मुंबई -खार पोलिसांनी अटकेची कारवाई केल्यानंतर नवनीत आणि रवी राणा दाम्पत्यांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब आणि संजय राऊत यांच्यासह सर्व ७०० जणांवर कलम १२०बी, १४३, १४७, १४८, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना त्यांच्या खार येथील निवासस्थानातून ताब्यात घेतलं. पोलीस दोघांना खार पोलीस ठाण्यात घेऊन आले आणि त्यानंतर पोलिसांनी कायदेशिर प्रक्रिया पार पाडत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली. खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध भादंवि १५३ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्यानंतर प्राथमिक माहितीनुसार, राणा दाम्पत्यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले की, आम्ही मातोश्रीसमोर केवळ हनुमान चालिसाचे पठण करणार होतो पण त्यावेळी आमच्यावर हल्ला करण्याचाही शिवसेनेचा डाव होता. त्यामुळेच तेथे रुग्णवाहिकाही ठेवली होती. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत, अनिल परब यांच्यावर गुन्हा दाखल करावा असेही तक्रारीत त्यांनी नमुद केले आहे.
संजय राऊत यांनी शिवसैनिकांना चिथावले आणि जीवे मारण्याचा कट रचला. शिवसैनिकांनी आमच्या घरासमोर आंदोलन केले असून आमच्या जीवाला धोका निर्माण केला असा आरोपही खार पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमुद करण्यात आले आहे.
नेमके काय आहे तक्रारीत
काल संध्याकाळी बैठक घेऊन आमच्या विरोधात शिवसेनेने रणनिती तयार केली. त्यानंतर आम्हाला मारण्यासाठी शेकडोंचा जमाव मातोश्रीसमोर बोलावण्यात आला. त्यावेळी शिवसैनिकांकडे बॅट आणि हत्यारे होती. आम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला आमच्यासाठी रुग्णवाहिका ठेवली गेली आणि तशा आशयाच्या घोषणाही शिवसैनिकांनी दिल्या असून संजय राऊतांनी चिथावणी करणारे टवि्ट केले होते असेही राणा दाम्पत्यांनी दिलेल्या तक्रारीत नमुद केले आहे.
राणांच्या तक्रारीतील मुद्दे
- आमच्या जीवाला धोका झाल्यास मुख्यमंत्री, संजय राऊत, अनिल परब जबाबदार
- संजय राऊतांनी ट्विट करीत चिथावणी दिली
- शिवसेनेने आमच्याविरुद्ध कट रचला
- शारीरीक नुकसान होईल अशी स्थिती निर्माण केली गेली