एकोणीसाव्या शतकात भारतात सामाजिक सुधारणा होण्यास सुरुवात झाली. या काळात स्त्रियांना शिक्षण दिले जात नसे, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मोठ्या संघर्षातून मुलींसाठी शाळा सुरु केली होती, मात्र समाजाच्या मानसिकते मध्ये अजूनही फार बदल झालेला नव्हता अशा परिस्थितीत एका स्त्री ने डॉक्टर होण्याचे स्वप्न बघितले आणि तिच्या पतीने ते पूर्णत्वास नेले. स्त्री शिक्षण म्हणजे व्याभिचाराला निमंत्रण असे समजले जायचे त्या काळात सातासमुद्रापार जाउन डॉक्टरेट मिळविण्यासाठी एका महिनेने आणि तिच्या पतीने म्हणजेच आनंदीबाई आणि गोपाळराव यांनी जो सामाजिक संघर्ष केला त्याची कथा म्हणजे समीर विद्वांस दिग्दर्शित ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट होय.
दहा – बारा वर्षाच्या यमुना साठी तिचे आईवडील वर संशोधन करत आहेत. सोमण बुवा यमुनासाठी पोस्टात काम करणाऱ्या गोपाळराव जोशीचं (ललित प्रभाकर) स्थळ घेऊन येतात. बिजवर असलेल्या गोपाळरावांचा हुंडा, मानपान अशा गोष्टीना विरोध आहे. लग्नासाठी. फक्त त्यांची एक अट असते, ती म्हणजे मुलीला लिहिता वाचता यायला हवं. त्यानंतर गोपळरावाशी लग्न करून यमूना आनंदीबाई गोपाळराव जोशी बनते. यमुनाचे आई वडील मनातून मात्र स्त्री शिक्षण म्हणजे व्यभिचाराला आमंत्रण असे मानणारे आहेत यामुळे तिच्या शिक्षणात अडथळे निर्माण करतात. मात्र,गोपाळरावांच्या हट्टीपणापुढे त्यांचे काही चालत नाही आणि आनंदीचे प्राथमिक शिक्षण सुरू होते.
दरम्यान गोपाळरावांची अलिबागला बदली होते, येथे दोघांचा संसार आणि अभ्यास दोन्ही सुरू होतो. मात्र, त्याचवेळी गोपाळरावांच्या पहिल्या पत्नीच्या वडिलांचे निधन होते. त्यामुळे ते त्यांच्या पहिल्या पत्नीपासूनचा मुलगा कृष्णा आणि सासूबाई (गीतांजली कुलकर्णी) यांना घरी घेऊन येतात. याच काळात या जोडप्याला मुल होते मात्र आजारपणामुळे ते दगावते, या घटनेतून सावरताना त्या डॉक्टर होण्याचा निर्णय घेतात, गोपाळराव त्यांना पाठिंबा देतात मात्र, त्यासाठी या जोडप्याला जो संघर्ष करावा लागतो तो जाणून घेण्यासाठी ‘आनंदी गोपाळ’ बघायला हवा.
या चित्रपटाची कथा वास्तव आहे, चित्रपटात १८६५ ते १८८७ चा काळ दिसतो. मुळातच ही गोष्ट फक्त आनंदीबाईंची नाही, तर ती त्यांना खंबीर आणि अमूल्य साथ देणाऱ्या त्यांच्या पतीची- गोपाळरावांचीही आहे. दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी या जोडप्याचा संघर्ष मांडण्याचा प्रयत्न केला असला तरी तो काहीसा वरवरचा वाटतो. चित्रपटात संवाद चांगले आहे, त्या काळातील बोली भाषेच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी कथेचा वेग मंदावला आहे. मध्यंतरानंतर आनंदीबाईंचा अमेरिकेतील वास्तव्याचा भाग सविस्तरपणे आला असता तर चित्रपट अधिक प्रभावी ठरला असता. चित्रपटाची तांत्रिक बाजू भक्कम आहे.
कलाकारांच्या अभिनयाबद्दल सांगायचे तर गोपाळरावांचा तऱ्हेवाईकपणा, संतापी वृत्ती, जिद्द हे सारं ललितने चांगले साकारले आहे. भाग्यश्री मिलिंदने आनंदीबाई व्यक्तिरेखांच्या जवळ जाण्याचा चांगला प्रयत्न केला आहे., गीतांजली कुलकर्णी यांची भूमिका लक्षवेधून घेते, इतर कलाकारांनी आपल्या भूमिकांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
हृषीकेश – सौरभ – जसराज यांचे संगीत ही सुद्धा जमेची बाजू आहे, आनंदीबाईंचा प्रवास दाखवणारे “रंग माळियेला”,नाचरे अवखळ “वाटा वाटा”, स्फूर्तिदायक “माझे माऊली” , शांत भासणारे “मम पाऊली” आणि शेवटी येणारे “तू आहेस ना” ही गाणी प्रेक्षकांच्या मनात रुंजी घालतात.
एकंदरीत सांगायचे आजची स्मार्ट स्त्री विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने काम करते. कुटुंब, पाल्यांची जडण-घडण करण्यात तिचा मोठा वाटा आहे. परंतु सुमारे १३० वर्षा पूर्वी स्त्री शिक्षण हा विचार करणे सुद्धा पाप मानले जायचे,अशा काळात गोपाळराव जोशी यांनी पत्नी आनंदीबाईचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्णत्वास नेले. या यातून आजच्या पिढीला प्रेरणा मिळेल.
चित्रपट – आनंदी गोपाळ
निर्मिती – . झी स्टुडीओज, फ्रेश लाईम फिल्मस्, नमः पिक्चर्स
दिग्दर्शक – समीर विद्वांस
संगीत – हृषीकेश – सौरभ – जसराज
कलाकार – ललित प्रभाकर, भाग्यश्री मिलिंद, गीतांजली कुलकर्णी, क्षिती जोग, योगेश सोमण
रेटिंग – ***
-भूपाल पंडित