हैदराबाद- महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केल्यास त्यांना राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करू, असे वक्तव्य एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीने आमच्याशी कोणताही संपर्क साधलेला नाही. महाराष्ट्रातील एमआयएमच्या आमदारांनाही मविआच्या नेत्यांकडून संपर्क साधण्यात आलेला नाही. आम्ही 2 दिवस त्यांची वाट पाहू, अशी भूमिका आज ओवेसी यांनी जाहीर केली.येत्या 10 जूनला होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीनिमित्त राजकीय घडामोडींना वेग आला आहे. निवडणूक जिंकण्यासाठी भाजप व शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यात आता एमआयएमने एंट्री केली आहे. आज पत्रकारांशी संवाद साधताना ओवेसी म्हणाले, राज्यसभेसाठी 10 तारखेला निवडणूक होत आहे. त्यामुळे आम्ही आणखी 2 दिवस मविआकडून काही प्रतिसाद मिळतो का, याची वाट पाहू. त्यानंतर आम्ही निवडणुकीबाबत निर्णय घेऊ, असे ओवेसी यांनी सांगितले.
राज्यसभा निवडणुकीत आपले उमेदवार जिंकून आणण्यासाठी मविआला आमची गरज आहे. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ओवेसी यांनी केले. तसेच, मविआला पाठिंबा देण्याबाबत महाराष्ट्रातील नेत्यांशीही बोलणे झाले आहे. राज्यात धुळे आणि मालेगाव येथे एमआयएमचे 2 आमदार आहेत. या 2 आमदारांनी कोणाला पाठिंबा द्यायचा, याचा निर्णय आपण 2 दिवसानंतर घेणार असल्याचे ओवेसी यांनी सांगितले.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादला 8 जूनला जाहीर सभा होत आहे. त्यावर ओवेसी म्हणाले, लोकशाहीत प्रत्येकाला सभा घेण्याचे स्वातंत्र्य असते. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या सभेवर आक्षेप घेण्यासारखे काहीही नाही. मीदेखील लवकरच औरंगाबादला जाहीर सभा घेऊन जनतेशी संवाद साधणार आहे.