीन कार्यकर्त्यांविरोधात विनयभंग आणि मारहाणीचा गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ते पुढे म्हणाले की, हे सरकार, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते खुलेआम भाजपच्या कार्यकर्त्यांवर हल्ले करताना दिसतात. स्मृती इराणींचा कार्यक्रम असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या घुसल्या त्यांच्यावर कारवाई केली नाही. शिवसेनेच्या वतीने मोहित कंबोजच्या गाडीवर, रवी राणांच्या घरावर हल्ले झाले, किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ले झाले, त्यांच्यावर कारवाई नाही. सरकार पुरस्कृत राष्ट्रवादी, शिवसेना हल्ले करतात. मात्र गृहमंत्री महोदय यावर काही कारवाई करत नाहीत, काही बोलत नाहीत. केतकी चितळेची भूमिका निषेधार्ह आहे. याचा आम्हीही निषेध करतो. असे लिहिणे चुकीचे आहे, परंतु पोलिसांच्या उपस्थितीत तिला नेत असताना मारहाण करणे, धक्काबुक्की करणे, शाई फेकणे याला कायद्याने संरक्षण दिले गेले नाही, असेही दरेकर यांनी सांगितले.