‘ मित्र आणि मैत्री ’’ (लेखक -डॉ.दत्ता कोहिनकर)
रविवारचा दिवस होता, निवांत सोफ्यावर पेपर वाचत बसलो होतो. तेवढयात रेडियोवर एक सुंदर गाणं लागलं.
‘‘*कुछ भी नही रहता दुनिया मे लोगो, रह जाती है दोस्ती ।
जिंदगीका नाम दोस्ती, दोस्ती का नाम जिंदगी ॥’’
खरोखर मित्रांशिवाय आयुष्य जगणं कठीण असतं. एक घटना आदित्य व शंकर दोघेही जिवलग मित्र. आदित्यचे सामाजिक प्रस्थ व आर्थिक स्थिती चांगली असल्याने व गर्विष्ट स्वभावामुळे तो नेहमी शंकरवर हुकमत गाजवायचा. बघता-बघता दिवस बदलले. शंकर वडिलोपार्जित जमिनींच्या व्यवहारामुळे कोटयाधीश झाला. त्याचेही सामाजिक प्रस्थ वाढले.एकदा आदित्य व शंकरमध्ये जोरात भांडण झाले. शंकरनेही त्यास प्रत्युत्तर दिले. आदित्यने रागाच्या भरात शंकरला अपशब्द वापरून त्याचा मोबाईल नंबर डिलीट केला.
काही दिवसानंतर आदित्यला एक मेसेज आला, ‘मित्रा कसा आहेस, तब्येतीची काळजी घेत जा.’ आदित्यकडे फोन नंबर नसल्याने त्याने रिप्लाय केला.Who are you ? शंकरला हा मेसेज मिळताच त्याने आदित्यला फोन केला व तो म्हणाला, काय रे तुला How चे स्पेलिंग पण नीट लिहिता येत नाही का ? चुकून How च्या ऐवजी Who टाईप झाले बघ. आदित्य आजारी आहे हे कळताच शंकर त्यांच्या घरी गेला. त्याने त्याला घट्ट मिठी मारून म्हटले, I Love You , खरोखर मित्रांनो खरे मित्र तोडता येत नाही. ते चुकीच्या मेसेजचे देखील चांगलाच अर्थ काढतात. प्रत्येकाला आपल्या भावभावना, सुख-दुःख व्यक्त करण्यासाठी मित्र-मैत्रीणींची आवश्यकता असते.
आजच्या वाढत्या गर्दीत, स्पर्धेत माणूस आत्मकेंद्री झाल्यामुळे मैत्रीला ग्रहण लागले आहे. आत्मकेंद्री होऊन मनुष्य स्वतः अधिकाराने, पदाने, संपत्तीने मोठा होत आहे. पण जिवाभावाचे दोस्त मात्र आज दूर जात आहेत. वरवरच्या गाठीभेटी, हसणे-खिदळणे, मतलब साधण्यासाठी पाटर्या, खोटी स्तुती, खाणे-पिणे अशा तोंड देखल्या उपक्रमाला आज उत आला आहे. ‘ ओठात एक आणि पोटात एक ’ या जुन्या म्हणीचा अर्थ आज प्रत्यक्षात दिसून येत आहे.
पुर्वीच्या काळी जीवाला जीव देणारे दोस्त आज राहिले नाहीत. आज दोस्त एकमेकांच्या गाडीवर खांदयावर हात ठेवून असतात. पण त्यांची मने मात्र एकमेकांपासून दूर असतात. आज जवळचा मित्र आपल्यापेक्षा वरचढ झाला त्याची सर्वांगीण प्रगती दिसू लागली तर मनात आकस निर्माण करणार्या मित्रांची संख्या वाढू लागली आहे. मित्राकडून जास्तीत जास्त कसा लाभ मिळवता येईल या विचारांनी मैत्रीला संकुचित केले आहे. एकेकाळी एकमेकांवर प्रेमाची उधळण करणारे मित्र आज एकमेकांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणाले होते ‘‘भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे.’’ भगवान बुद्धांनी मनाचा मुळ स्वभाव सांगताना अनंत मैत्री, करूणा, मुदिता, उपेक्षा यावर भर दिला होता. निरागस मैत्री ही मनाला प्रसन्न करते, मन मोकळे करते. खर्या मैत्रीत कसलेच गणित व जमाखर्च नसतो ती लाभाविण केली जाणारी प्रीत असते. खरी मैत्री उघड-सरळ व पारदर्शक असते. ती लपत नाही. जेथे लाचारी नसते तेथेच घट्ट मैत्रीचे अधिष्ठान लाभते. कृष्ण व सुदामा, कृष्ण व अर्जुन ही मैत्रीची उत्तम उदाहरणे आहेत.
धनवंताला खूप मित्र असतात पण ते स्वार्थापोटी. आईचे प्रेम, बहिणीची माया, वडिलांचा आधार या भावनिक संबंधाचे सार मैत्रीत सामावलेले असते. मैत्री ही स्त्री-पुरूषात ही असू शकते पण त्यात पारदर्शकता, शुध्दता व लक्ष्मणरेषा ठेवल्यास त्या मैत्रीला नैतिकतेचा स्पर्श होऊन जीवनाच्या मनमोहक वेलींवर सुंदर फुले बहरतात. मैत्री हा ताणतणावापासून दूर राहण्याचा राजमार्ग आहे. भगवान बुध्द म्हणतात, ‘‘कल्याणमित्र मिळाला कि आयुष्याचे सोने होते.’’ रामदासस्वामी म्हणतात ‘‘मना तुचिरे एक क्रिया करावी, सदा संगती सज्जनांची धरावी’’ ज्यामुळे ज्यांना कल्याणमित्र असतील त्यांनी ते जपावे, ज्यांना नसतील त्यांनी ते शोधावेत. मित्रांशिवाय जगण्याची वेळ शत्रूवरही येऊ नये.