मुंबई, दि. ३ जुलै – कोरोना संसर्गामुळे मागील वर्षीप्रमाणे यंदाही राज्य सरकारनं पायी वारीला परवानगी नाकारली आहे. मात्र, पायी वारी व्हायला हवीचं, अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली असताना आज पायी चालत पंढरीकडे निघालेले कीर्तनकार ह. भ. प. बंडातात्या कराडकर यांच्यासह काही वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. हा महाराष्ट्राच्या तमाम वारकऱ्यांचा अपमान आहे, हे सरकार आता वारकऱ्यांनासुद्धा सोडत नाही. अशाप्रकारे राज्य सरकार वारकऱ्यांची मुस्कटदाबी करत असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली.
कोरोनाचा धोका अदयापही कायम असताना वाईन शॉप, बार सुरु करण्याची परवनागी देण्यात येते, मात्र लाखो भक्तांची श्रध्दास्थाने असलेली मंदिर मात्र उघडण्यास राज्यसरकारकडून परवानगी का दिली जात नाही, असा सवाल प्रविण दरेकर यांनी उपस्थित केला.
कल्याणमधील मारहाणीची घटना निंदनीय
कल्याणमधील मारहाणीची घटना निंदनीय आहे. या घटनेमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा कसा उडाला आहे हे दिसून येते. ही अमानुषपणे झालेली मारहाण करणे म्हणजे पोलिसांचे व पर्यायाने सरकारचे अपयश आहे. रस्त्यावर पट्टे काढून जुलमी पद्धतीने मारहाण कशी होऊ शकते ? यावेळी कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलिस कुठे होते ? काय करत होते ? अमानवी पद्धतीने मारहाण करणं अत्यंत चुकीचं आहे, असे विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी स्पष्ट केले.
साखर कारखान्यांची चौकशी झाली पाहिजे
कायद्यासमोर सर्व समान आहेत. जे कोणी दोषी असतील मग ते भाजपचे असो किंवा इतर पक्षाचे त्यांच्यावर कारवाई करावी, परंतु आपल्या अंगावर आले म्हणून तुमच्या अंगावर यावे असं काही होत नसते. कायद्याच्या चौकटीत कारवाई होत असते, असे दरेकर यांनी यावेळी सांगितले.