मुंबई- एमआयएम प्रमुख असुदुद्दीन ओवेसी यांनी दिलेली ऑफर काँग्रेसने स्वीकारली असून, राज्यसभा निवडणुकीसाठी एमआयएमशी संवाद साधणार असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. राज्यसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी आज मुंबईत काँग्रेसची बैठक होतेय. या बैठकीला काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे उपस्थित आहेत. या बैठकीपूर्वी पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला.राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आमच्याशी संपर्क केल्यास त्यांना मतदान करू, असे वक्तव्य एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केले आहे. मात्र, अद्याप महाविकास आघाडीने आमच्याशी कोणताही संपर्क साधला नाही. महाराष्ट्रातील एमआयएमच्या आमदारांनाही मविआच्या नेत्यांकडून संपर्क साधण्यात आला नाही. आम्ही 2 दिवस त्यांची वाट पाहू, अशी भूमिका आज ओवेसी यांनी जाहीर केली.
ओवेसी यांच्या भूमिकेनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, आम्ही एमआयएमशी नक्कीच संवाद साधू. छोटे पक्ष आणि अपक्षांच्या आम्ही संपर्कात आहोत. आमचे सगळे उमेदवार हे विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शिवाय समाजवादी पक्षही आमच्यासोबत असल्याचे सांगायला ते विसरले नाहीत.पटोले म्हणाले, काँग्रेसच्या आमदारांना प्रशिक्षणाची काहीच गरज नाही. फक्त मतदानाची थोडी पद्धत सांगितली जाणार आहे. शिर्डीमध्ये आमचे दोन दिवसाचे अधिवेशन झाले. त्याचा शंभर दिवसांचा कार्यक्रम आम्ही तयार केला आहे. काँग्रेस विचारधारेची चळवळ महाराष्ट्रात उभी करायची आहे. त्यावर आम्हाला चर्चा करायची आहे. दरम्यान, काँग्रेसचे सर्व आमदार हे पटोलेंच्या निवासस्थानी थांबणार असल्याचे समजते.राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये यासाठी महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष खबरदारी घेताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत. ट्रायडेंट हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून सध्या मतांची जुळवाजुळव सुरू आहे. त्यापाठोपाठ काँग्रेस आमदारांना देखील बॅग भरून मुंबई येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. काँग्रेसने इम्रान प्रतापगडींना उमेदवारी दिली आहे.विधान परिषदेबाबत काँग्रेस उद्या निर्णय घेण्यात येणार, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. आज शिवसेनेच्या वतीने दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा सुरू झाली असून राष्ट्रवादीकडून एकनाथ खडसेंच्या नावाची चर्चा सुरू आहे.