पुणे नगर वाचन मंदिराचा १७४ वा वर्धापन दिन
पुणे : पुण्यामध्ये अशा कितीतरी संस्था अशा आहेत, ज्या वाङ्मयमयीन संस्कृतीसाठी आणि वाचकांसाठी काम करतात. त्यांची साखळी निर्माण व्हायला हवी. ज्ञानवृद्धीसाठी हे गरजेचे आहे. ग्रंथालये ही वाङमय संस्कृतीची केंद्र झाली पाहिजेत. सृजनशीलतेची गजबज हे आपल्या संस्कृतीच्या समृद्धीचे लक्षण आहे, असे मत ज्येष्ठ साहित्यिका अरुणा ढेरे यांनी व्यक्त केले.
पुणे नगर वाचन मंदिराच्या १७४ व्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन सिटी पोस्ट चौकातील संस्थेच्या इमारतीत करण्यात आले होते. कार्यक्रमात अरुणा ढेरे यांच्या हस्ते विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. यावेळी पुणे नगर वाचन मंदिराचे अध्यक्ष मधुमिलिंद मेहंदळे, उपाध्यक्ष बाळासाहेब देशमुख, कार्यवाह सुवर्णा जोगळेकर, सहकार्यवाह प्रसाद जोशी, चिंतामणी तावरे, अनघा फडणीस, गायत्री सावंत,केदार पटवर्धन, अरविंद रानडे, गुरुदास नूलकर, अनिल देऊरकर, गौरी कुलकर्णी, रवींद्र चौधरी, विनायक माने, हर्षदा ठाकर, प्रशांत कुलकर्णी, रोहित जोगळेकर, राजीव मराठे, केतनकुमार पाटील, संगीता पुराणिक, स्वाती ताडफळे उपस्थित होते.
अरुणा ढेरे यांच्या हस्ते सुमेधा चिथडे यांना आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार, विनायक रानडे यांना वाचन चळवळ आदर्श कार्यकर्ता पुरस्कार आणि टी.एन.परदेशी यांना संत वाङमय लेखन पुरस्कार देण्यात आला.
अरुणा ढेरे म्हणाल्या, पूर्वी समाजाच्या विकासामध्ये धर्मसंस्था ही पायाभूत होती. मंदिर हे समाज विकासाचे साधन होते. नृत्य, संगीत, वादन अशा अनेक कलांचा विकास मंदिरातूनच झाला. बदलत्या काळानुसार वाचनालये ही समाज विकासाची मंदिरे झाली पाहिजेत. वाचनालयाचा विकास झाला पाहिजे. पुणे नगर वाचन मंदिर हे प्रबोधनपर्वाच्या इतिहासातील महत्त्वाचा दस्तावेज आहे. समाजाच्या हिताला पोषक असे नव्या पद्धतीने वाचकांपर्यंत पोहोचविणारी जाणती मंडळी वाचन मंदिरात आहेत, असेही त्यांनी सांगितले.
सुमेधा चिथडे म्हणाल्या, पुरस्कार व्यक्तीला नाही तर सेवाकार्याला आहे. हा पुरस्कार प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना आणि त्यांच्या त्यागाला मी अर्पण करते. थोर पुरुष केवळ वाचायचे नसतात, तर आपापल्या परीने कृतीमध्ये उतरवायचे असतात. सैन्यदल हे केवळ एकच असे क्षेत्र आहे, जिथे मागणी नसते, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर संप नसतो. स्वातंत्र्य मिळवण्यात आपले काही योगदान नव्हते, परंतु स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी काय करू शकतो याचा विचार करायला हवा, असेही त्यांनी सांगितले.
टी.एन.परदेशी म्हणाले, दुसऱ्याने काहीतरी करायला पाहिजे यापेक्षा स्वतः काहीतरी करायला पाहिजे, या विचरातूनच वाचन चळवळ सुरु झाली. विनायक रानडे यांनी पुरस्काराची ५ हजार रुपये रक्कम सैनिकांसाठी काम करणाऱ्या सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेला दिली.
विनायक रानडे म्हणाले, आज मिळालेला पुरस्कार ही माझ्या ग्रंथाला मिळालेला पुरस्कार आहे. हा पुरस्कार गोरक्षनाथांचा कृपाशिर्वाद असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
मधुमिलिंद मेहेंदळे यांनी मनोगत व्यक्त केले. संगीता पुराणिक यांनी सूत्रसंचालन केले. सुवर्णा जोगळेकर यांनी प्रास्ताविक केले. विनायक माने यांनी आभार मानले.