नागपूर -सीमाप्रश्नावरून नागपूर हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस आज वादळी ठरला. कोल्हापुरातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज कर्नाटकात जाण्यापासून कर्नाटक पोलिसांनी रोखले आहे. त्याचे जोरदार पडसाद आज सभागृहात उमटले.त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’
सीमा भागातील आमच्या मराठी बांधवांशी राज्य सरकार ठामपणे उभे आहे.आतापर्यंत केंद्र सरकार या प्रश्नात कधीच हस्तक्षेप करीत नव्हते.पहिल्यांदा मा.केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शाह यांनी बैठक घेतली आणि दोन्ही बाजू ऐकून घेतल्या.आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी अतिशय स्पष्ट भूमिका मांडली60 वर्षाची समस्या 1 तासात सुटू शकत नाही.पण संवाद राहिला पाहिजे, यासाठी दोन्ही राज्यांतील मंत्र्यांची एक समिती गठीत करण्याचा निर्णय झाला.या देशात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. तसा महाराष्ट्र एकीकरण समितीला सुद्धा आहे.आज आंदोलन करताना मराठी भाषिकांना अटक करणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्या सुटकेसाठी राज्य सरकार प्रयत्न करेल आणि लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा अधिकार नाकारला जात असताना याबाबत तीव्र नाराजी सुद्धा नोंदविण्यात येईल.सीमाभागातील योजना/प्रकल्प विशेषत्वाने हाती घेण्यात येतील. म्हैसाळ योजनेसाठी 2000 कोटी आम्ही मंजूर केले आहेत. इतरही योजनांना गती देण्यात येईल.