जनअदालत संस्थेची ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे मागणी
पुणे – जिल्ह्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयात वकिलांना दस्त नोंदणी करण्यास जाताना अथवा येताना अटकाव करण्यात येऊ नये, अशी मागणी जनअदालत संस्थेतर्फे ग्रामीण पोलीस अधीक्षकांकडे करण्यात आली आहे.
सध्या लॉकडाउनचा काळ सुरू आहे. मात्र, महसुली उत्पन्नाची बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने दुय्यम निबंधक कार्यालयातील कामकाजाला परवानागी दिली आहे. 15 मे 2020 च्या जिल्हधिकारी यांच्या परिपत्रकाअन्वये काही कार्यालये वगळता सर्व दुय्यम निबंधक कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र, वकिलांना दस्त नोंदणी करताना आंतर तालुक्यात जाताना त्यांची अडवणूक सुरू झाली आहे, पोलीस त्यांच्या पास किंवा कागदपत्रे मागत आहेत.
आंतर तालुक्यात जाताना अथवा जिल्ह्यात कोठे ही दुय्यम निबंधक कार्यालयात जाताना वकिलांना अटकाव करू नये. बार कौन्सिलच्या अथवा स्थानिक वकील बार संघटनेच्या ओळख पत्रावर वकिलांना सोडण्यात यावे, अशी मागणी संस्थेचे अध्यक्ष अॅड. सागर नेवसे, अॅड. राणी कांबळे , अॅड. अनिशा फणसाळकर, अॅड. नरहर कुलकर्णी, अॅड. स्वरूप कुमार चौधरी यांनी केली आहे.