काव्यमय नृत्याविष्कारातून घडले कथकच्या अस्मितेचे दर्शन
काव्य कुसुमांजली मैफलीस
रसिकांची भरभरून दाद
पुणे.: नवोन्मेषाच्या ध्यासातून बहरलेल नृत्य काव्याशी एकरूप होऊन रंगमंचावर अवतरल. साहित्य आणि नृत्याच्या या अनोख्या कलासंगमास रसिकांची भरभरून दाद लाभली. निमित्त होते ‘रोचित’ कथक अकादमीतर्फे झालेल्या ‘काव्य कुसुमांजली ‘ मैफलीचे.
महान कवींच्या अजरामर काव्यांवर गुरु रोशन दात्ये यांनी तितक्याच ताकदीने नृत्यबद्ध केलेल्या रचना पाहताना कथकच्या असिमतेचे दर्शन उपस्थितांना घडले.
रोचित कथक अकादमीच्या ४०व्या वर्षपूर्तीनिमित्त वर्षभर सुरू असलेल्या ‘परितोष’ या शृंखलेतील “काव्य कुसुमांजली” हे ४थे पुष्प असून ज्येष्ठ साहित्यिक आणि कवी कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ ही मैफल घेण्यात आली.
मोरोपंत यांच्या विष्णूवंदनेवरील नृत्य रचनेने मैफलीची सुरुवात झाली. त्यानंतर चिमुकल्या शिष्यांनी ‘ उठा उठा चिऊताई,’ यावर लोभस नृत्य केले. ‘नाचत वाऱ्या संगे, आल्या पावसाच्या सरी’ हे लोकगीत, ‘विकल मन आज ‘, ‘नदी किनारी लवून, पिंपळ बघतो पाण्यात’ अशा सदाबहार काव्यावर सादर झालेल्या नृत्यरचनांना रसिकांची उत्स्फूर्त दाद लाभली.
प्रसिद्ध दिग्दर्शक व संगीतकार सुनील सुकथनकर यांनी शब्दबध्द केलेली ‘कोवळ्या देहाला पीर्तीचा भार ‘ या लावणीने रसिकांची मने जिंकली. अहि- नकुल’ मध्ये सर्प व मुंगुसाचे युद्ध तर “पृथ्वीचे प्रेमगीत’मध्ये पृथ्वीने सूर्याप्रती व्यक्त केलेला समर्पण भाव नृत्याविष्कारातून शिष्यांनी अचूकपणे मांडला. ‘ मन वढाय वढाय’, श्रावण मासी हर्ष मानसी, इंदिरा संत यांची ‘ एकटी ‘ या काव्यरचना नृत्यातून अनुभवताना कथकच्या विविधांगी पैलूंचे दर्शनच रसिकांना घडले. गुरु रोशन दात्ये यांनी ‘मंद समीरण, शितल मधुगंध’ या काव्यावर पेश केलेल्या नृत्याभिनयास रसिकांची विशेष वाहवा लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांवरील पोवाड्याने मैफलीची सांगता झाली. केतकी वाडेकर, प्राजक्ता राज, धनश्री पोतदार, आभा औटी, रसिका कुलकर्णी, मुग्धा बेलवलकर, प्रिया भागवतकर यांच्यासह रोचित अकादमीच्या निपुण शिष्यांनी या नृत्यरचना सादर केल्या. माधुरी जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
कुसुमाग्रजांच्या हृदयस्पर्शी
आठवणींना उजाळा
रोशनताई माहेरून नाशिकच्या. त्यांच्या घराला लागून कविवर्य कुसुमाग्रज यांचं घर होत. साहित्य क्षेत्रात कुसुमाग्रजांचा वाढता नावलौकिक, मोठंमोठ्या साहित्यिकांची वर्दळ, हा कविवर्य कुसुमाग्रजांच्या कार्यकीर्दीचा सुवर्णकाळ रोशनताईंनी जवळून अनुभवला. त्यांचे अमूल्य मार्गदर्शन व सहवास रोशनताईंना लाभला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक किस्से सांगत कुसुमाग्रजांच्या या हृदयस्पर्शी आठवणींना रोशनताईंनी उजाळा दिला.